Pages

Tuesday 3 July 2012

नाणेटंचाईमुळे व्यावसायीक व ग्राहकांना मनस्ताप

स्टेट बँकेने नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

दैनंदिन व्यवहारात महत्वपूर्ण असलेल्या नाण्यांची टंचाई घाटंजी तालुक्यात सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे. परिणामी टंचाईचे कारण पुढे करून ग्राहकांची लूट होत आहे. व्यापारी वर्गाकडून सक्तीने सुट्या पैशांसाठी अनावश्यक वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपुर्वी बाजारपेठ व बँक व्यवहारात नाण्यांचा सुकाळ पहावयास मिळत होता. यानंतर देशभरात एक रुपयांत बोला अशी सुविधा क्वॉईन बॉक्सवर आल्याने या व्यवहारात वेगाने वाढ झाली. परिणामी नाण्यांची टंचाई भासू लागली. पण आता मोबाईलच्या एक पैसा एक सेकंद अशा विविध सवलती योजनांमुळे क्वॉईन बॉक्स व्यवसाय अडचणीत येऊन बंद झाल्याने बॉक्समध्ये पडणारी नाणी व्यवहारातून हद्दपार झाली आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेकदा नाण्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी, हॉटेल चालकांची पंचाईत झाली आहे. सध्या बाजारपेठेत १,२,५ रुपयांच्या नाण्यांची टंचाई असून अनेक ठिकाणी सक्तीने अनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच ते अडचणीचे ठरत आहे. प्रवास करतांना तिकिट काढल्यानंतर सुटे पैसे उतरतांना मागून घ्या, असे वाहकाकडून सांगण्यात येते. अनेकदा प्रवासी कामाच्या गडबडीत तसेच उतरुन जातात, तर काहीजण एक-दोन रुपये मागण्यात कुठे वेळ घालवायचा म्हणून पैसे न घेताच जातात. याचा फायदा वाहकांना होतो. एकेकाळी सक्तीने नाणी दिली जायची. असे असतांना आता असणारी भरमसाठ नाणी गेली कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
स्टेट बँकेकडून नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासुन स्टेट बँकेतही नाणे उपलब्ध होत नसल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. नाणे टंचाईमुळे सुट्या पैशासाठी व्यावसायीकांचे ग्राहकांशी होणारे वाद आता नेहमीचे झाले आहेत. मात्र यामुळे व्यवसायावर तसेच ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. स्टेट बँकेने व्यापा-यांना नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करावी अशी आग्रही मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment