Pages

Showing posts with label नगरसेवक. Show all posts
Showing posts with label नगरसेवक. Show all posts

Monday, 9 January 2012

नव्या नगरसेवकांपुढे अपेक्षा अन आव्हानांचा डोंगर


नगर परिषदेतील निवडीचे कार्यक्रम एकदाचे संपले. घाटंजीकरांनी निवडून दिलेले नवे नगरसेवक आता काहीसे स्थिरावले आहेत. यावेळी जनतेने नव्या चेह-यांना प्रामुख्याने संधी दिली आहे. १७ पैकी तब्बल १३ नगरसेवक नवखे आहे. त्यांना नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लागेल. मात्र नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांची हे पद भुषविण्याची दुसरी वेळ आहे. त्यामुळे शहरातील समस्यांशी ते अवगत आहेत. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्याने संख्याबळाचीही चिंता नाही. एकंदरीतच या अगोदरच्या सत्ताधा-यांसारखा बहुमत नसल्याचा राग या आघाडीला आळवता येणार नाही.
घाटंजी शहर विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे. निवडणुक काळात सर्वांनीच मतदारांना विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र विकास होईल अशी खोटी आशा देखिल मनात बाळगण्यास घाटंजीकर तयार नाहीत. खरं तर विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन घाटंजी शहराला बराच काळ लागेल. विकास होणे हा लांबचा पल्ला आहे. नागरिकांना सध्या गरज आहे ती रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता व लोकाभिमुख सेवेची. या प्राथमिक गरजा पुरविण्यास जरी सध्याचे नगरसेवक यशस्वी ठरले तरी जनतेच्या दृष्टीने तो विकासच ठरेल. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सत्तेवर असलेल्या निगरगट्ट पदाधिका-यांमुळे घाटंजीकरांचा नगर परिषदेवरील विश्वासच उडाला आहे. निवडणुकीवर डोळा ठेवुन शहरात विवीध विकासकामांची वेगाने सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख रस्त्यांचे बांधकाम निवडणुक होईस्तोवर झालेही. मात्र ईतर कामे निवडणुक आटोपताच थंड पडली आहेत. त्यामुळे ही कामे केवळ निवडणुक डोळ्यापुढे ठेवुनच एवढ्या तडकाफडकी सुरू करण्यात आली होती ही बाब सिद्ध झाली आहे. निवडणुक काळात प्रचारासाठी लावण्यात आलेल्या मोठमोठ्या होर्डींग्सवरील रोषणाईने शहर न्हाऊन निघाले होते. मात्र आता   रस्त्यांवर अंधार दाटला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील ८० टक्के पथदिवे रात्री बंद असतात. शिवाय या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.  याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या बगिच्यांमध्ये सध्या जनावरे चरायला जातात. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या शहरात केवळ एक नाममात्र सार्वजनिक मुत्रीघर आहे. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांनी सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याने अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
अशा एकापेक्षा एक समस्यांचे आव्हान नव्या दमाच्या नगरसेवकांपुढे आहे. शिवाय निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांमुळे त्या अपेक्षांचेही ओझे आहे. या अपेक्षांच्या पुर्ततेकरीता नगरसेवक आपली शक्ती पणाला लावतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यात शक्ती वाया घालवतात याकडेच घाटंजीकर नजरा लावुन बसले आहेत.
अमोल राऊत

Thursday, 15 December 2011

घाटंजी नगर परिषदेची धुरा तरूणाईच्या खांद्यावर द्यावी

नगर परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल लागल्याने घाटंजीत त्रिशंकु सत्ता स्थापीत होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती घाटंजीकरांमध्ये आहे. केवळ एका विजया अभावी बहुमता पासुन वंचीत राहिलेल्या कॉंग्रेसकडे आठ नगरसेवक आहे. मागील निवडणुकीपेक्षा कांग्रेसने सहा जागांची आघाडी मिळविली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला अंतर्गत कुरघोडींमुळे केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेला एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच घाटंजीकरांनी पराभवाची चपराक लगावल्याने चार जागांवरील विजय सेनेच्या जिव्हारी लागला आहे. आजवरच्या नगरपरिषदेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त आहेत. कुणीही सत्तेत आले तरी सारखेच अशी भावना निर्माण झाली आहे. घाटंजीकरांमध्ये आलेली ही निराशा दुर करायची असल्यास नव्या दमाच्या नगरसेवकांवर न.प.ची धुरा देण्याची गरज व्यक्त होत आहे. मतदारांनीही काही प्रभागात प्रस्थापीतांना नाकारून नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. यापासुन धडा घेत नेत्यांनीही नगर परिषदेची सत्ता तरूणाईच्या हातात देणे ही शहर विकासासाठी आवश्यक बाब समजल्या जात आहे. गेली काही वर्षे नगराध्यक्षपदी महिला विराजमान होत्या. त्यामुळे त्यांच्या पदाचे सर्व अधिकार नवरोबांच्याच हातात होते. तसेच अनुभवी नगरसेवकांनीही नगराध्यक्षाच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन नगराध्यक्षपदावर सत्ता गाजविली. या विचित्रपणाला जनता कंटाळली असुन निर्णयक्षमता असलेल्या व्यक्तीकडेच पदे असावीत असा मतप्रवाह निर्माण होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस मधुन संदिप बिबेकार, परेश कारिया, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राम खांडरे व सेनेचे संतोष शेंद्रे या नव्या पिढीला जनतेने निवडुन दिले आहे. यांना पुढे करून जेष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शनाचे कर्तव्य बजावल्यास तो ख-या अर्थाने जनादेशाचा सन्मान होईल. घाटंजी तालुक्यात आजवर नविन नेतृत्व पुढे आल्याचे दिसले नाही. ज्यांना योगायोगाने पदे मिळाली त्यांच्या पदाचा प्रभाव नेत्यांच्या वलयामुळे दिसला नाही. तर कधी नेत्यांनी पद देऊन अधिकार स्वत:कडेच ठेवल्याने नवख्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली नाही हे घाटंजी तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे किमान आता तरी जेष्ठ नेत्यांनी नव्या नगरसेवकांच्या उत्साहाचा वापर शहर विकासासाठी करावा. केवळ नाममात्र पद न सोपवता त्या पदाचे अधिकार सुद्धा खुल्या दिलाने प्रदान करावे अशी घाटंजीकरांची व नव्या पिढीची भावना आहे. नेते जनतेच्या या भावनेचा किती आदर ठेवतात हे लवकरच पुढे येणार आहे.
साभार:- देशोन्नती

Wednesday, 30 November 2011

घाटंजीत वर्तमान नगरसेवकांसाठी 'दरवाजे बंद'

नगर परिषद निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा वेग वाढत असुन उमेदवारांच्या गृहभेटींना सुरूवात झाली आहे. घाटंजी नगर परिषदेचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेता नगरिकांमध्ये नगरसेवकांविषयी मुळीच सहानुभूती राहिली नसुन उमेदवार भेटीसाठी येताच मतदार घरातुन काढता पाय घेत आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारांसाठी घराचे दरवाजेच बंद होत असल्याने काही उमेदवारांची चांगलीच पंचाईत होत आहे. हा अनुभव प्रामुख्याने वर्तमान नगरसेवक व सत्तेत असलेल्या उमेदवारांना येत आहे. नागरिक ज्यावेळी आपल्या अडचणी व समस्या घेऊन न.प.कार्यालयात जात असत तेव्हा अनेकदा हे तथाकथित लोकप्रतिनिधी दडुन बसत. रस्त्यावर मुरूम टाकतांनाही जे भेदभाव करित होते त्या नगरसेवकांना आता घरी उभेच करायचे नाही अशी अनेक घाटंजीकरांची मानसिकता झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होण्याच्या तिन दिवसांपुर्वीच एका राजकीय पक्षाने मोठमोठे होर्डींग्स व लाऊडस्पिकरच्या कर्णकर्कश आवाजात प्रचाराला सुरूवात करून आपल्या उताविळपणाचा परिचय दिला. गेल्या तिन दिवसात खोटारडी आश्वासने व पोकळ घोषणांच्या आवाजानेच घाटंजीकरांची झोप उघडत आहे. लाऊडस्पिकरच्या आवाजासंबंधी सर्व नियम मोडीत निघत असुन सुद्धा प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे. सकाळी ९ वाजल्यानंतरच लाऊडस्पिकर वाजविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
गेल्या काही वर्षात ‘विकास’ हा शब्दच घाटंजीकरांसाठी नवलाईचा आहे. सध्या घाटंजीच्या सर्वांगीन विकासाची खात्री देणा-यांनी गेल्या अडीच वर्षात काय दिवे लावले असा प्रश्न पुढे येत आहे. पाच वर्षाच्या छळाचे उत्तर देण्याची हिच खरी वेळ आहे याच भावनेतुन आता अनेक मतदारांची विद्यमान नगरसेवक असलेल्या उमेदवारांविषयी नकारघंटा असल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सत्तेत असलेलेच नव्हे तर विरोधकानाही जनतेच्या प्रासंगिक संतापाचा सामना करावा लागत आहे. नुकताच एका पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग क्र. १ मध्ये लाऊडस्पिकरच्या कर्कश  आवाजात गृहभेटी घेतल्या. ज्या ठिकाणी आपली डाळ शिजणार नाही याची त्यांना खात्री होती तेथे जाणेच या उमेदवारांनी टाळल्याने ते किती पाण्यात आहेत हे सर्वांनाच लक्षात आले. जुन्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नविन उमेदवारांकडे मतदार आशेने पहात असुन नवख्या तसेच पुर्वानुभवी उमेदवारांना यावेळी मतदार संधी देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साभार:- देशोन्नती

Sunday, 13 November 2011

घाटंजीत शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवारासाठी कॉंग्रेस-रा.काँ. करणार अ‍ॅडजस्टमेंट?

सत्तेत असतांना नगर परिषदेला ‘मालकी’ हक्काने वापरणा-या सेनेच्या नगर सेवकाला या निवडणुकीत नागरिकांच्या संतापामुळे पळता भुई थोडी होणार असल्याने त्याने कॉंग्रेस व रा.-कॉ.या पक्षांसोबत अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण अवलंबिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेच्या या उमेदवाराच्या वार्डामध्ये आरक्षणामुळे त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. मात्र वार्डाबाहेर तिळमात्रही अस्तित्व नसल्याने  निवडुन येणार नाही याची खात्री उमेदवारासह सर्वांना आहे. आपली राजकीय ‘दुकानदारी’ कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेल्या या नगरसेवकाने विवीध मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेस रा.कॉ.ला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. त्यावेळी कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सेनेला मदत केली. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही या नगरसेवकांची उपस्थिती चर्चिल्या गेली होती. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक जिंकली त्या पक्षाला व बहुमताला महत्व न देता दोन्ही कॉंग्रेसचे काही नगरसेवक सेनेला ‘शरण’ गेले. कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या यजमानाचे कोट्यवधींचे ले-आऊट तांत्रीक कारणामुळे प्रलंबीत आहे. या ले-आऊटला मार्गी लावण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेशी सलगी केली होती. मात्र अद्यापही या ले-आऊटचा तिढा सुटलेला नाही.
या निवडणुकीत सेनेच्या या नगरसेवकाला सहकार्य केले नाही तर ले-आऊटच्या कामात तो ‘कुरापती’ करणार या भितीने पुर्वाश्रमी कॉंग्रेस मध्ये असलेल्या व सध्या रा.कॉ.च्या वाटेवर असलेल्या या नगरसेविकेच्या पतीकडे रा.कॉं.ची शहरातील रणनिती ठरविण्याची जबाबदारी आहे. तसेच न.प.मध्ये निवडुन न आल्यास हा उमेदवार कॉंग्रेससाठीही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेस व रा-कॉं.आपल्या प्रमुख उमेदवारांना सेनेच्या उमेदवाराविरूद्ध न ठेवता ईतरत्र हलविणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवाराऐवजी एखादा ‘कामचलाऊ’ उमेदवार देऊन सेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एकंदरीतच सर्वच दृष्टीने खचलेली सेना व व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणात आलेले कॉंग्रेस-रा.काँ.मधील काही महाभाग यांच्या पक्षविरोधी डावांना वरिष्ठ सहकार्य करतात की हाणुन पाडतात याकडे घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:-देशोन्नती