Pages

Showing posts with label ऑनलाईन. Show all posts
Showing posts with label ऑनलाईन. Show all posts

Sunday, 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 19 September 2012

गॅस सिलेंडर ‘ऑनलाईन’ वरून ‘लांबलाईन’वर




दोन तिन वर्षांपुर्वी गॅस सिलेंडर वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सुविधा अंमलात आली. मोबाईलद्वारे फोन करून बुकींग करणे सक्तीचे केल्या गेले. त्यानंतर घरपोच गॅस पोहचविण्यात येत होता. आता मात्र या सेवेचा पार बोजवारा उडाला असुन ही सेवा ऑनलाईन वरून लांबलाईन झाल्याची प्रतिक्रीया घाटंजी शहरात व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी शहरात गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण अनियमीतपणे होत आहे. काही ठरावीक भागातच गॅस घरपोच जातो. या आठवड्यात तर ऑनलाईन बुकींगच बंद झाली असे लखमाई ईण्डेन या गॅस वितरकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरापुर्वी ऑनलाईन बुकींग केलेल्या ग्राहकांनाही सिलेंडर मिळेनासे झाले. त्यामूळे अनेकांनी थेट गॅस वितरकाच्या गोडाऊनपुढेच सिलेंडरसह ठाण मांडणे सुरू केले. आता तर अनेकदा गॅस सिलेंडरची ही रांग तब्बल १ ते २ किलोमीटर पर्यंत पसरलेली असते. पहाटे ६ वाजतापासुनच ग्राहक येथे आपला नंबर लावुन बसतात. सुमारे ६ ते ७ तास वाट पाहिल्यावर त्यांना सिलेंडर मिळते. कधी तर ग्राहकांची संख्या जास्त असल्यावर पुरेसे सिलेंडर उपलब्ध नसल्याने तासंतास वाट पाहुनही आल्या पावली परत जावे लागते. तिन चार दिवसांपुर्वी तर लखमाई ईण्डेनच्या अंजी रोडवरील गोदामावर सुमारे ८०० ते ९०० ग्राहकांची रांग सकाळपासुन लागलेली होती. मात्र गॅसच्या गाडीमध्ये केवळ ३०० सिलेंडरच आले. त्यामुळे ईतर ग्राहकांना परत जावे लागले. एकीकडे ग्राहकाना सिलेंडर मिळणे दुरापास्त झाले असतांना काळ्या बाजारात मात्र गॅस सिलेंडरचा मागणी तेवढा पुरवठा सुरू आहे. ज्या ग्राहकांनी वर्षातून केवळ चार ते पाच सिलेंडरची उचल केली आहे. त्यांच्या नावे त्यापेक्षा कितीतरी अधिक सिलेंडरची नोंद आहे. महसुल प्रशासन, पुरवठा निरिक्षक व तहसिलदार गेल्या अनेक महिन्यांपासुन सुरू असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत आहे. घाटंजी महसुल प्रशासनाने कधी घरगुती सिलेंडरच्या व्यावसायीक वापरावर कार्यवाही केल्याचे ऐकीवात नाही. अधिका-यांच्या या चुप्पीचे नेमके काय कारण आहे हे सर्वानांच माहित आहे. 
लखमाई ईण्डेनच्या मनमानीपणामुळे ऑनलाईन गॅस बुकींग नाममात्रच ठरली असुन ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. 
अमोल राऊत

साभार :- देशोन्नती 



Thursday, 15 March 2012

शेतक-यांच्या हितासाठी घाटंजी बाजार समिती कटीबद्ध - अभिषेक ठाकरे



शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर राहिल असे आश्वासन सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिले. बाजार समिती मार्केट यार्डावर आयोजीत विवीध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पायाभुत सुविधांची उभारणी होताच बाजार समितीला ‘ऑनलाईन’ करून शेतक-यांना जगभरातील बाजारभावाची माहिती देण्याची सुविधाही कार्यान्वयीत करण्यात येईल असे ते म्हणाले. शासनाने वारंवार कापुस उत्पादक शेतक-यांची थट्टा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापुस पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर होते. तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, पांढरकवडा बाजार समितीचे उपसभापती जानुसेठ जिवानी, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना लोकनेते सुरेश लोणकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकुन टिका केली. शेतकरी आत्महत्या का होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती जिल्हा दौ-यावर असताना कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शासनाने आपली बौद्धीक दिवाळखोरीच सिद्ध केली असे ते म्हणाले. सांसदीय समितीचा अहवाल जाण्यापुर्वीच कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेणे म्हणजे दाक्षीणात्य राज्यातील भांडवलदारांचा गल्ला भरण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्राशी संबंधीत एवढा महत्वाचा निर्णय घेतांना देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशातील एकुण ९० टक्के कापसाचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. मात्र राज्यात केवळ १० टक्के मिल आहेत. तर ज्या केरळ राज्यात १० टक्के कापुस उत्पादन होत नाही तिथे ९० टक्के मिल आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापुस उत्पादक शेतक-यांवर निर्यातबंदीची कु-हाड चालवली असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पारवेकर यांनी शेतक-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीबद्दल निषेध नोंदविला. शेतक-यांना आपले हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सी.सी.आय.ने यावेळी कापुस खरेदी का केली नाही असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २ कोटी ८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुलभूत सुविधांमध्ये लिलाव ओटा (धान्य यार्ड) करीता ११.७० लाख, पिण्याच्या पाण्याची सुविधा १ लाख, संरक्षण भिंत २४.१५ लाख, सिमेंट रस्ते २७.६४ लाख, ईलेक्ट्रीक सुविधा ३.५३ लाख, पाण्याची टाकी १२.९७ लाख, सांडपाण्याची व्यवस्था ३.१४ लाख, तर उत्पादीत सुविधांमध्ये धान्य चाळणी यंत्र ३०.६८ लाख, घनकचरा व्यवस्थापन १५.४८ लाख, गोदाम (धान्ययार्ड) २२.७० लाख, गोदाम (कापुस यार्ड) ४५.४१ लाख, भुईकाटा (५० मेट्रीक टन) १०.४२ लाख असा निधी बाजार समितीला प्राप्त झाला आहे. ही सर्व कामे ९ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होतील असा विश्वास सभापती अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सचिन पारवेकर यांनी केले. संचालन बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार व आभार प्रदर्शन प्रकाश डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती

Thursday, 16 February 2012

‘मोबाईल फसवेगिरी’ अजुनही सुरूच

आणखी एका ईसमाला १५ हजारांनी गंडविले
पोलीस यंत्रणेला तक्रारीची वाट

मोबाईलवर कॉल करून लॉटरी व तत्सम बक्षिसांचे आमिष दाखवुन हजारो रूपयांनी गंडा घालण्याचा प्रकार अजुनही सुरूच आहे. प्रशांत कुंभारे नामक ईसम या आमिषाला बळी पडल्याने तब्बल १५ हजार रूपयांनी फसविल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यापुर्वी देशोन्नती ने ‘मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय’ या बातमी मधुन हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर काही मोबाईल  कंपन्यांनी अशा कॉल पासुन सावध राहण्याबाबत ग्राहकांना एस.एम.एस.द्वारे सुचनाही दिल्या होत्या. मात्र पोलीस यंत्रणेने ही बाब अद्यापही गंभिरतेने न घेतल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत विस्तृत माहिती अशी की, प्रशांत मुकींदा कुंभारे रा. हिरापूर जि.वर्धा यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रं.९७६७२९२७३१ यावर ९२३४४४८३१३०८ या क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला १० लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. मात्र त्यासाठी बँक खाते क्रं.३०११७१०२८९४ यामध्ये १५ हजार २०० रूपये टाका असे सांगण्यात आले. त्यावेळी कुंभारे हे यवतमाळ तालुक्यातील त्यांची सासुरवाडी जवळा ईजारा येथे आले होते. त्यांनी कॉलवर विश्वास ठेवून अकोलाबाजार स्टेट बँकेत संबंधीत खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर ११ फेब्रुवारीला त्यांना ००९२३४१६९०८६७३ या क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. आणखी २४ हजार रूपये खाते क्रं.१०८८७५९८११९ (खातेधारक - प्रदिपकुमार) किंवा ०७१००१५०१९५१ (खातेधारक - झिया उल हक सिद्धीकी) या खात्यामध्ये पैसे भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र कुंभारे यांना शंका आल्याने त्यांनी पैसे भरले नाहीत. १३ फेब्रुवारीला त्यांना पुन्हा कॉल आला व किमान ६ हजार रूपये तरी खात्यात भरावे लागतील अन्यथा १० लाखांची रक्कम अनाथालयाला जाईल असे सांगण्यात आले. फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपण कंपनीचे डी.एम.असल्याचे सांगीतले. आपण फसविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रक्कम भरली नाही. 
कुंभारे यांनी ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते अमितसिंग चंद्राकेस सिंग विला रा. इंद्रानगर गोरखपुर या व्यक्तीचे असल्याचे बँकेत चौकशी केली असता निदर्शनास आले. वृत्त लिहिस्तोवर घटनेची तक्रार करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आज दुपारी १ वाजुन १२ मिनीटांनी नरेंद्र ढवळे रा.दहेगाव यांना ९१९१९९१७७१८३ या क्रमांकावरून कॉल आला. अडीच लाख रूपयांचे बक्षिस लागल्याचे त्यांना सांगीतल्या गेले. बक्षिसाची रक्कम १० मिनीटातच तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येईल असेही संबंधीताने त्यांना सांगीतले. मात्र त्यासाठी कमलेश कुमार नामक व्यक्तीच्या खाते क्रं. ३१९५१७४३८०७ यावर २ हजार ६०० रूपये भरा अशी अट ठेवण्यात आली. ढवळे यांनी ‘देशोन्नती’ मध्ये याबाबतचे वृत्त वाचलेले असल्याने हे गौडबंगाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांनी पैसे भरले नाहीत. शिवाय या प्रकाराची पोलीसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
गेल्या काही महिन्यांपासुन अशा ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे कोणाचीही तक्रार नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधुन असे रॅकेट चालविल्या जात असल्याच्या संशय व्यक्त होत असुन यंत्रणेने आपल्या स्तरावर या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे. 
साभार :- देशोन्नती