घाटंजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्याचा ठराव
सर्वत्र महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जागतिक महिलादिनी घाटंजी तालुक्यातील ९७ गावांमध्ये हजारो किशोरवयीन मुलींनी अन्यायाचा प्रतिकार करण्याची शपथ घेतली. समाजाच्या विवीध चालीरितींमुळे महिलांची होणारी कुचंबना रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ठराव घेण्यात आले.
वयाची १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय माझे लग्न होऊ देणार नाही, एखाद्या मैत्रिणीचे लग्न १८ वर्षाआधी होणार असेल तर आईवडीलांच्या मदतीने ते थांबविण्याचा प्रयत्न करेन, मी जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेन, शिकत असतांना मजुरीला जाणार नाही, कोणीही त्रास दिला तर न घाबरता आई वडील व घरच्या मंडळींना सांगेन अशी शपथ ९७ गावातील किशोरवयीन मुलींनी आज घेतली. युनिसेफ मुंबई, यशदा पुणे, महिला व बाल विकास कार्यालय यवतमाळ, विकासगंगा समाजसेवी संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम तालुक्यात राबविण्यात आला. सुमारे २ वर्षांपासुन या क्षेत्रात घाटंजी काम सुरू आहे. तसेच मुलांची काळजी व गावपातळीवर संरक्षीत वातावरण निर्माण व्हावे यासाठी २८ गावांमध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या.
आज तालुक्यातील १०५ गावांमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बालमजुरी, किशोरवयीन मुलींच्या समस्या, महिला अत्याचार, स्त्री भ्रुणहत्या, यासह विवीध समस्यांवर यानिमित्तांनी चर्चा करण्यात आली. अनेक गावातील ग्रामसभांमध्ये महिलांनी मनमोकळेपणाने आपल्या अडचणी मांडल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालहक्क संरक्षण व अधिकार प्रकल्पाचे तालुका समन्वयक अरूण कांबळे, विकासगंगा संस्थेचे संचालक रंजित बोबडे, युनिसेफचे जिल्हा समन्वयक परेश मनोहर यांच्या मार्गदर्शनात सचित्रा पिलावन, पुजा गुडपल्लिवार, नैना रावळे, निता सुरसकार, अर्चना तुरे, शितल ठाकरे, राहुल प्रधान, ज्ञानेश्वर घोम, मारोती वेलादे यांचेसह विकासगंगा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment