Pages

Showing posts with label गृहमंत्री. Show all posts
Showing posts with label गृहमंत्री. Show all posts

Wednesday, 12 December 2012

गुप्तधन व नरबळी प्रकरणी हयगय करणा-यांची ‘वाट’ लावू - निता केळकर

पोलीस तपासाबाबत व्यक्त केले आश्चर्य

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व सपना पळसकर या चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तपासात हयगय करणा-या पोलीस अधिका-यांची वाट लावू अशा संतप्त शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता केळकर यांनी तपासाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चोरांबा येथे पळसकर कुटूंबीयांना दिलेल्या भेटीच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे प्रकरण अतिशय गंभिर असुन पोलीसांनी अद्याप या प्रकरणी केलेला तपास प्रथमदर्शनी संशयास्पद दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नकारात्मक भुमिकेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार असुन भाजपाच्यावतीने अधिवेशनात हा मुद्दा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेच्या तपासात जाणीवपुर्वक विलंब करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पळसकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस उमा खापरे, माधवी नाईक, देवयानी फरोडे, वनीता कानडे, शैला सामंत, मंजु वैष्णव, शिल्पा गणपते, शैला साळवी, रेखा कोठेकर यांची उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 28 November 2012

आबा तुमच्या पोलीसांचा हा असा कसा तपास ?



गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाला आठवडा लोटलाय. तर चोरांब्याची ‘सपना’ तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता आहे. गुप्तधन प्रकरणातील फिर्यादी पोटतिडकीने सांगतोय की, मी एका बालकाची किंकाळी ऐकली. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे देखिल हा गुप्तधनासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट करीत आहेत. बेपत्ता मुलीच्या पालकांची जिकडे तिकडे उपाशीपोटी भटकंती सुरू आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांनी तपास गांभिर्याने घ्या असे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमे घटनेच्या  वास्तविकतेवर प्राधान्याने लक्ष वेधत आहेत. या सर्व खटाटोपात पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या नावाखाली केवळ  ‘तपासनाट्य’ करीत असल्याचे दिसत आहे. ही घटना गावातील दोन गटातील राजकारणाचा भाग आहे. तर कधी मारहाण केल्याने आपल्यावर अ‍ॅट्रोसिटी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र बेपत्ता मुलगी व गुप्तधनासाठी नरबळीच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलीस तपास ‘शुन्य’ आहे. कोणत्याही स्पष्ट निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. गेल्या आठ दिवसात केवळ फिर्यादी व ग्रामस्थांचे बयाण घेण्यापलिकडे पोलीस तपास गेला नाही. या दरम्यान फिर्यादी विजय चव्हाण याची किमान दहा वेळा चौकशी झाली आहे. त्याला चार ते पाच वेळा घटनास्थळी नेण्यात आले. तर घटनेतील आरोपी व संशयीतांपैकी कुणालाही घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले नाही हे विषेश. अपहरण व हत्येचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी पोलीसांना केवळ एकाच दिवसाचा ‘पीसीआर’ मिळाला तेव्हाच पोलीसांना या प्रकरणात नेमके काय करायचे आहे हे लक्षात आले. चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांना पाचवा आरोपी शोधण्या ऐवजी पोलीस वारंवार फिर्यादीलाच पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लावत आहेत. एवढेच काय तर पत्रकारांनाही ही बातमी तुम्हाला कोणी दिली ते आम्हाला सांगा असे म्हणण्यापर्यंत पोलीसांची मजल गेली आहे. मात्र या घटनेतील संशयीत कोण कोण आहेत याची संपुर्ण माहिती तालुक्यातील ‘शेंबड्या’ पोरांनाही आहे. मग पोलीस या प्रकरणात त्यांना का दुर्लक्षीत आहेत?  या प्रकरणाच्या सुरूवाती पासुनच तपास अधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे. प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले, पोलीस उपनिरिक्षक राऊत यांनी या आठवडाभरात आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचेच प्रयत्न केलेत. माध्यमांनी त्यावर वेळोवेळी प्रकाशही टाकला आहे. त्यानंतर तपास हाती घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन हे सुद्धा तशाच कार्यपद्धतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांची सुद्धा या प्रकरणात ‘नकारात्मक’ भुमिकाच दिसत आहे. असे असतांना नि:पक्ष तपास होईल तरी कसा? त्यामुळेच राज्याचे गृहमंत्री ना.आर.आर.पाटील तरी या गंभिर प्रकरणात जातीने लक्ष घालुन पोलीस दलाबद्दल जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप दुर करण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. एका गंभिर प्रकरणात पोलीसांच्या या ‘उरफाट्या’ तपासाबद्दल तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
साभार :- देशोन्नती