Pages

Showing posts with label पोलीस. Show all posts
Showing posts with label पोलीस. Show all posts

Wednesday, 26 June 2013

चोरटे ‘सापळा’ रचतात, मग पोलीस का नाही?

‘त्या’ महिलांना पकडण्यासाठी पोलीसही हतबल

‘त्यांची’ भिरभिरणारी नजर शोधत असते दागिण्यांनी लदबदलेले ‘सावज’. एकदा का ते नजरेस पडले की त्याचा पाठलाग सुरू होतो. पाच सहाच्या संख्येत असलेल्या ‘त्या’ अगदी गर्दीच्या ठिकाणी ते सावज गाठतात. त्याच्या अवतीभवती गराडा घालतात. एकदा का ‘पाश’ आवळला की मग थेट मानेवर ‘झडप’ घालुन दागिने लंपास करतात. गराडा अशा पद्धतीने घालण्यात येतो की समोरच्या व्यक्तीला ती बाब लक्षात आली तरी हालचाल करता येऊ नये. लगेच त्या टोळीतील अन्य साथिदार दागिने घेऊन निघुनही जातात. म्हणजे कोणी आरोप केलाच तर ‘आमची झडती घ्या’ असे म्हणायला त्या मोकळ्या. ही परिस्थिती आहे जवळजवळ प्रत्येक बसस्थानक व वर्दळीच्या परिसरातील. घाटंजीच्या बसस्थानकावरही असे प्रकार आता ऐकीवास येत आहेत. सापळा रचुन दागिने लंपास करणा-या महिलांची टोळी सध्या शहरात सक्रीय आहे. लग्नाचा हंगाम असल्याने दागिने घालुन जाणा-या महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र अनेक घटना पोलीस स्टेशन पर्यंत जातच नाहीत. अन कुणी तक्रार द्यायला गेलेच तर पोलीस, ‘वस्तु मिळणार नाही अन तुम्हालाच त्रास होईल’ असे गोंडस कारण सांगुन अशा तक्रारी धुडकावुन लावतात. 
चोरट्या महिलांनी पद्धतशीरपणे सापळा रचुन मौल्यवान दागिने लंपास केल्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र सहज लक्षात येणा-या अशा टोळ्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी कधी सापळा रचल्याचे अगदी दुर्मिळच. ज्या प्रमाणे पोलीस ईतर गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचतात त्याच प्रकारे अशा टोळ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करणा-या युवकांपेक्षाही या महिलांच्या कारवाया जास्त आहेत. मात्र त्याचा उहापोह होत नाही. 
अनेकदा प्रवाशी अशा महिलांना पकडतात. मात्र केवळ तक्रार नसल्याच्या कारणावरून अशा टोळ्यांना सोडून दिल्याचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत. बसस्थानकावर पोलीस कर्मचा-याची नेमणुक असते. मात्र घाटंजीच्या बसस्थानकावर कधीही पोलीस कर्मचारी आढळत नाही. नेहमीच घडणा-या अशा चोरीच्या घटना व त्याचा क्वचीतच लागणारा तपास यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
साभार- सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          


Wednesday, 27 March 2013

घाटंजीत ‘ड्राय डे’ ला वाहतो दारूचा महापुर

छुप्या मार्गाने होते दारू विक्री
पोलीसांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
धुलिवंदन व तत्सम दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. मात्र असे असले तरी घाटंजी शहर व तालुक्यात ‘ड्राय डे’ ला सुद्धा मागेल त्याला देशी विदेशी दारू उपलब्ध होते. अवैध व्यवसायाला पोषक ठरत असलेल्या घाटंजी तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे हा प्रकार आजतागायत सुरू आहे. ‘ड्राय डे’ ला अवैध दारू सोबतच परवाना प्राप्त देशी व विदेशी दारूची दुकाने बाहेरून बंद तर आतून सुरू असतात. बार मध्ये काम करणारे ‘बंद’ दुकानाबाहेर उभे असतात. मद्यशौकीन हळुच त्यांचेजवळ जाऊन हातात पैसे ठेवतात. मागील दारातून जाऊन त्यांना अवघ्या दोन मिनिटात मागणीनुसार दारू पुरविण्यात येते. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र या दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे कोणीही या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत नाही. तर पोलीस मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. घाटंजी शहरातील आठवडी बाजार, यवतमाळ रोड, खापरी नाका या भागातील काही बारमधुन ‘ड्राय डे’ ला छुप्या मार्गाने दारूविक्री होते हे सर्वश्रुत आहे.
धुलिवंदनाच्या सणाला दारू पिण्याचा विचित्र पायंडा गेल्या काही वर्षात पडल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्याचा हा उत्सव आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासुन याला विकृत स्वरूप येऊ लागले आहे. मद्यधुंद अवस्थेत अश्लिल हातवारे करीत धिंगाणा घालणे म्हणजेच रंगपंचमी असाच समज काही तळीरामांनी करून घेतला आहे. रंगपंचमी दारू पिऊन व मांसाहार करून एन्जॉय करण्याची एक फॅशन पडत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने युवावर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. दारूची दुकाने, बार बंद ठेवण्याचा आदेश असतानाही अनेक जण पिऊन झिंगताना दरवर्षी दिसतात.  होळी हा एकच सण नव्हे, तर प्रत्येक सणाला पिऊन धिंगाणा घातल्याशिवाय तो सण साजरा करायचाच नाही, असा निश्चय केलेले तळीराम दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूच्या धुंदीत जिवघेण्या वेगात दुचाकी चालविणे, सायलेंसर काढुन ध्वनी प्रदुषण करणे, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत नाचणे, मारामारी व भांडणाने रंगोत्सवाचा बेरंग होत असताना पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. एखादा गंभिर प्रकार घडल्यावरच त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध घालणे सोयीस्कर ठरणार नाही का याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
साभार :- देशोन्नती 

Sunday, 17 March 2013

पोलीसच बनले अवैध व्यवसायाचे ‘पालनहार’


गेल्या काही वर्षांपासुन घाटंजी तालुका अवैध व्यावसायीकांसाठी अत्यंत सुरक्षीत परिसर झाला आहे. कारण ज्यांच्या खांद्यावर या व्यवसायांना पायबंद घालण्याची जबाबदारी आहे ती पोलीस यंत्रणाच जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. जणु काही पोलीसच या अवैध व्यवसायांचे पालनहार आहेत की काय असे वाटण्या एवढी गंभिर परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे या गोष्टीची साक्ष देतात. तर क्लबच्या गोंडस नावाखाली चालणा-या जुगार अड्ड्यांवर महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. पारवा पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू व मटका व्यवसायाची भरभराट आहे. गेल्या वर्षभरात घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन परिसरात विषेश शाखेच्या पथकाने अनेकदा छापे मारले. मात्र स्थानिक पोलीसांनी आजवर कोणताही मोठा छापा मारल्याचे ऐकीवात नाही. केवळ विशेष शाखेच्या छाप्यानंतर औपचारीकता म्हणुन तुरळक कार्यवाही दाखविण्यात येते. घाटंजी शहरात उघडपणे मटका अड्डे चालतात. कन्या शाळा, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, घाटी यासह विवीध परिसरात अगदी सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी हे अड्डे चालतात. मात्र पोलीसांना त्यावर कार्यवाही करण्याची गरज वाटत नाही. तालुक्यातील पारवा, चिखलवर्धा, घोटी, शिवणी, जरूर यासह ग्रामिण भागात कुठे अवैध दारू तर कुठे मटक्याचे प्रस्थ निर्माण झाले आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन, पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध असुनही अवैध व्यवसायांवर पोलीसांचे नियंत्रण नसेल तर ते जाणिवपुर्वकच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील तिथल्या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याचे सुतोवाच पोलीस अधिक्षकांनी केले होते. मात्र घाटंजी तालुक्यातील परिस्थितीकडे पाहता तालुक्याला यामध्ये ‘सुट’ तर देण्यात आली नाही ना असा संभ्रम निर्माण होईल एवढी गंभिर परिस्थिती आहे. ठाणेदार जगमोहन जोहरे यांच्या काळात अवैध व्यावसायीकांवर निर्माण झालेली जरब पुन्हा कधी होईल याची नागरीक वाट पाहात आहेत. 
साभार :- देशोन्नती 

मुलांमध्ये संस्कार रूजवा, गुन्हेगारी कमी होईल

पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मांचे महिलांना आवाहन




मुलांवर लहानपणापासुनच चांगले संस्कार केले तर एका सुदृढ समाज निर्माण होऊन गुन्हेगारी कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. येथिल पोलीस स्टेशनमध्ये आयोजीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुर्वी मुलाने वाईट कृत्य केले तर आई वडील त्याला शिक्षा देत होते. मात्र सध्याच्या काळात परिवार अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा गुन्हा लक्षात न घेता त्याला पाठिशी घालतात. तो कायद्याच्या चौकटीत सापडू नये यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मानसिक बळ मिळते व तो आणखी मोठा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. 
त्यामुळे महिलांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रूजवावे असे आवाहन त्यांनी केले. आईवडीलांनी वेळीच मुलांना शिक्षा केली तर मोठे गुन्हेगार निर्माणच होणार नाहीत असे ते म्हणाले. मुलींनी भारतिय सभ्यतेची जाणिव ठेवुन आपल्या आईवडीलांना दुखावेल असे कृत्य करू नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. कुणी छेड काढली व कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर थेट आत्महत्येची पळवाट न स्विकारता त्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी. ९० टक्के गुन्हे केवळ दारूमुळेच होतात. गावातील महिलांनी ठरविल्याशिवाय दारूबंदी होऊ शकणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, नगराध्यक्ष किशोर दावडा, डॉ.विणा खान, जि.प.सदस्य उषा राठोड, अनुपमा दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शुभांगी तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. समिक्षा भोयर या विद्यार्थीनीने बेटी बचाओ विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पायल जेंगठे या विद्यार्थींनीने आपल्या भाषणातून सद्यस्थितीत स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर महिला दिन साजरा करणे किती औचित्याचे आहे असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनाच कोड्यात टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी केले. संचालन मंजुषा तिरपुडे व आभार प्रदर्शन जमादार अशोक भेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वस्तरातील महिला, शालेय विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

Friday, 1 February 2013

घाटंजी सेना तालुका प्रमुखासह सात जणांविरूद्ध वाटमारीचा गुन्हा

ग्रामसेवक व पं.स. लेखापालाचा समावेश
राजकीय दबावातून कार्यवाही झाल्याचा आरोप

रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याच्या कारणावरून टिटवी येथिल ईसमास शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात व्यक्तींनी  मारहाण करून त्यांच्या जवळील मुद्देमाल लुटल्याची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला करण्यात आली. यावरून शिवसेना तालुका प्रमुख भरत माणिक दलाल, महेंद्र माणिक दलाल, ग्रामसेवक बापु खंडूजी पाटील, घाटंजी पं.स.मध्ये कार्यरत लेखापाल जगदिश अंबादास गंधरवार, किसन संभाजी भोजेवार, अशोक संभाजी भोजेवार, अर्जुन शंकर धोत्रे यांचे विरूद्ध अप.क्र.१९/०१३ कलम ३४१, १४७, १४८, १४९, ३२६, ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार या सात ईसमांनी फिर्यादी गजानन कर्णुजी शेंडे व गोपाल उमरे यांची दुचाकी अडवुन त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात हे दोघे जखमी झाले. त्यापैकी गोपाल उमरे यांचेवर यवतमाळ येथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात आरोपींनी कथितपणे फिर्यादी जवळील त्यांच्या जवळील १२ ग्रम वजनाची सोन्याची साखळी, दोन मोबाईल व १० हजार रूपये रोख हिसकावून घेतले. ही घटना येथिल पंजाबी लॉनजवळ दि.२८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता घडली. यातील जखमी व्यक्तींनी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाने या सातही आरोपींना २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवसेना पदाधिका-यांसह दोन शासकीय कर्मचा-यांवर थेट वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मारहाण व भांडणाचा मुद्दा समजण्यासारखा आहे. मात्र वाटमारी बाबत शंकेला वाव आहे. एरवी गुन्हा दाखल करतांना सरकारी वकीलांशी ‘सल्लामसलत’ करणा-या घाटंजी पोलीसांनी या प्रकरणी तडकाफडकी गुन्हा दाखल केला. टिटवी येथिल रोहयोच्या भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामसेवक पाटील यांचेसह एका अभियंत्याचे निलंबन झाले आहे. तर आता या प्रकरणामध्ये दोन कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे राजकीय ओढाताणीमध्ये आणखी किती कर्मचा-यांचा बळी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस बनले राजकीय हस्तक - शिवसेना
शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात जणांविरूद्ध हेतुपूरस्सरपणे कलम ३९५ अन्वये जी कार्यवाही करण्यात आली ती अन्यायकारक आहे. कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले. पोलीस एका राजकीय पुढा-याच्या ईशा-यावर काम करीत आहे. पोलीस राजकीय हस्तक झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी संतप्त प्रतिक्रीया शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर यांनी व्यक्त केली. या अन्यायाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येईल तसेच न्यायालयातही दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.
साभार :- देशोन्नती 

Sunday, 13 January 2013

माझ्या भावाचा अपघात नव्हे तर खुन झालाय

'त्या' घटनेतील मृतकाच्या भावाची एस.पी.कडे तक्रार

यवतमाळ घाटंजी रस्त्याने मुरली शिवाराजवळ अपघात सदृष स्थितीत अफरोजखाँ पठाण यांचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद असतांना पोलीसांनी कोणताही तपास न करता या घटनेला अपघात म्हणुन नोंद केली. त्यामुळे मृतकाचा भाऊ फिरोज शमिउल्लखॉं पठाण रा.पारवा यांनी हा अपघात नसुन पुर्वनियोजीत कट करून खुन करण्यात आल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
इमरानखॉं ताजखाँ पठाण, सलमा अफरोजखॉं पठाण, जावेदखॉं ताजखाँ पठाण, ताजखॉं सरदारखॉं पठाण, जमीलाबी ताजखाँ पठाण तसेच मृतकाचा मामा या कटात समाविष्ट असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
दि. ६ जानेवारी रोजी घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह ग्रामिण रूग्णालयात नेल्यावर देण्यात आली. तक्रारकर्त्याने हा अपघात नसुन खुन असल्याबाबतची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न केला सर्व नातेवाईकांनी हा खुन असल्याचे ठासुन सांगितले. मात्र ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्यांचेवर दबाव टाकुन अपघाताची नोंद केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. 
उल्लेखनिय म्हणजे मृतकाची पत्नी ही सुमारे १० महिन्यांपासुन भांडण करून वेगळी राहात होती. तिने पतीसह ईतर कुटूंबियांविरोधात तक्रारही केली होती. त्यानुसार त्यांचेवर ४९८ अ, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल असुन प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. घटनेच्या सुमारे ३ महिन्यांपुर्वी ईमरानखॉं ताजखाँ पठाण याने फोनवरून मृतकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मृतक पारवा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला असता तक्रार नोंदविण्यात आली नाही. असा तक्रारीत आरोप आहे. मृतक हा घटनेच्या दिवशी यवतमाळ येथे होता. मग दुसरे दिवशी त्याचे प्रेत मुरली गावाजवळ कसे सापडले? प्रेत रस्त्याच्या एका बाजुला पडलेले होते. दुचाकीची चाबी रस्त्यावर पडली होती. दुचाकीचे केवळ सायलेन्सर व मागील लाईट फुटले होते. मोबाईल घटनास्थळी आढळला नाही. घटनेच्या दिवशी त्यावर कॉल केला असता कोणी उचलत नव्हते. मृतकाच्या कपाळावर ठोसा मारल्याची खुण होती. तसेच अंगावर मारहाण केल्यासारख्या जखमा होत्या. एकंदरीतच सर्व परिस्थिती व कौटूंबीक वादाची पार्श्वभूमी यावरून हा खुन असल्याचा थेट आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. संबंधीतांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जर मृतकाच्या कुटूंबीयांचा या घटनेबाबत असा आरोप होता तर घाटंजी पोलीसांनी तेव्हाच यादृष्टीने किमान चौकशी का केली नाही? फिर्यादींना धाकदडप का करण्यात आली? घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये नेहमीच असे प्रकार घडत असतानांही वरिष्ठ का गप्प आहेत असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 10 January 2013

घाटंजी पंचायत समितीसाठी ‘सी.ई.ओं.’ चे आदेश कवडीमोल

भारत निर्माण गैरव्यवहार प्रकरणी अद्याप एफ.आय.आर.नाही
लाखो रूपयांच्या अफरातफरीपुढे अधिका-यांचे लोटांगण

तालुक्यातील काही ग्रामपंचायती अंतर्गत भारत निर्माण पाणी पुरवठा योजेनेमध्ये लाखो रूपयांची अफरातफर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार करणा-यांवर तडकाफडकी फौजदारी कार्यवाही करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर चौकशी होऊन ज्या ठिकाणी अफरातफर आढळली त्या पाणी पुरवठा समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर.नोंदविण्यात यावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी वारंवार पंचायत समितीला दिले आहेत. मात्र कुर्ली, अंजी (नृ.) येथिल पाणी पुरवठा समितीवर पंचायत समितीने अद्याप एफ.आय.आर. दाखल केला नाही. तसेच भांबोरा येथिल गैरव्यवहाराची चौकशीच थंडबस्त्यात आहे. उल्लेखनिय म्हणजे भांबोरा येथे भारत निर्माण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी चौकशी केली. लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असतांना सदर चौकशीत केवळ १६ हजार ९०० रूपये एवढीच वसुली पात्र रक्कम दाखविण्यात आली. त्यानंतर माजी पं.स.सदस्य सहदेव राठोड यांनी वरिष्ठांकडे पुन्हा तक्रारी केल्या. त्यानुसार १२ ऑक्टोबर २०११ रोजीच्या विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशावरून चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीने अद्याप काय चौकशी केली हे कोणालाच माहित नाही असे सहदेव राठोड यांनी सांगितले. तसेच लाखो रूपये गिळंकृत केलेल्यांवर केवळ गुन्हे दाखल करून लोकांना पाणी मिळणार का? त्यांचेकडून रकमेची वसुली कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये समितीच्या पदाधिका-यांनी १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार केल्याची बाब उपअभियंता, पांढरकवडा यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. या योजनेत अपहार झाल्याची तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली होती. माजी सरपंच व पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विलास बडगुलवार तसेच समितीच्या सदस्यांनी हा अपहार केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणाच्या चौकशीत व कार्यवाहीमध्ये प्रशासनाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी ३१ ऑक्टोबरला गटविकास अधिकारी घाटंजी यांना या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 
या प्रकरणात सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत असल्यानेच एफ.आय.आर.दाखल करण्यासाठी चालढकल करण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली आहे. पाणी पुरवठा समितीने एम.बी.रेकॉर्डवर सुद्धा खोडतोड केली असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday, 19 December 2012

दारू विक्रीच्या संशयातून पोलीसांचा साक्षगंधाच्या कार्यक्रमात गोंधळ


जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा संशय घेऊन घाटंजी पोलीसांनी भांबोरा येथे साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असतांना घरझडती घेतली. तसेच कुटूंबीयांना धाकदपट व मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ डिसेंबर रोजी भांबोरा येथिल प्रेमसिंग चव्हाण यांचे घरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यादरम्यान अचानक घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, बिट जमादार गुल्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बोकडे तिथे आले. ‘तुम्ही दारूचा व्यवसाय करता, त्यामुळे तुमच्या घराची झडती घ्यायची आहे’ असे सांगुन पोलीस घरात घुसले. झडती दरम्यान घरातील सामानाची फेकाफेक  केली. यावेळी साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी चव्हाण यांचे घरी पाहुणे सुद्धा आलेले होते. पोलीसांनी संपुर्ण घराची झडती घेतली. प्रेमसिंग चव्हाण यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तडकाफडकी उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकाराने घाबरलेले पोलीस तेथुन निघुन गेले. असे यशोदा प्रेमसिंग चव्हाण यांनी तक्रारीत नमुद केले आहे. उल्लेखनिय म्हणजे घरझडती मध्ये पोलीसांना काहीही गैर आढळले नसल्याची माहिती आहे. शिवाय ज्यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यांच्यावर यापुर्वी अशा प्रकारच्या व्यवसायात लिप्त असल्याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. मग पोलीसांनी अचानक अशी झडती घेण्याचे कारण काय? संपुर्ण तालुक्यात अवैध व्यवसायाचे नेटवर्क  व्यवस्थित सुरू आहे. अशा व्यवसायांची झडती पोलीसांनी अद्याप का घेतली नाही. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे पोलीसांना का दिसत नाहीत असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे. अवैध व्यावसायीकांना पोलीसांचा धाक वाटत नसला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आता पोलीसांचीच भिती वाटायला लागली आहे. यावर प्रतिक्रीया घेण्यासाठी ठाणेदार अंबाडकर यांचेशी संपर्वâ होऊ शकला नाही. 
साभार :- देशोन्नती  

Wednesday, 12 December 2012

बेपत्ता सपनाच्या पालकांचे अखेर देवालाच साकडे !


दिड महिन्यात पोलीस तपास शुन्य

बेपत्ता सपनाचा शोध घेऊन थकलेल्या पळसकर कुटूंबीयांनी पोलीस तपासातील अपयश बघता अखेर देवालाच तिला  वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अजनसरा येथिल भोजाजी महाराज देवस्थानाला जाऊन पळसकर कुटूंबीयांनी सपनासाठी नवस केला. सपनाच्या काळजीपोटी चिंतातूर तिचे आईवडील अजुनही आपल्या परिने शोध घेत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व सपना पळसकर बेपत्ता प्रकरण पोलीसांच्या दिरंगाईमुळे तपासशुन्य ठरले आहे. दस-याच्या दिवसापासुन चोरांबा येथिल सपना पळसकर ही चिमुकली बेपत्ता आहे. तर गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न १७ नोव्हेंबरला झाला. ग्रामस्थांनी पकडून दिलेले २ आरोपी व ईतर दोघे असे अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पलिकडे प्रकरण सरकलेच नाही. गेल्या विस दिवसांपासुन केवळ बयाण घेणे, गावोगावी तपास पथक पाठविणे अन फिर्यादी, वकील, पत्रकार यांची चौकशी यापलीकडे पोलीस तपास झाल्याचे दिसत नाही.
संशय हे पोलीसांचे प्रमुख शस्त्र. मात्र या प्रकरणात पोलीसांनी हे शस्त्रच म्यान केले की काय अशी परिस्थिती आहे. कारण पोलीस अधिक्षक, एस.डी.पी.ओ. व ठाणेदार यांनी सुरूवाती पासुनच या प्रकरणातील आरोपींवर साधा संशय घेतला नाही. त्यांच्या जवळ मुलगी नव्हतीच हिच गोष्ट पोलीस विश्वासाने सांगत आहेत. कदाचीत तसे असेलही. मग सपना कुठे आहे? प्रकरणातील आरोपींविषयी घटनेच्या दिवसापासुन पोलीसांना असलेली सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे. थातूर मातूर चौकशी करून सोडून देणे, जाणिवपुर्वक एकाच दिवसाचा पी.सी.आर, न्यायालयीन कोठडीत पाठवितांना आरोपींना ‘व्हर्टीगो’ ही आलिशान कार वापरण्याची देण्यात आलेली मुभा पोलीसांविषयी संशय निर्माण करण्यास पुरेसे आहे. 
केवळ प्रसार माध्यमे व विवीध संघटना यांचा दबाव आहे म्हणुनच पोलीस तेवढ्यापुरता तपास करीत असल्याचे दिसत आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विवीध आदिवासी संघटना, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, महिला कॉंग्रेस, यवतमाळ यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष दिले आहे. जनमानसात सध्या केवळ याच प्रकरणाची चर्चा आहे. मात्र तरिही तपास सुरू आहे यापलिकडे कोणतेही उत्तर पोलीस देऊ शकले नाहीत.
बेपत्ता सपना व गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई करणा-या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ते पोलीस स्टेशनला असतांना तपास योग्य रितीने होईल का? सध्याचे तपास अधिकारी भालचंद्र महाजन यांनाही अद्याप प्रकरणातील एकही धागा सापडला नाही. त्यामुळे केवळ दबाव आहे म्हणुन तपास करीत असल्याचे  दाखवायचे असा प्रकार तर सुरू नाही ना? याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर सपनाचा शोध लागणार का? व पैशाच्या लालसेने झपाटलेले गुप्तधन प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 5 December 2012

तंटेबखेटे निस्तरायला महापंचायत मग बेपत्ता सपनासाठी काय?

सपनाच्या निर्धन मायबापाचा सवाल

गुप्तधनासाठी नरबळी...माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार. मात्र पैशाच्या लालसेने तोंडाला पाणी सुटणा-या व चुकीने मनुष्य योनित जन्मलेल्या त्या लांडग्यांना त्याचे काय? अंधश्रद्धेचे भुत मानगुटीवर घेऊन ते एक चिमुकला जीव संपवायला निघाले होते. माणुसपण जीवंत असलेल्या ग्रामस्थांनी तो प्रकार हाणुन पाडला.
हे प्रकरण जेवढे घृणास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यानंतर झालेल्या घडामोडींनी संपुर्ण समाजाला कोड्यात टाकले आहे. एक आदिवासी समाजातील मुलगी दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. त्यातच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न उजेडात येतो. मात्र पोलीस एवढ्या गंभिर प्रकरणातही नेहमीची ‘रफादफा’ भुमिका घेतात. आधी तर आरोपी गुप्तधनासाठी गेलेच नव्हते असा पवित्रा पोलीस घेतात. पण प्रकरण अंगलट आल्यावर गुप्तधनाचा प्रयत्न कबुल होतो. मात्र बेपत्ता सपनाच्या बाबत सर्वच कानावर हात ठेवतात. खुनासाठी अपहरणाचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा, बेपत्ता मुलीचा नसलेला सुगावा व गुप्तधन प्रकरणातील पुढे न आलेले आरोपी अशी परिस्थिती असतानांही पोलीसांना केवळ एकाच दिवसाची कोठडी मिळवता येते. आरोपींच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर पोलीस गप्प बसतात. आरोपींना न्यायालयीन कोठडीत नेतांना खासगी वाहनातून नेण्यात येते. गुप्तधन प्रकरण हाणुन पाडणारे ग्रामस्थ, फिर्यादी, मुलीच्या आईला तक्रार लिहुन देणारे वकील, पोलीस तपासात मदत व्हावी या दृष्टीने वृत्तांकन करणारे पत्रकार या सर्वांची पोलीस सखोल चौकशी करतात. मात्र आरोपींचीही अशा प्रकरणी प्रसंगी पोलीसी खाक्या दाखवुन ऊलटतपासणी करायची असते ही गोष्ट सोयीस्कररित्या दुर्लक्षीत केल्या जाते. गुप्तधन शोधणा-या टोळ्यांमध्ये केवळ चार पाच सदस्य नसतात ही गोष्ट पोलीसांना सांगण्याची गरज नसावी. दस-याच्या दिवशी चोरांबा येथिल विज बंद होते, कोणीतरी डि.पी.वरील फ्युज काढुन ठेवतो. अन त्याच दिवशी सपना बेपत्ता होते. 
हा केवळ एक योगायोग की कटाचा भाग याचा तपास करणेही पोलीसांना गरजेचे वाटू नये का? फिर्यादीचे वारंवार बयाण घेऊन त्यातील विसंगती शोधण्यापलिकडे तपास गेलेला नाही. अशीच भुमिका राहिली तर यापुढे कोणी अशा घटनांमध्ये पोलीसांची मदत करायला पुढे येणार का?
पोलीस अधिक्षकांपासुन ते ठाण्यातील शिपायापर्यंत सर्वच याप्रकरणी नकारात्मक विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांना नेमके सिद्ध काय करायचे आहे? गुप्तधनाची घटनाच झाली नाही का? पण आरोपींनी तर त्यासाठीच गेलो होतो अशी कबुली दिली आहे. सपना नावाची चिमुकली बेपत्ता नाही का? जर या आरोपांrनी तिला नेले नाही तर मग ती कुठे आहे? या दोन्ही प्रकरणातील किमान एकतरी बाजु पोलीसांनी स्पष्ट करून त्यांचे अस्तित्व आहे हे दाखवायला नको का? असे प्रश्न आता जनसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघेंना पत्रपरिषदेत या विषयावर छेडल्यावर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा गंभिरतेने तपास करण्याचे आदेश दिले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. तालुका कॉंग्रेस मधील काही कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असल्याचीही चर्चा आहे. पण ते अद्याप चौकशीच्याही फे-यात आले नाहीत. ऊलट फिर्यादी व सपनाच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दडपणात आणल्या जात आहे. पोलीसांशी संबंधीत एक व्यक्ती पळसकर परिवाराला तुम्हाला मुलगी पाहिजे की पैसा असा प्रश्न विचारतो याचा अर्थ काय? घटनेच्या संशयास्पद तपासाची सुरूवात करणारे पोलीस अधिकारी अरूण गुरनूले तणावात का आहेत? हे सर्व प्रश्न तपासाबाबत संशय निर्माण करणारे आहेत.
सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकावे लागू नये यासाठी उद्या घाटंजी येथे महापंचायत आयोजीत केली आहे. तर संपुर्ण राज्याला सामाजीक न्याय देण्याची जबाबदारी असलेले ना.शिवाजीराव मोघे व जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले ना.नितिन राऊत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तरी दिड महिन्यांपासुन न्यायासाठी वणवण भटकणा-या त्या मातेला दिलासा मिळणार का? गरिब असल्याने दुर्लक्षीत असल्याची तिची खंत दुर होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 29 November 2012

गरिबाच्या लेकराले किंमत नसते काय?

‘सपना’च्या आईचा जळजळीत सवाल

‘कोण्या मोठ्या लोकायचं लेकरू कोनी नेलं असतं... तं सारेच्या सारे कामाले लागले असते. पन आता कोनालेच कायी घेनदेन नाई... गरिबाच्या लेकराची किंमतच नसते का? त्यायचा जीव गेला तरी दुनियेले काही फरक पडत नाही...’ चिंतातूर चेह-यावर ओघळणारे अश्रू पुसत चोरांब्याची शारदाबाई बोलत होती. तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता असलेल्या सपनाची ती आई. दिवसभर मजुरी केली तरच जेवणाची सोय होईल अशी बिकट परिस्थिती. मुलीच्या शोधासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने खायचे काय? असा प्रश्न पुढे असुनही दोन मुलांना कडेवर घेऊन सपनाचे आई वडील तिचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र सुरूवातीपासुनच पोलीस प्रशासनाच्या असंवेदनशिल व्यवहारामुळे ते हतबल झालेत. गोपाल व सौ.शारदा पळसकर हे दाम्पत्य घाटंजीलगत असलेल्या चोरांबा येथे कोलामपोडावर राहतात. त्यांना तिन अपत्य. सात वर्षांची सपना सर्वात मोठी त्यापाठोपाठ अपर्णा (३ वर्ष) व मंगल केवळ एक वर्षाचा. विजयादशमीचा तो सोन्यासारखा दिवस. या दिवशीच ‘सोन्यासारखी’ लेक बेपत्ता झाली ते पळसकर दाम्पत्याला कळलं सुद्धा नाही. कारण गावातच शारदाबाईचे माहेर. सपना कधी कधी आजीकडेच राहायची. त्यामुळे दस-याच्या दिवशी ती बेपत्ता झाल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही. सकाळी ती आजीकडेही नसल्याने तिची गावभर शोधाशोध सुरू झाली. आजुबाजूच्या जंगलातही सर्वांनी मिळून शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारणा झाली. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर २५ ऑक्टोबरला पळसकर दाम्पत्याने पोलीस स्टेशन गाठले. पण सुरूवातीला तक्रार घेण्यासच टाळाटाळ करण्यात आली. आधी तुम्ही शोध घ्या... आम्ही देखिल प्रयत्न करतो... तक्रार करू नका. असे गोड बोलुन त्यांची बोळवण करण्यात येत होती.
जेव्हा तिच्या पालकांनी तक्रारीचा आग्रह धरला तेव्हा त्यांना धाकदपट करण्यात आली. तेव्हाही ते न जुमानल्याने अखेर बेपत्ता असल्याची नोंद घेऊन पोलीसांनी कागदी सोपस्कार केले. पण तक्रारीची पोच देण्यास चक्क नकार देण्यात आला. महिनाभर जिकडेतिकडे भटकत असलेल्या पळसकर दाम्पत्याच्या कानावर जेव्हा मुरली येथिल घटना पडली तेव्हा त्वरीत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. आपली सपना तिच तर नसेल ना या भितीने त्या मायमाऊलीच्या काळजाची काय अवस्था झाली असेल ते अकल्पनीयच. 
पोलीस मात्र ती सपना असेल असा संशय व्यक्त करून तपास करण्याच्या मानसिकतेत नसल्याने मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने पळसकर दाम्पत्याने थेट ‘एस.पी.’ साहेबांना गाठले. पण ते तर गुप्तधनासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा नव्हे, घटनास्थळी मुलगी असणे शक्यच नाही, ती तुमचीच मुलगी असेल हे कसे म्हणायचे? असे प्रतिप्रश्न करायला लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. साहेबांनाही आमच्यावर विश्वास बसला नाही असे निराश चेह-याने शारदाबाईने सांगितले. 
घाटंजी पोलीसांविषयी कोलामपोडावर प्रचंड संताप असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ‘ठाणेदारानं डब्बे भरून घेतले म्हनुनच त्यायचे हात बांधुन असंन’ अशा शब्दात ग्रा.पं.सदस्य यशोदा मेश्राम यांनी पोलीस तपासावर आपली नाराजी व्यक्त केली. गावात यापुर्वी अशी घटनाच घडली नसल्याचे गावकरी सांगतात. सात वर्षांची मुलगी जाणार तरी कुठे? अन ते ही या छोट्याशा गावातून? शंकेला नक्कीच वाव आहे. पण हे पोलीसांना कोण सांगणार? ते केवळ या प्रकरणात आपण सुरक्षीत राहावे यासाठी कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त आहेत तर निवडणुकीच्या वेळी मिरवणारे राजकारणी आपल्या ‘सग्या सोय-यांना’ वाचविण्याच्या प्रयत्नात हे प्रकरणच दडपण्यासाठी निघालेत. मन सुन्न करणा-या या बिकट परिस्थितीत एक चिमुकला निष्पाप जीव मात्र कुठे असेल याच प्रश्नाने संवेदनशिल माणसाच्या मनाचा ठाव घेतलाय.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 28 November 2012

आबा तुमच्या पोलीसांचा हा असा कसा तपास ?



गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाला आठवडा लोटलाय. तर चोरांब्याची ‘सपना’ तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता आहे. गुप्तधन प्रकरणातील फिर्यादी पोटतिडकीने सांगतोय की, मी एका बालकाची किंकाळी ऐकली. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे देखिल हा गुप्तधनासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट करीत आहेत. बेपत्ता मुलीच्या पालकांची जिकडे तिकडे उपाशीपोटी भटकंती सुरू आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांनी तपास गांभिर्याने घ्या असे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमे घटनेच्या  वास्तविकतेवर प्राधान्याने लक्ष वेधत आहेत. या सर्व खटाटोपात पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या नावाखाली केवळ  ‘तपासनाट्य’ करीत असल्याचे दिसत आहे. ही घटना गावातील दोन गटातील राजकारणाचा भाग आहे. तर कधी मारहाण केल्याने आपल्यावर अ‍ॅट्रोसिटी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र बेपत्ता मुलगी व गुप्तधनासाठी नरबळीच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलीस तपास ‘शुन्य’ आहे. कोणत्याही स्पष्ट निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. गेल्या आठ दिवसात केवळ फिर्यादी व ग्रामस्थांचे बयाण घेण्यापलिकडे पोलीस तपास गेला नाही. या दरम्यान फिर्यादी विजय चव्हाण याची किमान दहा वेळा चौकशी झाली आहे. त्याला चार ते पाच वेळा घटनास्थळी नेण्यात आले. तर घटनेतील आरोपी व संशयीतांपैकी कुणालाही घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले नाही हे विषेश. अपहरण व हत्येचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी पोलीसांना केवळ एकाच दिवसाचा ‘पीसीआर’ मिळाला तेव्हाच पोलीसांना या प्रकरणात नेमके काय करायचे आहे हे लक्षात आले. चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांना पाचवा आरोपी शोधण्या ऐवजी पोलीस वारंवार फिर्यादीलाच पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लावत आहेत. एवढेच काय तर पत्रकारांनाही ही बातमी तुम्हाला कोणी दिली ते आम्हाला सांगा असे म्हणण्यापर्यंत पोलीसांची मजल गेली आहे. मात्र या घटनेतील संशयीत कोण कोण आहेत याची संपुर्ण माहिती तालुक्यातील ‘शेंबड्या’ पोरांनाही आहे. मग पोलीस या प्रकरणात त्यांना का दुर्लक्षीत आहेत?  या प्रकरणाच्या सुरूवाती पासुनच तपास अधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे. प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले, पोलीस उपनिरिक्षक राऊत यांनी या आठवडाभरात आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचेच प्रयत्न केलेत. माध्यमांनी त्यावर वेळोवेळी प्रकाशही टाकला आहे. त्यानंतर तपास हाती घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन हे सुद्धा तशाच कार्यपद्धतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांची सुद्धा या प्रकरणात ‘नकारात्मक’ भुमिकाच दिसत आहे. असे असतांना नि:पक्ष तपास होईल तरी कसा? त्यामुळेच राज्याचे गृहमंत्री ना.आर.आर.पाटील तरी या गंभिर प्रकरणात जातीने लक्ष घालुन पोलीस दलाबद्दल जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप दुर करण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. एका गंभिर प्रकरणात पोलीसांच्या या ‘उरफाट्या’ तपासाबद्दल तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 21 November 2012

अखेर गुप्तधन प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल

श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच  





गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली. 
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ  राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे.  या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.  या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 


Tuesday, 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

Sunday, 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 15 September 2012

आठवडाभरापासुन बेपत्ता युवकाच्या तपासात पोलीसांना यश नाही

घाटंजीवासियात तिव्र संताप

गेल्या आठवडाभरापासुन बेपत्ता असलेल्या यश बाबाराव लिंगणवार याच्या प्रकरणात पोलीस कमालीचा दुर्लक्षीतपणा करीत असुन अजुनही त्या युवकाचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या आरोपी युवकांच्या तपासणीतूनही काहीही निष्पन्न झाले नसल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आठ दिवसांपासुन यशचा ठावठिकाणा पोलीसांना लागलेला नाही. या प्रकरणात पोलीस तपासात अजिबात गांभिर्य नसुन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. यश हा यवतमाळ येथिल बाजोरीया नगरातून बेपत्ता झाला आहे. तो मुळचा घाटंजी येथिल रहिवासी आहे. त्यामुळे घाटंजी वासियांमध्ये पोलीस तपासाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. घाटंजी येथिल नाभिक संघटना तसेच व्यापारी संघटना याप्रकरणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
साभार :- देशोन्नती   

Tuesday, 11 September 2012

दारू पिण्यास १० रू मागितले म्हणुन निर्घुण खुन



दारू पिण्यासाठी दहा रूपये मागितले म्हणुन एकाने लाकडाच्या मोठ्या दंडूक्याने महादेव जयवंत मेश्राम (४५) याचा निर्घुण खुन केला. तालुक्यातील शिवणी पोडावर आज सकाळी वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. याबाबत माहिती अशी की, मृतक मारोती भिमा कोवे याने आरोपी महादेव जयवंत मेश्राम (४०) यास दारू पिण्यासाठी दहा रूपये मागितले. यातुनच दोघांमध्ये वाद त्यानंतर झटापट झाली. आरोपीने बाजुलाच पडून असलेल्या लाकडाच्या दांडक्याने मारोती कोवेच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे मृतक जागीच कोसळुन गतप्राण झाला. पोलीसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले करीत आहे.
साभार :- देशोन्नती