Pages

Saturday 10 March 2012

उत्तमराव पाटील यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

आज लोणी येथे अंत्यसंस्कार

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, सहकार क्षेत्रातील मुरब्बी नेते, लोणी या छोट्याश्या गावातील सरपंच ते लोकसभेचे सलग पाच वेळा खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केलेले उत्तमराव पाटील उपाख्य 'दादा' यांचे नागपूर येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळी ६.३0 वाजता निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी येथे धडकताच जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
उत्तमरावदादा यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या आर्णी रोड स्थित 'देवकृपा' या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. नागपूर येथून रात्री त्यांचे पार्थिव यवतमाळात आणण्यात आले. रविवार ११ मार्च रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत दादांचे पार्थिव त्यांच्या येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी लोणी येथे (ता. आर्णी) अंत्यसंस्कार केले जातील. दादांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२ मार्चला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात रक्तदाब कमी झाल्याने अचानक ते मंचावर कोसळले. त्यांना येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ६ मार्चला नागपूर येथील डॉ.राजन मारोकार यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे आज सायंकाळी ६.३0 वाजता त्यांचे निधन झाले. सन १९६९ मध्ये लोणी (ता.आर्णी) येथील सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. दिग्रस पंचायत समितीचे सदस्य, यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर १९७२ ते ७८ या कालावधीत ते विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर १९८0 ते २00३ अशी सलग २३ वर्षे ते काँग्रेस पक्षाचे पाच टर्म खासदार राहिले. १४ नोव्हेंबर २0११ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.


दादांच्या निधनावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया


जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण
असलेला नेता हरवला - मुख्यमंत्री 
जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरविला, अशा शब्दात माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विदर्भातील बहुजन समाजाला घेवून चालणारा नेता उत्तमराव पाटील यांच्या रूपाने आपल्यातून निघून गेला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- सदाशिवराव ठाकरे
माजी खासदार

जिल्ह्याला व राष्ट्रवादी पक्षाला उत्तमरावदादांची आवश्यकता होती. माझा हितचिंतक काळाने हिरावला आहे. काँग्रेसमध्ये असूनसुध्दा दादांसोबत स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक दृष्ट्याही अतिशय जवळ होते. परिवारातीलच व्यक्ती हिरावली आहे. या घटनेने कधीही भरून न निघणारी पोकळी वैयक्तिक जीवनात निर्माण झाली आहे.
- मनोहरराव नाईक
अन्न व औषध प्रशासन मंत्री

राजकीय कृपाछत्र हिरावले. उत्तमरावदादा हे अतिशय सरळ व सर्वसामान्य माणसाला घेवून चालणारे लोकनेते होते. विदर्भातील आघाडीच्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. काळाने आपल्यातील एक प्रामाणिक नेतृत्व हिरावले आहे.
- आमदार वसंतराव पुरके
विधानसभा उपाध्यक्ष

दादांनी व्यक्तिगतरीत्या केलेल्या मदतीमुळेच अनेक पदांपर्यत पोहोचू शकलो. सामाजिक व राजकीय क्षेत्रात दादांचे फार मोठे कार्य आहे. दादांनी जिल्ह्यात माझ्यासारख्या अनेकांना घडविले. निधनाची वार्ता कळताच मला व माझ्या कुटुंबीयांना दु:ख झाले आहे. दादांच्या निधनाने जिल्ह्यात एक पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
- आमदार माणिकराव ठाकरे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सामाजिक जाण असणारी व्यक्ती गेली. दादांच्या काम करण्याच्या शैलीमुळे विरोधकांनाही ते आपलेसे वाटायचे. दादा आपल्यातून निघून गेले यावर विश्‍वास बसत नाही. ही घटनाच माझ्यासाठी धक्कादायक आहे. जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व गमावले आहे. पाटील कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
- भावनाताई गवळी
खासदार

दादांच्या निधनाने राजकीय पोकळी तयार झाली आहे. श्रेष्ठ मार्गदर्शक निघून गेले. विरोधकांनाही सन्मानपूर्वक वागणूक देणारा द्रष्टा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- हरिभाऊ राठोड
माजी खासदार

उत्कृष्ट संघटक जिल्ह्याने गमावला आहे. उत्तमराव पाटील हे माझ्या मुलासारखे होते. त्यांचे वडील देवराव पाटील व त्यानंतर उत्तमराव पाटील यांची काँग्रेसवर निष्ठा होती. कालपरवाच ते राष्ट्रवादीत दाखल झाले आणि काळाने त्यांना आपल्यातून हिरावले आहे. माझ्या कुटुंबातलाच माणूस गेल्याने अतिव दु:ख झाले आहे.
- जांबुवंतराव धोटे
माजी खासदार

माझी राजकीय कारकीर्द घडविण्यात उत्तमरावदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे निधन ही सर्वांसाठीच दु:खद घटना आहे. काँग्रेस कमिटीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- आ.वामनराव कासावार
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

दूरदृष्टी ठेवणारा, राजकारणात राहून स्पष्ट भूमिका असलेला खुल्या दिलाचा नेता उत्तमरावदादा होते. त्यामुळेच विरोधी पक्षातही माणणारा वर्ग जिल्ह्यात आहे. स्वाभिमानी व राजकारणात राहुनही कटकारस्थान, हुजरेगिरी यापासून दादा कोसो दूर होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील स्वाभिमानी नेता हरविला आहे. माझे त्यांच्याशी पारिवारिक संबंध असल्याने ही घटना माझ्यासाठी कौटुंबिक आघात आहे. दारव्हा व दिग्रस येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत निधनाची दु:खद वार्ता कळाली. कार्यकर्त्यांनी लगेच दादांना श्रध्दांजली अर्पण करून मिरवणूक आटोपती घेतली. यातच त्यांचे थोरपण दिसून येते.
- आमदार संजय राठोड
जिल्हा प्रमुख, शिवसेना

शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी दादा सदैव भांडत होते. कृषी क्षेत्रात दादांचे भरीव योगदान आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील ते अजात शत्रू होते. विदर्भासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या घटनेने प्रचंड असे नुकसान झाले आहे.
- आमदार निलेश पारवेकर

दादांचे निधन ही आम्हा सर्वांसाठीच अतिशय दु:खद घटना आहे. या पलिकडे कुठलेही शब्द मला सूचत नाही.
- आमदार संदीप बाजोरिया

लोकनेता काळाने हिरावून घेतला आहे. सर्वसामान्यांना समान वागणूक देणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व उत्तमरावदादा होते. संयमाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून दादांवर सर्वांचेच प्रेम होते. त्यांच्या निधनाने आज मोठी हानी झाली आहे.
- योगेश गढिया
नगराध्यक्ष, यवतमाळ

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दादांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला चांगली उभारी मिळणार होती. मात्र दु:खद घटनेने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
- प्रकाश पाटील देवसरकर
माजी आमदार





साभार:- लोकमत

No comments:

Post a Comment