Pages

Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts
Showing posts with label गुन्हेगारी. Show all posts

Sunday, 17 March 2013

मुलांमध्ये संस्कार रूजवा, गुन्हेगारी कमी होईल

पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मांचे महिलांना आवाहन




मुलांवर लहानपणापासुनच चांगले संस्कार केले तर एका सुदृढ समाज निर्माण होऊन गुन्हेगारी कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. येथिल पोलीस स्टेशनमध्ये आयोजीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुर्वी मुलाने वाईट कृत्य केले तर आई वडील त्याला शिक्षा देत होते. मात्र सध्याच्या काळात परिवार अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा गुन्हा लक्षात न घेता त्याला पाठिशी घालतात. तो कायद्याच्या चौकटीत सापडू नये यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मानसिक बळ मिळते व तो आणखी मोठा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. 
त्यामुळे महिलांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रूजवावे असे आवाहन त्यांनी केले. आईवडीलांनी वेळीच मुलांना शिक्षा केली तर मोठे गुन्हेगार निर्माणच होणार नाहीत असे ते म्हणाले. मुलींनी भारतिय सभ्यतेची जाणिव ठेवुन आपल्या आईवडीलांना दुखावेल असे कृत्य करू नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. कुणी छेड काढली व कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर थेट आत्महत्येची पळवाट न स्विकारता त्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी. ९० टक्के गुन्हे केवळ दारूमुळेच होतात. गावातील महिलांनी ठरविल्याशिवाय दारूबंदी होऊ शकणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, नगराध्यक्ष किशोर दावडा, डॉ.विणा खान, जि.प.सदस्य उषा राठोड, अनुपमा दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शुभांगी तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. समिक्षा भोयर या विद्यार्थीनीने बेटी बचाओ विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पायल जेंगठे या विद्यार्थींनीने आपल्या भाषणातून सद्यस्थितीत स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर महिला दिन साजरा करणे किती औचित्याचे आहे असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनाच कोड्यात टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी केले. संचालन मंजुषा तिरपुडे व आभार प्रदर्शन जमादार अशोक भेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वस्तरातील महिला, शालेय विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 17 May 2012

घाटंजी तालुक्यातील जुगार व मटका अड्ड्यांवर विशेष पथकाच्या धाडी

२० जणांना अटक; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
घाटंजी, पारवा ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
येथिल पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर विशेष पोलीस पथकाने धाड मारून तब्बल १२ आरोपींना अटक केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रूपाली दरेकर व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सारंग नवलकर  यांच्या पथकाने काल रात्री ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीमध्ये १६ हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी मोहन बापुराव शिवणकर (४०), विश्वनाथ विष्णुजी रामटेके (६२), मारूती रोडबाजी पारधी (३६), रमेश काशीराम ठाकरे (५५), प्रशांत लक्ष्मण धोटे (५०), सुदाम शंकर वाडे (५०), विनायक माधव प्रसन्नकर, प्रताप प्रभाकर डंभारे (३५), राम किसन पेटेवार (२६), राजु विलास गावंडे (२०), सुधाकर शामराव कांबळे (३२), राहुल वसंत लढे (३५) यांना अटक करण्यात आली. तर मटका अड्डा चालविणारा सतिष यल्लरवार हा फरार आहे.
यापुर्वी दि.१४ ला पारवा येथे जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने धाड मारून ४७ हजार रूपयांच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेतले. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक दत्ता नलावडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा शेख आसिफ शेख चांद (२१) याचेसह शेख असलम शेख रेहमान (१९), उत्तम बापुराव तायडे (६२), राजु गंगाधर धवने (२८), मन्सुर अली अकबर अली लालानी (५८), आकाश रामराव मोहिते (२०), सुनिल डोमाजी शेंडे (३५) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कार्यवाहीमध्ये स.पो.नि.सारंग नवलकर, जमादार नरेंद्र मानकर, कैलास देवकर, विशाल भगत, सचिन आडे, भोजराज करपते, नितिन वास्टर, प्रमोद इंगोले, विवेक पेठे, प्रमोद मडावी,मयुरी मांगुळकर यांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने घाटंजी तालुक्यात राबविलेल्या धाडसत्रामुळे घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद करण्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाला कवडीचीही विंâमत न देता घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वंजारे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना जणु संरक्षणच दिले आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये खुले आमपणे अवैध दारू विकल्या जाते. वाहतुकीची बेशिस्त तर अंगावर काटा आणणारी आहे. घाटंजी शहरात मुख्य बाजारपेठेच्या परिसरात खुलेआमपणे मटका अड्डे चालविल्या जातात. उल्लेखनिय म्हणजे नेहमी महाराष्ट्र बँक परिसरातील मटका अड्ड्यांवरच धाड पडते. मात्र कन्या शाळेच्या मागे, संत मारोती महाराज मंदीर परिसर, मटन मार्केट यासह विवीध भागात असलेल्या मटका अड्ड्यांवर कधी कार्यवाही होतांना दिसत नाही. महाराष्ट्र बँकेच्या परिसरात महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय आहे. बँक व या कार्यालयात महिलांची नेहमीच ये जा असते. मात्र मटका लावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या परिसरात भटकत असल्याने महिलावर्गाची प्रचंड कुचंबना होते. तर कन्या शाळेच्या मागील भागातही मटकाबहाद्दरांची वदळ राहत असल्याने प्रसंगी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात चालणारे काही प्रमुख मटका व जुगार अड्डे राजकारणी व्यक्ती चालवित असल्याने पोलीस विभागाची त्याकडे मेहेरनजर असते असा नागरिकांचा आरोप आहे.
विशेष पथकाच्या कार्यवाही नंतर एक दोन दिवस हे व्यवसाय बंद राहतील व त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होईल. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीसांच्या मुसक्या आवळण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


Friday, 11 May 2012

चिमुकलीला पळविण्याच्या बेतात असलेल्या तरूणीस अटक

भरवस्तीतील घटनेने घाटंजीत खळबळ
शेकडो लोकांनी केला तरूणीचा पाठलाग



पाच वर्षांच्या चिमुकलीस पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीला नागरिकांनी शिताफिने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. घाटंजीतील नेहरूनगर भागात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
अश्विनी विठ्ठल गायकवाड (२३) रा.मांडवा ता.घाटंजी असे अटक करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजेदरम्यान नेहरूनगर भागातील सुमारे पाच वर्षांची चिमुकली घरी न आढळल्याने तिच्या कुटूंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात मुलीच्या आजीला ती एका अनोळखी तरूणीजवळ दिसली. म्हातारी आपल्याकडे येत असल्याचे दिसताच सदर तरूणीने मुलीला घेऊन तिथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्धेने तरूणीचा पाठलाग करून तिला गाठले. मुलगी बेपत्ता असल्याची वार्ता परिसरात वा-यासारखी पसरल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले होते. त्यामुळे शेकडो लोकांच्या जमावाने त्या तरूणीस घेरले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. यावेळी जमाव संतप्त झाला होता.  त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. घाटंजी पोलीसांनी सदर तरूणीस ताब्यात घेऊन तिला ‘मायापाखर’ सुधारगृहात रवाना केल्याची माहिती आहे. ही तरूणी गुन्हेगारी प्रवृत्तीची असुन यापुर्वीही तिला काही ठिकाणी चोरी करतांना नागरीकांनी पकडून दिल्याचे यावेळी काही नागरिकांनी सांगीतले.
पोलीसांनी या प्रकरणात कसुन चौकशी करून यामागे मुले पळविणारी टोळी तर नाही ना याबाबत तपास करावा अशी मागणी होत आहे.


कुलरचा शॉक लागुन नवविवाहितेचा मृत्यू

तालुक्यातील पांढुर्णा (बु.) येथे दिपाली नितिन देठे (२३) या नवविवाहीतेचा कुलरचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. विजेचा झटका लागल्यावर उपचारासाठी यवतमाळ येथे नेतेवेळी रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. सुमारे एक महिन्यापुर्वीच दिपाली हिचे गावातीलच नितिन देठे याचेशी लग्न झाले होते. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती