Pages

Showing posts with label तोडफोड. Show all posts
Showing posts with label तोडफोड. Show all posts

Tuesday, 7 April 2015

ग्रा.पं.निवडणुक प्रक्रीयेतील वादातून घाटंजीत तणाव








देवानंद पवार समर्थकांनी सतिश मलकापुरे यांच्या घरात केलेली तोडफोड
दोन गटात हाणामारी : राजकीय वैमनस्यातून घटनेला हिंसक वळण
येथिल तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू असतांना जातवैधता प्रमाणपत्र स्विकारण्याच्या वेळेबाबत निर्माण झालेल्या वादाला ता.६ ला रात्री उशिरा हिंसक वळण मिळाले. जि.प.सदस्य देवानंद पवार यांना मारहाण झाल्यावर दोन गटात हाणामारी होऊन काही ठिकाणी जमावाकडून दगडफेकही झाली. माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांच्या घरात घुसून जमावाने प्रचंड तोडफोड केली. या संपुर्ण घटनाक्रमात दोन्ही गटाच्या तक्रारींवरून घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या वादामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.
घाटंजी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सुरू होती. दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र स्विकारण्याची वेळ गेल्याचे सांगुन संबंधीत लिपिकाने काही लोकांचे प्रमाणपत्र स्विकारले नाही. तर देवानंद पवार समर्थकांचे प्रमाणपत्र स्विकारल्या जात आहे असा आरोप करून माजी नगरसेवक सतिश मलकापुरे यांचा संबंधीत लिपिकाशी वाद झाला. हि घटना कळताच त्या लिपिकाचा मुलगा कार्यालयात आला. परिस्थिती पाहुन त्याची प्रकृती बिघडली. त्याला पवार व त्यांच्या सहका-यांनी खासगी दवाखान्यात नेले. तेवढ्यात तिथे सतिश मलकापुरे, भरत दलाल व अन्य काहीनी येऊन देवानंद पवार यांना मारहाण करायला सुरूवात केली. हि घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास नेहरू नगर परिसरात घडली. 
घटनेची माहिती मिळताच देवानंद पवार यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी गोळा झाले. पोलीस स्टेशनसमोर तुरळक दगडफेकही झाली. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हा जमाव सतिश मलकापुरे यांच्या घराकडे वळला. घराचा दरवाजा तोडून घरातील वस्तुंची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी मलकापुरे यांच्या घरी कुणीही नव्हते. शिवाय परिसरातील काही नागरिकांनाही जमावातील काहीनी मारहाण केल्याची माहिती आहे. 
घरात तोडफोड करत असतांना मलकापुरे यांच्या समर्थकांनीही या जमावावर दगडफेक केली. त्यामुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटातील समर्थकांमध्येही हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सतिश मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, अशोक पवार, अमोल मुत्यलवार, अरविंद चौधरी व इतर आठ जणांविरूद्ध भा.दं.वि. कलम १४३, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तर मारहाण केल्याबद्दल देवानंद पवार यांच्या फिर्यादीवरून सतिश मलकापुरे, वैभव मलकापुरे, भरत दलाल यांचेविरूद्ध भांदवि ३९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय भरत दालाल यांच्या फिर्यादीवरून देवानंद पवार यांचे विरोधात भांदवि ३९४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सतिश मलकापुरे यांचे घर फोडून तोडफोड केल्या प्रकरणी मलकापुरे यांच्या तक्रारीवरून देवानंद पवार, साहेबराव पवार, अशोक पवार, अनिल एंबडवार, संदिप जाधव यांचेसह एकुण २३ जणांविरूद्ध भांदवि  १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३९५ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. राजकीय दबावातून गुन्हे दाखल केल्या गेल्याचा पवार गटाचा आरोप आहे. तर ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीयेत पवार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मलकापुरे गटाने केला आहे.
तणावपुर्ण परिस्थितीमुळे यवतमाळ येथुन पोलीसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन घाटंजीत तळ ठोकुन आहेत. या घटनेच्या पाश्र्वभुमिवर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक तणावपुर्ण वातावरणात होण्याची चिन्हे दिसत असुन निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

त्या लिपिकाला कारणे दाखवा नोटीस
या संपुर्ण वादाचा केंद्रबिंदू असलेल्या तहसिल कार्यालयातील लिपिक कैलासवार यांना काही जातवैधता प्रमाणपत्र न स्विकारल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर लिपिकाने वेळ गेल्याचे सांगून जातवैधता प्रमाणपत्र स्विकारले नव्हते. तर विशिष्ट लोकांचे प्रमाणपत्र स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पोलीसांची जरब संपली !
दोन गटात निर्माण झालेल्या तणावात घाटंजी पोलीसांनी नरमाईची भुमिका घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रकरण गंभिर होत असल्याचे निदर्शनास येऊनही पोलीसांनी तातडीने पावले उचलली नाही. जमावातील अनेकजण पोलीस स्टेशनच्या परिसरात काठ्या, रॉड, मिरचीपुड घेऊन असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हाणामारी, दगडफेक व तोडफोड होत असतांना पोलीस कुठेच प्रतिबंध करतांना दिसले नाही. पोलीसांची अतिरिक्त कुमक रात्री उशिरा आली. एकंदरीतच घाटंजी पोलीसांची तालुक्यात जरबच नसल्याचे बोलल्या जात आहे.

Friday, 27 July 2012

शिवणी प्रा.आ.केंद्रात गावगुंडाचा धुमाकूळ

महिला कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला
कार्यालयातील सामानाची प्रचंड तोडफोड

तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातीलच एका गुंड प्रवुत्तीच्या युवकाने प्रचंड धुमाकुळ घातल्याने आरोग्य कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वुत्त असे की, काल ( दि.२४) ला रात्री ९ च्या सुमारास संदिप श्रावण जाधव हा युवक जखमेवर पट्टी बांधण्याचे कारण सांगून आरोग्य केंद्रात आला. संबंधीत विभागाचे कर्मचारी वाघाडे त्याला पट्टी करण्यासाठी गेले असता त्याने अश्लिल शिवीगाळ केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने कार्यालयात तोडफोड करण्यास सुरूवात केली. 
टेबल, खुर्च्या, खिडक्यांची तावदाने फोडली. औषधांची फेकाफेक करण्यास सुरूवात केली. ही आरडाओरड ऐकुन परिचारीका कुसूम मानकर व कुसूम वेट्टी बाहेर आल्या. सदर युवकाने त्यांनाही अश्लिल शिवीगाळ करण्यास केली. कुसूम मानकर या अपंग परिचारीकेला मारहाण केली. वायरच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना थापडा मारून ढकलुन दिले. वेट्टी यांनाही त्याने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा कर्मचा-यांच्या निवासस्थानाकडे वळविला. निवासस्थानाच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्या मारून आतील सामानाची  फेकाफेक  केली. वैद्यकीय अधिका-याच्या निवासस्थानाबाहेरही त्याने असाच धुमाकूळ घातला. या संपुर्ण प्रकाराने धास्तावलेल्या कर्मचा-यांनी घाटंजी पोलीस स्टेशन व वरिष्ठांना याबबत कळविले. शिवणी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन गेडाम हे त्यावेळी बाजुच्या गावात साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. 
त्यांनी लगेच आरोग्य केंद्र गाठले. तसेच घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. मात्र तोवर सदर आरोपी तेथुन पसार झाला होता. घाटंजी पोलीसांनी त्याचेविरूद्ध अप.क्र.५५/०१२ कलम ३३२, ३५३, २९४, ५०६, ४२७ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र लगेच त्याची जामिनावर मुक्तताही करण्यात आल्याची माहिती आहे. या गावगुंडाविरोधात पंधरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकामाची तोडफोड करून सरपंच व ग्रामसेवकाला धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याचेविरूद्ध पोलीसांनी मवाळ भुमिका घेतली होती. हा युवक गावात नेहमीच अशा प्रकारचा धिंगाणा घालीत असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस विभाग त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपुर्ण प्रकारामुळे कर्मचारी भयभीत झाले असुन अशा हिंसक प्रवुत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Thursday, 29 March 2012

निकृष्ट अंथरूण पुरविल्याच्या निषेधार्थ समाजकल्याण कार्यालयात मनसेचे संतप्त आंदोलन




जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली. या विभागांतर्गत मागासवर्र्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविले जातात. तेथील विद्यार्थ्यांना नुकतेच गाद्या व इतर साहित्य पुरविण्यात आले. हे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे सहकार्‍यांसह समाजकल्याण विभागात आले. यावेळी त्यांनी समाजकल्याण अधिकारी कुठे आहे, अशी विचारणा केली. तेथील कर्मचार्‍यांनी साहेब बैठकीला गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खूच्र्यांची व टेबलाची तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई भिरकावली. त्यानंतर कार्यालयाबाहेर जाऊन सोबत आणलेल्या साहित्याला आग लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या आकस्मिक हल्ल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व इतर काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे कार्यालय गाठले. साहेब आहेत का अशी विचारणा करुन कार्यालयातील साहित्याची तोडफोड सुरू केली. यात समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांच्या कक्षातील खूच्र्या, टेबल तोडले. कक्षातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले. त्यानंतर कर्मचार्‍यांचे टेबल व खूच्र्यांची फेकफाक करण्यात आली. एवढेच नाही तर सोबत आणलेल्या गाद्या फाडून त्यातील रुई कार्यालयात भिरकावली. यानंतर कार्यालयातून बाहेर पडून पटांगणात गाद्या जाळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा धुडगूस सुरू होता.
या प्रकाराची माहिती समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांना कळताच त्यांनी तातडीने कार्यालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसेचे कार्यकर्ते निघून गेले होते. घटनेची माहिती पोलिसांना व वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दीपक केदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सज्रेराव गायकवाड यांनीही पोलीस कुमकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

शासन जबाबदार नाही - ना. शिवाजीराव मोघे 
समाज कल्याण विभागांतर्गत खासगी संस्थेमार्फत वसतिगृह चालविल्या जाते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनातर्फे संस्थांना अनुदान दिल्या जाते. साहित्य खरेदी आणि निविदा या प्रक्रियेला शासन जबाबदार नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

हल्ले सहन करणार नाही - सीईओ राम
न्याय मागण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असताना त्याचा वापर न करता गुंडागर्दी करुन अधिकारी व कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही. एकदाही तक्रार किंवा माहिती न देता थेट तोडफोड करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया सीईओ नवलकिशोर राम यांनी दिली.

खरेदी राज्यस्तरावरून - अविनाश देवसटवार
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या गाद्यांचे कंत्राट राज्यस्तरावरुन देण्यात आले आहे. यात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया समाजकल्याण अधिकारी अविनाश देवसटवार यांनी दिली.

साभार :- लोकमत


Thursday, 5 January 2012

लखमाई गॅस एजन्सीत शिवसेना पदाधिका-याची तोडफोड


येथिल ईण्डेन गॅसचे वितरक असलेल्या लखमाई गॅस एजन्सीमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांनी आपल्या तिन साथिदारासमवेत तोडफोड केली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गॅस एजन्सीच्या कार्यालयात येऊन त्यांनी चारचाकी वाहनासाठी सिलेंडरची मागणी केली. मात्र नियमबाह्यपणे सिलेंडर देता येत नसल्याचे येथिल कर्मचा-याने सांगताच त्यांनी शिविगाळ करून येथिल सामानाची तोडफोड केली. संगणकाला विटा मारून फोडले. सदर घटनेची तक्रार देण्यास एजन्सीचे संचालक सचिन माहुरे हे पोलीस स्टेशनला आले असता सुरूवातीला त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. साहेब आल्याशिवाय तुमची तक्रार घेता येणार नाही असे सांगण्यात आल्याने तक्रारकर्त्यास बराच वेळ ताटकळत बसावे लागले. आरोपी भरत दलाल यांचेसह तिन जणांविरोधात कलम ४५२, ४२७, २९४, ५०६, ३८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
शिवसेनेचे काही पदाधिकारी नेहमीच धाकदपट करून नियमबाह्यरित्या सिलींडरची मागणी करतात असे येथिल कर्मचा-यांनी सांगीतले.

कोंबडबाजारावर विशेष पथकाची धाड
तालुक्यातील दडपापुर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कोंबडबाजावर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने धाड मारली. यामध्ये सुमारे १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी देवसिंग बाबाराव राठोड, शब्बीर पठाण, संतोष हरी चव्हाण, रंगराव हरी राठोड या आरोपांrना अटक करण्यात आली. विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक नवलकर, जमादार प्रभाकर शिंगणजुटे, विजय डबले, राजेंद्र नागभिडकर, रावसाहेब शेंडे, निलेश वारेकर, सचिन आडे यांनी ही कारवाई केली. यामुळे पुन्हा एकदा घाटंजीच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार:- देशोन्नती