Pages

Saturday 21 July 2012

उपविभागीय कार्यालय घाटंजीतच करण्याची सर्वस्तरातून मागणी


नव्याने होऊ घातलेले उपविभागीय कार्यालय घाटंजीमध्येच व्हावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे. राजकीय पक्ष, सामाजीक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार, कर्मचारी अशा सर्वच स्तरातून या मागणीला मोठा पाठींबा मिळत असुन अनेकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयामार्फत संबंधीतांना पाठविले आहे. तसेच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ग्राहक पंचायत, विदर्भ जन आंदोलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, प्राऊटीस्ट ब्लॉक इंडीया, विद्यार्थी संघटना तसेच अनेक कार्यकत्र्यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
सध्या घाटंजी तालुका पांढरकवडा उपविभागीय कार्यालयाशी संलग्न आहे. तर नव्याने होणा-या उपविभागात घाटंजीला आर्णीशी जोडून आर्णीमध्येच महसुल उपविभागीय कार्यालय स्थापन होण्याची शक्यता आहे. घाटंजी तालुक्यातील नागरिकांसाठी आर्णी अत्यंत गैरसोयीचे ठरणार असुन प्रशासकीय दृष्टीने सक्षम असतांना घाटंजीला डावलल्या जात असल्याबद्दल तालुक्यात प्रचंड संताप आहे. यापुर्वीही नव्यानेच स्थापन झालेल्या विधानसभा मतदार संघाला आर्णी विधानसभा मतदार संघ असे नामकरण करून घाटंजी तालुक्यावर अन्याय करण्यात आला. घाटंजी तालुका १९८१ मध्ये स्थापन झालेला आहे. तर घाटंजीत १९४८ पासुन नगर परिषद अस्तित्वात आहे. घाटंजी तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये, जिल्ह्यात एकाच ठिकाणी असलेले केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, विवीध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले अग्रगण्य औद्योगीक केंद्र तसेच सामाजीक क्षेत्रात नावाजलेल्या स्वयंसेवी संस्था आहेत. घाटंजी शहर हे पांढरकवडा व आर्णी शहराच्या मध्यभागी असल्याने ईतर दोन्ही तालुक्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. 
त्यामुळे उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी तालुक्यातून होत असुन अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा अनेक संघटनांनी दिला आहे.


उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी घाटंजी बंद

प्रस्तावीत उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच व्हावे या मागणीसाठी घाटंजीतील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील व्यापा-यांची मोर्चा काढुन बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आर्णी पेक्षा जास्त सोयीस्कर असुन देखिल घाटंजीला डावलुन नव्याने होत असलेल्या महसुल उपविभागाचे कार्यालय आर्णी मध्ये स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे कार्यालय आर्णीला झाल्यास घाटंजी तालुक्यातील ग्रामिण जनतेला प्रचंड आर्थिक व मानसिक ताण सोसावा लागणार आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील काही पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, सामाजीक कार्यकर्ते तसेच विवीध संघटनांनी यापुर्वीच याबाबत निवेदने दिली आहेत.
आज घाटंजीतील व्यापारी व अनेक नागरीकानी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुक, शैक्षणीक प्रतिष्ठाने व जिवनावश्यक वस्तुंच्या व्यवसायांना या बंद मधुन वगळण्यात आले होते.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment