Pages

Showing posts with label नगर परिषद. Show all posts
Showing posts with label नगर परिषद. Show all posts

Friday, 2 August 2013

घाटंजीत नगराध्यक्षपदाची ‘संगितखुर्ची’

दिड वर्षात तिन नगराध्यक्ष : पदाच्या आघाडीत ‘कर्तव्य’ माघारले
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल तिन नगराध्यक्ष पाहण्याचा दुर्मिळ पण तितकाच दुर्दैवी योग घाटंजीवासीयांच्या नशिबी आला आहे. येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर तिस-यांदा ‘नवा गडी’ विराजमान होणार आहे. कोणतीही तांत्रिक अडचण नसतांना दिड वर्षात तिन वेळा सर्वसहमतीने नगराध्यक्ष बदलाची बहुदा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे की ‘संगितखुर्ची’च्या खेळातली? असा प्रश्न घाटंजीवासियांना पडला आहे.
उल्लेखनिय म्हणजे हे बदल प्रासंगिक नव्हे तर पुर्वनियोजीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करतेवेळीच ही ‘वाटणी’ ठरविली होती. ज्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने नगर पालिकेत सर्वाधीक जागा मिळविल्या ते जगदिश पंजाबी हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. एका वर्षात त्यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसचेच परंतु ना.मोघे यांचे खंदे समर्थक किशोर दावडा यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली. मात्र सहाच महिन्यामध्ये त्यांना ‘खो’ मिळाल्याने खुर्चीवरून उठावे लागले. आता एका वर्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे हे खुर्चीचा ताबा घेतील. त्यानंतरचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव आल्याने व त्या प्रवर्गातील एकमेव उमेदवार रा.कॉं.कडे असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अन्यथा घाटंजी नगर परिषदेने यावेळी पाच वर्षांच्या काळात सर्वाधीक नगराध्यक्ष बदलाचा नवा विक्रम प्रस्थापीत केला असता. पदाच्या या ओढाताणीत विकास तर सोडाच परंतु मुलभूत समस्यांकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही. पावसात शहराच्या विवीध भागामध्ये साचणारे तलाव व त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणारे घाटंजीकर, अवघ्या दोन तिन वर्षांपुर्वी बांधलेल्या रस्त्यांवर पावलोपावली पडलेले खड्डे, नाल्या नसल्याने पॉश वस्त्यांमध्येही वाहणारी गटारे यासह विवीध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. न.प.च्या सर्वच शाळांची दुरावस्था झाली आहे. न.प.कार्यालयातही ठिकठिकाणी पाणी गळते. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये यावर्षी मुरूम देखिल टाकण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांवर मुख्याधिका-यांची स्वाक्षरी मिळवणे हे मोठे दिव्य असल्याचा अनुभव घाटंजीकरांना येत आहे. अशातच नगराध्यक्षपदाची ही संगितखुर्ची मात्र शहरवासियांचे मनोरंजन करीत आहे.

युवा नगराध्यक्षाकडून ‘रामराज्या’ची अपेक्षा !
 येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदी आरूढ होणार असलेले राम खांडरे हे पालिकेच्या विस्कळीत कारभाराला रूळावर आणतील अशी अपेक्षा घाटंजीकर बाळगून आहेत. एक प्रगतीशील व्यावसायीक, उमदा कार्यकर्ता व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणुस अशी ओळख असलेले हे व्यक्तीमत्व अन नावामध्ये असलेला ‘राम’ यामुळे त्यांच्याकडून सुराज्याची अपेक्षा केली जात आहे.
अमोल राऊत
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

पाऊस पडताच घाटंजीत वाहते गटारगंगा !

नगर परिषद व पंचायत समितीतही पाणीच पाणी
अनेक भागातील नागरिकांचा जीव धोक्यात





नगर परिषद व तहसिल कार्यालयाच्या तुघलकी कारभारामुळे पाऊस पडताच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचुन सर्वत्र तलावाचे स्वरूप येते. पांढुर्णा रोड, आंबेडकर वार्ड, आनंद नगर, घाटी यासह अनेक भागातील नागरिकांना पाऊस येताच घर सोडून उंच ठिकाणी जावे लागते. बेशरमाच्या झाडांनी लुप्त झालेले नाले, पाणी वाहुन जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, कच-याने तुंबलेल्या नाल्या यामुळे पाऊस येताच सर्वत्र पाणी साचते. शहरातील रहिवाशी भागच नव्हे तर पाण्याच्या निच-याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषद कार्यालय परिसरालाही तलावाचे स्वरूप येते. अशीच परिस्थिती पंचायत समिती कार्यालयाचीही आहे. 
पांढुर्णा रोडवरील सरस्वती नगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी तहसिल व न.प.ला दिली होती. या ले आऊट मध्ये नाल्या नाहीत. या भागातून जो नाला वाहतो त्याचे पाणी थेट ले आऊट मधील घरांमध्ये घुसते. येथिल रहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या. तहसिलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पं.स.सभापती या सर्वांनी येऊन पाहणी केली. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. दि.३ जुलै रोजी ले आऊटधारक दिपक बळीराम बेलोरकर यांनी तहसिलदारांसमक्ष नाल्याची २४ तासात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. संदिप नार्लावार यांच्याबाबतही नागरिकांची अशीच तक्रार आहे. पांढुर्णा रोड, वसंत नगर व शहरातील ईतर भागात असलेले मोठे नाले बेशरम व गाजगवताने बुजलेले आहेत. वर्षानुवर्षे त्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे या सफाईचा निधी कोणाच्या घशात गेला असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर यांनी उपस्थित केला. सरस्वतीनगरासह शहरातील समस्या तातडीने न सोडविल्यास आंदोलन करण्याच्या ईशारा मनसेचे विनायक परचाके, गजानन ठाकरे, सागर मोहुर्ले, अनिल जाधव, आनंद पंधरे, राजु गावंडे, संदिप झाडे, राहुल धुर्वे, राजु ठाकरे, नितेश डोनारकर, संदिप राऊत, शिवराज्य चे जिल्हाध्यक्ष पवन परडखे, प्रशांत ठाकरे यांचेसह या परिसरातील रहिवासी प्रविण ठाकरे, वैâलास बगमारे, संदिप आत्राम, आकाश  बांगरे, विलास बगमारे, आसीफ शेख यांनी दिला आहे.

आमच्या जीवाची जबाबदारी प्रशासनावरच
आम्ही वारंवार तक्रारी करूनही न.प.व तहसिल प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने जीवीतहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील अशी प्रतिक्रीया या भागातील नागरिकांनी दै.सकाळ जवळ व्यक्त केली.

रस्त्यांवर डबक्यांचे साम्राज्य
घाटंजीच्या मुख्य रस्त्याला डबक्यांनी व्यापले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचुन असल्याने अनेक वाहनधारक यामध्ये पडून जखमी होतात. मात्र नगर परिषदेला ते बुजविण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणी न.प.मध्ये तक्रार घेऊन गेले तर त्यांना सांभाळून वाहने चालविण्याचा सल्ला देण्यात येतो.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

हि शाळा आहे की मुत्रीघर ?

न.प.च्या दुर्लक्षाने उर्दू शाळेची दुरावस्था

जीर्ण ईमारतीमुळे २१२ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात














शाळा म्हणजे विद्येचे भांडार...तिथे ज्ञानाचा दरवळ यावा, विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण असावे हि सर्वांचीच माफक अपेक्षा असते. मात्र घाटंजीतील नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळेचे चित्र जरा वेगळे आहे. येथिल विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण तर सोडाच पण गटार व मुत्रीघराच्या घाणेरड्या वासाने शाळेमध्ये बसणे दुरापास्त झाले आहे. 
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेमध्ये वर्ग १ ते ७ मध्ये ४९ मुले व ९३ मुली  तर वर्ग ८ ते १० मध्ये ३२ मुले व ३८ मुली असे एकुण २१२ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शाळेची ईमारत अत्यंत जीर्ण झाली असुन भिंतीना भेगा पडल्या आहेत त्यातून पाणी झिरपते. विंचु, साप असे धोकादायक जीव जंतू सुद्धा वर्गात येत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. छतावरील कवेलु फ़ुटल्याने
 वर्गात पाणी गळते. एका वर्गखोलीचा स्लॅब खाली झुकला आहे. तो कधीही कोसळु शकतो. परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर टिनाचे शेड टाकुन त्याला स्वयंपाकगृह केले आहे. ६ बाय ८ च्या या जागेतच पोषण आहार शिजवुन विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवायला दिले जाते. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असावे असा नियम आहे. मात्र उर्दू शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाही. शाळेलगत असलेल्या न.प.कन्या शाळेचे दोन मुत्रीघर आहे. त्यापैकी वापर करण्या योग्य नसल्याने एक कुलूपबंद तर दुस-या मुत्रीघराचा वापर परिसरातील व्यापारी व नागरिक करतात. न.प.उर्दू शाळा, कन्या शाळा व अंगणवाडी एकाच परिसरात आहेत. मात्र संरक्षक भिंत नसल्याने मुत्रीघर व परिसरामध्ये नागरिक नेहमीच घाण करून ठेवतात. वर्गखोल्यांच्या भिंती, स्वयंपाकगृहाचाही वापर मुत्रीघरासारखाच केल्या जातो. त्यामुळे या परिसरात अत्यंत उग्र दर्प दरवळत राहतो. शिवाय शिक्षीका, विद्यार्थीनींची यामुळे प्रचंड कुचंबना होते. विद्यार्थींनीना तर अत्यंत संकोचलेल्या अवस्थेत परिसरात वावरावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थीनी वर्गाबाहेरच पडत नाहीत.
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची खोलीही जीर्ण झाली आहे. पाणी झिरपत असल्याने भिंती काळवंडल्या आहे. शाळेचे दस्तावेज सुरक्षीत राहतील का याचीही हमी नाही. एकदा तर चोरट्यांनी जीर्ण झालेली खिडकी तोडून कार्यालयातील कपाटे फोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली होती. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये १३१ अल्पसंख्यांक विद्यार्थींनी व ८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी आज दुपारी शाळा व्यवस्थापन समितीसह न.प.कार्यालय गाठले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयात तक्रार देऊन त्यांना परतावे लागले. नविन जागेवर उर्दू शाळेची ईमारत बांधण्यासाठी न.प.ने २०१२ मध्ये ठराव घेतला आहे. जागा उपलब्ध आहे. नविन ईमारतीसाठी निधीही आला आहे. मात्र तरी देखिल नगर परिषद नविन ईमारत बांधण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे.सलिम कुरेशी यांनी केला. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Tuesday, 26 March 2013

घाटंजीच्या आठवडी बाजारात असुविधांचा कळस


तालुक्यातील अनेक खेड्यांसाठी घाटंजी ही मुख्य बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. मात्र व्यावसायीक व ग्राहक यांच्यासाठी कोणत्याही सुविधा स्थानिक नगर परिषदेने आजवर पुरविल्याचे उदाहरण नाही. अनेक खेड्यापाड्यांमध्येही आता आठवडी बाजारात व्यावसायीकांसाठी ओटे बांधलेले आहेत. मात्र घाटंजी न.प.ने आजवर ओटे बांधण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. घाटंजीच्या बाजारात भाजीपाला, धान्य, मसाले, फळे, कापड, फरसाण यासह अनेक किरकोळ व्यावसायीक आपली दुकाने थाटतात. केवळ मुरूम व दगड टाकुन त्यांना जागा आखणी करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र दुकानांच्या अवतीभवती दगड धोंडे, कचरा पडून राहत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो.
आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या या आठवडी बाजारात सर्वत्र प्रचंड घाण असल्याने वातावरणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवुनच कसाबसा बाजार करावा लागतो. बाहेरगावाहुन येणारे व्यावसायीक व ग्राहकांच्या सोयीसाठी पाणी, सार्वजनिक शौचालय, मुत्रीघर यापैकी कोणतीही सोय आठवडी बाजार परिसरात नाही.
व्यावसायीकांना कोणतीही सुविधा न देणारी नगर परिषद त्यांचेकडून दर आठवड्याला कर मात्र न चुकता वसुल करते. व्यवसायानुसार १० रू, २० रू, ५० रू असा कर दैनिक वसुलीचे वंâत्राटदार वसुल करतात. मात्र त्या तुलनेत दुकानापर्यंत ग्राहक विनाअडथळा येऊ शकेल एवढी व्यवस्थाही न.प.ने आजवर केली नाही. पावसाळ्यात तर बाजारात एवढी घाण पसरलेली असते की, पाय कुठे ठेवावा असा प्रश्न पडतो. पाऊस आला की व्यावसायीकांची तारांबळ उडते. अनेकदा तर मोठे आर्थिक नुकसानही होते.
आजवरच्या कोणत्याही न.प.सत्ताधा-यांनी आठवडी बाजाराकडे लक्ष दिले नाही. व्यवसाय करण्यासाठी सिमेंटचे ओटे, शेड, स्वच्छ परिसर, बाजारात फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा, रस्ते, पाणी,स्वच्छतागृह या सुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र सध्यातरी तेवढी ईच्छाशक्ती न.प.चे सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यापैकी कोणामध्येही असल्याचे दिसत नाही हेच घाटंजी शहराचे दुर्दैव आहे.
साभार :- देशोन्नती 


Saturday, 9 March 2013

अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

रस्ता तिथे अतिक्रमण अशी परिस्थिती सध्या सर्वत्र आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर अगदी ग्रामिण परिसर व जंगलात देखिल अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहेत. बेरोजगारी या गोंडस नावाखाली कोट्यवधींची जमिन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. घाटंजी तालुकाही त्याला अपवाद नाही. घाटंजी शहरात तर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहे. अवघ्या काही महिन्यांपुर्वीच शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली. बहुतांश अतिक्रमण हटविण्यात आले. यंत्रणेचा यामध्ये प्रचंड खर्चही झाला. मात्र काही महिने जात नाही तोच अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाली.
अतिक्रमणाचे समर्थन नक्कीच केल्या जाऊ शकत नाही. मात्र ते हटविल्यावर हजारो बेरोजगारांवर कोसळणारी बेरोजगारीची कु-हाड व त्यावर अवलंबुन असणा-या कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. यंत्रणेने योग्य नियोजन केले तर बेरोजगारांचा प्रश्न व अतिक्रमणाची समस्याही निकालात निघेल. शहरात नगर परिषद कार्यालय ते राम मंदिर रोड, शि.प्र.मं.कन्या शाळा, बसस्थानक, आठवडी बाजार परिसर यासह विवीध भागात किरकोळ व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. नगर परिषद तसेच खासगी व्यक्तींची कॉम्प्लेक्स आहेत. मात्र त्याची किंमत सर्वसाधारण व्यावसायीकांच्या आवाक्या बाहेरची आहे. मोहिमेदरम्यान त्याच जागेवर व्यावसायीकांसाठी दुकाने काढण्यात येतिल असा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे प्रचंड खर्च करून मोकळी झालेली जागा पुन्हा अतिक्रमणाने व्यापली. त्याच जागेवर दुकाने दिल्यास अतिक्रमणधारक त्यासाठी भाडे देण्यासही तयार आहेत. नगर परिषदेसाठी हे एक उत्पन्नाचे साधन होऊ शकते. मात्र ही बाब दुर्लक्षील्या गेली हे दुर्दैवच.
शिवाजी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. त्यांच्या दुकानांच्या पाय-या अगदी रस्त्यापर्यंत आल्या आहेत. वाहतुकीला त्याचा प्रचंड अडथळा होतो. मात्र प्रत्येक अतिक्रमण हटाओ मोहिमेत या ‘श्रीमंत’ अतिक्रमणाकडे कानाडोळाच करण्यात आला आहे. केवळ कोणी आक्षेप घेऊ नये म्हणुन थातुरमातुर कार्यवाही केल्या जाते. या भागात मुख्यत्वेकरून सराफांची दुकाने आहेत. तसेच काही गोदाम सुद्धा या भागात असल्याने आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर जेव्हा एखादा ट्रक अथवा वाहन साहित्य नेण्यासाठी उभे केल्या जाते तेव्हा वाहतुकीचा खोळंबा होतो. या रस्त्याची भुमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी अनेकांची मागणी आहे. पोलीस स्टेशन चौकात अतिक्रमणाच्या जागेत असलेले फ़ेब्रीकेटर्स व मिरचीची गिरणी वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. मिरचीही पुड रस्त्यावरून जाणा-यांच्या डोळ्यात जात असल्याने या मार्गावर अनेकदा अपघातही होतात. तसेच फ़ेब्रीकेटर्सचे साहित्य रस्त्यावरच पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळ्याचे ठरते. भर चौकात असलेल्या या  वेल्डींगच्या दुकानाकडे प्रशासन डोळेझाक का करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या नगर परिषदेवर अतिक्रमण काढण्याची व प्रतिबंध करण्याची जबाबदारी आहे त्या नगर परिषदेचे एक प्रवेशद्वारच अतिक्रमणाने व्यापले आहे. दर दोन तिन वर्षांनी राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाओ मोहिम केवळ एक औपचारीकताच होऊन बसली आहे. एकदा अतिक्रमण काढल्यावर ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहुन बेरोजगारांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी योग्य मोबदला घेऊन जागा दिल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
साभार :- देशोन्नती 

Friday, 1 February 2013

घाटंजी न.प.च्या विषय समित्यांपुढे आव्हानांचा डोंगर


घाटंजी शहराच्या एकंदरीत अवस्थेकडे नजर टाकली तर येथे नगर परिषद खरंच कार्यरत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. गेल्या महिन्यात न.प.च्या विषय समित्यांचे नव्याने गठण झाले. न.प.निवडणुकीनंतरच्या एका वर्षात अपेक्षे प्रमाणे काहीच घडले नाही. बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या चारही विषय समित्यांचा कारभार सुमारच राहिला आहे. घाटंजी नगर परिषदेंतर्गत आरोग्य सभापती आहे मात्र कर्मचा-या अभावी आरोग्य यंत्रणाच अस्तित्वात आहे की नाही असे चित्र आहे. शहराच्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ पॉश वस्त्यांमध्येच न.प.च्या कचरा उचलणा-या गाड्या जातात. सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने अनेकांनी पाणी रस्त्यावरच सोडले आहे. त्यामुळे शहराला डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून कोणत्याही उपाययोजना होतांना दिसत नाही.
पाणी पुरवठ्याचीही तशीच परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन आजवरच्या पदाधिका-यांनी केले नाही. केवळ वाघाडी नदीच्या पाण्यावरच घाटंजीकरांची तहान भागते. मध्यंतरी नगर परिषदेने नविन नळ कनेक्शन देणेच बंद केले होते. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक वस्त्यांमध्ये पाणी पोहचत नाही. सार्वजनिक पाणवठ्यावर नागरिकांना रात्र जागुन काढावी लागते. शहरासाठी महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना प्रस्तावीत आहे. मात्र ती कधी कार्यान्वयीत होणार याची वाट घाटंजीकर पाहात आहेत.
नगर परिषदेच्या शाळांची अवस्थाही काही वेगळी नाही. अनुभवी आणी दर्जेदार शिक्षक असताना शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. एकीकडे गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक मेहनत घेतात. मात्र अनेक बाबतीत नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या प्रयत्नातून अपेक्षीत अशा गोष्टी साध्य झाल्या नाही.
बांधकामाबाबत तर काही बोलण्याचीही सोय नाही. रस्ते, नाल्या, रपटे बांधकाम तर एवढ्या सुमार दर्जाचे आहे की, अवघ्या काही महिन्यातच त्याचे खरे स्वरूप निदर्शनास येते. बाबासाहेब देशमुख कॉलनीतून बसस्थानकाकडे जाणारा रस्ता, शिवाजी चौक ते पंचायत समिती यासह काही सिमेंट रस्ते बांधकाम होताच अवघ्या चार ते पाच महिन्याच्या काळात उखडले. आता त्यावर केवळ डागडूजी करून मोठा घोळ लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगर परिषदेच्या नविन विषय समित्यांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. बहुतांश पदाधिकारी जुनेच आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे अनेक आव्हाने असली तरी त्यांच्या कडून खुप अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही यांची घाटंजीकरांना खात्री पटली आहे.
साभार :- देशोन्नती 



Friday, 28 December 2012

वैभव राठोड याचे सुयश



येथिल नगर परिषद शाळा क्रं.५ चा विद्यार्थी वैभव देविदास राठोड याची केन्द्रीय नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. सध्या तो न.प.शाळेत ६ व्या वर्गात शिकत आहे. या यशासाठी त्याला मुख्याध्यापक प्र.ल.बोमिडवार, वर्गशिक्षक क.तु.कांबळे, ग.ग.बंडीवार, रूपेश कावलकर, तुषार बोबडे, न.उ.राठोड, स्विटी कपिले यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 16 November 2011

निवडणुकीचा खर्च ‘धनादेश’ देऊनच होणार !


प्रत्येक उमेदवाराला काढावे लागणार स्वतंत्र बँक खाते
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषद निवडणुकीत निवडणुक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढविली आहे. मात्र हा खर्च चेकद्वारेच करावा असा अध्यादेश काढून उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांना लगामही घातली आहे. यावेळच्या निवडणुकीत वार्डांचे प्रभागात रूपांतर झाल्यामुळे कार्यकक्षा तब्बल चौपट ते पाचपट झाली आहे.त्यामुळे यापुर्वी असलेल्या खर्च मर्यादेत एवढ्या मतदारांपर्यंत पोहचणे उमेदवारांना शक्य होणार नाही ही बाब लक्षात घेऊन आयोगाने  उमेदवारांच्या खर्चात जवळ जवळ ६ ते ७ पटीने वाढ करत ही मर्यादा वाढविली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. कारण प्रत्यक्ष खर्चाचा व कागदी खर्चाचा मेळ लावताना उमेदवारांना खुप मोठी कसरत करावी लागणार होती. पण निवडणुक आयोगाने खरा झटका नगरपालिकेला पाठविलेल्या अध्यादेशाने दिला आहे. कारण यात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, उमेदवारांनी निवडणुक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते काढून ते जो खर्च करणार आहेत. तो खर्च धनादेशाच्या माध्यमातून करावा लागणार आहे. सर्वसामान्य उमेदवारांसाठी जरी हा निर्णय अडचणीचा ठरणार असला तरी आर्थिक बळावर निवडणुक लढविणा-या उमेदवारांवर या निर्णयाने फास आवळल्या जाणार आहे. या निर्णयाने संपुर्ण बेकायदेशीर प्रकार जरी थांबले नाहीत तरी ब-याच प्रमाणात आर्थिक उलाढालीवर आयोगाचे नियंत्रण राहणार आहे.
जर एखाद्या उमेदवाराने या नियमाचे उल्लंघन केले व त्या विरोधात सामान्य माणसांनी जरी तक्रार दिली व ते कृत्य सिद्ध झाले तर त्या उमेदवाराचे सदस्यत्व देखील रद्द होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांना आर्थिक गणिते जुळवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पुर्वी पैशाचा, खर्चाचा मेळ घालणे सोपे काम होते. आता मात्र ते अवघड बनले आहे. याबाबतचा अध्यादेश स्थानिक निवडणुक अधिका-यांना प्राप्त झाला असुन प्रत्येक उमेदवाराला या आदेशाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती घाटंजीचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी ‘देशोन्नती’ शी बोलतांना दिली. त्यामुळे यावर्षी मतदारांना पार्ट्या, मंडप, सभा, बैठका, पथके, वाहन खर्च आदीचे बील धनादेशाद्वारेच अदा करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच राजकीय पक्षांचीही मोठी गोची होणार आहे.
साभार:-देशोन्नती 

Sunday, 13 November 2011

घाटंजीत शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवारासाठी कॉंग्रेस-रा.काँ. करणार अ‍ॅडजस्टमेंट?

सत्तेत असतांना नगर परिषदेला ‘मालकी’ हक्काने वापरणा-या सेनेच्या नगर सेवकाला या निवडणुकीत नागरिकांच्या संतापामुळे पळता भुई थोडी होणार असल्याने त्याने कॉंग्रेस व रा.-कॉ.या पक्षांसोबत अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण अवलंबिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेच्या या उमेदवाराच्या वार्डामध्ये आरक्षणामुळे त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. मात्र वार्डाबाहेर तिळमात्रही अस्तित्व नसल्याने  निवडुन येणार नाही याची खात्री उमेदवारासह सर्वांना आहे. आपली राजकीय ‘दुकानदारी’ कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेल्या या नगरसेवकाने विवीध मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेस रा.कॉ.ला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. त्यावेळी कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सेनेला मदत केली. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही या नगरसेवकांची उपस्थिती चर्चिल्या गेली होती. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक जिंकली त्या पक्षाला व बहुमताला महत्व न देता दोन्ही कॉंग्रेसचे काही नगरसेवक सेनेला ‘शरण’ गेले. कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या यजमानाचे कोट्यवधींचे ले-आऊट तांत्रीक कारणामुळे प्रलंबीत आहे. या ले-आऊटला मार्गी लावण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेशी सलगी केली होती. मात्र अद्यापही या ले-आऊटचा तिढा सुटलेला नाही.
या निवडणुकीत सेनेच्या या नगरसेवकाला सहकार्य केले नाही तर ले-आऊटच्या कामात तो ‘कुरापती’ करणार या भितीने पुर्वाश्रमी कॉंग्रेस मध्ये असलेल्या व सध्या रा.कॉ.च्या वाटेवर असलेल्या या नगरसेविकेच्या पतीकडे रा.कॉं.ची शहरातील रणनिती ठरविण्याची जबाबदारी आहे. तसेच न.प.मध्ये निवडुन न आल्यास हा उमेदवार कॉंग्रेससाठीही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेस व रा-कॉं.आपल्या प्रमुख उमेदवारांना सेनेच्या उमेदवाराविरूद्ध न ठेवता ईतरत्र हलविणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवाराऐवजी एखादा ‘कामचलाऊ’ उमेदवार देऊन सेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एकंदरीतच सर्वच दृष्टीने खचलेली सेना व व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणात आलेले कॉंग्रेस-रा.काँ.मधील काही महाभाग यांच्या पक्षविरोधी डावांना वरिष्ठ सहकार्य करतात की हाणुन पाडतात याकडे घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:-देशोन्नती 

Friday, 11 November 2011

बाहेरुन आणलेल्या गर्दीत हरविले न.प.चे धुरेकरी




तालुका कॉंग्रेसने नगर परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर घाटंजीत आयोजीत केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न करून बरीच गर्दी जमविली. कार्यक्रमाच्या मंचकावर नेते व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र या सर्व धावपळीत नगर परिषद निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर कॉंग्रेसची धुरा आहे ते जगदिश पंजाबी मान्यवरांमध्ये कुठेच दिसले नाहीत. विषेश म्हणजे त्यांचा उल्लेखही कार्यक्रमादरम्यान झाला नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. जगदिश पंजाबी हे बराच वेळ प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र काही वेळानंतर ते मंडपात दिसले नाही. अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर विराजमान होते. निलेश पारवेकर यांच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते मात्र व्यासपीठाच्या बाजुला होते. आ.पारवेकरांनी संचालन करणा-याला त्यांना व्यासपीठावर बोलाविण्याची सुचना केली. मात्र बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नामोल्लेख न करता त्यांना आमंत्रीत करण्यात आले. एकंदरीतच आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सामाजीक न्याय मंत्र्यांच्या  निकटस्थ असलेल्या जि.प.सदस्याने खासगी वाहनांद्वारे खेड्यापाड्यातुन विवीध कारणाने लोकांना एकत्रीत केले. कार्यक्रम झाल्यावर अनेक जण आपले काम होईल या आशेने ‘भाऊंना’ शोधत होते.
या दरम्यान निष्ठावंतांच्या मेळाव्यात काही नागरीकांनी एका खिसेकापुला पकडले. त्याला बेदम मारहाण करीत व्यासपीठाजवळ नेण्यात आले. सदर चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात देण्याची विनंती जमावाने संयोजकांना केली. मात्र संयोजक आपल्याच कामात असल्याचे लक्षात आल्यावर जमावाने त्या चोरट्याची धुलाई केली. काहींनी तर त्याला व्यासपीठाजवळच्या खांबाला दोरीने बांधण्याचाही प्रयत्न केला. हा गोंधळ थांबविण्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पुढे धजावत नव्हते. अखेर जमावाने त्या चोरट्याला मारहाण करीतच पोलीसांच्या स्वाधीन केले. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने पोलीस ताफा होता. मात्र चोरट्याची धुलाई होत असताना एकही पोलीस कर्मचारी कार्यक्रमस्थळी नव्हता. पोलीस स्टेशनला पोलीसांनी सदर चोरट्याची झडती घेतली असता त्याचेजवळ काहीही आढळले नाही. मो.अन्वर मो.शमी असे या चोरट्याचे नाव असुन तो दिग्रस येथिल रहिवासी आहे.
साभार:- देशोन्नती 

Friday, 4 November 2011

घाटंजी नगर परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची ‘केविलवानी’ धडपड

अखेर बहुप्रतिक्षीत नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले. येत्या ८ डिसेंबरला नागरीक आपले शहर कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असुन आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेने न.प.निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत केविलवानी धडपड सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. घाटंजी शहरासाठी व येथिल नागरीकांसाठी गेली दोन अडीच वर्षे जे केले नाही ते अवघ्या एका महिन्यात करण्याचा खटाटोप नगर परिषदेतील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. आचार संहिता लागण्याच्या महिनाभर आधी शहरातील विवीध भागात रस्ते व नाल्यांची कामे एवढ्या वेगाने सुरू करण्यात आली की, मतदान करायला नागरीक त्या रस्त्यावरूनच जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या धडपडीत बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. निवडणुक तोंडावर आल्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्याची वर्तमानपत्रातुन प्रसिद्धी करण्याचा सपाटाच लावला आहे. जनतेच्या मनात खदखदत असलेल्या या संतापाला प्रसिद्धीची पुंâकर घालण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. या नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारांचीही कमतरता आहे. मागील महिन्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेल्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आमदार संजय राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही निवडणुक शिवसेना भाजपासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात घाटंजीकरांनी आजवरचे सर्वात निष्क्रीय पदाधिकारी पाहिले. जनतेचे प्रश्न, शहरातील विवीध समस्या व विकास याचेशी काहीही देणेघेणे न ठेवता एकमेकांचे पाय ओढुन आपल्या पदरात मिळेल ते पाडुन घेण्यातच या पदाधिका-यांनी पाच वर्षे घालवली. आता जनतेच्या समोर जाण्याची वेळ आल्याने या ‘आणीबाणीच्या’ विकासकामांचा बेगड लावुन जनतेची दिशाभुल करण्याच्या या प्रयत्नाला मतदार कितपत भिक घालतात हे लवकरच स्पष्ट होईल.
साभार :- देशोन्नती

Monday, 24 October 2011

पाच वर्ष ‘छळ’ केल्यावर न.प.ला विकासकामांचा ‘पुळका’


गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचा निधी आपल्या विकासासाठी वापरून नगर परिषद पदाधिका-यांनी घाटंजीकरांचा अक्षम्य छळ केला. आता निवडणुक महिनाभरावर असतांना विवीध विकास कामांना सुरूवात करून आम्ही किती कर्तव्य तत्पर आहोत याचे ‘दयनिय’ प्रदर्शन नुकतेच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर साधा मुरूम टाकण्यासाठी नागरीकांना न.प.कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. त्यानंतरही तिथे मुरूमाऐवजी माती टाकुन निर्लज्जपणाचा कळस वर्तमान पदाधिका-यांनी गाठला. हा प्रकार कुठे जाणीवपुर्वक तर कुठे पदाधिका-यांच्या मनमानीपणामुळे करण्यात आला.
घाटंजी न.प.हद्दीतील विवीध कामांचे भुमिपुजन शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेष ठाकुर यांनी भुमिपुजनाच्या फलकावर स्वत:ची सचित्र प्रसिद्धीही करून घेतली. घाटंजी शहरात जणु काही विकासाची गंगाच अवतरली आहे असा बनाव निर्माण करून घाटंजीकरांची थट्टा उडविल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीकांना ज्या रस्ते नाल्यांची गरज होती ती कामे आतापर्यंत अडवुन निवडणुक येताच अत्यंत तत्परतेने त्या कामांना सुरूवात करण्यात आली. यापुर्वी न.प.च्या सत्तेत असलेल्यांनीही त्यावेळी निवडणुकीपुर्वी विकासाचे असेच ‘नाटक’ उभे केले होते. तेव्हा जनतेने त्याना त्यांची जागा दाखविली होती हे विषेश. बसस्थानकाकडे जाणा-या रस्त्यांचे काम आता सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या रत्यावरून जाणे म्हणजे एकप्रकारची शिक्षाच होती. त्यात पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये मातीचे ढिगारे टाकुन नगर परिषदेने घाटंजीकरांचा अंतच पाहिला. आता निवडणुकीपुर्वी या रस्त्याचे काम सुरू करून जखमेवर मिठ चोळण्याचेच काम न.प.ने केले असल्याची जनमानसात चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी केवळ नगर सेवकांच्याच विकासासाठी वापरला गेला अशी संतप्त भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे मतांची ‘भिक’ मागायला जाताना प्रसंगी या रागाचा सामनाही वर्तमान पदाधिका-यांना करावा लागणार आहे. केवळ आरक्षणामुळे शिवसेनेकडे नगराध्यक्षपद आले. त्यामूळे वच्छला धुर्वे गेली दोन अडीच वर्ष नाममात्र नगराध्यक्षपदावर विराजमान आहेत. पदाचे संपुर्ण अधिकार मात्र नगरसेवक शैलेष ठाकुर यांनीच वापरले. गेली काही वर्षे सुरू असलेल्या रामभरोसे कारभारामुळे घाटंजी नगर परिषदेत पदाधिकारी व प्रशासन अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
नुकतीच भुमिपुजन करण्यात आलेली सर्व कामे शैलेष ठाकुर यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला देऊन निवडणुकीचा खर्च काढण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या या भुमिपुजन नाट्याबाबत जनतेमध्ये समाधानाऐवजी संतापच दिसुन येत आहे.

Tuesday, 2 August 2011

नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार ?

घाटंजीकरांची संतप्त भावना
न.प.वर नियंत्रण कुणाचे?

जीवघेणे रस्ते, कच-याने तुंबलेल्या नाल्या, महत्वाच्या रस्त्यांवर नसलेली पथदिव्यांची व्यवस्था अशा स्थितीत गेल्या काही वर्षापासुन दिवस काढणा-या घाटंजीकरांमध्ये आता असंतोष खदखदत आहे. 
मोठ्या अपेक्षेने सत्तापालट करून नव्या चेह-याना संधी देणा-या घाटंजीवासीयांचा भ्रमनिरासच झाला आहे. विकास तर सोडाच पण नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तताही या काळात नगर परिषदेला करता आली नाही. स्वयंस्पुâर्तीने न.प. ने काम केलेले नाहीच परंतु नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घ्यायलाही पदाधीकारी व प्रशासन यांना वेळ नाही. सध्या पावसाळी दिवसांमध्ये शहरातील अनेक भागात कच्च्या रस्त्यांवर चालणेही दुरापास्त झाले आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसंत नगर, गुरूदेव वार्ड, नेहरु नगर, ईस्तारी नगर, जेसिस कॉलनी, अंबा नगरी, बाबासाहेब देशमुख कॉलनी यासह अनेक भागातील अंतर्गत रस्ते चिखल व खड्ड्यांनी व्यापले आहेत. त्यावरून वाहने चालविणे तर दुरच पण चालणेही कठीण झाले आहे. या भागात नाल्या नसल्याने सांडपाणी पावसाच्या पाण्यासोबत घरात शिरते. वसंत नगराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर पथदिवे नाहित त्यामुळे रात्री शिकवणी वर्गाला जाणा-या विद्यार्थ्यांना  जीव मुठीत घेऊनच येथुन जावे लागते.

 यामुळे संतप्त झालेल्या वसंत नगरातील महिलांनी प्रभारी मुख्याधीकारी व तहसिलदार संतोष शिंदे तसेच न.प. अध्यक्ष वच्छला धुर्वे यांना भेटुन समस्यांचा पाढा वाचला होता. समस्यांचे निराकरण तातडीने न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा ईशारा तारा टाले, मिनाक्षी जकाते, श्रीमती खिरटकर, लता नखाते, मिना घुगरे, लिला विरदंडे, ललिता लिंगरवार, मंगला खरतडे, सुनिता पडलवार, अंजली तांबारे, सुलोचना नामपेल्लीवार, मयुरी डफळे, श्रीमती लाकडे, उज्वला मुनेश्वर, श्रीमती चोपडे, मंजुळा पेंदाम, श्रीमती दातारकर, सुशिला मनवर, श्रीमती भेंडे, ललिता खरतडे, श्रीमती चिलकावार, सुवर्णा कोल्हे, पुष्पा वराटकर, श्रीमती राठोड, दिपाली गवार्ले, संध्या आस्वले, श्रीमती भुरे, सुमन मंगाम, श्रीमती संगनवार, वंदना गंधारे, श्रीमती पुसनाके, मंदा बिसन, अनिता गायकवाड, श्रीमती धोबे, श्रीमती पाटील यांनी दिला होता. सात दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर काही ठीकाणी मुरूम टाकण्यात आला. मात्र रस्त्यावरील मुरूम पसरवायचा असतो हा निकष कदाचीत घाटंजी न.प.ला लागु नसल्याने मुरूमाचे ढिग तसेच रस्त्याशी एकरूप झाले आहेत.
गुरूदेव वार्ड व बाबासाहेब देशमुख कॉलनीत हिच परिस्थिती आहे. नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अधिकच धोकादायक झाले आहेत. वसंत नगरात किशोर धोबे यांच्या धराजवळ दगडासारख्या मुरूमाचे ढिग टाकल्याने चालणे दुरापास्त झाले आहे. गुरूदेव नगरातील रहिवाशांनी या भागातील नगरसेवक व न.प. उपाध्यक्ष सुरेश कुडेगावे यांचेकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कैफियत  मांडली असता माझ्या हातात काहीच नाही मी काय करू शकतो? असे बेजबाबदारपणे बोलुन जबाबदारी झटकल्याची माहिती आहे. तर मुख्याधिकारी शिंदेनी कर्मचा-यांना सुचना देऊनही त्यांना कुणीच महत्व दिले नाही. त्यामुळे नगर परिषदेवर आता नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निर्ढावलेले नगरसेवक, वचक नसलेले प्रशासन आणी यावर वरिष्ठ यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे नागरीकांचे मात्र हाल होत आहे. नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार असा संतप्त सवाल घाटंजीकर करीत आहेत.