Pages

Tuesday, 9 August 2011

चंदन चोरट्यांपुढे वनविभागाने टाकली नांगी

घटनेची अद्याप तक्रार नाही


वनविभागाच्या नाकावर टिच्चुन गेल्या दोन महिन्यात वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदन चोरट्यांच्या टोळीने बहुमोल किमतीची चंदनाची झाडे तोडून नेली. या टोळीला जेरबंद करण्याऐवजी वनविभागाने त्यांच्या पुढे शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. 
दि. ५ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी चंदनाचे एक झाड तोडून नेले होते. तसेच कार्यालय उघडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र या घटनेची गेल्या दोन दिवसांपासुन साधी पोलीस तक्रार करण्याचे सोपस्कारही वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांनी केलेले नाहित. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे सांगीतले. याची शहानिशा करण्याकरीता पोलीस स्टेशनला चौकशी केली असता, आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत वनविभागाकडून लेखी अथवा तोंडी स्वरूपात कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलीसांनी सांगीतले. कार्यालय परिसरात झालेली चंदनचोरी क्षुल्लक स्वरूपाची असुन चंदनाचे ते झाड जलतनाच्याच कामाचे होते असा अजब निर्वाळा राठोड यांनी दिला.
दहा बारा चोरट्यांची सशस्त्र टोळी नियमितपणे कार्यालय परिसरात आपला डाव साधुन जाते व परिक्षेत्रातील वनसंरक्षणाची जबाबदारी असलेले अधिकारी असे बेजबाबदार वक्तव्य करतात हे निश्चितच संशयाला बळ देणारे आहे. या भागातील रहिवाश्यांच्या सांगण्यानुसार काही वर्षापुर्वी या परिसरात चंदनाची शेकडो झाडे होती. मात्र आज केवळ बोटावर मोजण्याईतकी झाडे शिल्लक राहिली आहेत. उल्लेखनिय म्हणजे कार्यालय परिसरात असलेल्या झाडांचे कोणतेही रेकॉर्ड वनविभागाजवळ नाही असे कार्यालयातुन सांगण्यात आले. अनेकदा चोरी होऊनही त्याची तक्रारच देण्यात आली नाही. एवढ्या वर्षापासुन एकही चंदन चोरटा वनविभाग अथवा पोलीसांच्या हाती लागु नये हा या विभागांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे. 
५ ऑगस्टच्या चोरीनंतरही हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी आटोकाट प्रयत्न केले. वरिष्ठांकडून याबाबत चौकशी होऊ नये यासाठी राठोड यांनी चांगलीच फिल्डींग लावली असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. या प्रकरणाबाबत कर्मचा-यांना  गप्प राहण्याचे सक्त आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. 
यवतमाळ व घाटंजीचा प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच रक्कम मोजल्याचीही माहिती आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिका-यांनी सुद्धा राठोड यांच्या प्रमाणे या घटनेला फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचे लक्षात येत आहे. मागील दोन प्रकरणात चौकशी होऊन सुद्धा कुणावरही अद्याप कार्यवाही झाली नाही. वनपरिक्षेत्र अधिका-याची या सर्व प्रकरणात संशयास्पद भुमिका असल्याचे लक्षात येते. ते घाटंजी येथे आल्यापासुन सुमारे दहा वेळा चोरीच्या घटना झाल्या आहेत. एकंदरीतच याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी झाल्यास नेमके गौडबंगाल पुढे येऊ शकते.

Saturday, 6 August 2011

घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालय चंदन चोरट्यांसाठी खुले


दर आठवड्याला होते चंदनचोरी
परिसरातील रहिवासी धास्तावले
















गेल्या दोन महिन्यात घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या अनेक घटना झाल्याने हे कार्यालय चोरट्यांसाठी खुले तर करण्यात आले नाही ना असा संशय निर्माण झाला आहे.
काल (दि.५) ला रात्री एक वाजताच्या सुमारास चंदन चोरट्यांचा टोळीने पुन्हा एकदा चंदनाचे एक झाड तोडुन नेले. तसेच त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दहा ते बाराच्या संख्येत असलेल्या चोरट्यांनी कर्मचा-याना शस्त्राचा धाक दाखवुन नेहमीप्रमाणे आपला डाव साधला. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसराला लागुन असलेल्या काकडे यांच्या घराजवळील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडुन नेले. येथिल वनविभागाच्या कर्मचा-यांनी रात्रीच ही सुचना वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांना दिली. मात्र त्यांनी पोलीस तक्रार देण्याऐवजी घटनेची कोणाकडेही वाच्यता करू नये अशी सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. त्यामुळे वारंवार होणा-या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय संशयाच्या भोव-यात सापडले आहे. 
यापुर्वी दि. २१ जुन व २६ जुनला कार्यालय परिसरातुन चोरट्यांनी चंदनाची झाडे लंपास केली. याचा गवगवा झाल्यामुळे नाईलाजास्तव पोलीसात तक्रार करण्यात आली. पोलीसानांrही औपचारीकता पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेऊन दिले. मात्र परिसरात निर्भिडपणे फिरणा-या टोळीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग व पोलीस यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वनखात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यामुळे मुख्य वनसंरक्षक देवेंद्रकुमार, उपवनसंरक्षक सुधाकर डोळे, यांनी घटनास्थळी भेट देऊन औपचारीक चौकशी केली. मात्र घटनेची तक्रार देण्यास टाळाटाळ करणारे वनपाल न.वि.वानखडे, मुख्यालयी अनुपस्थित असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप झाली नाही.त्यानंतर चोरट्यांनी चंदनाच्या तोडलेल्या झाडांची बुडे सुद्धा मुळासकट काढुन नेली. याचीही तक्रार करण्यात आली नाही. या परिसरात चंदन चोरांचा वावर आता नित्याचाच झाला आहे. दहा बारा चोरटे हत्यारासह येतात. रात्रपाळीवर असलेल्या कर्मचा-यांना शस्त्राचा धाक दाखवुन एका जागी बसवुन ठेवतात. तोवर त्यांचे काही साथीदार वनकर्मचा-यांसारखे शिटी वाजवीत परिसरात फिरत असतात. त्यामुळे कुणाला शंका सुद्धा येत नाही. त्या दरम्यान अन्य चोरटे झाड तोडून नेतात. काही वेळा चोरट्यांनी कर्मचा-यांना क्वार्टर मध्ये डांबुन चोरी केल्याचीही माहिती आहे. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे कर्मचा-यांनी याची वाच्यता कुणाकडे केली नसल्याचे बोलल्या जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांची नेमणुक झाल्यापासुन केवळ दोन महिन्यातच चंदनचोरीच्या सुमारे दहा घटना झाल्या आहेत मात्र तक्रार केवळ दोन वेळा करण्यात आल्याने राठोड यांचे चोरट्यांशी साटेलोटे तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे. ज्या अधिका-यावर संपुर्ण वनपरिक्षेत्रातील जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळील चंदनाचे झाड चोरीस जावे यापेक्षा लाजीरवाणे दुसरे काय असेल?
 वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांचेकडे यवतमाळ वनपरिक्षेत्राचाही प्रभार त्यांनी ठेऊन घेतला आहे. गेल्या तिन महिन्यांपासुन ते घाटंजी कार्यालयात आठवड्यातुन एक दोनदा येतात. यवतमाळ वनपरिक्षेत्रात असलेला मलिदा डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी स्वत:कडे ठेऊन घेतल्याची चर्चा खासगीत होत आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या नित्य घटनांनी या भागात राहणारे नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. शिवाय वनकर्मचा-यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असुन रात्रपाळीवर सेवा देण्यास कर्मचारी नकार देत आहेत. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र ठराविक कर्मचा-यानांच रात्रपाळीला जुंपत आहेत. वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत एकाही कर्मचा-याला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालुन पहारा देण्याशिवाय त्यांचेकडे पर्याय उरलेला नाही. एकंदरीतच वनविभागाच्या अस्तित्वालाच आव्हान देणा-या या घटनांमुळे हा विभागच संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

Thursday, 4 August 2011

पाणी पुरवठा योजनांच्या अमंलबजावणीसाठी आता कठोर निकष


गैरप्रकार करणा-यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश


ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अजुनही कायम आहे. शासनाकडून त्यासाठी विवीध योजना राबविल्या जातात. मात्र योग्य अमंलबजावणी ऐवजी त्याचा अपेक्षीत लाभ नागरीकांना होत नाही. त्यामुळे आगामी काळात पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी
कठोर निकष ठरविण्यात आले असुन त्या संबंधीचा आदेश शासनाने नुकताच निर्गमीत केला आहे. पाणी पुरवठ्याची कामे ग्रामीण भागात जनतेच्या सहकार्या शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करण्यावर आता भर देण्यात येणार आहे. योजना राबवितांना गाव ६० टक्के हागणदारीमुक्त असणे आवश्यक असते. अनेक टंचाईग्रस्त गावे हागणदारीमुक्त नसल्याने त्यांना या योजनांचा लाभ होत नाही. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी अशी गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा संपुर्ण स्वच्छता अभियान कक्षाला याबाबत सुचित करून त्यासाठी प्रथम प्राधान्याने प्रयत्न करावेत असे निर्देशीत करण्यात आले आहे.
पाणी पुरवठ्याच्या कोणत्याही योजनेमध्ये अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पोलीसात तक्रार करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रस्तावाची तांत्रीकदृष्ट्या काटेकोर तपासणी करण्यासोबतच गावात यापुर्वी राबविल्या गेलेल्या योजनांच्या मालमत्तेचा पुरेपूर वापर करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करण्याचेही आदेशात नमुद आहे.
या योजनांची बांधकामे गुणवत्तेनुसारच होईल याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
आजवर राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे उद्देशपुर्ती झालेली नाही. काही महिन्यांपासुन गाजत असलेल्या घाटंजी तालुक्यातील वासरी ग्रामपंचायती अंतर्गत भारत निर्माण योजनेमध्ये झालेल्या १२ लाखांच्या अपहारामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद व पोलीस यंत्रणेने घोटाळेबाजांनाच पाठीशी घातले. राजकारण्यांचाही त्यांना सक्रीय पाठींबा होता. या प्रकरणात तर गुन्हा दाखल होण्यास तब्बल चार महिण्यांचा कालावधी लागला. तर आरोपी दिड महिना फरार होते. त्यामुळे शासनाच्या या आदेशाची अमंलबजावणी कितपत होणार हे येणारा काळच ठरवेल.

Tuesday, 2 August 2011

नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार ?

घाटंजीकरांची संतप्त भावना
न.प.वर नियंत्रण कुणाचे?

जीवघेणे रस्ते, कच-याने तुंबलेल्या नाल्या, महत्वाच्या रस्त्यांवर नसलेली पथदिव्यांची व्यवस्था अशा स्थितीत गेल्या काही वर्षापासुन दिवस काढणा-या घाटंजीकरांमध्ये आता असंतोष खदखदत आहे. 
मोठ्या अपेक्षेने सत्तापालट करून नव्या चेह-याना संधी देणा-या घाटंजीवासीयांचा भ्रमनिरासच झाला आहे. विकास तर सोडाच पण नागरिकांच्या मुलभूत गरजांची पुर्तताही या काळात नगर परिषदेला करता आली नाही. स्वयंस्पुâर्तीने न.प. ने काम केलेले नाहीच परंतु नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घ्यायलाही पदाधीकारी व प्रशासन यांना वेळ नाही. सध्या पावसाळी दिवसांमध्ये शहरातील अनेक भागात कच्च्या रस्त्यांवर चालणेही दुरापास्त झाले आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसंत नगर, गुरूदेव वार्ड, नेहरु नगर, ईस्तारी नगर, जेसिस कॉलनी, अंबा नगरी, बाबासाहेब देशमुख कॉलनी यासह अनेक भागातील अंतर्गत रस्ते चिखल व खड्ड्यांनी व्यापले आहेत. त्यावरून वाहने चालविणे तर दुरच पण चालणेही कठीण झाले आहे. या भागात नाल्या नसल्याने सांडपाणी पावसाच्या पाण्यासोबत घरात शिरते. वसंत नगराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर पथदिवे नाहित त्यामुळे रात्री शिकवणी वर्गाला जाणा-या विद्यार्थ्यांना  जीव मुठीत घेऊनच येथुन जावे लागते.

 यामुळे संतप्त झालेल्या वसंत नगरातील महिलांनी प्रभारी मुख्याधीकारी व तहसिलदार संतोष शिंदे तसेच न.प. अध्यक्ष वच्छला धुर्वे यांना भेटुन समस्यांचा पाढा वाचला होता. समस्यांचे निराकरण तातडीने न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा ईशारा तारा टाले, मिनाक्षी जकाते, श्रीमती खिरटकर, लता नखाते, मिना घुगरे, लिला विरदंडे, ललिता लिंगरवार, मंगला खरतडे, सुनिता पडलवार, अंजली तांबारे, सुलोचना नामपेल्लीवार, मयुरी डफळे, श्रीमती लाकडे, उज्वला मुनेश्वर, श्रीमती चोपडे, मंजुळा पेंदाम, श्रीमती दातारकर, सुशिला मनवर, श्रीमती भेंडे, ललिता खरतडे, श्रीमती चिलकावार, सुवर्णा कोल्हे, पुष्पा वराटकर, श्रीमती राठोड, दिपाली गवार्ले, संध्या आस्वले, श्रीमती भुरे, सुमन मंगाम, श्रीमती संगनवार, वंदना गंधारे, श्रीमती पुसनाके, मंदा बिसन, अनिता गायकवाड, श्रीमती धोबे, श्रीमती पाटील यांनी दिला होता. सात दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर काही ठीकाणी मुरूम टाकण्यात आला. मात्र रस्त्यावरील मुरूम पसरवायचा असतो हा निकष कदाचीत घाटंजी न.प.ला लागु नसल्याने मुरूमाचे ढिग तसेच रस्त्याशी एकरूप झाले आहेत.
गुरूदेव वार्ड व बाबासाहेब देशमुख कॉलनीत हिच परिस्थिती आहे. नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अधिकच धोकादायक झाले आहेत. वसंत नगरात किशोर धोबे यांच्या धराजवळ दगडासारख्या मुरूमाचे ढिग टाकल्याने चालणे दुरापास्त झाले आहे. गुरूदेव नगरातील रहिवाशांनी या भागातील नगरसेवक व न.प. उपाध्यक्ष सुरेश कुडेगावे यांचेकडे रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कैफियत  मांडली असता माझ्या हातात काहीच नाही मी काय करू शकतो? असे बेजबाबदारपणे बोलुन जबाबदारी झटकल्याची माहिती आहे. तर मुख्याधिकारी शिंदेनी कर्मचा-यांना सुचना देऊनही त्यांना कुणीच महत्व दिले नाही. त्यामुळे नगर परिषदेवर आता नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निर्ढावलेले नगरसेवक, वचक नसलेले प्रशासन आणी यावर वरिष्ठ यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे नागरीकांचे मात्र हाल होत आहे. नगर परिषद आमचा आणखी किती अंत पाहणार असा संतप्त सवाल घाटंजीकर करीत आहेत.

Monday, 1 August 2011

लायनेस क्लबतर्फे घाटंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दहावी व बारावीत घाटंजी शहरातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना लायनेस क्लबतर्फे गणवेश वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी साधना ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता बेलोरकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळून भावी आयुष्यात प्रगती व्हावी या उद्देशाने पुष्पगुच्छ, रोख बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच नगरपरिषद शाळा क्र.५ मधील विद्यार्थ्यांना साधना ठाकरे, माधुरी चौधरी, संगीता भुरे, माया कटकमवार, वैशाली वाघ यांच्यातर्फे गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह ताई मिर्शा, वैष्णवी मिर्शा, रूपेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा गुणगौरव व साहित्य वितरण कार्यक्रमाचे संचालन पूजा उत्तरवार यांनी तर आभार सीमा ठाकरे यांनी मानले.