Pages

Wednesday 27 March 2013

घाटंजीत ‘ड्राय डे’ ला वाहतो दारूचा महापुर

छुप्या मार्गाने होते दारू विक्री
पोलीसांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
धुलिवंदन व तत्सम दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. मात्र असे असले तरी घाटंजी शहर व तालुक्यात ‘ड्राय डे’ ला सुद्धा मागेल त्याला देशी विदेशी दारू उपलब्ध होते. अवैध व्यवसायाला पोषक ठरत असलेल्या घाटंजी तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे हा प्रकार आजतागायत सुरू आहे. ‘ड्राय डे’ ला अवैध दारू सोबतच परवाना प्राप्त देशी व विदेशी दारूची दुकाने बाहेरून बंद तर आतून सुरू असतात. बार मध्ये काम करणारे ‘बंद’ दुकानाबाहेर उभे असतात. मद्यशौकीन हळुच त्यांचेजवळ जाऊन हातात पैसे ठेवतात. मागील दारातून जाऊन त्यांना अवघ्या दोन मिनिटात मागणीनुसार दारू पुरविण्यात येते. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र या दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे कोणीही या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत नाही. तर पोलीस मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. घाटंजी शहरातील आठवडी बाजार, यवतमाळ रोड, खापरी नाका या भागातील काही बारमधुन ‘ड्राय डे’ ला छुप्या मार्गाने दारूविक्री होते हे सर्वश्रुत आहे.
धुलिवंदनाच्या सणाला दारू पिण्याचा विचित्र पायंडा गेल्या काही वर्षात पडल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्याचा हा उत्सव आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासुन याला विकृत स्वरूप येऊ लागले आहे. मद्यधुंद अवस्थेत अश्लिल हातवारे करीत धिंगाणा घालणे म्हणजेच रंगपंचमी असाच समज काही तळीरामांनी करून घेतला आहे. रंगपंचमी दारू पिऊन व मांसाहार करून एन्जॉय करण्याची एक फॅशन पडत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने युवावर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. दारूची दुकाने, बार बंद ठेवण्याचा आदेश असतानाही अनेक जण पिऊन झिंगताना दरवर्षी दिसतात.  होळी हा एकच सण नव्हे, तर प्रत्येक सणाला पिऊन धिंगाणा घातल्याशिवाय तो सण साजरा करायचाच नाही, असा निश्चय केलेले तळीराम दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूच्या धुंदीत जिवघेण्या वेगात दुचाकी चालविणे, सायलेंसर काढुन ध्वनी प्रदुषण करणे, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत नाचणे, मारामारी व भांडणाने रंगोत्सवाचा बेरंग होत असताना पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. एखादा गंभिर प्रकार घडल्यावरच त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध घालणे सोयीस्कर ठरणार नाही का याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
साभार :- देशोन्नती 

सौ.श्वेता योगेश पारवेकर यांचे आकस्मिक निधन

 पारवा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख पारवेकर यांच्या पत्नी श्‍वेता यांचे आज सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ३२ वर्षांच्या होत्या. फ़िट (मिरगी) आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या व त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.  
त्यांच्या मागे पती, मुलगा यश व मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या त्या भावसून होत्या. अवघ्या दोन महिन्यापुर्वी २७ जानेवारीला आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते. या  दु:खातून पारवेकर परीवार सावरत नाही तोच सौ.श्वेता यांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबाला दुसरा धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी व रंगपंचमीच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या दु:खद घटनेने संपुर्ण घाटंजी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Tuesday 26 March 2013

रोहयो प्रकरणी गुन्हे दाखल न केल्यास खटला न्यायालयात

अयनुद्दीन सोलंकी यांचा ईशारा
ना.मोघेंचा दबाव असल्याचा आरोप
तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्रातील माणुसधरी रोहयो अपहार प्रकरणात संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे अयनुद्दीन सोलंकी यांनी सांगितले. याप्रकरणी पारवा पोलीस स्टेशनसह वरिष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार केली असतांनाही पोलीसांनी अद्याप एफ.आय.आर.दाखल केला नाही. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांच्या दबावाखाली पोलीस कार्यवाही करण्यास दिरंगाई करीत आहेत. आलेल्या तक्रारीवर आधी गुन्हा नोंद करून त्यानंतर तपास करण्यात यावा असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २ जानेवारी २०१२ रोजी दिला आहे. त्यामुळे तक्रारीवर तब्बल अडीच महिन्यापर्यंत गुन्हा नोंद न करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे. पारवा वनपरिक्षेत्रांतर्गत माणुसधरी येथे रोहयो अंतर्गत कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ज्या मजुरांनी रोहयोची कामे केली नाही त्यांच्या नावाने मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून रक्कम विड्रॉल करण्यात आली आहे. या मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाण पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद व ईतर ठिकाणी नोंदविले आहे. या अपहारात मोहद्याचे पोस्ट मास्तर काळे, उपवनसंरक्षक डी.बी.श्रीखंडे, ए.पी.गि-हेपुंजे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) ए.ए.शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) लक्ष्मण गाडे, तहसिलदार संतोष शिंदे, कंत्राटदार नितिन कांबळे, मंगेश ताटकंडवार, किसन जाधव ईतर दोषी अधिकारी कर्मचारी, मिराबाई कनाके यांचेसह ईतरांनी संगनमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. 
पोस्टातून रक्कम विड्रॉल करतांना साक्षीदार म्हणुन सोलंकी यांची खोटी सही करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हस्ताक्षर तज्ञामार्फ़त त्याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या भ्रष्टाचारात बडे अधिकारी व राजकीय नेत्यांचे काही निकटस्थ असल्याने गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे दाखल करण्यात न आल्यास फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन करीत आहेत.
साभार :- देशोन्नती 

एस.टी.- मेटॅडोअरच्या धडकेत १५ जखमी: ३ गंभिर


एस.टी.ने मेटॅडोअरला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. घाटंजी पांढरकवडा मार्गावर नुक्ती गावाजवळ हा अपघात झाला. बसचालक रामु चौरे याचेसह विठोबा दौलत डंभारे व अरूण सदाशिव सहारे गंभिर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अरूण रंदई (मांडवा), अनिता निखाडे (राजुर), श्रावण कांबळे, लक्ष्मी श्रावण कांबळे, साई श्रावण कांबळे, सुमित श्रावण कांबळे रा.हिंगणघाट, दिपक खंदारे, रेश्मा दिपक खंदारे, करण दिपक खंदारे, सुरज दिपक खंदारे, मुस्कान दिपक खंदारे रा.कुटकी (हिंगणघाट), पुजा भुपेंद्र लोहकरे हे प्रवाशी जखमी झाले. पांढरकवडा आगाराची एस.टी.बस क्रं.एम.एच.४० ८३०० पांढरकवड्याहून घाटंजीकडे येत होती. विरूद्ध दिशेने येत असलेल्या मेटॅडोअर क्र.एम.एच.३७ जी.३०१ ला या एस.टी.ची जबर धडक बसली.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीच्या आठवडी बाजारात असुविधांचा कळस


तालुक्यातील अनेक खेड्यांसाठी घाटंजी ही मुख्य बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. मात्र व्यावसायीक व ग्राहक यांच्यासाठी कोणत्याही सुविधा स्थानिक नगर परिषदेने आजवर पुरविल्याचे उदाहरण नाही. अनेक खेड्यापाड्यांमध्येही आता आठवडी बाजारात व्यावसायीकांसाठी ओटे बांधलेले आहेत. मात्र घाटंजी न.प.ने आजवर ओटे बांधण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. घाटंजीच्या बाजारात भाजीपाला, धान्य, मसाले, फळे, कापड, फरसाण यासह अनेक किरकोळ व्यावसायीक आपली दुकाने थाटतात. केवळ मुरूम व दगड टाकुन त्यांना जागा आखणी करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र दुकानांच्या अवतीभवती दगड धोंडे, कचरा पडून राहत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो.
आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या या आठवडी बाजारात सर्वत्र प्रचंड घाण असल्याने वातावरणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवुनच कसाबसा बाजार करावा लागतो. बाहेरगावाहुन येणारे व्यावसायीक व ग्राहकांच्या सोयीसाठी पाणी, सार्वजनिक शौचालय, मुत्रीघर यापैकी कोणतीही सोय आठवडी बाजार परिसरात नाही.
व्यावसायीकांना कोणतीही सुविधा न देणारी नगर परिषद त्यांचेकडून दर आठवड्याला कर मात्र न चुकता वसुल करते. व्यवसायानुसार १० रू, २० रू, ५० रू असा कर दैनिक वसुलीचे वंâत्राटदार वसुल करतात. मात्र त्या तुलनेत दुकानापर्यंत ग्राहक विनाअडथळा येऊ शकेल एवढी व्यवस्थाही न.प.ने आजवर केली नाही. पावसाळ्यात तर बाजारात एवढी घाण पसरलेली असते की, पाय कुठे ठेवावा असा प्रश्न पडतो. पाऊस आला की व्यावसायीकांची तारांबळ उडते. अनेकदा तर मोठे आर्थिक नुकसानही होते.
आजवरच्या कोणत्याही न.प.सत्ताधा-यांनी आठवडी बाजाराकडे लक्ष दिले नाही. व्यवसाय करण्यासाठी सिमेंटचे ओटे, शेड, स्वच्छ परिसर, बाजारात फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा, रस्ते, पाणी,स्वच्छतागृह या सुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र सध्यातरी तेवढी ईच्छाशक्ती न.प.चे सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यापैकी कोणामध्येही असल्याचे दिसत नाही हेच घाटंजी शहराचे दुर्दैव आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday 20 March 2013

कुर्ली भारत निर्माण अपहार प्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल


कुर्ली येथिल भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत अपहार केल्या प्रकरणी अनेक दिवस टाळाटाळ केल्यावर संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी सरपंच व पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विलास बडगुलवार, माजी सरपंच तथा पाणी पुरवठा समितीच्या सचिव सुप्रिया संजय सवनकर यांचे विरूद्ध पारवा पोलीसांनी कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. कुर्लीचे विद्यमान सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश देऊनही पंचायत समितीने त्यासाठी टाळाटाळ केली. सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्या दबावामुळेच गुन्हे दाखल करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ केल्या जात असल्याची तक्रारही सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली होती हे विषेश.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी ६ ऑगस्ट २०१२ रोजी याप्रकरणी सुनावणी घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता येवले यांनी भारत निर्माण योजनेत १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ३१ ऑक्टोबर २०१२ ला संबंधीतांविरूद्ध एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पंचायत समितीने वेगवेगळी कारणे देऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे टाळले. आता गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपींवर पुढील कार्यवाही करण्यात पोलीस किती तत्परता दाखवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती 

माजी आमदार अण्णासाहेब पारवेकरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

पारवेकर समर्थकांची घाटंजी येथे निषेध सभा
राष्ट्रवादीला ठोकणार रामराम
माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.  सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केले आहे. पक्ष विरोधी कारवायांमुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे पारवेकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनाही कळविण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये पांढरकवडा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यात एबी फॉर्म नसतानाही पारवेकर यांनी काही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले होते. निवडणुकीच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या फलकांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो न लावता पारवेकर यांनी स्वतःचे फोटो लावले होते. या प्रकाराची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली होती.
अण्णासाहेब पारवेकर यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून निष्काषीत केल्यामुळे दुखावलेल्या पारवेकर समर्थकांनी येथिल कृषीभवनात आयोजीत सभेत या निर्णयाचा निषेध नोंदविला. व्यक्तीद्वेष व व्यापारी तत्वाच्या नवख्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कार्यवाही करण्यात आल्याची प्रतिक्रीया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी
नोंदविली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण पोतराजे होते. रा.कॉ.चे माजी तालुका अध्यक्ष व बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे, माजी सभापती सचिन पारवेकर, सुहास पारवेकर, अंजी (नृ.) चे सरपंच गजानन भोयर, दादाराव खोब्रागडे, पोचारेड्डी जिड्डेवार, पारव्याचे सरपंच अर्जुन आत्राम, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष अंकुश ठाकरे यांचेसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासुन ज्या नेत्याने तालुक्यात पक्षाचे अस्तित्व निर्माण केले त्यांना क्षुल्लक कारणांवरून थेट पक्षातूनच काढणे अन्यायकारक असुन त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निषेध करीत असल्याचे मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या पक्षात आता कंत्राटदार व धनदांडग्यांनाच स्थान आहे का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ शेकडो पारवेकर समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचे या सभेत सांगण्यात आले. ज्या पक्षात आमच्या नेत्याचा सन्मान होत नसेल, नवखे लोक येऊन त्यांच्याबाबत अपशब्द बोलत असतील तर ते आम्ही मुळीच सहन करणार नाही असे प्रकाश डंभारे म्हणाले.

Sunday 17 March 2013

पोलीसच बनले अवैध व्यवसायाचे ‘पालनहार’


गेल्या काही वर्षांपासुन घाटंजी तालुका अवैध व्यावसायीकांसाठी अत्यंत सुरक्षीत परिसर झाला आहे. कारण ज्यांच्या खांद्यावर या व्यवसायांना पायबंद घालण्याची जबाबदारी आहे ती पोलीस यंत्रणाच जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. जणु काही पोलीसच या अवैध व्यवसायांचे पालनहार आहेत की काय असे वाटण्या एवढी गंभिर परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे या गोष्टीची साक्ष देतात. तर क्लबच्या गोंडस नावाखाली चालणा-या जुगार अड्ड्यांवर महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. पारवा पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू व मटका व्यवसायाची भरभराट आहे. गेल्या वर्षभरात घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन परिसरात विषेश शाखेच्या पथकाने अनेकदा छापे मारले. मात्र स्थानिक पोलीसांनी आजवर कोणताही मोठा छापा मारल्याचे ऐकीवात नाही. केवळ विशेष शाखेच्या छाप्यानंतर औपचारीकता म्हणुन तुरळक कार्यवाही दाखविण्यात येते. घाटंजी शहरात उघडपणे मटका अड्डे चालतात. कन्या शाळा, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, घाटी यासह विवीध परिसरात अगदी सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी हे अड्डे चालतात. मात्र पोलीसांना त्यावर कार्यवाही करण्याची गरज वाटत नाही. तालुक्यातील पारवा, चिखलवर्धा, घोटी, शिवणी, जरूर यासह ग्रामिण भागात कुठे अवैध दारू तर कुठे मटक्याचे प्रस्थ निर्माण झाले आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन, पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध असुनही अवैध व्यवसायांवर पोलीसांचे नियंत्रण नसेल तर ते जाणिवपुर्वकच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील तिथल्या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याचे सुतोवाच पोलीस अधिक्षकांनी केले होते. मात्र घाटंजी तालुक्यातील परिस्थितीकडे पाहता तालुक्याला यामध्ये ‘सुट’ तर देण्यात आली नाही ना असा संभ्रम निर्माण होईल एवढी गंभिर परिस्थिती आहे. ठाणेदार जगमोहन जोहरे यांच्या काळात अवैध व्यावसायीकांवर निर्माण झालेली जरब पुन्हा कधी होईल याची नागरीक वाट पाहात आहेत. 
साभार :- देशोन्नती 

मुलांमध्ये संस्कार रूजवा, गुन्हेगारी कमी होईल

पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मांचे महिलांना आवाहन




मुलांवर लहानपणापासुनच चांगले संस्कार केले तर एका सुदृढ समाज निर्माण होऊन गुन्हेगारी कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. येथिल पोलीस स्टेशनमध्ये आयोजीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुर्वी मुलाने वाईट कृत्य केले तर आई वडील त्याला शिक्षा देत होते. मात्र सध्याच्या काळात परिवार अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा गुन्हा लक्षात न घेता त्याला पाठिशी घालतात. तो कायद्याच्या चौकटीत सापडू नये यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मानसिक बळ मिळते व तो आणखी मोठा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. 
त्यामुळे महिलांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रूजवावे असे आवाहन त्यांनी केले. आईवडीलांनी वेळीच मुलांना शिक्षा केली तर मोठे गुन्हेगार निर्माणच होणार नाहीत असे ते म्हणाले. मुलींनी भारतिय सभ्यतेची जाणिव ठेवुन आपल्या आईवडीलांना दुखावेल असे कृत्य करू नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. कुणी छेड काढली व कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर थेट आत्महत्येची पळवाट न स्विकारता त्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी. ९० टक्के गुन्हे केवळ दारूमुळेच होतात. गावातील महिलांनी ठरविल्याशिवाय दारूबंदी होऊ शकणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, नगराध्यक्ष किशोर दावडा, डॉ.विणा खान, जि.प.सदस्य उषा राठोड, अनुपमा दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शुभांगी तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. समिक्षा भोयर या विद्यार्थीनीने बेटी बचाओ विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पायल जेंगठे या विद्यार्थींनीने आपल्या भाषणातून सद्यस्थितीत स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर महिला दिन साजरा करणे किती औचित्याचे आहे असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनाच कोड्यात टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी केले. संचालन मंजुषा तिरपुडे व आभार प्रदर्शन जमादार अशोक भेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वस्तरातील महिला, शालेय विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

Saturday 16 March 2013

घाटंजीत स्वामी विवेकानंद ‘सार्ध शती’ महोत्सवानिमित्य विवीध कार्यक्रम



स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त घाटंजीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंतीदिनी स्थानिक विद्यार्थ्यांनी रॅली काढुन स्वामी विवेकानंदांना अभिवादन केले. तसेच नुकतेच सुर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शि.प्र.मं.मुलांच्या शाळेतील ३०० विद्यार्थी, शि.प्र.मं.मुलींच्या शाळेतील २५० विद्यार्थीनी, समर्थ विद्यालयाचे २९५ विद्यार्थी, नगर परिषद शाळेतील ४०० विद्यार्थी व श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालय घोटीच्या ३०० विद्यार्थ्यांनी पहाटे सुर्यनमस्कार घालुन या यज्ञात सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती ता.घाटंजीचे सर्व कार्यकर्ते व शाळांमधील शिक्षक, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.























Saturday 9 March 2013

९७ गावातील किशोरवयीन मुलींनी घेतली अत्याचाराविरूद्ध लढा देण्याची शपथ

घाटंजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्याचा ठराव
सर्वत्र महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जागतिक महिलादिनी घाटंजी तालुक्यातील ९७ गावांमध्ये हजारो किशोरवयीन मुलींनी अन्यायाचा प्रतिकार करण्याची शपथ घेतली. समाजाच्या विवीध चालीरितींमुळे महिलांची होणारी कुचंबना रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ठराव घेण्यात आले.
वयाची १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय माझे लग्न होऊ देणार नाही, एखाद्या मैत्रिणीचे लग्न १८ वर्षाआधी होणार असेल तर आईवडीलांच्या मदतीने ते थांबविण्याचा प्रयत्न करेन, मी जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेन, शिकत असतांना मजुरीला जाणार नाही, कोणीही त्रास दिला तर न घाबरता आई वडील व घरच्या मंडळींना सांगेन अशी शपथ ९७ गावातील किशोरवयीन मुलींनी आज घेतली. युनिसेफ मुंबई, यशदा पुणे, महिला व बाल विकास कार्यालय यवतमाळ, विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम तालुक्यात राबविण्यात आला. सुमारे २ वर्षांपासुन या क्षेत्रात घाटंजी काम सुरू आहे. तसेच मुलांची काळजी व गावपातळीवर संरक्षीत वातावरण निर्माण व्हावे यासाठी २८ गावांमध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या. 
आज तालुक्यातील १०५ गावांमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बालमजुरी, किशोरवयीन मुलींच्या समस्या, महिला अत्याचार, स्त्री भ्रुणहत्या, यासह विवीध समस्यांवर यानिमित्तांनी चर्चा करण्यात आली. अनेक गावातील ग्रामसभांमध्ये महिलांनी मनमोकळेपणाने आपल्या अडचणी मांडल्या. 
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालहक्क संरक्षण व अधिकार प्रकल्पाचे तालुका समन्वयक अरूण कांबळे, विकासगंगा संस्थेचे संचालक रंजित बोबडे, युनिसेफचे जिल्हा समन्वयक परेश मनोहर यांच्या मार्गदर्शनात सचित्रा पिलावन, पुजा गुडपल्लिवार, नैना रावळे, निता सुरसकार, अर्चना तुरे, शितल ठाकरे, राहुल प्रधान, ज्ञानेश्वर घोम, मारोती वेलादे यांचेसह विकासगंगा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

रस्ता तिथे अतिक्रमण अशी परिस्थिती सध्या सर्वत्र आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर अगदी ग्रामिण परिसर व जंगलात देखिल अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहेत. बेरोजगारी या गोंडस नावाखाली कोट्यवधींची जमिन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. घाटंजी तालुकाही त्याला अपवाद नाही. घाटंजी शहरात तर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहे. अवघ्या काही महिन्यांपुर्वीच शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली. बहुतांश अतिक्रमण हटविण्यात आले. यंत्रणेचा यामध्ये प्रचंड खर्चही झाला. मात्र काही महिने जात नाही तोच अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाली.
अतिक्रमणाचे समर्थन नक्कीच केल्या जाऊ शकत नाही. मात्र ते हटविल्यावर हजारो बेरोजगारांवर कोसळणारी बेरोजगारीची कु-हाड व त्यावर अवलंबुन असणा-या कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. यंत्रणेने योग्य नियोजन केले तर बेरोजगारांचा प्रश्न व अतिक्रमणाची समस्याही निकालात निघेल. शहरात नगर परिषद कार्यालय ते राम मंदिर रोड, शि.प्र.मं.कन्या शाळा, बसस्थानक, आठवडी बाजार परिसर यासह विवीध भागात किरकोळ व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. नगर परिषद तसेच खासगी व्यक्तींची कॉम्प्लेक्स आहेत. मात्र त्याची किंमत सर्वसाधारण व्यावसायीकांच्या आवाक्या बाहेरची आहे. मोहिमेदरम्यान त्याच जागेवर व्यावसायीकांसाठी दुकाने काढण्यात येतिल असा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे प्रचंड खर्च करून मोकळी झालेली जागा पुन्हा अतिक्रमणाने व्यापली. त्याच जागेवर दुकाने दिल्यास अतिक्रमणधारक त्यासाठी भाडे देण्यासही तयार आहेत. नगर परिषदेसाठी हे एक उत्पन्नाचे साधन होऊ शकते. मात्र ही बाब दुर्लक्षील्या गेली हे दुर्दैवच.
शिवाजी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. त्यांच्या दुकानांच्या पाय-या अगदी रस्त्यापर्यंत आल्या आहेत. वाहतुकीला त्याचा प्रचंड अडथळा होतो. मात्र प्रत्येक अतिक्रमण हटाओ मोहिमेत या ‘श्रीमंत’ अतिक्रमणाकडे कानाडोळाच करण्यात आला आहे. केवळ कोणी आक्षेप घेऊ नये म्हणुन थातुरमातुर कार्यवाही केल्या जाते. या भागात मुख्यत्वेकरून सराफांची दुकाने आहेत. तसेच काही गोदाम सुद्धा या भागात असल्याने आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर जेव्हा एखादा ट्रक अथवा वाहन साहित्य नेण्यासाठी उभे केल्या जाते तेव्हा वाहतुकीचा खोळंबा होतो. या रस्त्याची भुमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी अनेकांची मागणी आहे. पोलीस स्टेशन चौकात अतिक्रमणाच्या जागेत असलेले फ़ेब्रीकेटर्स व मिरचीची गिरणी वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. मिरचीही पुड रस्त्यावरून जाणा-यांच्या डोळ्यात जात असल्याने या मार्गावर अनेकदा अपघातही होतात. तसेच फ़ेब्रीकेटर्सचे साहित्य रस्त्यावरच पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळ्याचे ठरते. भर चौकात असलेल्या या  वेल्डींगच्या दुकानाकडे प्रशासन डोळेझाक का करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या नगर परिषदेवर अतिक्रमण काढण्याची व प्रतिबंध करण्याची जबाबदारी आहे त्या नगर परिषदेचे एक प्रवेशद्वारच अतिक्रमणाने व्यापले आहे. दर दोन तिन वर्षांनी राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाओ मोहिम केवळ एक औपचारीकताच होऊन बसली आहे. एकदा अतिक्रमण काढल्यावर ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहुन बेरोजगारांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी योग्य मोबदला घेऊन जागा दिल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
साभार :- देशोन्नती 

घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटू पोहचले आंतरराष्ट्रीय पातळीवर

बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यात सहभाग

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने तालुक्याचे नाव उंचावणा-या घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटुंनी आता देशाची सिमा ओलांडली आहे. दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांकरीता या क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 
तालुक्यातील प्रणित यशवंत घुगरे, राहुल उनकेश्वर राठोड, रत्नदिप दिलीप नगराळे व रविसिंग प्रेमसिंग राठोड हे या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये योटी ग्रुपमार्फ़त भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. फरिदाबाद (हरीयाणा) येथे झालेल्या निवड चाचणीत देशभरातील २०० खेळाडूंमधुन १९ वर्ष वयोगटातील १५ सदस्यीय संघात घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटूंची निवड होणे ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. या खेळाडूंनी जालना, रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे त्यांची कुरूक्षेत्र (हरीयाणा) व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीच्या सामन्यांसाठी निवड झाली. येथेही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने निवडचाचणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी योटी ग्रुपच्या संघात त्यांची निवड करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाजाची भुमिका बजावणारा प्रणित यशवंत घुगरे हा घाटंजीतील ईस्तारी नगर भागात राहतो. तो शि.प्र.मं.विद्यालयात ईयत्ता १० वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील जि.प.शाळेत शिक्षक आहेत. श्री.समर्थ विद्यालयातील ईयत्ता १०वीचा विद्यार्थी व संघातील उत्कृष्ट फलंदाज राहुल उनकेश्वर राठोड हा नेहरू नगर भागात राहतो. त्याचे वडील शेती करतात. तडाखेबाज फलंदाजीने राष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅन ऑद द मॅच पुरस्कार पटकाविणारा रत्नदिप नगराळे हा तालुक्यातील ससाणी गावचा आहे. तो शि.प्र.मं.शाळेत दहाव्या वर्गात शिकत असुन वसतीगृहात राहतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर मुळचा आर्णी तालुक्यातील बोरगावचा रहिवासी व आर्णीतील सावित्रीबाई फ़ुले विद्यालयाचा १२ वीचा विद्यार्थी रविसिंग प्रेमसिंग राठोड हा संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. तो मुळचा आर्णी तालुक्यातील असला तरी सरावासाठी तो घाटंजी येथे असतो. त्याचे वडीलही शेती करतात. 
दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशाची राजधानी ढाका यासह विवीध शहरात होणा-या आशियायी सामन्यांमध्ये भारतातून जाणा-या संघामध्ये तालुक्यातील चार खेळाडूंचा समावेश असणार आहे. नुकतेच या दौ-यासाठी निवड झाल्याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना योटी रूरल क्रिकेट असोशिएशन तर्फ़े पाठविण्यात आले आहे. या सर्व क्रिकेटपटूंना शिरोली ता.घाटंजी येथिल राष्ट्रीय पातळीवरील धावपटू व क्रिडा मार्गदर्शक राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

Sunday 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

पांढरकवडा नांदेड महामार्गावर मनसेचा रास्तारोको

अहमदनगर येथिल ‘त्या’ दगडफेकीचा निषेध
मनसे तालुकाध्यक्ष स्थानबद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगर येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पारवा येथिल मनसे कार्यकर्त्यांनी पांढरकवडा नांदेड महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उल्लेखनिय म्हणजे मनसेचे घाटंजी तालुका प्रमुख राजु बल्लुरवार यांना पारवा पोलीसांनी सकाळीच स्थानबद्ध केले होते. तरी देखिल पारवा परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पारवा येथुन निषेध मोर्चा काढत महामार्गावर ठिय्या दिला. यावेळी मनसे कार्यकर्ते रमेश इंगोले, संजय कुडमते, गजानन चौधरी, रविंद्र शेंडे, हर्षल राऊत, संतोष चिल्लावार, विजय नेरूद्रवार, ज्योतीराम कुसरे, पुंजाराम धानोरकर, गणपत म्हरस्कोल्हे, देवीदास मंगाम, उमेश कुडमते, गोवर्धन मडावी, संजय जाधव, प्रकाश बावणे, बळवंत कुमरे या कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
साभार :- देशोन्नती