Pages

Friday, 27 July 2012

शिवणी प्रा.आ.केंद्रात गावगुंडाचा धुमाकूळ

महिला कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला
कार्यालयातील सामानाची प्रचंड तोडफोड

तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातीलच एका गुंड प्रवुत्तीच्या युवकाने प्रचंड धुमाकुळ घातल्याने आरोग्य कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वुत्त असे की, काल ( दि.२४) ला रात्री ९ च्या सुमारास संदिप श्रावण जाधव हा युवक जखमेवर पट्टी बांधण्याचे कारण सांगून आरोग्य केंद्रात आला. संबंधीत विभागाचे कर्मचारी वाघाडे त्याला पट्टी करण्यासाठी गेले असता त्याने अश्लिल शिवीगाळ केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने कार्यालयात तोडफोड करण्यास सुरूवात केली. 
टेबल, खुर्च्या, खिडक्यांची तावदाने फोडली. औषधांची फेकाफेक करण्यास सुरूवात केली. ही आरडाओरड ऐकुन परिचारीका कुसूम मानकर व कुसूम वेट्टी बाहेर आल्या. सदर युवकाने त्यांनाही अश्लिल शिवीगाळ करण्यास केली. कुसूम मानकर या अपंग परिचारीकेला मारहाण केली. वायरच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना थापडा मारून ढकलुन दिले. वेट्टी यांनाही त्याने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा कर्मचा-यांच्या निवासस्थानाकडे वळविला. निवासस्थानाच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्या मारून आतील सामानाची  फेकाफेक  केली. वैद्यकीय अधिका-याच्या निवासस्थानाबाहेरही त्याने असाच धुमाकूळ घातला. या संपुर्ण प्रकाराने धास्तावलेल्या कर्मचा-यांनी घाटंजी पोलीस स्टेशन व वरिष्ठांना याबबत कळविले. शिवणी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन गेडाम हे त्यावेळी बाजुच्या गावात साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. 
त्यांनी लगेच आरोग्य केंद्र गाठले. तसेच घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. मात्र तोवर सदर आरोपी तेथुन पसार झाला होता. घाटंजी पोलीसांनी त्याचेविरूद्ध अप.क्र.५५/०१२ कलम ३३२, ३५३, २९४, ५०६, ४२७ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र लगेच त्याची जामिनावर मुक्तताही करण्यात आल्याची माहिती आहे. या गावगुंडाविरोधात पंधरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकामाची तोडफोड करून सरपंच व ग्रामसेवकाला धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याचेविरूद्ध पोलीसांनी मवाळ भुमिका घेतली होती. हा युवक गावात नेहमीच अशा प्रकारचा धिंगाणा घालीत असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस विभाग त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपुर्ण प्रकारामुळे कर्मचारी भयभीत झाले असुन अशा हिंसक प्रवुत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Thursday, 26 July 2012

घाटंजी तालुक्यात पावसाचे भिषण तांडव

२ हजार कुटूंबांना पुराचा फटका
अडीच हजार हेक्टरवरील पिक वाहुन गेले
कोट्यवधींचे नुकसान









गेल्या दोन दिवसांपासुन घाटंजी तालुक्यात कोसळत असलेल्या संततधार पावसाने तब्बल अडीच हजार हेक्टर शेतातील पिके खरडून नेली. तर सुमारे २ हजार कुटूंबे पावसाच्या तडाख्याने बेघर झाली आहेत.या पावसामुळे तालुक्यात कोट्यवधी रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या पाण्यात ९ जनावरे वाहुन गेली तर १ हजार १०३ घरे अंशत: व ९०५ घरे पुर्णपणे उध्वस्त झाले. दि.२२ जुलैच्या रात्री पासुन सुरू झालेल्या संततधार पावसाने संपुर्ण घाटंजी तालुक्यात धिंगाणा घातला. अनेक गावांना पुराचा फटका बसला. काही गावे तर पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथिल नागरिकांना जंगलात रात्र काढावी लागली. घरातील साहित्य, कपडे, धान्य व पावसाची वाट पाहात राखुन ठेवलेले बि.बियाणे, रासायनिक खतेही पावसाने वाहुन नेली. सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली. कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घाटंजी शहरातील काही नेहरू नगर, घाटी, पांढुर्णा रोड, आनंद नगर मधील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथिल  राहिवाशाना न.प.शाळा, गजानन महाराज मंगल कार्यालय, सोनु मंगलम, पंजाबी लॉन, न.प.सांस्कृतिक भवन या ठिकाणी हलविण्यात आले. येथे या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व  नगरसेवक, व्यापारी व सामाजीक कार्यकर्त्यांनी केली. कोळी बु. हे गाव अडाण नदीच्या काठी असल्याने या गावाला पुराचा सर्वाधीक फटका बसला. संततधार पावसामुळे अडाण नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले व पाहता पाहता संपुर्ण गाव पाण्याखाली गेले. त्यामुळे येथिल नागरीकांना गावालगत असलेल्या आश्रमशाळेत आश्रय घ्यावा लागला. शिरोली येथिल नागरीकानी पुरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पुरविले. तर विलास निलावार यांनी या नागरीकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या वेळकाढु धोरणामुळे शासकीय मदत मात्र वेळेवर पोहचली नसल्याची माहिती आहे.. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितीन राऊत, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी या भागांचा दौरा केला. उपविभागीय अधिकारी एस.ए.खांदे, तहसिलदार प्रकाश राऊत हे देखिल गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करीत आहेत. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानाचा शासकीय अंदाज व प्रत्यक्षात झालेले नुकसान यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप न होऊ देता वास्तविक नुकसानाचे सर्वेक्षण केल्या जावे अशी मागणी होत आहे.

Saturday, 21 July 2012

उपविभागीय कार्यालय घाटंजीतच करण्याची सर्वस्तरातून मागणी


नव्याने होऊ घातलेले उपविभागीय कार्यालय घाटंजीमध्येच व्हावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे. राजकीय पक्ष, सामाजीक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार, कर्मचारी अशा सर्वच स्तरातून या मागणीला मोठा पाठींबा मिळत असुन अनेकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयामार्फत संबंधीतांना पाठविले आहे. तसेच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ग्राहक पंचायत, विदर्भ जन आंदोलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, प्राऊटीस्ट ब्लॉक इंडीया, विद्यार्थी संघटना तसेच अनेक कार्यकत्र्यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
सध्या घाटंजी तालुका पांढरकवडा उपविभागीय कार्यालयाशी संलग्न आहे. तर नव्याने होणा-या उपविभागात घाटंजीला आर्णीशी जोडून आर्णीमध्येच महसुल उपविभागीय कार्यालय स्थापन होण्याची शक्यता आहे. घाटंजी तालुक्यातील नागरिकांसाठी आर्णी अत्यंत गैरसोयीचे ठरणार असुन प्रशासकीय दृष्टीने सक्षम असतांना घाटंजीला डावलल्या जात असल्याबद्दल तालुक्यात प्रचंड संताप आहे. यापुर्वीही नव्यानेच स्थापन झालेल्या विधानसभा मतदार संघाला आर्णी विधानसभा मतदार संघ असे नामकरण करून घाटंजी तालुक्यावर अन्याय करण्यात आला. घाटंजी तालुका १९८१ मध्ये स्थापन झालेला आहे. तर घाटंजीत १९४८ पासुन नगर परिषद अस्तित्वात आहे. घाटंजी तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये, जिल्ह्यात एकाच ठिकाणी असलेले केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, विवीध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले अग्रगण्य औद्योगीक केंद्र तसेच सामाजीक क्षेत्रात नावाजलेल्या स्वयंसेवी संस्था आहेत. घाटंजी शहर हे पांढरकवडा व आर्णी शहराच्या मध्यभागी असल्याने ईतर दोन्ही तालुक्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. 
त्यामुळे उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी तालुक्यातून होत असुन अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा अनेक संघटनांनी दिला आहे.


उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी घाटंजी बंद

प्रस्तावीत उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच व्हावे या मागणीसाठी घाटंजीतील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील व्यापा-यांची मोर्चा काढुन बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आर्णी पेक्षा जास्त सोयीस्कर असुन देखिल घाटंजीला डावलुन नव्याने होत असलेल्या महसुल उपविभागाचे कार्यालय आर्णी मध्ये स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे कार्यालय आर्णीला झाल्यास घाटंजी तालुक्यातील ग्रामिण जनतेला प्रचंड आर्थिक व मानसिक ताण सोसावा लागणार आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील काही पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, सामाजीक कार्यकर्ते तसेच विवीध संघटनांनी यापुर्वीच याबाबत निवेदने दिली आहेत.
आज घाटंजीतील व्यापारी व अनेक नागरीकानी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुक, शैक्षणीक प्रतिष्ठाने व जिवनावश्यक वस्तुंच्या व्यवसायांना या बंद मधुन वगळण्यात आले होते.
साभार :- देशोन्नती 


घाटंजी बाजार समितीच्या गोदामावर व्यापा-यांचा कब्जा

मनसेच्या धडकेत पितळ उघडे



शेतक-यांचे धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फक्त व्यापा-यांचीच धान्य पोती ठेवून असल्याचे सत्य मनसेने धान्य यार्डावर दिलेल्या धडकेत समोर आले.
काही शेतक-यांच्या तक्रारीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी कार्यकत्र्यांसह धान्य यार्डावर जाऊन पाहणी केली असता शेतमाल तारण योजनेचे धान्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामात नामदेव आडे व अविनाश भुरे या व्यापा-यांच्या मालकीचे सुमारे ७५० धान्याची पोती या गोदामात असल्याचे आढळले. तसेच इतरही गोदामात फक्त व्यापा-यांचाच माल ठेवून असल्याचे निदर्शनास आले. उल्लेखनिय म्हणजे नामदेव आडे हे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. ते स्वत:च बाजार समितीच्या गोदामावर कब्जा करीत असतील तर शेतक-यांनी आपले धान्य कुठे ठेवायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 
जे गोदाम शेतक-यांनी आणलेले धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणे अभिप्रेत आहे तिथे व्यापारीवर्ग जागा काबिज करून ठेवत असल्याने शेतक-यांची प्रचंड हेळसांड होते. बाजार समिती प्रशासनही व्यापारी व त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते यांच्या दबावाखाली राहुन व्यापा-यांना खुली सुट देत असल्याचे दिसुन येत आहे.
शेतक-यांच्या गोदामावर मालकी हक्क समजणारे बाजार समितीचे संचालक नामदेव आडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोणतेही भाडे न देता गोदाम वापरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रशांत धांदे यांनी यावेळी केली.
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांना विचारणा केली असता शेतक-यांचा माल सध्या उपलब्ध नसल्याने काही व्यापा-यांना दोन महिन्यांसाठी या गोदामात धान्य ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची बाब त्यांनी कबुल केली.
मात्र शेतक-यांची तक्रार असेल तर तिन चार दिवसात गोदाम रिकामे करून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगितले. घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले की, व्यापा-यांमध्ये स्पर्धा टिकवून ठेवण्याकरीता समितीला अनेकदा परिस्थितीनुरूप लवचिक धोरण अवलंबावे लागते. मात्र हे करतांना शेतकरी डावलल्या जातात हा आरोप साफ चुकीचा आहे. व्यापारी असतील तरच शेतक-यांचा माल योग्य दरात विकल्या जाईल. व्यापा-यांना झिडकारून चालणार नाही असे ते म्हणाले. शेतक-यांच्या मालाची आवक नसल्याने व व्यापा-यांनी विनंती केल्याने काही कालावधीसाठी गोदाम देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 13 July 2012

घाटंजी न.प.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा ‘तो’ ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविला अवैध

सार्वजनिक उपक्रमाची जागा प्रार्थनास्थळाला दिल्याचे प्रकरण
मुख्याधिका-यांच्या भुमिकेवरही ताशेरे

नगर परिषद निवडणुक डोळ्यापुढे ठेवुन ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाची जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला देण्याबाबतचा घाटंजी न.प.चा वादग्रस्त ठराव जिल्हाधिका-यांनी अवैध ठरवुन तहकुब केला.
येथिल दत्ता बापुराव दातारकर व ईतर तिघांनी नगर परिषदेच्या या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी जलाराम प्रभाग क्रं.१ मधील बापुराव खांडरे यांच्या ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाकरीता असलेली खुली जागा प्रार्थनास्थळाकरीता दिली होती. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अंतर्गत ८ डिसेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पटलावर नसतांना अध्यक्षांच्या परवानगीने हा ठराव मांडून पारित करण्यात आला. यानुसार वात्सल्य बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रार्थनास्थळासाठी ही जागा मंजुर करण्यात आली होती. मात्र परिसरातील मुलांना खेळण्यासाठी अथवा ईतर सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला दिल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या.
तसेच जिल्हाधिका-यांकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड कोडापे यांनी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रं.२ व न.प.मुख्याधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी व कार्यवाही स्थगीत ठेवण्याबाबत युक्तीवाद केला. न.प.ने ही जागा देतांना त्या परिसरातील भुखंडधारकांची संमती घेतली नव्हती. तसेच खुली जागा ज्या कारणासाठी दिली जावी त्यासाठी न देता विशिष्ट समाजाच्या धार्मिक कारणास्तव देण्यात आल्याने बांधकाम उपविधी व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिका-यांनी या आदेशास स्थगिती दिली. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदेने जिल्हाधिका-यांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात ले आऊटमधील जागेच्या १० टक्के जागा सार्वजनिक उपक्रमासाठी अनुज्ञेय असुन प्रार्थना स्थळाला देणे अपेक्षीत नाही असे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच हा ठराव पारित करतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे कबुल केले आहे.
मुख्याधिका-यांनी सदर आदेश पारित करतांना ठरावातील सर्व बाजु नियमातील तरतुदीस धरून पडताळून पाहिल्या नसल्याने हा आदेश अवैध ठरत असल्याचे जिल्हाधिका-यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे. शिवाय विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाकरीता सार्वजनिक उपक्रमाची जागा दिल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. 
घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी केवळ न.प.निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा ठराव घेतला होता. त्यावेळी देशोन्नतीने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर ठराव त्या काळात नगर परिषदेने घेतले असुन त्याची सविस्तर चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती