Pages

Showing posts with label चंदन. Show all posts
Showing posts with label चंदन. Show all posts

Tuesday, 9 August 2011

प्रकरण दडपण्यासाठी आर.एफ.ओ. राठोडचा आटापीटा

वरिष्ठही मुग गिळुन गप्प
कर्मचारी दुहेरी तणावाखाली
शस्त्राच्या धाकावर वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे प्रकरण दडपण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना ब-याच अंशी यश आले असुन घटनेला पाच दिवस होऊनही वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय या संशयाला पुष्टी मिळाली आहे. घटनेची पोलीस स्टेशनला अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही तरी काल (दि.८) ला रात्री ७.३० दरम्यान आर.एफ.ओ. राठोड आपल्या सहका-यांसमवेत पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांची भेट घेऊन त्यांचेशी खास ‘चर्चा' केल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाच्या वतीने तक्रार देण्यात आलेली नाही.
आपल्याकडे दोन ठिकाणचा प्रभार असल्याचे गोंडस कारण देऊन राठोड आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यवतमाळचा अतिरिक्त प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यांची नियुक्ती घाटंजी येथे झालेली असली तरी काम मात्र ते यवतमाळ येथुनच पाहतात. गेल्या तिन महिन्यात ते एखाद दुसरा अपवाद वगळता मुख्यालयी असल्याचे निदर्शनास आले नाही. या दरम्यान तिन वेळा कार्यालय परिसरात चंदन चोरी झाली. गवगवा न झालेल्या चो-यांचा तर हिशोबच नाही. या प्रकरणांमध्ये वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही तितकेच दोषी आहेत. चौकशी करूनही त्यातुन काहीच निष्पन्न न झाल्यामुळे चोरट्यांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कायमस्वरूपी कुरणच झाले आहे. या प्रकारामुळे कनिष्ठ कर्मचारी मात्र दुहेरी तणावाखाली वावरत आहेत. कर्तव्य बजावतांना चोरट्यांची भिती व अशी घटना घडल्यावर वरिष्ठांचा दबाव या संकटात कर्मचारी सापडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्यावरील सर्व जबाबदारी कनिष्ठ कर्मचा-यांवर लोटून नामनिराळे होतात. वनविभागाच्या या धोरणामुळे शस्त्रसज्ज चोरट्यांकडून गस्त घालणा-या कर्मचा-यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरासह घाटंजी तालुक्यातील वनसंपदा चोरट्यांसाठीच खुली असल्याचे सिद्ध झाले आहे.

चंदन चोरट्यांपुढे वनविभागाने टाकली नांगी

घटनेची अद्याप तक्रार नाही


वनविभागाच्या नाकावर टिच्चुन गेल्या दोन महिन्यात वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदन चोरट्यांच्या टोळीने बहुमोल किमतीची चंदनाची झाडे तोडून नेली. या टोळीला जेरबंद करण्याऐवजी वनविभागाने त्यांच्या पुढे शरणागती पत्करल्याचे चित्र आहे. 
दि. ५ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी चंदनाचे एक झाड तोडून नेले होते. तसेच कार्यालय उघडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र या घटनेची गेल्या दोन दिवसांपासुन साधी पोलीस तक्रार करण्याचे सोपस्कारही वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांनी केलेले नाहित. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे सांगीतले. याची शहानिशा करण्याकरीता पोलीस स्टेशनला चौकशी केली असता, आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत वनविभागाकडून लेखी अथवा तोंडी स्वरूपात कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलीसांनी सांगीतले. कार्यालय परिसरात झालेली चंदनचोरी क्षुल्लक स्वरूपाची असुन चंदनाचे ते झाड जलतनाच्याच कामाचे होते असा अजब निर्वाळा राठोड यांनी दिला.
दहा बारा चोरट्यांची सशस्त्र टोळी नियमितपणे कार्यालय परिसरात आपला डाव साधुन जाते व परिक्षेत्रातील वनसंरक्षणाची जबाबदारी असलेले अधिकारी असे बेजबाबदार वक्तव्य करतात हे निश्चितच संशयाला बळ देणारे आहे. या भागातील रहिवाश्यांच्या सांगण्यानुसार काही वर्षापुर्वी या परिसरात चंदनाची शेकडो झाडे होती. मात्र आज केवळ बोटावर मोजण्याईतकी झाडे शिल्लक राहिली आहेत. उल्लेखनिय म्हणजे कार्यालय परिसरात असलेल्या झाडांचे कोणतेही रेकॉर्ड वनविभागाजवळ नाही असे कार्यालयातुन सांगण्यात आले. अनेकदा चोरी होऊनही त्याची तक्रारच देण्यात आली नाही. एवढ्या वर्षापासुन एकही चंदन चोरटा वनविभाग अथवा पोलीसांच्या हाती लागु नये हा या विभागांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे. 
५ ऑगस्टच्या चोरीनंतरही हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी आटोकाट प्रयत्न केले. वरिष्ठांकडून याबाबत चौकशी होऊ नये यासाठी राठोड यांनी चांगलीच फिल्डींग लावली असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. या प्रकरणाबाबत कर्मचा-यांना  गप्प राहण्याचे सक्त आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. 
यवतमाळ व घाटंजीचा प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच रक्कम मोजल्याचीही माहिती आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिका-यांनी सुद्धा राठोड यांच्या प्रमाणे या घटनेला फारसे गांभिर्याने घेतले नसल्याचे लक्षात येत आहे. मागील दोन प्रकरणात चौकशी होऊन सुद्धा कुणावरही अद्याप कार्यवाही झाली नाही. वनपरिक्षेत्र अधिका-याची या सर्व प्रकरणात संशयास्पद भुमिका असल्याचे लक्षात येते. ते घाटंजी येथे आल्यापासुन सुमारे दहा वेळा चोरीच्या घटना झाल्या आहेत. एकंदरीतच याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी झाल्यास नेमके गौडबंगाल पुढे येऊ शकते.

Saturday, 6 August 2011

घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालय चंदन चोरट्यांसाठी खुले


दर आठवड्याला होते चंदनचोरी
परिसरातील रहिवासी धास्तावले
















गेल्या दोन महिन्यात घाटंजी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या अनेक घटना झाल्याने हे कार्यालय चोरट्यांसाठी खुले तर करण्यात आले नाही ना असा संशय निर्माण झाला आहे.
काल (दि.५) ला रात्री एक वाजताच्या सुमारास चंदन चोरट्यांचा टोळीने पुन्हा एकदा चंदनाचे एक झाड तोडुन नेले. तसेच त्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दहा ते बाराच्या संख्येत असलेल्या चोरट्यांनी कर्मचा-याना शस्त्राचा धाक दाखवुन नेहमीप्रमाणे आपला डाव साधला. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसराला लागुन असलेल्या काकडे यांच्या घराजवळील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडुन नेले. येथिल वनविभागाच्या कर्मचा-यांनी रात्रीच ही सुचना वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांना दिली. मात्र त्यांनी पोलीस तक्रार देण्याऐवजी घटनेची कोणाकडेही वाच्यता करू नये अशी सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे. त्यामुळे वारंवार होणा-या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय संशयाच्या भोव-यात सापडले आहे. 
यापुर्वी दि. २१ जुन व २६ जुनला कार्यालय परिसरातुन चोरट्यांनी चंदनाची झाडे लंपास केली. याचा गवगवा झाल्यामुळे नाईलाजास्तव पोलीसात तक्रार करण्यात आली. पोलीसानांrही औपचारीकता पुर्ण करून प्रकरण थंडबस्त्यात ठेऊन दिले. मात्र परिसरात निर्भिडपणे फिरणा-या टोळीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग व पोलीस यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. वनखात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यामुळे मुख्य वनसंरक्षक देवेंद्रकुमार, उपवनसंरक्षक सुधाकर डोळे, यांनी घटनास्थळी भेट देऊन औपचारीक चौकशी केली. मात्र घटनेची तक्रार देण्यास टाळाटाळ करणारे वनपाल न.वि.वानखडे, मुख्यालयी अनुपस्थित असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप झाली नाही.त्यानंतर चोरट्यांनी चंदनाच्या तोडलेल्या झाडांची बुडे सुद्धा मुळासकट काढुन नेली. याचीही तक्रार करण्यात आली नाही. या परिसरात चंदन चोरांचा वावर आता नित्याचाच झाला आहे. दहा बारा चोरटे हत्यारासह येतात. रात्रपाळीवर असलेल्या कर्मचा-यांना शस्त्राचा धाक दाखवुन एका जागी बसवुन ठेवतात. तोवर त्यांचे काही साथीदार वनकर्मचा-यांसारखे शिटी वाजवीत परिसरात फिरत असतात. त्यामुळे कुणाला शंका सुद्धा येत नाही. त्या दरम्यान अन्य चोरटे झाड तोडून नेतात. काही वेळा चोरट्यांनी कर्मचा-यांना क्वार्टर मध्ये डांबुन चोरी केल्याचीही माहिती आहे. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे कर्मचा-यांनी याची वाच्यता कुणाकडे केली नसल्याचे बोलल्या जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांची नेमणुक झाल्यापासुन केवळ दोन महिन्यातच चंदनचोरीच्या सुमारे दहा घटना झाल्या आहेत मात्र तक्रार केवळ दोन वेळा करण्यात आल्याने राठोड यांचे चोरट्यांशी साटेलोटे तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे. ज्या अधिका-यावर संपुर्ण वनपरिक्षेत्रातील जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळील चंदनाचे झाड चोरीस जावे यापेक्षा लाजीरवाणे दुसरे काय असेल?
 वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड यांचेकडे यवतमाळ वनपरिक्षेत्राचाही प्रभार त्यांनी ठेऊन घेतला आहे. गेल्या तिन महिन्यांपासुन ते घाटंजी कार्यालयात आठवड्यातुन एक दोनदा येतात. यवतमाळ वनपरिक्षेत्रात असलेला मलिदा डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी स्वत:कडे ठेऊन घेतल्याची चर्चा खासगीत होत आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात चंदनचोरीच्या नित्य घटनांनी या भागात राहणारे नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. शिवाय वनकर्मचा-यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असुन रात्रपाळीवर सेवा देण्यास कर्मचारी नकार देत आहेत. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र ठराविक कर्मचा-यानांच रात्रपाळीला जुंपत आहेत. वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत एकाही कर्मचा-याला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालुन पहारा देण्याशिवाय त्यांचेकडे पर्याय उरलेला नाही. एकंदरीतच वनविभागाच्या अस्तित्वालाच आव्हान देणा-या या घटनांमुळे हा विभागच संशयाच्या भोव-यात सापडला आहे.