Pages

Showing posts with label निवडणुक. Show all posts
Showing posts with label निवडणुक. Show all posts

Tuesday, 7 April 2015

ग्रा.पं.निवडणुक प्रक्रीयेतील वादातून घाटंजीत तणाव








देवानंद पवार समर्थकांनी सतिश मलकापुरे यांच्या घरात केलेली तोडफोड
दोन गटात हाणामारी : राजकीय वैमनस्यातून घटनेला हिंसक वळण
येथिल तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू असतांना जातवैधता प्रमाणपत्र स्विकारण्याच्या वेळेबाबत निर्माण झालेल्या वादाला ता.६ ला रात्री उशिरा हिंसक वळण मिळाले. जि.प.सदस्य देवानंद पवार यांना मारहाण झाल्यावर दोन गटात हाणामारी होऊन काही ठिकाणी जमावाकडून दगडफेकही झाली. माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांच्या घरात घुसून जमावाने प्रचंड तोडफोड केली. या संपुर्ण घटनाक्रमात दोन्ही गटाच्या तक्रारींवरून घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वादामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.
घाटंजी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू होती. दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र स्विकारण्याची वेळ गेल्याचे सांगुन संबंधीत लिपिकाने काही लोकांचे प्रमाणपत्र स्विकारले नाही. तर देवानंद पवार समर्थकांचे प्रमाणपत्र स्विकारल्या जात आहे असा आरोप करून माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांचा संबंधीत लिपिकाशी वाद झाला. हि घटना कळताच त्या लिपिकाचा मुलगा कार्यालयात आला. परिस्थिती पाहुन त्याची प्रकृती बिघडली. त्याला पवार व त्यांच्या सहका-यांनी खासगी दवाखान्यात नेले. तेवढ्यात तिथे सतिश मलकापुरे, भरत दलाल व अन्य काहीनी येऊन देवानंद पवार यांना मारहाण करायला सुरूवात केली. हि घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास नेहरू नगर परिसरात घडली. 
घटनेची माहिती मिळताच देवानंद पवार यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी गोळा झाले. पोलीस स्टेशनसमोर तुरळक दगडफेकही झाली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हा जमाव सतिश मलकापुरे यांच्या घराकडे वळला. घराचा दरवाजा तोडून घरातील वस्तुंची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी मलकापुरे यांच्या घरी कुणीही नव्हते. शिवाय परिसरातील काही नागरिकांनाही जमावातील काहीनी मारहाण केल्याची माहिती आहे. 
घरात तोडफोड करत असतांना मलकापुरे यांच्या समर्थकांनीही या जमावावर दगडफेक केली. त्यामुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील समर्थकांमध्येही हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सतिश मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, अशोक पवार, अमोल मुत्यलवार, अरविंद चौधरी व इतर आठ जणांविरूद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तर मारहाण केल्याबद्दल देवानंद पवार यांच्या फिर्यादीवरून सतिश मलकापुरे, वैभव मलकापुरे, भरत दलाल यांचेविरूद्ध भांदवि ३९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय भरत दालाल यांच्या फिर्यादीवरून देवानंद पवार यांचे विरोधात भांदवि ३९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सतिश मलकापुरे यांचे घर फोडून तोडफोड केल्या प्रकरणी मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, साहेबराव पवार, अशोक पवार, अनिल एंबडवार, संदिप जाधव यांचेसह एकुण २३ जणांविरूद्ध भांदवि  १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३९५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. राजकीय दबावातून गुन्हे दाखल केल्या गेल्याचा पवार गटाचा आरोप आहे. तर ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीयेत पवार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मलकापुरे गटाने केला आहे.
तणावपुर्ण परिस्थितीमुळे यवतमाळ येथुन पोलीसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन घाटंजीत तळ ठोकुन आहेत. या घटनेच्या पाश्र्वभुमिवर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक तणावपुर्ण वातावरणात होण्याची चिन्हे दिसत असुन निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

त्या लिपिकाला कारणे दाखवा नोटीस
या संपुर्ण वादाचा केंद्रबिंदू असलेल्या तहसिल कार्यालयातील लिपिक कैलासवार यांना काही जातवैधता प्रमाणपत्र न स्विकारल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर लिपिकाने वेळ गेल्याचे सांगून जातवैधता प्रमाणपत्र स्विकारले नव्हते. तर विशिष्ट लोकांचे प्रमाणपत्र स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पोलीसांची जरब संपली !
दोन गटात निर्माण झालेल्या तणावात घाटंजी पोलीसांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रकरण गंभिर होत असल्याचे निदर्शनास येऊनही पोलीसांनी तातडीने पावले उचलली नाही. जमावातील अनेकजण पोलीस स्टेशनच्या परिसरात काठ्या, रॉड, मिरचीपुड घेऊन असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हाणामारी, दगडफेक व तोडफोड होत असतांना पोलीस कुठेच प्रतिबंध करतांना दिसले नाही. पोलीसांची अतिरिक्त कुमक रात्री उशिरा आली. एकंदरीतच घाटंजी पोलीसांची तालुक्यात जरबच नसल्याचे बोलल्या जात आहे.

Monday, 29 September 2014

आर्णी-केळापुर मतदार संघात उमेदवारीची अभुतपुर्व ओढाताण

भाजप नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली
कॉंग्रेसपुढे मतदारांच्या नाराजीचे आव्हान
सर्वसामान्य मतदार अजुनही संभ्रमावस्थेत
युती व आघाडीमध्ये झालेला घटस्फोट व त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आर्णी-केळापुर विधानसभा मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी अभुतपुर्व ओढाताण पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, कार्यकत्र्यांच्या भावना अशा सर्वच गोष्टी आमदारकीच्या स्वप्नापुढे गौण ठरत आहेत. उमेदवारीसाठी पक्ष बदल केल्याने नेमका कोण कोणत्या पक्षाचा आहे हे निवडणुक आयोगाने अंतिम यादी जाहिर केल्यावरच लक्षात येईल असे चित्र आहे. 
उमेदवारीसाठी पक्ष बदल करण्याचा हा प्रकार यावेळी महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसुन आला. आर्णी - केळापुर देखिल यातुन सुटले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धर सोड प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळल्या गेली आहे. उमेदवारी देतांना वेळोवेळी बदललेल्या निर्णयांमुळे या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची विश्वसनियताच दावणीला बांधल्या गेल्याची चर्चा आहे. 
विद्यमान आमदार असतांनाही गेल्या निवडणुकीत भाजपाने डॉ.संदिप धुर्वे यांना उमेदवारी न देता दुस-या मतदार संघातून उमेदवार आयात केला. तरी देखिल डॉ.धुर्वे यांनी बंडखोरी न करता गेली पाच वर्ष पक्षासोबत एकनिष्ठता दाखविली. यावेळी ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. यावेळी त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा केल्या जात होता. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी राजु तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा केल्याने तोडसाम यांची उमेदवारी निश्चित होणार असे स्पष्ट चित्र दिसल्याने डॉ.संदिप धुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवीली. 
एक माजी आमदार असलेला उमेदवार मिळत असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष डॉ.धुर्वे यांना उमेदवारी देण्यास ईच्छुक होते. डॉ.धुर्वेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेले सेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विष्णु उवंâडे नाराज झाले व त्यांनी थेट पक्ष बदल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीने गेलेले राजु तोडसाम यांना ऐनवेळी ए.बी.फॉर्म हा उद्धव येरमे यांचा आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसरात भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर येरमे यांनी भाजपाकडून व तोडसाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र त्या नंतर पुन्हा राजकारण शिजले व उद्धव येरमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपाची उमेदवारी पुन्हा एकदा राजु तोडसाम यांच्या पदरात पडली आहे. मात्र या संभ्रमावस्थेमुळे भाजपाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री व मतदारसंघाचे सर्वाधीक काळ प्रतिनिधीत्व केलेले ना.शिवाजीराव मोघे यांच्याप्रती नाराजीचा सुर असला तरी गेल्या वर्षभरापासुन ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना उमेदवारीतच बराच काळ गुंतून राहावे लागल्याने ना.मोघे यांचे पारडे आपसुकच जड झाले आहे. शिवाय कार्यकत्र्यांची भक्कम फळी असल्याने त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे कठिण जाणार नाही. मात्र ते लोकांची नाराजी कशी कमी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ना.मोघे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचे तोंड दाखविणा-या डॉ.संदिप धुर्वे यांनी आमदारकीच्या काळात केलेली अनेक कामे ही त्यांची जमेची बाजु आहे. शिवाय ना.मोघेंना फक्त धुर्वेच पराभुत करू शकतात अशी भावनाही मतदार संघात रूजल्या गेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने का कोण जाणे पण त्यांना दोन वेळ दगा दिला. विद्यमान आमदार असतांना गेल्या निवडणुकीतही डॉ.धुर्वेंना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. तेव्हा उमरखेडचे आमदार अनिल इंगळे हे भाजपाचे उमेदवार होते. मात्र ते डमी उमेदवार असल्याची चर्चा झाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी डॉ.संदिप धुर्वे यांनी राजकीय डावपेचांकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारी गमावली व यावेळीही नेमके तसेच झाले. शिवाय त्यांना भाजपाचे स्थानिक व जिल्हा पदाधिकारी तसेच नेत्यांची मर्जी सांभाळता आली नाही.

आता भाजपाचे "लेटेस्ट" अधिकृत उमेदवार असलेले राजु तोडसाम यांच्याकडे तरूण कार्यकर्त्याची चांगली फळी आहे. उमेदवारीसाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन पुर्वतयारीही केली आहे. शिवाय प्रमुख नेतेही त्यांच्या बाजुने अनुवूâल आहेत. त्यामुळे ते आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही. मात्र पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरीत मतदार संघात ते फारशे परिचीत नाहीत. त्यांच्या संपर्वâही तेवढा नाही. त्यामुळे ना.मोघे व डॉ.धुर्वे यांच्या तुलनेत ते नवखे म्हणुन गणल्या जातील. मात्र तरी देखिल लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या निवडणुकीतही चालली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखिल महत्वाचे ठरणार आहे. एकुणच आर्णी-केळापुर मतदारसंघात कॉग्रेस, शिवसेना व भाजपामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच रा.कॉ.चे विष्णु ऊवंâडे हे किती मते घेणार यावरही विजयाचे गणित अवलंबुन राहिल.

Sunday, 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.

Tuesday, 8 January 2013

घाटंजी नगराध्यक्षपदी किशोर दावडा



नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश  पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 

Monday, 10 September 2012

गिलानी महाविद्यालयाच्या छात्रसंघ सचिवपदी गौरव गावंडे


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या आज झालेल्या छात्रसंघ सचिवपदाच्या निवडणुकीत गौरव श्यामकांत गावंडे विजयी झाला.  त्याने प्रतिस्पर्धी पुजा मुन हिचा एका मताने पराभव केला. गौरव गावंडे याला ६ तर पुजा मुन हिला ५ मते मिळाली. गौरव हा गिलानी महाविद्यालयात वाणिज्य शाखा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. या निवडणुकीत एकुण १३ मतांपैकी ११ वर्गप्रतिनिधींनी मतदान केले. निवडणूक झाल्यावर संपुर्ण शहरातून विजयी निवडणुक काढण्यात आली. या निवडणुकीसाठी प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.बि.बि.चोपडे, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.ए.पी.भगत, प्रा.आर.एम.पवार, प्रा.व्ही.एस.जगताप  यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती  


Friday, 17 February 2012

घाटंजी तालुक्यात कॉंग्रेसची सरशी, भाजपाचे खाते उघडले

कॉंग्रेसला जि.प.२ पं.स. मध्ये ४ जागा
राष्ट्रवादीची मते वाढली, विजय नाही








संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधुन घेणा-या घाटंजी तालुक्यातील निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधीक जागा मिळवित आघाडी घेतली. तर प्रथमच भाजपाचे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आल्याने तालुक्यात यावेळी भाजपाचे खाते उघडले. राष्ट्रवादीला बंडखोरी व काही ठिकाणी उमेदवार निवडीचा फटका बसल्याने एकही जागा मिळवता आली नाही. बहुचर्चित शिवणी जि.प.गटात देवानंद पवार व पारवा गटात योगेश पारवेकर या कॉंग्रेसच्या उमेदवारांनी मतांची आघाडी घेत विजय मिळविला. तर पार्डी नस्करी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत भाजपाच्या उषा राठोड यांनी बाजी मारली.
पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसला चार व भाजपाला २ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेवर आता कॉंग्रेसने कब्जा मिळविला आहे. पंचायत समिती मध्ये शिवणी गणात शैलेष इंगोले (कॉंग्रेस), मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस), पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस), कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस), पार्डी गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) व शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पार्डी गटाच्या मतमोजणी दरम्यान अखेरच्या टप्प्यात मांजरी गावाची मतमोजणी करतांना मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे चार तास प्रक्रीया रखडली होती. त्यानंतर यवतमाळ येथुन तज्ञांना पाचारण करण्यात आले. दुपारी चार वाजता यंत्र दुरूस्त झाल्यावर येथिल निकाल घोषीत करण्यात आला.
जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना मिळालेली मते पारवा गट योगेश पारवेकर (कॉंग्रेस) ७०८० मते, सुहास पारवेकर (रा.कॉ.) ५६५५ मते, रमेश यमसनवार (भाजप) ३७७० मते, शे.आसिफ शे.चांद (सेना) २०२७ मते, अविनाश ठाकरे (अपक्ष) १०३१ मते, शिवणी गट देवानंद पवार (कॉंग्रेस) ७८०० मते, सुरेश लोणकर (रा,कॉ.) ५६५५ मते, मोहन जाधव (सेना) २२०७ मते, जितेंद्र ठाकरे (अपक्ष) १२५७ मते, विशाल कदम (भाजप) १११९ मते, प्रशांत धांदे (मनसे) ८१४ मते, पार्डी (नस्करी) गट उषा राठोड (भाजप) ६१८५ मते, 
मंदा डंभारे (रा.कॉ.) ६०८७ मते, ज्योती निकडे (कॉंग्रेस) ५७५५ मते, शांता आसुटकर (अपक्ष) ३१६ मते, पंचायत समिती मध्ये पार्डी (नस्करी) गणात रत्नमाला कोंडेकर (भाजप) ३२५३ मते, छाया राठोड (रा.कॉ.) ३०४२ मते, अर्चना राठोड (कॉंग्रेस) २७९६ मते, रूपाली राठोड (सेना) ३४९ मते, शिरोली गणात रमेश धुर्वे (भाजप) ३४६९ मते, कैलास कोरवते (रा.कॉ.) २९२९ मते, अनिल गेडाम (कॉंग्रेस) २३३५ मते, भाऊराव आत्राम (सेना) १५३ मते, शिवणी गण शैलेष इंगोले (कॉंग्रेस) २८९७ मते, संजय आडे (रा.कॉ.) २३४६ मते, राजेश्वर वातिले (सेना) १६८१ मते, गिरीधर राठोड (भाजप) ११४८ मते, रविंद्र चव्हाण (मनसे) ७२९, नरेंद्र चव्हाण (अपक्ष) ४९१ मते, मानोली गणात सुमित्रा पेंदोर (कॉंग्रेस) ४५३१ मते, सिंधु मेश्राम (रा.कॉ.) ३६०६ मते, रूख्मा कनाके (सेना) ६२१ मते, सुमित्रा घोडाम (भाजप), सुशिला मंगाम (मनसे) ३४५ मते, पारवा गणात सुवर्णा निकोडे (कॉंग्रेस) ३७८३ मते, पुष्पा खडसे (रा.कॉ.) ३५८५ मते, अरूणा महल्ले (भाजप) १८२४ मते, कलावती मोहुर्ले (सेना) ९५४ मते, कुर्ली गणात रूपेश कल्यमवार (कॉंग्रेस) ३६८० मते, नितिन नार्लावार (रा.कॉ.) २५३२ मते, गजानन गाऊत्रे (भाजप) २२२५ मते, सोमा मंगाम (सेना) ९४२ मते मिळाली आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डॉ.अशोक खरात, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार एस.व्ही भरडे, वामन वैद्य होते. विजयी उमेदवारांची शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी ग्रामिण भागातुन मोठ्या प्रमाणावर नागरीक येथिल सांस्कृतिक भवन परिसरात आले होते.
मागील निवडणुकी पेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या मतांचे प्रमाण वाढले असले तरी दिग्गज नेते रा.कॉ.मध्ये असतांना झालेला पराभव धक्कादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पार्डी सर्कलमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पाठी ‘गॉडफादर’ कोण होते याची चर्चा सुरू आहे. जनतेने दिलेला कौल मान्य असुन सर्व मतदारांचे आभार जेष्ठ नेते सुरेश लोणकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Sunday, 5 February 2012

निवडणुकीचा ज्वर शिगेला........!

घराणेशाहीच्या चिखलात भाजपाचे कमळ फुलणार - रमेश यमसनवार

पारवा गट व गणात भाजप उमेदवारांची आघाडी

पारवा सर्कल आजवर घराणेशाहीच्या चिखलातच राहिल्याने या परिसराचा विकास झाला नाही. मात्र यावेळी याच चिखलात भाजपाचे कमळ फुलवून विकासाचा नवा अध्याय सुरू करणार असल्याचा विश्वास पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांनी व्यक्त केला. पारवा जि.प.सर्कलसह कुर्ली व पारवा गणातही भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्वयंस्फूर्त पाठींबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. 
ईतर पक्षाच्या पारंपारिक उमेदवारांचा अनुभव जनतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात हात जोडतात. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षात कधी ढुंकूनही पाहात नाहीत. मात्र माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेतून असुन निवडून आल्यावर जनतेतच राहायचे असल्याने प्रत्येक क्षणी शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्य व केंद्र शासनात कॉग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतांना सुद्धा शेतक-यांना न्याय मिळाला नाही. सर्वत्र कापसाच्या भावासाठी आंदोलने झाली मात्र सरकार व कॉंग्रेस रा.कॉ. नेत्यांनी जनक्षोभ दुर्लक्षीत केला. 
आता उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले स्थानीक नेते आंदोलनाच्या वेळी शेतक-यांना न्याय मिळावा म्हणुन का पुढे आले नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा पंचायत समिती गणात अरूणा वासुदेवराव  महल्ले व कुर्ली गणात सुशिक्षीत उमेदवार गजानन गाऊत्रे यांना भाजपाने संधी देऊन सर्वसामान्य जनतेतून उमेदवार उभा करण्याची परंपरा कायम राखली आहे. 
पंचायत समिती गणातही भाजप उमेदवारांना जनता आनंदाने कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले रमेश यमसनवार पारवा परिसरात सुपरिचीत आहेत. काही वर्षांपुर्वी या भागात महापुर आला त्यावेळी ते पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे आले होते. अन्न, कपडे व निवारा या मुलभूत गोष्टींसाठी त्यांनी पुरग्रस्तांना मोलाची मदत केली होती. येथिल नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ते २७ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. धार्मिक व सामाजीक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. सुमारे दहा वर्षांपुर्वी कुर्ली येथे पाण्याची तिव्र टंचाई असतांना स्वखर्चाने उन्हाळाभर त्यांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. मतदार संघातील जवळजवळ प्रत्येक माणसाला त्यांची ओळख आहे. पारवा गटातील कुर्ली, वघारा, राजापेठ, पारवा, सावरगाव, सावंगी, सायतखर्डा, बोधडी, दत्तापुर, झटाळा, तरोडा, वाढोणा, मेसदा, गणेरी, भीमकुंड, पंगडी, येरंडगाव, देवधरी या गावांसह ईतर सर्वच ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. कुर्ली व पारवा गणातील उमेदवारांनाही जनतेचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सत्ता हाती असल्याने विकास करण्याचा प्रचार करीत आहेत. मात्र आजवर त्यांनी काय विकास साधला असा प्रश्न त्यांना जनता विचारत असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे खासदार हंसराज अहिर यांनी चंद्रपूर भागात केलेला विकास आता घाटंजी तालुक्यातही करायचा असुन त्यांच्या मदतीने विकासनिधी खेचून आणुन या भागातील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.
साभार :- देशोन्नती

Saturday, 4 February 2012

मर्यादा लाखांची खर्च मात्र कोटींच्या घरात

होर्डींगबाजीत पैशांची मुक्त उधळण
हॉटेल वाईनबार हाऊसफुल्ल
संग्रहित छायाचित्र
मोठमोठे होर्डींग्स, २०-२५ गाड्यांचा ताफा व सुमारे ५०० ‘पेड’ कार्यकर्त्यांचा  लवाजमा लक्षात घेतला तर निवडणुक लढविणे सर्वसामान्यांचे काम नव्हे यावर ठाम विश्वास बसतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामिण भागात सुरू असलेला प्रचाराचा धुमाकूळ पाहिला तर यावर किती खर्च होत असेल याचा अंदाज लावणेही कठीण आहे. 
निवडणुक आयोगाने जिल्हा परिषदेच्या एका उमेदवारासाठी ३ लाख व पंचायत समिती उमेदवारासाठी दोन लाख रूपये खर्च मर्यादा ठरविली आहे. शिवाय दररोजच्या खर्चाची माहिती त्याच दिवशी निवडणुक निर्णय अधिका-यांकडे द्यावी लागते. आयोगाने कठोर आचारसंहिता ठरविली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याने प्रचार निरंकुश झाला आहे. नेमका किती खर्च होत आहे याचा अंदाज घेण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आयोगाने जी खर्च मर्यादा ठरवून दिली आहे तेवढा केवळ एकाच दिवसाचा खर्च असल्याचे एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले. दररोज २० ते २५ भाड्याची वाहने, १०-१५ वैय्यक्तीक वाहने, शिवाय प्रचार कार्यात सोबत येणारे सुमारे ५०० कार्यकर्त्यांचे जेवण व भत्ता असा प्रतिव्यक्ती सुमारे ४०० ते ५०० रूपये खर्च येतो. केवळ याचा हिशोब काढला तरी तो लाखांच्या घरात जातो. 
ग्रामिण भागात लावण्यात आलेल्या होर्डींग्सचा हिशोब काढ़ला तर तोंडात बोट घालण्याची वेळ येते. जिल्हा परिषद सर्कलच्या एका गावात एका पक्षाच्या उमेदवाराचे किमान ५ ते १० होर्डींग्स व बॅनर आहेत. एका बॅनरची किंमत सुमारे ५०० रूपये तर मोठ्या होर्डींग साठी सुमारे ३ ते पाच हजार रूपये खर्च येतो. एका सर्कलमध्ये सुमारे ५० गावे येतात. त्यामुळे या खर्चाचा अंदाज काढला तर एका पक्षाच्या उमेदवाराला सुमारे २० ते २५ लाख रूपये फलकांचाच खर्च येतो. मात्र निवडणुक यंत्रणेला खर्च सादर करतांना तो कसा काय अ‍ॅडजस्ट केल्या जातो हा संशोधनाचा विषय आहे. मतदारांवर व्यक्तीगत स्वरूपात करण्यात येणा-या खर्चाचा हिशोब लावणे तर कुणालाच शक्य नाही. निवडणुक आयोग दरवेळी जाचक नियमांची सरबत्ती करीत असला तरी स्थानिक यंत्रणा त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.
साभार :- देशोन्नती

Saturday, 21 January 2012

कोण गटस्थ, कोण तटस्थ आणी कोण कटस्थ हे गुलदस्त्यातच

शिवणीत रा.कॉ.चा "तिन तिघाडा"
पारवा गटात कॉंग्रेसची गोची
उमेदवारी मिळविण्यासाठी लागतोय कस

वातावरणात अंग गोठवणारा गारवा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून गरमागरमी सुरू आहे. राष्ट्रवादी मध्ये नव्यानेच आलेल्या नेते व कार्यकर्त्यांमुळे आजवर तालुक्यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे नेते दुखावल्या गेले आहेत. प्रबळ दावेदार वाढ़ल्याने शिवणीमध्ये रा.कॉ. व पारव्यात कॉंग्रेसला निर्णय घेणे कठीण जात आहे
बाजार समिती सभापती निवडीदरम्यान झालेल्या मतभेदांमुळे आजवर ना.मोघेंना समर्थन देणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर कॉंग्रेसमधुन रा.कॉ.मध्ये आले. त्यांच्यासोबत एक मोठा कार्यकर्ता वर्ग असल्याने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा दबावगट वाढ़ला. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांची उमेदवारी निश्चित समजल्या जात होती. मात्र त्या मतदार संघात आजवर कार्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकोषाध्यक्ष व कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर हे या निर्णयामुळे दुखावल्या गेले. उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुक लढवायचीच असा चंग बांधुन ते आज नामांकन दाखल करणार आहेत. शिवणी मतदार संघासाठीच रा.कॉ.कडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार सदाशीव ठाकरे यांचे पुत्र जितेंद्र ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. ते सुद्धा आज उमेदवारी दाखल करतील. तर सुरेश लोणकरांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. त्यामुळे शिवणी मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठीच जोरदार रस्सीखेच राहणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली नाही तरी ते पक्षाने निवडलेल्या उमेदवाराला साथ देणे कठीण आहे. ते तटस्थ राहिले तर ठिक मात्र जर त्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची वाट मोकळी होणार आहे.  नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी पक्षविरोधी प्रचार करून प्रभाग २ मध्ये शिवसेनेला खुले सहकार्य केले होते. तसेच प्रभाग १ मध्येही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी आपल्या विजयासाठी सेनेच्या ईतर उमेदवारांना सहकार्य केले. तिच परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसुन येत आहे. पार्डी जि.प.गटात राष्ट्रवादीचे पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असा अंदाज बांधल्या जात होता. सहदेव राठोड हे पंचायत समितीत रा.कॉ.चे एकमेव सदस्य असुनही त्यांनी अत्यंत जबाबदारीने विरोधी भुमिका बजावली. एक अभ्यासू व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास पुढ़े येणारे सदस्य अशी त्यांची ख्याती असल्याने पार्डी गटासाठी त्यांच्या पत्नीला जनसमर्थनही मिळू शकले असते. मात्र तेथे बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. अण्णासाहेब पारवेकरांचा आदेशच सर्वस्व मानणारे असल्यामुळे डंभारे यांना त्याचे फळ मिळाले. सहदेव राठोड यांनीही मोठ्या मनाने पक्षाच्या आदेशाचा सन्मान राखत  पार्डी गणातून उमेदवारी घेऊन समाधान मानले. पारवा जि प  सर्कलमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश नसतानांही केवळ ना.मोघेंच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार व यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांच्यात कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी तुल्यबळ स्पर्धा रंगली आहे. मागील निवडणुकीत निलेश पारवेकरांनी आपले राजकीय वजन वापरून वेळेवर ए.बी. फॉर्म आणल्याने काटपेल्लीवार यांची गोची झाली होती. मात्र ना.मोघेंनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने तेव्हा स्वामी काटपेल्लीवार अवघ्या काही मतांच्या फरकाने निवडून आले होते. रा.कॉ.कडून सुहास पारवेकर व भाजपाकडून रमेश यमसनवार हे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना गटबाजीने ग्रासले असल्याने नेमकी कोणाची काय भुमिका राहणार हे कळायला मार्ग नाही. उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले नेते तटस्थ राहणार, उमेदवारी कायम ठेवणार की, उमेदवारी मागे घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करून ‘कटस्थ’ होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती

Monday, 19 December 2011

पाटापांगरा सोसायटीच्या अध्यक्षपदी अजय डेहणकर यांची निवड

तालुक्यातील पाटापांगरा ग्राम विवीध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अजय डेहणकर व उपाध्यक्षपदी हरिभाऊ भुरे यांची अविरोध निवड झाली.
यापुर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत  घाटंजी खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर डेहणकर व पाटापांगरा ग्रा.पं.सरपंच दिलीप राजगुरे यांच्या पॅनलचे सर्व १२ उमेदवार निवडुन आले होते. त्यांनी प्रतिस्पर्धी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक वंदना जिभकाटे यांचा पॅनलसह दणदणीत पराभव केला होता. या निवडणुकीत अजय डेहणकर, हरिभाऊ भुरे, राजाराम गुल्हाने, राजु गुल्हाने, वामन भवरे, महादेव पंधरे, शामराव घरत, श्रीराम लोखंडे, वंदना डेहनकर, पांडुरंग साठवणे, पुंडलीक नागोसे, रमेश नेवारे हे प्रचंड मताधिक्क्याने निवडुन आले होते. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर पाटापांगरा येथे विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मधुकर डेहनकर, दिलीप राजगुरे, किशोर जिरापुरे, अनिल पाटील, संजय डेहनकर, किशोर कांबळे, दिगांबर गुल्हाने, महादेव भुरे, शैलेष गुलवाडे, गजानन लोखंडे, अमोल लोखंडे, डॉ.गवई, पांडुरंग राकेस, प्रभु राकेस, सुनिल कांबळे, सुनिल सोनटक्के व तैलीक समाज बांधवांनी मोलाची भुमिका बजावली.

Monday, 12 December 2011

घाटंजी न.प.निवडणुकीत संमिश्र निकाल

कॉंग्रेसला आघाडी पण बहुमत नाही
रा.कॉ.५ तर सेना ४ जागी विजयी
सेनेमुळे भाजपाला भोपळा


नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज जाहिर झालेल्या निकालात कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली असुन निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीची असलेली 'हवा' निकालातुन न दिसल्याने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र कॉंग्रेसलाही केवळ एका जागे अभावी सत्तेपासुन दुर रहावे लागणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ व शिवसेना भाजपाच्या कथित महायुतीला ४ जागी विजय मिळाला. तर यापुर्वी ६ नगरसेवक असलेल्या भाजपाला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. शिवसेनेशी झालेल्या युतीमुळे भाजपाला हा फटका बसला असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. वर्तमान नगरसेवकांना नागरिकांच्या संतापाचा फटका बसला असुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक शैलेष ठाकुर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच विद्यमान नगरसेवक दादाराव खोब्रागडे हे देखिल पराभुत झाले. केवळ संगिता भुरे या एकमेव नगरसेविकेला जनतेने पुन्हा संधी दिली. दिग्गजांमध्ये माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी विजयी झाले तर माजी नगराध्यक्ष शाम बेलोरकर,दुर्गा साखरकर, माया मंगाम यांचा पराभव झाला.
जलाराम प्रभाग क्र. १ (अ) मध्ये कॉंग्रेसचे संदिप बिबेकार (१०४७ मते) यानी रा.कॉ.च्या प्रशांत भोरे (६४४ मते), सेनेचे संजय बुल्ले (६४४ मते), अपक्ष दत्ता गटलेवार (९४ मते) व संजय राऊत (२५ मते) यांचा पराभव केला. ब गटात रा.कॉ.च्या संगिता भुरे (१११७ मते) यांनी कॉंग्रेसच्या स्वाती महाजन (७८१ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (६७९ मते) यांना पराभुत केले. क गटामध्ये शिवसेनेच्या सरोज पडलवार (९९४ मते) यांनी आघाडी घेत  कॉंग्रेसच्या रेखा दोनाडकर (८०५ मते) व रा.कॉ.च्या वच्छला तलमले (७७९ मते) यांचा पराभव केला. ड गटात झालेल्या काट्याच्या लढतीत कॉंग्रेसच्या परेश कारीया (९९१मते) यांनी सेनेचे प्रमुख उमेदवार शैलेष ठाकुर (९३२ मते), रा.कॉ.चे शाम बेलोरकर (६२१ मते) यांना धुळ चारली.
घाटी क्र. २ मध्ये अ गटात सेनेचे संतोष शेंद्रे (७४५ मते) यांनी रा.कॉ.च्या दादाराव खोब्रागडे (५६१ मते), भाजपाचे विजय कासार (३८१ मते), कॉंग्रेसचे मधुकर पेटेवार (५९४ मते), अपक्ष नरेश कुंटलवार (३५६ मते), अजय गजभिये (९२ मते) यांना पराभुत केले. ब गटामध्ये शिवसेनेचे दिनेश उईके (७८६ मते) यांनी कॉंग्रेसच्या सतिष तोडसाम (७१५ मते), राष्ट्रवादीचे संतोष गेडाम (५३१ मते), भाजपाचे श्रावण परचाके (२९० मते), अपक्ष आनंद मडावी (४०१ मते) यांना पराभुत केले. क गटात कॉंग्रेसच्या अर्चना गोडे (८४७ मते) यांनी सेनेच्या सिता गिनगुले (७८२ मते), रा.कॉ.च्या सुधा ठाकरे (४३८ मते), भाजपाच्या दुर्गा साखरकर (३२२ मते), अपक्ष किशोरी चौधरी (३७५ मते) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या सिमा डंभारे (९०१ मते) यांनी शिवसेनेच्या सोफिया सैय्यद फिरोज (६८२ मते), रा.कॉ.च्या पुजा दिकुंडवार (४७४ मते), भाजपाच्या नलु मोहिजे (२९८ मते) अपक्ष फरझाना परविन अ रशिद (३४२ मते), विजु राठोड (६४ मते) यांचा दणदणीत पराभव केला. तर इ गटामध्ये सेनेच्या शर्मिला उदार (८५९ मते) यांनी रा.कॉ.च्या सिंधु सिरपुरे (७२० मते), कॉंग्रेसच्या जैबुनबी अफजलखॉ पठाण भाजपाच्या सुनिता गवारकर (३१७ मते), अपक्ष वर्षा जाधव (३५७ मते) व माया मंगाम (१७० मते)यांचा पराभव केला.
राममंदिर प्रभाग क्र.३ मध्ये चारही जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली. येथे अ गटात कॉंग्रेसच्या शोभा ठाकरे (१४६९ मते) यांनी रा.कॉ च्या सारीका उगले (७७५ मते), सेनेच्या सुलभा खांडरे (२६४ मते) यांचा पराभव केला. ब गटात कॉंग्रेसच्या जयश्री दिडशे (धांदे) (१०८३ मते) यांनी रा.कॉ.च्या निर्मला पांडे (५३१ मते), भाजपाच्या ललिता ठाकुर (३९१ मते) यांचा पराभव केला. क गटात कॉंग्रेसच्या जगदिश पंजाबी (१२७७ मते) यांनी रा.कॉ.च्या प्रमोद गिरी (७७५ मते), भाजपाचे विनायक परचाके (१६३ मते), मनसेचे गजानन भालेकर (३०४) यांचा पराभव केला. ड गटात कॉंग्रेसच्या किशोर दावडा (१४८६) यांनी रा.कॉ.च्या अशोक कटकमवार (५७९ मते), अपक्ष रविंद्र ठाकरे (२४५ मते) यांना पराभुत केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. ४ मध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. येथे अ गटात रा.कॉ.च्या चंद्ररेखा रामटेके (१०५६ मते) यांनी कॉंग्रेसच्या भारती चुनारकर ( ६९१ मते), भाजपाच्या शोभा रामटेके (४०१ मते), अपक्ष चित्रकला देवतळे (१३५ मते) यांना पराभुत केले. ब गटात  रा.कॉ.च्या इंदु परतेकी (१०७५ मते) यांनी कॉंग्रेसच्या शालु गेडाम (७३४ मते), भाजपाच्या नंदा कोडापे (४६७ मते) यांचा पराभव केला. क गटामध्ये राष्ट्रवादीचे राम खांडरे (१३९७ मते) यांनी कॉंग्रेसच्या नरेंद्र धनरे (४४० मते), भाजपाचे स्वरूप नव्हाते (४४६ मते) यांचा दणदणीत पराभव केला. ड गटात रा.कॉ.चे अकबर तंव्वर (९०७ मते) यांनी कॉंग्रेसचे सैय्यद मोहिब सैय्यद लतिफ (४३१ मते), अपक्ष मधुकर निस्ताने (३७१ मते), भाजपाचे अरविंद बोरकर (४१० मते), अपक्ष सुधिर अग्रहरी (१०४ मते), मनसेचे सुधिर उरकुडे (३९ मते), प्रभा शेवरे (२८ मते) यांचा पराभव केला. घाटंजीकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तेत नेमके कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

'धनुष्य' आला पण 'बाण' गेला

































अडीच वर्ष नगराध्यक्षपद सेनेकडे असतांना मनमानी कारभाराचा फटका शिवसेनेच्या शैलेष ठाकुर यांना बसला. प्रचारादरम्यानही जनतेने त्यांना अनेकदा फटकारले. यापुर्वी सेनेकडे तिन नगरसेवक होते. यावेळी एका जागेची बढत मिळाली असली तरी प्रमुख उमेदवारालाच पराभवाचे तोंड पहावे लागल्याने धनुष्य आला पण बाण गेला अशी परिस्थिती झाली आहे.
निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक सांस्कृतीक भवनाबाहेर जमले होते.

Tuesday, 22 November 2011

नगर परिषद निवडणुकीसाठी प्रतिक्रीया पाठवा


घाटंजी न्युजच्या सर्व वाचकांसाठी सुचना
येत्या ८ डिसेंबरला घाटंजी नगर परिषदेची निवडणुक होऊ घातली आहे. घाटंजी शहराची वर्तमान स्थिती आपल्या नजरेसमोर आहेच. त्यामुळे या निवडणुकीत निवडुन येणा-यांकडुन आपणास काय अपेक्षा आहेत? तुम्हाला आजवर नगर परिषदेत कोणत्या समस्याना सामोरे जावे लागले? न.प.च्या गत पाच वर्षांच्या कार्यकाळाबाबत तुमचे प्रांजळ मत काय? तसेच निवडणुकी संदर्भातील कविता, चुटकुले, वात्रटीका आमचेकडे तुमच्या छायाचित्रासह पाठवा. तुमच्या प्रतिक्रीयाना अवश्य प्रसिद्धी दिली जाईल. मात्र प्रतिक्रिया वैय्यक्तीक द्वेष, आकस अथवा सुडबुद्धीने लिहीलेली नसावी. कोणावरही
 वैय्यक्तीक टिका असलेली प्रतिक्रीया
 प्रसिद्ध केल्या जाणार नाही.
आपली प्रतिक्रीया खालील ई मेल वर पाठवावी. 
तसेच शक्यतो मराठीत असावी. 

E-Mail-   ghatanjinews@gmail.com

Monday, 21 November 2011

कुणी काढणार ‘काटा’ तर कुणी घालेल ‘टोपी’

अपक्षांसाठी ४९ मनोरंजक निवडणुक चिन्हे
आता त्याचा ‘काटा’ काढायचाच,अरे हा आता कुणालातरी ‘टोपी’ घालणार अशी वाक्य या निवडणुकीत ऐकायला येणार आहेत. कारण निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी एकापेक्षा एक मनोरंजक चिन्हे दिल्याने निवडणुकीच्या गरमागरमीत खुसखुशीत चर्चेची भर पडणार आहे.
अपक्ष उमेदवार जरी फारसे चर्चेत येत नसले तरी त्यांना देण्यात येणारी चिन्हे मात्र निवडणुक काळात चांगलेच मनोरंजन करतात. नगर परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याला  आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दिवशीच नामांकन अर्ज दाखल करतील. पक्षीय उमेदवारांसोबतच न.प. निवडणुकीत अपक्षांचाही भरणा असतो. अपक्षांना देण्यात येणारी निवडणुक चिन्हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावर्षी निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी ४९ मुक्तचिन्हे निश्चित केली आहेत. तसेच राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्षांची यादीही निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये बहुजन समाज पार्टी (हत्ती), भारतीय जनता पार्टी (कमळ), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (कणिस आणी विळा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्र्ससिस्ट) (हातोडा विळा आणी तारा), इंडियन नॅशनल कॉंग्रेस (हात-पंजा), नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (घड्याळ), राज्यस्तरीय पक्षांमध्ये शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) याशिवाय २३५ नोंदणीकृत राजकीय पक्षांची यादीही आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
तर अपक्षांसाठी ४९ मुक्त चिन्हे ठरविण्यात आली आहेत. त्यामध्ये कपाट, फुगा, टोपली, बॅट, फलंदाज, बॅटरी टॉर्च, फळा, पाव, ब्रिफकेस, ब्रश, केक, कॅमेरा, मेणबत्त्या, छताचा पंखा, कोट, नारळ, कंगवा, कपबशी, डिझेल पंप, विजेचा खांब, काटा, कढई, गॅस सिलेंडर, काचेचा पेला, हारमोनियम, हॅट, आईस्क्रिम, इस्त्री, जग, किटली, पतंग, पत्रपेटी, मका, नगारा, अंगठी, रोडरोलर, करवत, कात्री, शिवणयंत्र, शटल, पाटी, स्टुल, टेबल, टेबल लॅम्प, दुरदर्शन, तंबू, व्हायोलीन, चालण्याची काठी, शिटी ही चिन्हे आहेत. यावेळी एका प्रभागात एकच मुक्त चिन्ह अपक्षांसाठी राहणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पॅनल लढविणा-यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र
चिन्ह वाटपाबाबत अजुन आयोगाकडुन स्पष्ट निर्देश प्राप्त व्हायचे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली.
साभार:- देशोन्नती 

Thursday, 10 November 2011

घाटंजी नगर परिषद ‘सक्षम’ नेतृत्वाच्या प्रतिक्षेत


राजकीय पक्षांना उमेदवारांची टंचाई
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषदेच्या निवडणुकीतून यावेळी तरी घाटंजी शहराला सक्षम नेतृत्व लाभणार का याची उत्सुकता प्रत्येक घाटंजीकराला लागली आहे. मागील निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने सत्ताधा-यांची गुर्मी उतरविल्यानंतर नव्या नेतृत्वाकडून मतदारांना चांगल्या कामांची अपेक्षा होती. मात्र खुर्चीवर बसताच नवख्या नगरसेवकांचा तोरा बदलला. निवडणुकित दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला. अन त्यानंतर निगरगट्ट कारभाराच्या एका नव्याच पर्वाची सुरूवात झाली. अडीच वर्ष भाजप-रा.कॉ.च्या अभद्र युतीकडे नगराध्यक्ष पद होते. त्यांच्या मनमानी कारभारानंतर आरक्षणामुळे शिवसेनेकडे आयतीच सत्ता आली. बहुमत नसतानांही मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा शक्य तितका फायदा सेनेने घेतला. अडीच वर्ष प्रशासनाला बोटावर नाचवुन ‘हम करे सो कायदा’ याच तत्वाने त्यांचे काम चालले.
या निवडणुकीत प्रभाग पद्धत आल्यामुळे राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची कसोटीच लागणार आहे. एकुण १७ वार्ड पाच प्रभागात विभागल्या गेल्याने निवडणुक प्रचारात उमेदवारांची दमछाक होणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची केंद्र व राज्यात आघाडी असली तरी नगर परिषद निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहे. घाटंजी तालुक्यात निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्या सोबत एक मोठा गट रा.कॉ.मध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याने या दोन मुख्य पक्षामधील दरी आणखीच वाढली आहे. घाटंजीत मुख्य लढत या दोन पक्षांमध्येच होणार असा प्राथमिक अंदाज आहे. महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती यामुळे राजकीय पक्षांना योग्य उमेदवारांची टंचाई भासत आहे.
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मात्र अनेक उमेदवार आपली दावेदारी सांगत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे दिर्घ प्रतिक्षेनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने बहुतांश उमेदवार नगराध्यक्षपदाकडे नजर ठेऊनच निवडणुकीचा विचार करीत आहे.


जात पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा
तहसिलदार संतोष शिंदे यांचे आवाहन
जानेवारी  ते मार्च महिन्यात होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणीचे प्रस्ताव १५ नोव्हेंबर पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे लागणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विषेश सहाय्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता राखीव प्रभागातुन निवडणुक लढविणा-या ईच्छुक उमेदवारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तहसिल कार्यालयात सादर करावे असे आवाहन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.

साभार:- देशोन्नती

Friday, 4 November 2011

घाटंजी नगर परिषदेत अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेची ‘केविलवानी’ धडपड

अखेर बहुप्रतिक्षीत नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले. येत्या ८ डिसेंबरला नागरीक आपले शहर कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले असुन आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गेली अडीच वर्षे सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेने न.प.निवडणुकीत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अत्यंत केविलवानी धडपड सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. घाटंजी शहरासाठी व येथिल नागरीकांसाठी गेली दोन अडीच वर्षे जे केले नाही ते अवघ्या एका महिन्यात करण्याचा खटाटोप नगर परिषदेतील शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. आचार संहिता लागण्याच्या महिनाभर आधी शहरातील विवीध भागात रस्ते व नाल्यांची कामे एवढ्या वेगाने सुरू करण्यात आली की, मतदान करायला नागरीक त्या रस्त्यावरूनच जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या धडपडीत बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचा दर्जा काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. निवडणुक तोंडावर आल्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्याची वर्तमानपत्रातुन प्रसिद्धी करण्याचा सपाटाच लावला आहे. जनतेच्या मनात खदखदत असलेल्या या संतापाला प्रसिद्धीची पुंâकर घालण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे. या नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडे उमेदवारांचीही कमतरता आहे. मागील महिन्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेल्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आमदार संजय राठोड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही निवडणुक शिवसेना भाजपासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात घाटंजीकरांनी आजवरचे सर्वात निष्क्रीय पदाधिकारी पाहिले. जनतेचे प्रश्न, शहरातील विवीध समस्या व विकास याचेशी काहीही देणेघेणे न ठेवता एकमेकांचे पाय ओढुन आपल्या पदरात मिळेल ते पाडुन घेण्यातच या पदाधिका-यांनी पाच वर्षे घालवली. आता जनतेच्या समोर जाण्याची वेळ आल्याने या ‘आणीबाणीच्या’ विकासकामांचा बेगड लावुन जनतेची दिशाभुल करण्याच्या या प्रयत्नाला मतदार कितपत भिक घालतात हे लवकरच स्पष्ट होईल.
साभार :- देशोन्नती

Tuesday, 9 August 2011

वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार

प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा

छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था  गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात. 
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.

Friday, 29 July 2011

खुर्चीच्या प्रेमासाठी पत्नीला दिली ‘सोडचिठ्ठी'



प्रेम कधी कुणावर होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही असे म्हणतात. मग त्यापुढे सामाजीक संकेताचीही पर्वा केल्या जात नाही. आपल्या सभोवताल असे किस्से घडतच असतात. मात्र कुणी सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी जन्मजन्मांतरीच्या बंधनालाच कात्री लावत असेल त्याला काय म्हणावे. मात्र आजच्या युगात हे घडतंय हि आत्मचिंतनाची बाब आहे. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन रद्द झालेल्या उमेदवारांनी निवडणुक रिंगणात राहण्यासाठी अशा युक्त्या वापरल्याने ‘सत्तेसाठी वाट्टेल ते' चा प्रत्यय येत आहे. बाजार समितीत विद्यमान संचालक असलेल्या एका उमेदवाराचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान रद्द झाला. पत्नीच्या नावाने अडत परवाना असल्यामुळे त्यांनी जुन्या मुद्रांकाच्या आधारे पत्नीशी एक वर्षापुर्वीच घटस्फोट झाल्याचे दाखविले. त्याचप्रमाणे एकेकाळी बाजार समितीच्या सभापतीपदी असलेल्या एका उमेदवाराचा अर्ज मुलाच्या नावे अडत परवाना असल्याने अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अविवाहीत मुलाला कागदोपत्री चक्क घराबाहेर काढले. एकंदरीतच मानवी भावनांना छेद देणा-या अशा घटनांमुळे समाजात एक वेगळाच संदेश जात आहे. एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी अशा पळवाटा शोधणा-या वकीली मेंदुचे कौतुकच करावे लागेल. कागदोपत्री घटस्फोटाने ते वेगळे झाले नाहीत किंवा त्या मुलाने वेगळा संसार थाटला नाही. परंतु या कागदी उठाठेवीमुळे आपला वैचारीक स्तर किती खालावलेला आहे याचा प्रत्यय येतो.  नातेसंबंधाला काटेकोरपणे जपणा-या आपल्या समाजात आता अशा घटना होऊ लागल्याने येणा-या काळात आणखी काय बघावे लागेल 
याचा नेम नाही.

अखेर बाजार समितीच्या दिग्गजांना दिलासा

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामांकन अर्ज छाननीदरम्यान दोन्ही प्रमुख गटांची भिस्त असलेल्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. निवडणुकीबाहेर झालेल्या १७ पैकी ८ उमेदवारांनी त्याविरोधात अपील केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुक निर्णय अधिका-यांचा आदेश रद्द करून त्यांचे अर्ज कायम ठेवल्याने मोघे-लोणकर व पारवेकर गटाला दिलासा मिळाला आहे. आशिष लोणकर, प्रकाश डंभारे, सुरेश भोयर, चंद्रप्रकाश खरतडे, पांडूरंग सिदुरकर, माया पवार, इकलाख खान हे निवडणुकीत कायम राहिल्याने दोन्ही प्रमुख गटांवर आलेले संकट टळले आहे. सचिन पारवेकर व सैय्यद रफिक यांचे अर्ज छाननीमध्ये मंजुर झाले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे अपील करण्यात आले होते. मात्र ते फेटाळण्यात आले. आता १ ऑगस्टला नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख असुन त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे.