Pages

Showing posts with label अयनुद्दीन सोलंकी. Show all posts
Showing posts with label अयनुद्दीन सोलंकी. Show all posts

Tuesday, 26 March 2013

रोहयो प्रकरणी गुन्हे दाखल न केल्यास खटला न्यायालयात

अयनुद्दीन सोलंकी यांचा ईशारा
ना.मोघेंचा दबाव असल्याचा आरोप
तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्रातील माणुसधरी रोहयो अपहार प्रकरणात संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे अयनुद्दीन सोलंकी यांनी सांगितले. याप्रकरणी पारवा पोलीस स्टेशनसह वरिष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार केली असतांनाही पोलीसांनी अद्याप एफ.आय.आर.दाखल केला नाही. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांच्या दबावाखाली पोलीस कार्यवाही करण्यास दिरंगाई करीत आहेत. आलेल्या तक्रारीवर आधी गुन्हा नोंद करून त्यानंतर तपास करण्यात यावा असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २ जानेवारी २०१२ रोजी दिला आहे. त्यामुळे तक्रारीवर तब्बल अडीच महिन्यापर्यंत गुन्हा नोंद न करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे. पारवा वनपरिक्षेत्रांतर्गत माणुसधरी येथे रोहयो अंतर्गत कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ज्या मजुरांनी रोहयोची कामे केली नाही त्यांच्या नावाने मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून रक्कम विड्रॉल करण्यात आली आहे. या मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाण पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद व ईतर ठिकाणी नोंदविले आहे. या अपहारात मोहद्याचे पोस्ट मास्तर काळे, उपवनसंरक्षक डी.बी.श्रीखंडे, ए.पी.गि-हेपुंजे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) ए.ए.शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) लक्ष्मण गाडे, तहसिलदार संतोष शिंदे, कंत्राटदार नितिन कांबळे, मंगेश ताटकंडवार, किसन जाधव ईतर दोषी अधिकारी कर्मचारी, मिराबाई कनाके यांचेसह ईतरांनी संगनमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. 
पोस्टातून रक्कम विड्रॉल करतांना साक्षीदार म्हणुन सोलंकी यांची खोटी सही करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हस्ताक्षर तज्ञामार्फ़त त्याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या भ्रष्टाचारात बडे अधिकारी व राजकीय नेत्यांचे काही निकटस्थ असल्याने गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे दाखल करण्यात न आल्यास फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन करीत आहेत.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 29 January 2013

पांदण रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणा-यांवर कार्यवाही करा


कुर्ली ग्रामवासियांची मागणी

कुर्ली ते सायफळ पांदण रस्त्याच्या काम बंद करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणा-यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांचे नेतृत्वात कुर्ली ग्रामवासियांनी घाटंजी तहसिलदारांना दिले. तसेच हे काम तिन दिवसांच्या आत सुरू करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. कुर्ली ते सायफळ पांदण रस्ता तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांच्या निर्देशावरून २००३ साली मंजुर झाला होता. या रस्त्याचे काम जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत सुरू होते. मात्र अ.रब अ.सईद व ईतर काही लोकांनी रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले. उल्लेखनिय म्हणजे गट क्र.११ मधुन तलाठी नकाशा, नझुल नकाशा नुसार कुर्ली ते सायफळ रस्ता असल्याचे स्पष्ट आहे. मात्र सदर व्यक्ती रस्त्याचे काम बंद पाडून शेतकरी व कंत्राटदारांना धमक्या देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तिन दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा देण्यात आला आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 16 January 2013

रोहयो अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी कार्यवाही करा

अयनुद्दीन सोलंकी यांची मागणी

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत घाटंजी तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत माणुसधरी येथे रोजगार हमी योजनेची कामे न करता मोहदा पोष्टातून रक्कम काढुन अपहार केल्या प्रकरणी संबधीतांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केली आहे. 
रोहयो अंतर्गत माणुसधरी येथे कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात माणुसधरी येथे कुर्ली येथिल मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाणात मजुरांनी कबुल केले आहे. जिल्हा परिषद रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी पठारे यांनी केलेल्या चौकशीत मिरा मोहुर्ले, नामदेव मोहुर्ले, पार्वता पुसनाके, अनुसया गुरनुले, कर्णु तोडसाम, अनिता मोहुर्ले, दिनेश गुरनुले यांनी रोहयोच्या कोणत्याही कामावर मजुरीचे काम केले नाही व आमचे पैसे मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये कसे काय आहे? असे चौकशी दरम्यान नमुद केल्याचे सोलंकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे पोस्टाच्या विड्रॉल स्लिपवर साक्षीदार म्हणुन सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची खोटी स्वाक्षरी संबंधीत ठेकेदार अथवा त्यांच्या सहका-यांनी केली असल्याचा आरोप करून त्याची हस्ताक्षर तज्ञामार्पâत तपासणी करण्याची मागणी सोलंकी यांनी केली आहे.
पांढरकवडा वनविभागामार्फत माणुसधरी येथे रोहयोचे काम झाले नाही. परंतु उपवनसंरक्षक, पांढरकवडा, नितीन कांबळे, किसन जाधव, मंगेश ताटकंडवार, पोस्ट मास्तर मोहदा, वनपरिक्षेत्र अधिकारी पारवा, तहसिलदार घाटंजी, गटविकास अधिकारी पं.स.घाटंजी, यांनी संगनमत करून मजुरीच्या पैशाची उचल करून रकमेचा अपहार केल्याने त्यांचेविरूद्ध फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 10 January 2013

घाटंजी पंचायत समितीसाठी ‘सी.ई.ओं.’ चे आदेश कवडीमोल

भारत निर्माण गैरव्यवहार प्रकरणी अद्याप एफ.आय.आर.नाही
लाखो रूपयांच्या अफरातफरीपुढे अधिका-यांचे लोटांगण

तालुक्यातील काही ग्रामपंचायती अंतर्गत भारत निर्माण पाणी पुरवठा योजेनेमध्ये लाखो रूपयांची अफरातफर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार करणा-यांवर तडकाफडकी फौजदारी कार्यवाही करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर चौकशी होऊन ज्या ठिकाणी अफरातफर आढळली त्या पाणी पुरवठा समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर.नोंदविण्यात यावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी वारंवार पंचायत समितीला दिले आहेत. मात्र कुर्ली, अंजी (नृ.) येथिल पाणी पुरवठा समितीवर पंचायत समितीने अद्याप एफ.आय.आर. दाखल केला नाही. तसेच भांबोरा येथिल गैरव्यवहाराची चौकशीच थंडबस्त्यात आहे. उल्लेखनिय म्हणजे भांबोरा येथे भारत निर्माण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी चौकशी केली. लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असतांना सदर चौकशीत केवळ १६ हजार ९०० रूपये एवढीच वसुली पात्र रक्कम दाखविण्यात आली. त्यानंतर माजी पं.स.सदस्य सहदेव राठोड यांनी वरिष्ठांकडे पुन्हा तक्रारी केल्या. त्यानुसार १२ ऑक्टोबर २०११ रोजीच्या विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशावरून चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीने अद्याप काय चौकशी केली हे कोणालाच माहित नाही असे सहदेव राठोड यांनी सांगितले. तसेच लाखो रूपये गिळंकृत केलेल्यांवर केवळ गुन्हे दाखल करून लोकांना पाणी मिळणार का? त्यांचेकडून रकमेची वसुली कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये समितीच्या पदाधिका-यांनी १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार केल्याची बाब उपअभियंता, पांढरकवडा यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. या योजनेत अपहार झाल्याची तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली होती. माजी सरपंच व पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विलास बडगुलवार तसेच समितीच्या सदस्यांनी हा अपहार केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणाच्या चौकशीत व कार्यवाहीमध्ये प्रशासनाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी ३१ ऑक्टोबरला गटविकास अधिकारी घाटंजी यांना या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 
या प्रकरणात सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत असल्यानेच एफ.आय.आर.दाखल करण्यासाठी चालढकल करण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली आहे. पाणी पुरवठा समितीने एम.बी.रेकॉर्डवर सुद्धा खोडतोड केली असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday, 15 August 2012

माजी जि.प.सदस्य काटपेल्लीवार विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल



शेतजमीन सौदे प्रकरणात ७ लाख रूपये घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पारवा पोलीसांनी माजी जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरूद्ध कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी या प्रकरणात न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता कलम १५६ (३) अन्वये घाटंजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंग संधु यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयप्रकाश काटपेल्लीवार यांचे कुर्ली येथिल शेत गट क्रं ४/१ जमिन आहे. यापैकी ४ हेक्टर ८० आर जमिन त्यामधील विहीर व विद्युत मोटरपंपासह विक्रीचा करार सौदेपत्र फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांचेसोबत दि. १९ मे २००९ रोजी झाला होता. ईसारा दाखल ७ लाख रूपये विक्रीचा करारनामा नोंदवुन घेतला. मात्र त्यानंतर ठरलेल्या तारखेवर काटपेल्लीवार हे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिन खरेदी करून देण्यासाठी आले नाही. त्यामुळे त्यांनी सौदेपत्राच्या अटी नियमांचे पालन न करून फसवणुक केली आहे. त्यामुळे फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांनी १३ जुलै रोजी पारवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र राजकीय दबावातून पारवा पोलीसांनी या प्रकरणात चौकशी केली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
साभार :- देशोन्नती