Pages

Saturday, 7 January 2012

ज्वारीची भाकरी खाऊन स्पर्धा करायची तरी कशी ?

धावपटू राजन भुरेचा जळजळीत सवाल
ग्रामिण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना संधी मिळाली तर ते यशाची शिखरे गाठू शकतात. मात्र ग्रामीण खेळाडूंना कधी पुढे येऊच दिल्या जात नाही. मोठ्या स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा त्यांना मिळत नाहीत. त्यांचा आहारही सकस नसतो. केवळ डाळीच्या पाण्यावर अन ज्वारीच्या भाकरीवर ग्रामिण खेळाडू स्पर्धेत कसा टिकणार ?  असा जळजळीत सवाल राजन भुरे उपस्थित करतो. 
नशिबाने केलेल्या आघातानंतर स्वत:ला सावरून पुन्हा ‘टॅ्रक’ वर उतरलेल्या राजनला ग्रामिण भागातील खेळाडूंसाठीच जगायचं आहे. ग्रामिण भागातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची त्याची ईच्छा आहे. ग्रामिण खेळाडूंसाठी जिल्हास्तरावर क्रिडा प्रबोधीनी असावी जेणेकरून त्यांच्यातील प्रतिभेला चालना मिळेल असे त्याचे मत आहे. खेड्यातील खेळाडूंना नेहमीच हेटाळणीला सामोरे जावे लागते. याचे उदाहरण देतांना तो म्हणाला की, २००२ मध्ये नागपुरला राजीव गांधी राज्यस्तरीय सद्भावना दौड स्पर्धेत घाटंजी तालुक्यातून ९ खेळाडू सहभागी झाले होते. मात्र स्पोर्ट्स किट नसल्याने त्यांना सुरूवातीस मैदानाबाहेर काढण्यात आले. मात्र नागपुरचे तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना स्पर्धेत घेण्यात आले. त्यावेळी  मैदानाबाहेर काढण्यात आलेले पाच खेळाडू अव्वल ठरले तर राजन भुरे यांना बेस्ट कोच पुरस्कार मिळाला होता. जि.प.च्या अनुकंपा यादीत नाव असुनही राजनला अद्याप नोकरी मिळाली नाही. सध्या तो माणिकवाडा (धनज) येथे बहिणीकडे राहतो. बहिण उज्वला पारधी व जावई संजय पारधी यांनीच आजवर आपल्याला सावरले असल्याचे तो सांगतो. तसेच अडचणीच्या वेळी शिरोली येथिल कैलास कोरवते मदतीस धावुन येतात असे त्याने सांगीतले. येत्या २४ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत व त्यानंतर मार्च महिन्यात थायलंड येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. अशा स्पर्धांसाठी जातांना शासन केवळ तांत्रीक बाबी पुर्ण करते. मात्र देशाचे प्रतिनिधीत्व करीत असताना साधा प्रवासखर्चही देण्यात येत नसल्याबाबत त्याने खंत व्यक्त केली. अशा परिस्थितीत ग्रामिण खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचणार? असा सवाल त्याने उपस्थित केला. अंगी प्रचंड गुणवत्ता अन अनुभवातून आत्मसात केलेल्या अनेक गोष्टींमुळे राजन एक यशस्वी प्रशिक्षक होऊ शकतो. मात्र वशिलेबाजीच्या काळात त्याच्या गुणवत्तेची पारख कोण करणार ? त्याला संधी कोण देणार ? ग्रामिण खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची कुवत आहे. परंतु सध्याच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना केवळ जिल्हास्तरापर्यंतच संधी आहे. त्यानंतर ज्याची आर्थिक परिस्थिती आहे तोच पुढे जाऊ शकतो. घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागात खेळांप्रती प्रचंड आकर्षण आहे. मात्र त्यांची दखल घेण्यासाठीच कुणी तयार नाही. या भागाचे लोकप्रतिनिधी ना.शिवाजीराव मोघे अनेक वर्षांपासुन मंत्रीपदावर आहेत. मात्र घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंसाठी त्यानी पावले उचलली नाहीत. आदिवासी भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी शासनस्तरावर धोरण ठरविण्याची गरज राजन भुरे याने तळमळीने बोलुन दाखविली.
 नशिबाने केलेल्या प्रहारांना तेवढ्याच वेगाने मागे सोडून राजन पुन्हा आयुष्याच्या शर्यतीत उतरलाय. त्याला गरज आहे ती मदतीची प्रोत्साहनाची.

अमोल राऊत

साभार:- देशोन्नती

Thursday, 5 January 2012

लखमाई गॅस एजन्सीत शिवसेना पदाधिका-याची तोडफोड


येथिल ईण्डेन गॅसचे वितरक असलेल्या लखमाई गॅस एजन्सीमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांनी आपल्या तिन साथिदारासमवेत तोडफोड केली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गॅस एजन्सीच्या कार्यालयात येऊन त्यांनी चारचाकी वाहनासाठी सिलेंडरची मागणी केली. मात्र नियमबाह्यपणे सिलेंडर देता येत नसल्याचे येथिल कर्मचा-याने सांगताच त्यांनी शिविगाळ करून येथिल सामानाची तोडफोड केली. संगणकाला विटा मारून फोडले. सदर घटनेची तक्रार देण्यास एजन्सीचे संचालक सचिन माहुरे हे पोलीस स्टेशनला आले असता सुरूवातीला त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. साहेब आल्याशिवाय तुमची तक्रार घेता येणार नाही असे सांगण्यात आल्याने तक्रारकर्त्यास बराच वेळ ताटकळत बसावे लागले. आरोपी भरत दलाल यांचेसह तिन जणांविरोधात कलम ४५२, ४२७, २९४, ५०६, ३८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
शिवसेनेचे काही पदाधिकारी नेहमीच धाकदपट करून नियमबाह्यरित्या सिलींडरची मागणी करतात असे येथिल कर्मचा-यांनी सांगीतले.

कोंबडबाजारावर विशेष पथकाची धाड
तालुक्यातील दडपापुर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कोंबडबाजावर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने धाड मारली. यामध्ये सुमारे १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी देवसिंग बाबाराव राठोड, शब्बीर पठाण, संतोष हरी चव्हाण, रंगराव हरी राठोड या आरोपांrना अटक करण्यात आली. विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक नवलकर, जमादार प्रभाकर शिंगणजुटे, विजय डबले, राजेंद्र नागभिडकर, रावसाहेब शेंडे, निलेश वारेकर, सचिन आडे यांनी ही कारवाई केली. यामुळे पुन्हा एकदा घाटंजीच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार:- देशोन्नती

Wednesday, 4 January 2012

घाटंजीतील मटका अड्ड्यांवर एस.पीं.च्या विशेष पथकाचा छापा

संग्रहीत छायाचित्र
शहरातील विवीध भागात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गठित केलेल्या विशेष पथकाने आज दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत तब्बल ९ आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.  एस.पीं.चे विशेष पथक आज शहरात येणार याची ‘खबर’ घाटंजी पोलीसांना मिळाली होती अशी माहिती आहे. त्यामुळे घाटंजी पोलीसांनी एका मटका अड्ड्यावर सुरूवातीस छापा मारला. अवघ्या अर्ध्या तासातच विशेष पथकाने येऊन तब्बल तिन मटका अड्ड्यांवर छापे मारले. या संपुर्ण कार्यवाहीत रोख, मोबाईल असा सुमारे २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे कळु शकली नाही. या कारवाईमुळे घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या निलंबीत असलेल्या ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्या काळात तर अवैध व्यावयायीकांची चांगलीच चांदी सुरू होती. त्यांच्या निलंबनानंतर सुमारे महिनाभर सुधाकर अंभोरे यांच्याकडे ठाणेदार पदाचा प्रभार होता. अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळातच त्यांनी अवैध वाहतुकीसह मटका व अवैध दारू चा व्यवसाय करणा-यांना वठणीवर आणले होते.
अवैध वाहतुक करणा-या सुमारे ३० वाहनानांवर त्यांनी कारवाई केली होती. तसेच चोरांबा येथे खुलेआमपणे चालणा-या कोंबडबाजारावरही त्यांनी छापा मारून ठोस कारवाई केली होती. त्यांच्या या धडक मोहिमेचा धसका अवैध व्यावसायीकांनी घेतला होता. मात्र लवकरच त्यांची येथुन बदली करून ठाणेदारपदाचा प्रभार सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांचेकडे देण्यात आला आहे. तेव्हापासुन अवैध व्यवसायीकांसाठी मोकळे रान झाले आहे. शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या कन्या शाळांच्या परिसराला लागुनच मटका व अवैध दारू चा व्यवसाय खुलेआम केल्या जातो. सर्वसामान्य नागरीक तसेच विद्यार्थ्यांनाही सहज नजरेस पडणारी ही गोष्ट पोलीसांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायीकांना संरक्षण देणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार:- देशोन्नती

घाटंजी न.प.विषय समिती सभापतींची निवड


नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर सर्वांचेच लक्ष लागुन असलेल्या विषय समिती सभापतींची आज निवड करण्यात आली. सर्वात महत्वाच्या असलेल्या बांधकाम सभापती पदावर कॉंग्रेसचे परेश कारीया यांची वर्णी लागली. तर शिक्षण सभापतीपदावर रा.कॉ.चे राम खांडरे यांची निवड झाली. महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा ठाकरे तर उपसभापतीपदी सिमा डंभारे यांची निवड झाली. पाणीपुरवठा सभापतीपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर व आरोग्य सभापतीपदी संगिता भुरे यांची निवड करण्यात आली. विषय समित्यांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबरीचा वाटा मिळाला. पीठासीन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी एस.डी.खांदे तर सहाय्यक म्हणुन मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांचेसह सर्व नवनिर्वाचीत नगरसेवकांची उपस्थिती होती.

Sunday, 1 January 2012

केशटोभाऊ पाठोपाठ अंजुबाईचेही लागले शुभेच्छा फलक

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कुतूहल व चर्चेचा विषय ठरलेल्या केशटोभाऊंच्या शुभेच्छा फलकांपाठोपाठ काल त्या फलकाला न्याहाळणारी अंजुबाई ही मनोरूग्ण महिलाही फलकावर झळकली. काही हौशी तरूणांनी तिच्याही छायाचित्रासह शुभेच्छा फलक शहरात लावले आहेत. काल पोलीस स्टेशनसमोर लागलेल्या फलकाला अंजुबाई ही वेडसर महिला मोठ्या कुतूहलाने न्याहाळत होती. आपल्यातीलच एक आज चक्क फलकावर झळकल्याने तिला त्याचे नवल वाटले होते. अखेर आज तिच्याही नावाचे शुभेच्छा फलक लागल्याने ती सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
या उपक्रमामुळे अशा प्रसंगी भुछत्राप्रमाणे उगवणा-या कार्यकर्त्यांचे होर्डींग्स मात्र नजरेस पडले नाहीत. एरवी घाटंजी शहरात शुभेच्छा फलकांचा सुकाळ असतो. मात्र यावेळी केशटोभाऊ व अंजुबाई यांच्या भीतीमुळे केवळ फलकावर चमकणा-या बेगडी नेते व कार्यकर्त्यांची फलक लावण्याची हिंमतच झाली नाही. समाजात मानाचे स्थान असणा-यांचे लागणारे होर्डींग्स ही समजण्यासारखी गोष्ट आहे. मात्र ज्याच्याकडे कोणते पद नाही व समाजात पतही नाही असे लोकही स्वत:चा गवगवा करण्यासाठी होर्डींगबाजी करतात.
घाटंजी शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर मोठमोठे होर्डींग्स लावण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासुन बिनदिक्कतपणे सुरू आहे. या फलकांचा आकार एवढा मोठा असतो की, अनेकदा वाहनधारक त्याला जाऊन धडकतात. त्यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी सुद्धा झाले आहेत. मात्र या बाबीकडे नगर परिषद व पोलीस यंत्रणा सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने काही युवकांनी पुढे येऊन हा गांधीगीरीचा मार्ग अवलंबिला. त्याचा चांगलाच परिणाम नववर्षाच्या दिवशी दिसुन आला. काही सन्माननिय अपवाद वगळता शुभेच्छा फलक निदर्शनास आले नाही. हा बदल नेमका किती दिवस राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.