Pages

Showing posts with label नरबळी. Show all posts
Showing posts with label नरबळी. Show all posts

Saturday, 25 May 2013

अघोरी अंधश्रद्धेनेच घेतला चिमुकल्या सपनाचा बळी

देवीला प्रसन्न करण्यासाठी चालविला गळ्यावर सुरा 
प्रसाद म्हणुन प्राशन केले सपनाचे रक्त
मामा, आजोबा, आत्याच निघाले आरोपी 




घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना पळसकर नरबळीप्रकरणाचा अखेर पर्दापाश झाला असून गावात शांतता राहावी यासाठी सपनाचा मामा, आजोबा, आत्या आणि गावातील काही शेजार्‍यांनीच तिचा नरबळी देण्यात आल्याचे अखेर पोलिस तपासात उघड झाले आहे. दहा लोकांनी अत्यंत क्रूरपणे तिचा नरबळी देत तिचे रक्त प्रसाद म्हणून वाटल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपना पळसकर ही नवरात्र सुरू असताना २३ ऑक्टोंबर २0१२ रोजी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरविल्याची तक्रार २४ ऑक्टोंबरला घाटंजी पोलिस ठाण्यात तिच्या आईवडिलांनी दिली. तेव्हापासून पोलिस याप्रकरणाचा तपास करीत होते. परंतु सात महिन्यात तपासात फारशी प्रगती न झाल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तर लोकांकडून माहिती मिळावी म्हणून ५0 हजाराचे बक्षिसही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे यांनी जाहीर केले होते. अखेर सपनाची कवटी, हाडे आणि फ्रॉक चोंरबा येथील जंगलात गुराख्याला २२ मे २0१३ रोजी आढळून आले. तिच्या शरीराचे अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणी पोलिसांनी सपनाचे आजोबा पुनाजी आत्राम, मामा देविदास आत्रात आणि या प्रकरणाची मास्टरमाईंड यशोदा मेर्शाम हिला अटक केली असून तपासकामी आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. मनोज उर्फ लाल्या वसंता मेर्शाम यांने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच दुर्गा शिरभाते या महिलेच्या अंगात देवी येते. देवीने 'सपनाचे रक्त द्या, त्याशिवाय गावात शांतता नांदणार नाही', असे दुर्गाला सांगितले. दुर्गाने याबाबत आपल्या आईस म्हणजे यशोदा मेर्शाम हिला सांगितले. यशोदा मेर्शाम हिने गावातील काही लोकांना याबाबत माहिती दिली. शिवाय नरबळी देण्याची योजना आखली. 
त्यासाठी यशोदा मेर्शाम हिने वेगवेगळय़ा तीन बैठका घेऊन त्यात नरबळी देण्याची योजना आखली. त्यानुसार २३ ऑक्टोंबरला यादव टेकाम याने सपनाला बिस्किट आणण्यासाठी दहा रुपये दिले. ती दुकानात जात असताना ईलेक्ट्रिशिएन असलेल्या मोतीराम मेर्शाम यांनी लाईट बंद केले आणि अंधाराचा फायदा घेत यादव टेकाम याने सपनाचे तोंड दाबून तिला यशोदा मेर्शाम हिच्या घरी नेले. त्यानंतर एक तासाने देवीची पूजा करून सपनाचा नरबळी देण्यात आला. सपनाची मान अक्षरश: धारदार चाकूने कापून रक्त एका भांड्यात जमा करण्यात आले. नरबळी दिल्यानंतर तिचे रक्त गावातील देवीला वाहण्यात आले आणि प्रसाद म्हणूनही वाटण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह यशोदा मेर्शाम हिच्या स्नानगृहात पुरण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांनी तो मृतदेह तेथून काढून गावाबाहेर ४00 मीटर अंतरावर पुरण्यात आला. 
पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गावातच डेरा टाकल्याने पुन्हा तो मृतदेह बाहेर काढून चोरंबा येथील जंगलात पुरण्यात आला. तिच्या शरीराची कवटी, हाडे आणि फ्रॉक सापडल्याची माहिती गुराख्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी मोतीराम मेर्शाम, शेडकी बुडा मेर्शाम, यादव टेकाम, पुनाजी आत्राम, दुर्गा शिरभाते यांना तपासकामी ताब्यात घेतले असून यशोदा मेर्शाम व मनोज आत्राम व देविदास आत्राम यांना अटक करण्यात आली आहे.



Click On The Image To View In Full Size



Wednesday, 12 December 2012

........यापुढे सपनाच्या शोधासाठी एस.पी. व जिल्हाधिका-यांना घेराव

न्याय द्या मोर्चामध्ये निरंजन मसराम यांचा ईशारा


गेल्या दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलीसांना घेता आला नाही. तर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न करणा-या व पळुन गेलेल्या आरोपीनाही पोलीस शोधु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा धुसर झाल्याने पुढची दिशा म्हणुन आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना आदिवासी बांधवांना नाईलाजास्तव घेराव घालावा लागणार असा ईशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांनी आज घाटंजी येथे दिला.
ते गों.ग.पा.तर्फे घाटंजी तहसिलवर काढण्यात आलेल्या न्याय द्या धडक मोर्चाला संबोधीत करत होते. त्यांनी पुढे सांगितले की, सपनाचे आईवडील मजुरी करतात. ते परिस्थितीने गरिब आहेत. सपना ही चिमुकली बालिका आहे. त्यामुळे तिचे अपहरण खंडणी अथवा अनैतिक कारणासाठी झाले असे म्हणता येणार नाही. ती गावातून साणासुदीच्या दिवशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्यावेळी संशयास्पदपणे गावातील विज गेली होती. तसेच तिला पळवुन नेत असतांना कदाचीत ती ओरडू नये म्हणुन तिला खाण्यातून अथवा प्रसादातून गुंगीचे औषध दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान दि.१७ ऑक्टोबर रोजी मुरली येथे रात्रीच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या एकहात्या मारोती मंदिराजवळ एका बालिकेचा किंकाळीचा आवाज विजय चव्हाण या नागरिकाने ऐकल्यावर गावकरी तेथे धावुन गेले. त्यामुळे गुप्तधन शोधणा-या टोळीतील दोन आरोपी सापडले. आता चार आरोपी अटकेत आहेत. पोलीसांनी सपना पळसकर हिच्या अपहरणाचा व गुप्तधनाच्या प्रकरणाचा परस्पर संबंधाची शक्यताही तपासली नाही. या घटनेतील अनेक अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचाही शोध घेण्याची मानसिकता पोलीसांमध्ये दिसत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी बांधवांवर कितीही अन्याय झाला विंâवा त्याला कापुन टाकण्याचाही प्रयत्न झाला तरी तो पेटून ऊठणार नाही ही भावना तुमच्याप्रती एकप्रकारची रूढ झालेली आहे. म्हणुन आदिवासींवरील अन्यायाला शासनही गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारात क्रांतीची ठिणगी टाकुन न्यायासाठी पेटून ऊठले पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. मतदार संघातील आपलेच आदिवासी नेते व सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे दोन महिन्यात एकदाही सपनाच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. यावरून त्यांना आदिवासी बांधवांविषयी किती कळवळा आहे हे दिसुन येते. एवढ्या गंभिर घटनेबद्दल त्याना गांभिर्य नसल्याबद्दल मसराम यांनी आश्चर्य व्यक्त केले. सपनाचा त्वरीत शोध न घेतल्यास विधानसभेवर मशाल मोर्चा काढण्याचा ईशाराही त्यानी यावेळी दिला. या मोर्चाला गों.ग.पा.चे जिल्हाध्यक्ष श्रिराम तलांडे, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी, विठ्ठल धानोरकर, नाना टेकाम, जितेंद्र धुर्वे, सुदर्शन टेकाम, निमपाल राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
साभार :- देशोन्नती 

गुप्तधन व नरबळी प्रकरणी हयगय करणा-यांची ‘वाट’ लावू - निता केळकर

पोलीस तपासाबाबत व्यक्त केले आश्चर्य

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व सपना पळसकर या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तपासात हयगय करणा-या पोलीस अधिका-यांची वाट लावू अशा संतप्त शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता केळकर यांनी तपासाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चोरांबा येथे पळसकर कुटूंबीयांना दिलेल्या भेटीच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय गंभिर असुन पोलीसांनी अद्याप या प्रकरणी केलेला तपास प्रथमदर्शनी संशयास्पद दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नकारात्मक भुमिकेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार असुन भाजपाच्यावतीने अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेच्या तपासात जाणीवपुर्वक विलंब करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पळसकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, देवयानी फरोडे, वनीता कानडे, शैला सामंत, मंजु वैष्णव, शिल्पा गणपते, शैला साळवी, रेखा कोठेकर यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

बेपत्ता सपनाच्या पालकांचे अखेर देवालाच साकडे !


दिड महिन्यात पोलीस तपास शुन्य

बेपत्ता सपनाचा शोध घेऊन थकलेल्या पळसकर कुटूंबीयांनी पोलीस तपासातील अपयश बघता अखेर देवालाच तिला  वाचविण्यासाठी साकडे घातले आहे. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या अजनसरा येथिल भोजाजी महाराज देवस्थानाला जाऊन पळसकर कुटूंबीयांनी सपनासाठी नवस केला. सपनाच्या काळजीपोटी चिंतातूर तिचे आईवडील अजुनही आपल्या परिने शोध घेत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेले मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व सपना पळसकर बेपत्ता प्रकरण पोलीसांच्या दिरंगाईमुळे तपासशुन्य ठरले आहे. दस-याच्या दिवसापासुन चोरांबा येथिल सपना पळसकर ही चिमुकली बेपत्ता आहे. तर गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न १७ नोव्हेंबरला झाला. ग्रामस्थांनी पकडून दिलेले २ आरोपी व ईतर दोघे असे अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पलिकडे प्रकरण सरकलेच नाही. गेल्या विस दिवसांपासुन केवळ बयाण घेणे, गावोगावी तपास पथक पाठविणे अन फिर्यादी, वकील, पत्रकार यांची चौकशी यापलीकडे पोलीस तपास झाल्याचे दिसत नाही.
संशय हे पोलीसांचे प्रमुख शस्त्र. मात्र या प्रकरणात पोलीसांनी हे शस्त्रच म्यान केले की काय अशी परिस्थिती आहे. कारण पोलीस अधिक्षक, एस.डी.पी.ओ. व ठाणेदार यांनी सुरूवाती पासुनच या प्रकरणातील आरोपींवर साधा संशय घेतला नाही. त्यांच्या जवळ मुलगी नव्हतीच हिच गोष्ट पोलीस विश्वासाने सांगत आहेत. कदाचीत तसे असेलही. मग सपना कुठे आहे? प्रकरणातील आरोपींविषयी घटनेच्या दिवसापासुन पोलीसांना असलेली सहानुभूती चर्चेचा विषय ठरली आहे. थातूर मातूर चौकशी करून सोडून देणे, जाणिवपुर्वक एकाच दिवसाचा पी.सी.आर, न्यायालयीन कोठडीत पाठवितांना आरोपींना ‘व्हर्टीगो’ ही आलिशान कार वापरण्याची देण्यात आलेली मुभा पोलीसांविषयी संशय निर्माण करण्यास पुरेसे आहे. 
केवळ प्रसार माध्यमे व विवीध संघटना यांचा दबाव आहे म्हणुनच पोलीस तेवढ्यापुरता तपास करीत असल्याचे दिसत आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विवीध आदिवासी संघटना, रा.कॉं.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, महिला कॉंग्रेस, यवतमाळ यांनी या प्रकरणात प्राधान्याने लक्ष दिले आहे. जनमानसात सध्या केवळ याच प्रकरणाची चर्चा आहे. मात्र तरिही तपास सुरू आहे यापलिकडे कोणतेही उत्तर पोलीस देऊ शकले नाहीत.
बेपत्ता सपना व गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई करणा-या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. ते पोलीस स्टेशनला असतांना तपास योग्य रितीने होईल का? सध्याचे तपास अधिकारी भालचंद्र महाजन यांनाही अद्याप प्रकरणातील एकही धागा सापडला नाही. त्यामुळे केवळ दबाव आहे म्हणुन तपास करीत असल्याचे  दाखवायचे असा प्रकार तर सुरू नाही ना? याच पद्धतीने तपास सुरू राहिला तर सपनाचा शोध लागणार का? व पैशाच्या लालसेने झपाटलेले गुप्तधन प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 6 December 2012

मुरली येथिल गुप्तधन प्रकरणाची ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली दखल


मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न वृत्तपत्रांनी प्रखरतेने मांडल्यावर ईलेक्ट्रॉनिक मिडीयानेही त्याची प्राधान्याने दखल घेतली. 
झी २४ तास, ए.बी.पी.माझा, आय.बी.एन.लोकमत, टि.व्ही.९ मराठी यासह विवीध चॅनल्सवर या घटनेच्या बातम्या झळकल्या. त्यापैकी ए.बी.पी.माझा वरील बातमी व टि.व्ही.९ मराठीवरील चर्चासत्राचे व्हीडीओ घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.........


ए.बी.पी.माझा

टि.व्ही.९ मराठी चर्चासत्र
सहभाग ( डॉ.नरेंद्र दाभोळकर, कार्यकारी अध्यक्ष, समिती, अंधश्रद्धा निर्मुलन समिती),
शितल करदेकर ( पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्या ) , मैथिली जावकर (अभिनेत्री)  





Wednesday, 5 December 2012

सपना अपहरण व गुप्तधन प्रकरणी गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी

१२ डिसेंबरला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा घाटंजीत धडक मोर्चा 

गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न व दिड महिन्यांपासुन बेपत्ता असलेली सपना पळसकर हिचा शोध घ्यावा. तसेच संपुर्ण प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व लोकसंग्राम पक्षाच्या वतीने दि.१२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निरंजन मसराम यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सपनाचे अपहरण होऊन तब्बल दिड महिना उलटला तरी देखिल पोलीस विभागाला तिचा शोध घेण्यास यश आलेले नाही. एक गरिब आदिवासी कुटूंबातील मुलगी असल्याने पोलीस या तपासात गंभिर दिसत नाहीत. शिवाय गुप्तधन प्रकरणात देखिल पोलीस तपास संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून केल्या जाणार आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद न घातल्या गेल्यास भविष्यात हा प्रकार आणखी वाढु शकतो. यावेळी एका गरिब आदिवासी मुलीचे अपहरण झाले आहे. 
भविष्यात आपल्याही मुलाबाळांचे अपहरण अशा विकृत कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांसह सर्वांनीच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाला गों.ग.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तलांडे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव धानोरकर, महासचिव बंडू मसराम, जिल्हा उपाध्यक्ष निमपाल राजगडकर, अनिल गेडाम, तालुकाध्यक्ष महादेव चिकराम, तालुका सचिव महादेव वेट्टी, जितेंद्र धुर्वे, मोहन कोटरंगे, देवजी गेडाम, सहाय्यक सचिव दत्ता मडावी, लोकसंग्राम पक्षाचे सरचिटणीस विनोद सिंघानिया, नानाजी कोवे, लेतूजी जुनघरे, उरकुंडा जांभुळकर, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन घाटंजी तालुका कार्यकारी अध्यक्ष महादेव मैंद, नाना धुर्वे, कवडू मरापे, बाबुराव कोवे, शंकर कोरवते, कर्णूजी नैताम महाराज, कृष्णा आडे, गुलाब घोडाम, अमृत पेंदोर, अनिल गेडाम, संभा कोवे, नागोराव शेडमाके, लक्ष्मण अनाके, मारोती पेंदोर, शंकर वेलादी, नामदेव मरापे, अजय ताडपेल्लीवार, कवडू पेंदोर, खुशाल देडाम, विजय मेश्राम, बंडू सिडाम, देवजी गेडाम, विजय मसराम, नारायण कुळसंगे, प्रमोद ईळपाते, श्रावण किनाके, दत्ता मडावी, नानाजी किनाके, शंकर गेडाम, ज्ञानबा मसराम, शत्रुघ्न पेंदोर, सिताराम पराचे, काशिनाथ कनाके, संतु पेंदोर, अभिमान कातले, लक्ष्मण अनाके, भगवान उईके, राजु मडावी, अजाब सलाम, कवडू सुरपाम, शालिक मडावी, भानुदास सुरपाम, भाऊराव मेश्राम, शंकर अनाके, पुरूषोत्तम मडावी, अर्जुन कोरवते, गोकुल मेश्राम, मुनीरोद्दीन, ज्ञानेश्वर सिडाम, शेषराम आत्राम, हरिभाऊ सलाम, पुरूषोत्तम मडावी, दामोधर ऊईके, रामदास ऊईके, गुलाब कोडापे, शंकर कोरवे, अनिल गेडाम, जितेंद्र धुर्वे, रायबा आत्राम, रमजान जाटू, विलास चांदुरकर, सुबान जाटू, तुकाराम नेहारे, गोविंद तिरमानवार, दिलीप पेगर्लावार, ज्ञानेश्वर चितकुंटलवार, दत्तू पालेपवार, शरद खोडपे, मज्जीद बैलीम, दत्ता मडावी, कवडू मरापे, शंकर सोयाम, सलिम मनियार, शंकर गेडाम यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

तंटेबखेटे निस्तरायला महापंचायत मग बेपत्ता सपनासाठी काय?

सपनाच्या निर्धन मायबापाचा सवाल

गुप्तधनासाठी नरबळी...माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार. मात्र पैशाच्या लालसेने तोंडाला पाणी सुटणा-या व चुकीने मनुष्य योनित जन्मलेल्या त्या लांडग्यांना त्याचे काय? अंधश्रद्धेचे भुत मानगुटीवर घेऊन ते एक चिमुकला जीव संपवायला निघाले होते. माणुसपण जीवंत असलेल्या ग्रामस्थांनी तो प्रकार हाणुन पाडला.
हे प्रकरण जेवढे घृणास्पद आहे त्यापेक्षा जास्त त्यानंतर झालेल्या घडामोडींनी संपुर्ण समाजाला कोड्यात टाकले आहे. एक आदिवासी समाजातील मुलगी दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. त्यातच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न उजेडात येतो. मात्र पोलीस एवढ्या गंभिर प्रकरणातही नेहमीची ‘रफादफा’ भुमिका घेतात. आधी तर आरोपी गुप्तधनासाठी गेलेच नव्हते असा पवित्रा पोलीस घेतात. पण प्रकरण अंगलट आल्यावर गुप्तधनाचा प्रयत्न कबुल होतो. मात्र बेपत्ता सपनाच्या बाबत सर्वच कानावर हात ठेवतात. खुनासाठी अपहरणाचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा, बेपत्ता मुलीचा नसलेला सुगावा व गुप्तधन प्रकरणातील पुढे न आलेले आरोपी अशी परिस्थिती असतानांही पोलीसांना केवळ एकाच दिवसाची कोठडी मिळवता येते. आरोपींच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर पोलीस गप्प बसतात. आरोपींना न्यायालयीन कोठडीत नेतांना खासगी वाहनातून नेण्यात येते. गुप्तधन प्रकरण हाणुन पाडणारे ग्रामस्थ, फिर्यादी, मुलीच्या आईला तक्रार लिहुन देणारे वकील, पोलीस तपासात मदत व्हावी या दृष्टीने वृत्तांकन करणारे पत्रकार या सर्वांची पोलीस सखोल चौकशी करतात. मात्र आरोपींचीही अशा प्रकरणी प्रसंगी पोलीसी खाक्या दाखवुन ऊलटतपासणी करायची असते ही गोष्ट सोयीस्कररित्या दुर्लक्षीत केल्या जाते. गुप्तधन शोधणा-या टोळ्यांमध्ये केवळ चार पाच सदस्य नसतात ही गोष्ट पोलीसांना सांगण्याची गरज नसावी. दस-याच्या दिवशी चोरांबा येथिल विज बंद होते, कोणीतरी डि.पी.वरील फ्युज काढुन ठेवतो. अन त्याच दिवशी सपना बेपत्ता होते. 
हा केवळ एक योगायोग की कटाचा भाग याचा तपास करणेही पोलीसांना गरजेचे वाटू नये का? फिर्यादीचे वारंवार बयाण घेऊन त्यातील विसंगती शोधण्यापलिकडे तपास गेलेला नाही. अशीच भुमिका राहिली तर यापुढे कोणी अशा घटनांमध्ये पोलीसांची मदत करायला पुढे येणार का?
पोलीस अधिक्षकांपासुन ते ठाण्यातील शिपायापर्यंत सर्वच याप्रकरणी नकारात्मक विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांना नेमके सिद्ध काय करायचे आहे? गुप्तधनाची घटनाच झाली नाही का? पण आरोपींनी तर त्यासाठीच गेलो होतो अशी कबुली दिली आहे. सपना नावाची चिमुकली बेपत्ता नाही का? जर या आरोपांrनी तिला नेले नाही तर मग ती कुठे आहे? या दोन्ही प्रकरणातील किमान एकतरी बाजु पोलीसांनी स्पष्ट करून त्यांचे अस्तित्व आहे हे दाखवायला नको का? असे प्रश्न आता जनसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघेंना पत्रपरिषदेत या विषयावर छेडल्यावर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा गंभिरतेने तपास करण्याचे आदेश दिले. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. तालुका कॉंग्रेस मधील काही कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असल्याचीही चर्चा आहे. पण ते अद्याप चौकशीच्याही फे-यात आले नाहीत. ऊलट फिर्यादी व सपनाच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दडपणात आणल्या जात आहे. पोलीसांशी संबंधीत एक व्यक्ती पळसकर परिवाराला तुम्हाला मुलगी पाहिजे की पैसा असा प्रश्न विचारतो याचा अर्थ काय? घटनेच्या संशयास्पद तपासाची सुरूवात करणारे पोलीस अधिकारी अरूण गुरनूले तणावात का आहेत? हे सर्व प्रश्न तपासाबाबत संशय निर्माण करणारे आहेत.
सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकावे लागू नये यासाठी उद्या घाटंजी येथे महापंचायत आयोजीत केली आहे. तर संपुर्ण राज्याला सामाजीक न्याय देण्याची जबाबदारी असलेले ना.शिवाजीराव मोघे व जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले ना.नितिन राऊत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तरी दिड महिन्यांपासुन न्यायासाठी वणवण भटकणा-या त्या मातेला दिलासा मिळणार का? गरिब असल्याने दुर्लक्षीत असल्याची तिची खंत दुर होणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 28 November 2012

आबा तुमच्या पोलीसांचा हा असा कसा तपास ?



गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाला आठवडा लोटलाय. तर चोरांब्याची ‘सपना’ तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता आहे. गुप्तधन प्रकरणातील फिर्यादी पोटतिडकीने सांगतोय की, मी एका बालकाची किंकाळी ऐकली. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे देखिल हा गुप्तधनासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट करीत आहेत. बेपत्ता मुलीच्या पालकांची जिकडे तिकडे उपाशीपोटी भटकंती सुरू आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांनी तपास गांभिर्याने घ्या असे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमे घटनेच्या  वास्तविकतेवर प्राधान्याने लक्ष वेधत आहेत. या सर्व खटाटोपात पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या नावाखाली केवळ  ‘तपासनाट्य’ करीत असल्याचे दिसत आहे. ही घटना गावातील दोन गटातील राजकारणाचा भाग आहे. तर कधी मारहाण केल्याने आपल्यावर अ‍ॅट्रोसिटी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र बेपत्ता मुलगी व गुप्तधनासाठी नरबळीच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलीस तपास ‘शुन्य’ आहे. कोणत्याही स्पष्ट निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. गेल्या आठ दिवसात केवळ फिर्यादी व ग्रामस्थांचे बयाण घेण्यापलिकडे पोलीस तपास गेला नाही. या दरम्यान फिर्यादी विजय चव्हाण याची किमान दहा वेळा चौकशी झाली आहे. त्याला चार ते पाच वेळा घटनास्थळी नेण्यात आले. तर घटनेतील आरोपी व संशयीतांपैकी कुणालाही घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले नाही हे विषेश. अपहरण व हत्येचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी पोलीसांना केवळ एकाच दिवसाचा ‘पीसीआर’ मिळाला तेव्हाच पोलीसांना या प्रकरणात नेमके काय करायचे आहे हे लक्षात आले. चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांना पाचवा आरोपी शोधण्या ऐवजी पोलीस वारंवार फिर्यादीलाच पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लावत आहेत. एवढेच काय तर पत्रकारांनाही ही बातमी तुम्हाला कोणी दिली ते आम्हाला सांगा असे म्हणण्यापर्यंत पोलीसांची मजल गेली आहे. मात्र या घटनेतील संशयीत कोण कोण आहेत याची संपुर्ण माहिती तालुक्यातील ‘शेंबड्या’ पोरांनाही आहे. मग पोलीस या प्रकरणात त्यांना का दुर्लक्षीत आहेत?  या प्रकरणाच्या सुरूवाती पासुनच तपास अधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे. प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले, पोलीस उपनिरिक्षक राऊत यांनी या आठवडाभरात आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचेच प्रयत्न केलेत. माध्यमांनी त्यावर वेळोवेळी प्रकाशही टाकला आहे. त्यानंतर तपास हाती घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन हे सुद्धा तशाच कार्यपद्धतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांची सुद्धा या प्रकरणात ‘नकारात्मक’ भुमिकाच दिसत आहे. असे असतांना नि:पक्ष तपास होईल तरी कसा? त्यामुळेच राज्याचे गृहमंत्री ना.आर.आर.पाटील तरी या गंभिर प्रकरणात जातीने लक्ष घालुन पोलीस दलाबद्दल जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप दुर करण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. एका गंभिर प्रकरणात पोलीसांच्या या ‘उरफाट्या’ तपासाबद्दल तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday, 21 November 2012

अखेर गुप्तधन प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल

श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच  





गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली. 
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ  राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे.  या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.  या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 


Tuesday, 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

ग्रामस्थांच्या सतर्कतेने गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न फसला

घाटंजी तालुक्यातील मुर्ली तांड्यावरील घटना
गावक-यांकडून टोळीतील सदस्यांना चोप
‘त्या’ अज्ञात चिमुकलीचा जीव धोक्यातच
राजकीय दबावातून पोलीसांचे आरोपींना ‘अभय’





पैशाच्या लालसेने निष्ठुर झालेल्यांनी गुप्तधन मिळविण्यासाठी एका चिमुकल्या मुलीचा बळी देण्याचा केलेला प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पडला. दि.१७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही मन विषन्न करणारी घटना घडली. मात्र  टोळीतील सदस्य त्या अज्ञात मुलीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी लगत असलेल्या मुर्ली तांड्याजवळील एकहात्या मारोती मंदिरापुढे सुमारे ६ ते ८ लोक संशयास्पद स्थितीत वावरत असल्याचे त्या भागात शौचास गेलेल्या विजय चव्हाण नामक युवकास दिसले. त्यातच लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने त्याचा संशय बळावला. त्याने लगेच तांड्यावरील नातेवाईकांना भ्रमणध्वनी करून बोलावुन घेतले. अवघ्या काही वेळातच २० ते २५ लोक तेथे आले. लोकांचा जमाव येत असल्याचे दिसताच त्या टोळीतील सदस्यांची पळापळ सुरू झाली. 
त्यातील एकाने त्या लहान मुलीला घेऊन पळ काढला. त्या भागात अंधार असल्यामुळे तो पळुन जाण्यात यशस्वी झाला. या दरम्यान टोळीतील तिन सदस्य ग्रामस्थांच्या हाती लागले. घटनास्थळावरील प्रकार पाहुन संतापलेल्या नागरिकांनी त्यांना येथेच्च झोडपून काढले. त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. पोलीस येईपर्यंत तिन आरोपींपैकी एकजण निसटण्यात यशस्वी झाला. दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले.
अशोक दर्शनवार (३६) रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार (५२) रा.बेलोरा ता.घाटंजी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ताकसांडे नामक दोन ईसम व ईतर अज्ञात आरोपी फरार आहेत. मात्र अटक केलेल्या आरोपींवर केवळ गावातील शांतता भंग केल्या बद्दल प्रतिबंधात्मक कार्यवाही करून रात्रीच जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावरून एम.एच. २९ क्यु.१९७७ व ए.पी.१० ए.टी.५१६४ क्रमांकाच्या दोन दुचाकी, कुदळ, फावडे, हळदीने माखलेला दगड, लिंबु, दोरी जप्त केले. मात्र ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात आढळले नाहीत हे विषेश. 
या घटनेत ताब्यात घेतलेले आरोपी मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते असे आता पोलीस सांगत आहेत. मात्र नजरेसमोर अघोरी पुजा सुरू असताना हे दोन आरोपी खरंच हनुमान चालीसा वाचत होते काय? त्यांना त्या चिमुकल्या जीवाची किंकाळी ऐकु आली नाही का? घटनास्थळावरील परिस्थिती व आरोपींचे बयाण यामध्ये पोलीसाना संशय का आला नाही? जर आरोपी फक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते तर त्यांनी ग्रामस्थांना पोलीस तक्रार न करण्यासाठी १ लाख रूपये का देऊ केले? एरवी क्षुल्लक माहितीवरून घटनेचा तपास लावणा-या पोलीसांना एवढी गंभिर परिस्थिती डोळ्यापुढे दिसतांना गुन्हा दाखल करून गांभिर्याने तपास करण्याचीही गरज वाटू नये ही बाब संशयास्पद आहे. घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी, आरोपी, फिर्यादी व संबंधीतांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यास या प्रकरणात नेमके कोण कोण गुंतले आहेत ? पोलीस कोणाच्या दबावात काम करीत आहेत ? याचा सहज उलगडा होऊ शकतो. घाटंजी पोलीस सदर घटनेत आरोपींना थेट पाठीशी घालत असल्याने वरिष्ठानीच या प्रकरणी तपास करावा अशी मागणी होत आहे. या घटनेतील ती अज्ञात मुलगी अद्यापही या टोळीतील सदस्यांच्याच ताब्यात असल्याची भिती आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील चोरांबा येथिल सपना गोपाल पळसकर ही सात वर्षाची मुलगी दस-याच्या दिवसांपासुन बेपत्ता आहे. त्यामुळे या घटनेतील मुलगी तिच तर नाही ना अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा अद्याप योग्य तपास केलेला नाही. तालुक्यातील काही राजकीय धेंड या प्रकरणी आपल्या हस्तकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने घाटंजी पोलीसांकडून नि:पक्ष तपास होईल याबाबत साशंकता आहे.

साभार :- देशोन्नती