Pages

Wednesday 15 August 2012

सोसायटीचे नाव बदलण्यावरून आमसभेत गोंधळ


स्थानिक घाटी घाटंजी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आमसभेत आज संस्थेचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांच्या कालावधीतच सभा तहकुब करावी लागली. काही सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले.
घाटी घाटंजी सहकारी सोसायटीची आमसभा येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. या संस्थेचे नाव बदलुन सहकार महर्षी बाळासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्था म.घाटंजी असे करण्यासंबंधीचा आमसभेतील विषय पत्रिकेवरील ठराव क्रमांक सात सचिव शेंडे यांनी वाचुन दाखविला. यावरून आमसभेत गोंधळाला सुरूवात झाली. नाव बदलण्याला विरोध दर्शविण्यात आला. नाव बदलण्याची गरजच काय आहे? जे आहे तेच नाव कायम ठेवण्यात यावे अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. सभेत गोंधळ व तणाव वढत असल्याचे निदर्शनास येताच अध्यक्ष पुंडलीक वघरे यांनी आमसभा तहकुब केली. 
या गोंधळामध्येच आमसभेत उपस्थित असलेले आमदार निलेश पारवेकर, जि.प.सदस्य योगेश पारवेकर सभागृहातून बाहेर पडले. या दरम्यान सदस्यांनी दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने संस्थेचे सचिव व कर्मचारी गर्दीच्या गराड्यात सापडले. वातावरण संतप्त होत असल्याने तातडीने पोलीसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी आपल्या ताफ्यासह सभास्थळी येऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सदर संस्थेची स्थापना गोविंदराव चंपत ठाकरे यांनी १९६० साली केली. या संस्थेचा विस्तार तब्बल ३२ गावात असुन ६ हजार ७५० सभासद आहेत.
साभार :- देशोन्नती  

No comments:

Post a Comment