Pages

Showing posts with label उमेदवार. Show all posts
Showing posts with label उमेदवार. Show all posts

Friday, 10 February 2012

निवडणुक झाली...आता व्हायचे ते होईल....!

उमेदवारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
मतदार राजा पुन्हा कंगाल 
भल्या पहाटे उठुन रात्री उशिरापर्यंत धावपळ...गृहभेटी, प्रचार...  कार्यकर्त्यांची मर्जी -मतदारांचा मुड सांभाळणे... प्रत्येकालाच भाऊ-दादा ...करुन मानपान करणे...झाले एकदाचे.  हुश्श..! आता मतदान आटोपले... पुढे काय होईल ते होईल...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची धावपळ आटोपताच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दहा ते १५ दिवस प्रचंड दगदग व धावपळीचे गेले. तिकीट मिळविण्यापासुन सुरू झालेली कसरत मतदारांकडून मतदान करुन घेण्यापर्यंत कायम होती. या काळात मर्जी सांभाळायची तरी कोणाकोणाची? दररोज नेत्यांच्या घराचे दरवाजे ठोठवायचे. दारात उभे राहून तिकीट मागायचे. पक्षाचे तिकीट पदरात घेण्याचे दिव्य पार पाडल्यावर लक्षात आले की अजुन तर मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्यक्ष रिंगणात उतरल्यावर एका दरवाजाचे हजारो दरवाजे झाले. प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्या घरी फेऱ्या माराव्या लागल्या.  दारोदारी भटकावे लागले. हाडवै-यालाही ‘भाऊ लक्ष ठेवजो’ म्हणुन हात जोडावे लागले. दिवसाची सुरूवात भल्या पहाटे होत असली तरी झोपण्याची वेळ मात्र निश्चित ठरलेली राहात नव्हती. कधी एक वाजायचा. कधी तीन वाजायचे. कधी-कधी तर अंथरुणाला पाठ टेकते न टेकते तोच मोबाईल वाजायचा, ‘भाऊ तुमाले चाला लागते, दुस-या पार्टीवाले आपल्या एरीयात घुसले. आपले मतदार मॅनेज करने सुरू आहे’. अशी वार्ता कानी पडली की, एक एक दिवस झोपही नाही. स्वत:चा प्रचार करत असतांनाच विरोधी उमेदवारांच्या कुरापतींकडे लक्ष ठेवणे. या दरम्यान कुटूंब, जबाबदा-या, कामधंदा सगळं काही जागेवर. प्रचाराची धामधुम संपताच पोलचिटच्या निमित्ताने पुन्हा मतदारांचे घर गाठायचे. काही कमी पडले का विचारायचे. याच धावपळीत मतदानाचा दिवस आला. पुन्हा पहाटे उठून राहिलेल्यांच्या भेटी. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे यातच ५.३० ची वेळ संपून गेली. पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटी, कुठे काय झाले, मतदान कसे झाले, कुणाला झाले, त्यांनी मतदार आणण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यांचे हिशोब, देणे-घेणे या सगळ्यात मतदानाच्या दिवशीही वेळेचे भान राहिले नाही. अखेर सर्व काही व्यवस्थित पार पडले अन् मोबाईल बंद करुन शांत झोप लागली ती दिवस केंव्हा वर आला हे कळलेच नाही. ही अवस्था निवडणूकीत जवळपास प्रत्येक उमेदवार व त्यांच्या सोबत राबणा-या कार्यकर्त्यांची होती. मतदान संपले आणि त्यांनी सुस्कारा सोडला. धावपळ थांबली. आता फक्त निकालाची प्रतिक्षा राहीली आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी  होणार आहे. त्यात मतदारांनी काय कौल दिला याची धाकधुक असली तरी बहुतांश उमेदवारांनी आता जे व्हायचे ते होईल. उगीच टेंशन घेऊन फायदा काय? अशी मानसिकता करुन घेतली आहे. आता रिलॅक्स मुडमध्ये हे उमेदवार राहणार आहेत या कालावधीत पुन्हा कार्यकर्ते व मतदारांची कटकट नको म्हणून अनेकांनी आपले मोबाईलसुद्धा बंद करुन ठेवले आहेत. कांहींनी  हवापालट करण्यासाठी नियोजनही केले आहे. तर कोणी देवदर्शनालाही निघुन गेले आहे. ग्रामिण भागात नेत्यांच्या भरधाव गाड्यांनी उडणारा धुरळा आता दिसेनासा झाला आहे. निवडणुकीच्या झगमगाटात झाकल्या गेलेली ग्रामिण भागाची बिकट अवस्था, ग्रामस्थांना भेडसावणा-या समस्या पुन्हा नजरेस पडत आहेत. मात्र आता त्याचे कुणाला काय? अखेर गेल्या महिनाभरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला मतदार राजा मताचे दान देऊन कंगाल झाला आहे.
साभार :- देशोन्नती

Sunday, 5 February 2012

घराणेशाहीच्या चिखलात भाजपाचे कमळ फुलणार - रमेश यमसनवार

पारवा गट व गणात भाजप उमेदवारांची आघाडी

पारवा सर्कल आजवर घराणेशाहीच्या चिखलातच राहिल्याने या परिसराचा विकास झाला नाही. मात्र यावेळी याच चिखलात भाजपाचे कमळ फुलवून विकासाचा नवा अध्याय सुरू करणार असल्याचा विश्वास पारवा गटातील भाजपाचे उमेदवार रमेश यमसनवार यांनी व्यक्त केला. पारवा जि.प.सर्कलसह कुर्ली व पारवा गणातही भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्वयंस्फूर्त पाठींबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. 
ईतर पक्षाच्या पारंपारिक उमेदवारांचा अनुभव जनतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात हात जोडतात. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षात कधी ढुंकूनही पाहात नाहीत. मात्र माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेतून असुन निवडून आल्यावर जनतेतच राहायचे असल्याने प्रत्येक क्षणी शेतकरी व सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्य व केंद्र शासनात कॉग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतांना सुद्धा शेतक-यांना न्याय मिळाला नाही. सर्वत्र कापसाच्या भावासाठी आंदोलने झाली मात्र सरकार व कॉंग्रेस रा.कॉ. नेत्यांनी जनक्षोभ दुर्लक्षीत केला. 
आता उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले स्थानीक नेते आंदोलनाच्या वेळी शेतक-यांना न्याय मिळावा म्हणुन का पुढे आले नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा पंचायत समिती गणात अरूणा वासुदेवराव  महल्ले व कुर्ली गणात सुशिक्षीत उमेदवार गजानन गाऊत्रे यांना भाजपाने संधी देऊन सर्वसामान्य जनतेतून उमेदवार उभा करण्याची परंपरा कायम राखली आहे. 
पंचायत समिती गणातही भाजप उमेदवारांना जनता आनंदाने कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापुर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले रमेश यमसनवार पारवा परिसरात सुपरिचीत आहेत. काही वर्षांपुर्वी या भागात महापुर आला त्यावेळी ते पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे आले होते. अन्न, कपडे व निवारा या मुलभूत गोष्टींसाठी त्यांनी पुरग्रस्तांना मोलाची मदत केली होती. येथिल नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ते २७ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. धार्मिक व सामाजीक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. सुमारे दहा वर्षांपुर्वी कुर्ली येथे पाण्याची तिव्र टंचाई असतांना स्वखर्चाने उन्हाळाभर त्यांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला होता. मतदार संघातील जवळजवळ प्रत्येक माणसाला त्यांची ओळख आहे. पारवा गटातील कुर्ली, वघारा, राजापेठ, पारवा, सावरगाव, सावंगी, सायतखर्डा, बोधडी, दत्तापुर, झटाळा, तरोडा, वाढोणा, मेसदा, गणेरी, भीमकुंड, पंगडी, येरंडगाव, देवधरी या गावांसह ईतर सर्वच ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. कुर्ली व पारवा गणातील उमेदवारांनाही जनतेचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सत्ता हाती असल्याने विकास करण्याचा प्रचार करीत आहेत. मात्र आजवर त्यांनी काय विकास साधला असा प्रश्न त्यांना जनता विचारत असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे खासदार हंसराज अहिर यांनी चंद्रपूर भागात केलेला विकास आता घाटंजी तालुक्यातही करायचा असुन त्यांच्या मदतीने विकासनिधी खेचून आणुन या भागातील समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.
साभार :- देशोन्नती

Saturday, 28 January 2012

घाटंजी तालुक्यात निवडणुकीला चढलाय रंग

‘शिवणी’चा तिढा सुटता सुटेना
उमेदवार लागले प्रचाराला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला आता रंग चढण्यास सुरूवात झाली असुन बहुतांश उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. घाटंजी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिन गट व पंचायत समितीचे ६ गण अशा एकुण ९ जागांकरीता निवडणुक होणार आहे.
पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित झाले असले तरी कोणत्याही पक्षाने अद्याप आपले अधिकृत उमेदवार जाहिर केले नाहीत. शिवणी गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजुनही काथ्याकुट चालु आहे. सुरेश लोणकर, सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोणकरांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल केले. तर सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे हे सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी हतबल, कार्यकर्ते संभ्रमात व मतदार कोड्यात पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणा-या  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधुम जिल्हाभरात सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूकांना जि.प. व  पं.स.च्या सत्तेचे डोहाळे लागले आहेत. अस्ताव्यस्त पसरलेला मतदारसंघ, प्रचंड मतदार संख्या या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेकांनी विविध राजकिय पक्षांची तिकीटे मिळवण्याची खटपट सुरु केली आहे. विविध पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी झाली असून अनेकांनी तिकीटे मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. परंतू ऐनवेळी तिकीट कोणाला मिळणार? तिकीटाच्या शर्यतीतून पत्ता कोणाचा कापला जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याने ३० तारखेपर्यंत ईच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवारच राहणार आहे. 
गट व गणात एकाच पक्षातील तुल्यबळ उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. यातून बंडखोरीची समस्या निर्माण झाली. या बंडखोरीला लगाम लावण्यासाठी  नेतेमंडळींनी व्युहरचना आखली आहे. परंतू यास जुमानता काही बंडखोर निवडणुक लढून जिंकता नाही आले तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याची भूमिका वठविण्याची शक्यता आहे. उमेदवारीचा घोळ तात्काळ मिटत नसल्याने विरोधी पक्षाआधी पक्षांतंर्गत स्पर्धकाबरोबर शह- कटशहाचे राजकारण करत स्पर्धा करीत तिकीट मिळवण्याची लढाई खेळण्याची वेळ आली आहे. या पक्षांअंतर्गत लढाईतही धनशक्तींचीच सरशी होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते संतप्त होत आहेत. बहूतेक ठिकाणी उमेदवाराचे निष्कलंक चारित्र्य, राजकीय कौशल्य, या गुणाऐवजी निवडणुकीत धनशक्तीचा जोर दाखवू शकणा-या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात असल्याची खंत सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. 
सगळीकडे सध्या राजकारण्यांची धामधुम सुरू आहे. खेड्यातील रस्त्यांवर धुळ उडवित बेफामपणे जाणा-या वाहनांचा ताफा, मागील निवडणुकीनंतर गावात अवतरलेले नेते, स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी भाषणे यामुळे ग्रामिण भागातील वातावरण निवडणुकमय झाले आहे. तर दुसरीकडे मतदार संघातील जनता नागरी समस्यांच्या विळख्याने होरपळून निघत आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. रस्ते, पाणीपुरवठा,वीजसेवा, शिक्षण, आरोग्य, आदीसह विविध नागरी समस्यामुळे मतदार त्रस्त आहेत. निवडणुका आल्या की गावपुढा-यांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जातात. नंतर मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते अशी संतप्त प्रतिक्रीयाही मतदारातून व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती