Pages

Showing posts with label प्रचार. Show all posts
Showing posts with label प्रचार. Show all posts

Friday, 10 February 2012

निवडणुक झाली...आता व्हायचे ते होईल....!

उमेदवारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
मतदार राजा पुन्हा कंगाल 
भल्या पहाटे उठुन रात्री उशिरापर्यंत धावपळ...गृहभेटी, प्रचार...  कार्यकर्त्यांची मर्जी -मतदारांचा मुड सांभाळणे... प्रत्येकालाच भाऊ-दादा ...करुन मानपान करणे...झाले एकदाचे.  हुश्श..! आता मतदान आटोपले... पुढे काय होईल ते होईल...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची धावपळ आटोपताच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दहा ते १५ दिवस प्रचंड दगदग व धावपळीचे गेले. तिकीट मिळविण्यापासुन सुरू झालेली कसरत मतदारांकडून मतदान करुन घेण्यापर्यंत कायम होती. या काळात मर्जी सांभाळायची तरी कोणाकोणाची? दररोज नेत्यांच्या घराचे दरवाजे ठोठवायचे. दारात उभे राहून तिकीट मागायचे. पक्षाचे तिकीट पदरात घेण्याचे दिव्य पार पाडल्यावर लक्षात आले की अजुन तर मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्यक्ष रिंगणात उतरल्यावर एका दरवाजाचे हजारो दरवाजे झाले. प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्या घरी फेऱ्या माराव्या लागल्या.  दारोदारी भटकावे लागले. हाडवै-यालाही ‘भाऊ लक्ष ठेवजो’ म्हणुन हात जोडावे लागले. दिवसाची सुरूवात भल्या पहाटे होत असली तरी झोपण्याची वेळ मात्र निश्चित ठरलेली राहात नव्हती. कधी एक वाजायचा. कधी तीन वाजायचे. कधी-कधी तर अंथरुणाला पाठ टेकते न टेकते तोच मोबाईल वाजायचा, ‘भाऊ तुमाले चाला लागते, दुस-या पार्टीवाले आपल्या एरीयात घुसले. आपले मतदार मॅनेज करने सुरू आहे’. अशी वार्ता कानी पडली की, एक एक दिवस झोपही नाही. स्वत:चा प्रचार करत असतांनाच विरोधी उमेदवारांच्या कुरापतींकडे लक्ष ठेवणे. या दरम्यान कुटूंब, जबाबदा-या, कामधंदा सगळं काही जागेवर. प्रचाराची धामधुम संपताच पोलचिटच्या निमित्ताने पुन्हा मतदारांचे घर गाठायचे. काही कमी पडले का विचारायचे. याच धावपळीत मतदानाचा दिवस आला. पुन्हा पहाटे उठून राहिलेल्यांच्या भेटी. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे यातच ५.३० ची वेळ संपून गेली. पुन्हा कार्यकर्त्यांच्या भेटी, कुठे काय झाले, मतदान कसे झाले, कुणाला झाले, त्यांनी मतदार आणण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यांचे हिशोब, देणे-घेणे या सगळ्यात मतदानाच्या दिवशीही वेळेचे भान राहिले नाही. अखेर सर्व काही व्यवस्थित पार पडले अन् मोबाईल बंद करुन शांत झोप लागली ती दिवस केंव्हा वर आला हे कळलेच नाही. ही अवस्था निवडणूकीत जवळपास प्रत्येक उमेदवार व त्यांच्या सोबत राबणा-या कार्यकर्त्यांची होती. मतदान संपले आणि त्यांनी सुस्कारा सोडला. धावपळ थांबली. आता फक्त निकालाची प्रतिक्षा राहीली आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी  होणार आहे. त्यात मतदारांनी काय कौल दिला याची धाकधुक असली तरी बहुतांश उमेदवारांनी आता जे व्हायचे ते होईल. उगीच टेंशन घेऊन फायदा काय? अशी मानसिकता करुन घेतली आहे. आता रिलॅक्स मुडमध्ये हे उमेदवार राहणार आहेत या कालावधीत पुन्हा कार्यकर्ते व मतदारांची कटकट नको म्हणून अनेकांनी आपले मोबाईलसुद्धा बंद करुन ठेवले आहेत. कांहींनी  हवापालट करण्यासाठी नियोजनही केले आहे. तर कोणी देवदर्शनालाही निघुन गेले आहे. ग्रामिण भागात नेत्यांच्या भरधाव गाड्यांनी उडणारा धुरळा आता दिसेनासा झाला आहे. निवडणुकीच्या झगमगाटात झाकल्या गेलेली ग्रामिण भागाची बिकट अवस्था, ग्रामस्थांना भेडसावणा-या समस्या पुन्हा नजरेस पडत आहेत. मात्र आता त्याचे कुणाला काय? अखेर गेल्या महिनाभरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला मतदार राजा मताचे दान देऊन कंगाल झाला आहे.
साभार :- देशोन्नती

Saturday, 4 February 2012

मर्यादा लाखांची खर्च मात्र कोटींच्या घरात

होर्डींगबाजीत पैशांची मुक्त उधळण
हॉटेल वाईनबार हाऊसफुल्ल
संग्रहित छायाचित्र
मोठमोठे होर्डींग्स, २०-२५ गाड्यांचा ताफा व सुमारे ५०० ‘पेड’ कार्यकर्त्यांचा  लवाजमा लक्षात घेतला तर निवडणुक लढविणे सर्वसामान्यांचे काम नव्हे यावर ठाम विश्वास बसतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामिण भागात सुरू असलेला प्रचाराचा धुमाकूळ पाहिला तर यावर किती खर्च होत असेल याचा अंदाज लावणेही कठीण आहे. 
निवडणुक आयोगाने जिल्हा परिषदेच्या एका उमेदवारासाठी ३ लाख व पंचायत समिती उमेदवारासाठी दोन लाख रूपये खर्च मर्यादा ठरविली आहे. शिवाय दररोजच्या खर्चाची माहिती त्याच दिवशी निवडणुक निर्णय अधिका-यांकडे द्यावी लागते. आयोगाने कठोर आचारसंहिता ठरविली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याने प्रचार निरंकुश झाला आहे. नेमका किती खर्च होत आहे याचा अंदाज घेण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आयोगाने जी खर्च मर्यादा ठरवून दिली आहे तेवढा केवळ एकाच दिवसाचा खर्च असल्याचे एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले. दररोज २० ते २५ भाड्याची वाहने, १०-१५ वैय्यक्तीक वाहने, शिवाय प्रचार कार्यात सोबत येणारे सुमारे ५०० कार्यकर्त्यांचे जेवण व भत्ता असा प्रतिव्यक्ती सुमारे ४०० ते ५०० रूपये खर्च येतो. केवळ याचा हिशोब काढला तरी तो लाखांच्या घरात जातो. 
ग्रामिण भागात लावण्यात आलेल्या होर्डींग्सचा हिशोब काढ़ला तर तोंडात बोट घालण्याची वेळ येते. जिल्हा परिषद सर्कलच्या एका गावात एका पक्षाच्या उमेदवाराचे किमान ५ ते १० होर्डींग्स व बॅनर आहेत. एका बॅनरची किंमत सुमारे ५०० रूपये तर मोठ्या होर्डींग साठी सुमारे ३ ते पाच हजार रूपये खर्च येतो. एका सर्कलमध्ये सुमारे ५० गावे येतात. त्यामुळे या खर्चाचा अंदाज काढला तर एका पक्षाच्या उमेदवाराला सुमारे २० ते २५ लाख रूपये फलकांचाच खर्च येतो. मात्र निवडणुक यंत्रणेला खर्च सादर करतांना तो कसा काय अ‍ॅडजस्ट केल्या जातो हा संशोधनाचा विषय आहे. मतदारांवर व्यक्तीगत स्वरूपात करण्यात येणा-या खर्चाचा हिशोब लावणे तर कुणालाच शक्य नाही. निवडणुक आयोग दरवेळी जाचक नियमांची सरबत्ती करीत असला तरी स्थानिक यंत्रणा त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.
साभार :- देशोन्नती

Tuesday, 9 August 2011

वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार

प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा

छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था  गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात. 
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.