Pages

Showing posts with label मृत्यू. Show all posts
Showing posts with label मृत्यू. Show all posts

Thursday, 7 February 2013

घाटंजीतील पाच युवकांचा अपघातात करूण अंत

अंत्यसंस्काराला अवघी घाटंजी लोटली
पंधरवाड्यातील दुस-या दुर्दैवी घटनेने तालुका शोकमग्न





आमदार निलेश पारवेकर यांच्या अकाली निधनाच्या दु:खातून घाटंजी तालुका सावरलाही नसताना पाच जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूची बातमी पहाटेच धडकली अन संपुर्ण शहरात स्मशान शांतता पसरली. सारेच काही सुन्न झाले. राहुल अशोक फ़ुसे (२२), अमोल प्रल्हाद गोडे (२३), सुमित सुरेश कांबळे (२४), अजय गणपत कुमरे (२७), आकाश उर्फ़ गोल्डी विजय गिरी (२२) या पाच मित्रांचा देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील शिरपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात करूण अंत झाला. सुमारे १५ दिवसांपुर्वी राहुल फ़ुसे याने घेतलेल्या इंडीगो कार क्रं.एम.एच.२९-२१७३ या गाडीने हे सर्व मित्र काल सायंकाळी नागपुर येथे गेले होते. त्यानंतर परत येतांना रात्री २.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.एम.एच.२६ एच.६१७२ या सोयाबिन नेणा-या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव शहरात आणण्यात आले. वसंत नगर, राममंदीर वार्ड, मानोली रोड या परिसरात राहणा-या या पाचही युवकांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील अमोल प्रल्हाद गोडे हा वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. तो येथिल पेट्रोलपंपावर काम करतो. सुमित सुरेश कांबळे हा देखिल वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व बहिण आहे. अजय कुमरे हा मानोली रोड भागात राहतो. हा सुद्धा पेट्रोल पंपावर काम करतो. राहुल फ़ुसे हा राममंदिर वार्डात राहत होता. तो हि कार भाड्याने देत होता. 
आकाश गिरी हा राम मंदिर वार्डातील रहिवासी आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. हे पाचही अत्यंत जिवलग मित्र होते. मोक्षधामात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भयाण शांततेत मृतकांच्या नातलगांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता. घाटंजी तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच स्मशानभुमीने एवढी गर्दी अनुभवली. संपुर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली होती. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचेसह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरीक यावेळी उपस्थित होते. अनेकांनी घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या कडेवरून हा दु:खद प्रसंग अनुभवला. 
साभार :- देशोन्नती 

Monday, 24 December 2012

मानोली येथिल मृतक बालकांच्या परिवाराचे जि.प.अध्यक्षांकडून सांत्वन



मानोली येथिल तिन शालेय विद्यार्थ्यांचा १६ डिसेंबर रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रविण देशमुख यांनी मोहुर्ले व निकोडे परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आपल्या परिने शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांचेसमवेत शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, उपशिक्षणाधिकारी वा.ल. मोतीकर, बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळणारी अपघात विम्याची रक्कम शक्य तितक्या लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले
साभार :- देशोन्नती 

Friday, 21 December 2012

घाटंजी पं.स.कर्मचारी रविंद्र उगले यांचे अपघाती निधन


अज्ञात मेटॅडोअरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविंद्र दिलीप उगले (२६) रा.मुरली याचा मृत्यू झाला. काल (दि.१९) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. तो घाटंजी पंचायत समिती मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक पदावर कार्यरत होता. यवतमाळ येथुन परत येत असताना कोळंबी जवळ हा अपघात झाला. 
अपघातात गंभिर जखमी झाल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज मुरली येथे शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, पं.स.सभापती शैलेष इंगोले यांचेसह पंचायत समितीचे कर्मचारी, जिल्ह्यातील फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. वडील हयात नसल्याने रविंद्र हाच घरातील कर्ता होता. मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र ओळखल्या जाणा-या एका तरूण कर्मचा-याच्या अकाली मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती

Sunday, 16 December 2012

दोन भावंडांसह तिन बालकांचा विहिरीत पडून करूण अंत

मानोली येथिल हुदयद्रावक घटना  
घाटंजी तालुक्यात शोककळा


शेतात खेळायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांपैकी तिघांचा विहिरीत पडून करूण अंत झाला. घाटंजी पासुन सुमारे ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या मानोली येथे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.
तुषार रामदास मोहुर्ले (६) वर्ग १ ला, समय रामदास मोहुर्ले (९), शुभम ज्ञानेश्वर निकोडे (९) वर्ग ३ रा.यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या तुषार लक्ष्मण पेटकुले (९) याने गावात येऊन घटनेची माहिती सांगितली. यामधील तुषार व समय मोहुर्ले हे दोघे सख्खे भाऊ होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुपारच्या सुमारास हे चार सवंगडी जंगलात फिरायला गेले होते. बोरे तोडून आणल्यावर गावापासुन १ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुंडलिक पेटकुले यांच्या शेतातील विहिरीजवळ ते खेळायला लागले. पक्के बांधकाम करून नसल्याने विहिरीच्या एका बाजुने आतमध्ये उतरण्यासाठी असलेल्या जागेतून ते विहिरीमध्ये उतरले. विहिरीमध्ये विसर्जीत करण्यात आलेल्या दुर्गा देविचा पाट वर तरंगत होता. गंमत म्हणुन ते एक एक करून त्यावर बसले. जास्त भार झाल्याने लाकडी पाट उलटला. बाहेर निघता न आल्याने विहिरीमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तुषार पेटकुले याने गावात येऊन सर्वाना याबाबत माहिती दिली. लगेच गावक-यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोवर खुप उशिर झाला होता. घटनास्थळावर ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. गावातील तिन बालकांवर काळाने क्रूर झडप घातल्याने मुरली गावासह संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, सदस्य रूपेश कल्यमवार यांनी तातडीने गावात येऊन कुटूंबीयांची विचारपुस केली. तिनही बालकांना घाटंजी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

निस्तब्ध गाव अन पाणावलेले डोळे...
गावात खेळणारी बागडणारी तिन बालके दगावल्याची बातमी गावात कळताच सर्वत्र भयाण शांतता पसरली. चेहरे अबोल झाले अन अनेकांचे डोळे पाणावले. गावात कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. अनेकांनी शेताकडे धाव घेतली तर आबालवृद्ध रस्त्याकडे डोळे लावुन बसले होते. बालकांचे मृतदेह असलेले वाहन गावात येताच सर्वांच्याच भावनांचा बांध पुâटला अन अनेकांचे डोळे आपसुकच पाणावले. या बालकांच्या मातापित्यांच्या आक्रोशाने तर सर्व वातावरणच गहिवरून गेले. काय करावे व काय बोलावे हे कुणालाच कळत नव्हते. मोहुर्ले कुटूंबावर तर आभाळच कोसळले. तुषार व समय या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने त्यांचे सर्वस्वच गेले. तिन वर्षांपुर्वी घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथेही अशीच हुदयद्रावक घटना घडली होती. विहिरीत पडून तिन शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला होता.
साभार :- देशोन्नती 

Monday, 18 June 2012

अवैध वाहतुकीने घेतला नवयुवकाचा बळी

पारवा पोलीसांच्या नाकर्तेपणाचा परिणाम

पारवा पोलीस स्टेशन हद्दीसह संपुर्ण घाटंजी तालुक्यात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे 
१५ वर्षीय नवयुवकाचा बळी घेतला. आयता येथुन घाटंजीकडे येताना अज्ञात काळी पिवळीने दुचाकीला धडक दिल्याने अभिजीत अशोक खडसे (१५) याचा उपचाराकरीता यवतमाळला नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवक आपल्या मित्राच्या दुचाकीवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घाटंजीकडे येत होता. यादरम्यान पाटापांगरा गावाजवळ काळी पिवळीने दुचाकीला धडक दिली. या भिषण धडकेत जखमी झालेल्या दोन्ही युवकांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले. मात्र अभिजीत याचा रूग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे अपघाताला ६ तास लोटुनही पारवा पोलीसांकडे घटनेची नोंद झाली नव्हती. यावरूनच पोलीस याबाबत किती गंभिर आहेत याची प्रचिती येते. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी अवैध वाहतुकीला खुली सुट दिल्याने प्रवाशी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी नेण्यात येतात. गाडीच्या टपावर व अवतीभवती बिलगुन असलेले प्रवाशी वाहने घाटंजी तालुक्याच्या प्रत्येक रस्त्यावर आढळतात. पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक त्यांचेवर असल्याचे दिसत नाही. घाटंजी व पारव्याच्या बसस्थानकासमोर नेहमीच अवैध वाहतुकदारांचा गराडा असतो. अनेकदा वाहतुक पोलीसांच्या नजरेसमोर बसस्थानक परिसरातून प्रवाशी घेतल्या जातात. मात्र त्याकडे पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहीती आहे. ठाणेदारांकडून जसा आदेश मिळतो त्याचेच पालन करावे लागत असल्याचे एका वाहतुक पोलीसाने खासगीत सांगीतले. अवैध वाहतुकदारांकडून पोलीसांना महिन्याकाठी मिळणा-या मलिद्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला मोकळीक दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असुन यावर वेळीच नियंत्रण न आणल्या गेल्यास यापेक्षाही गंभिर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अवैध वाहतुकीला चालना देणा-या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
साभार :- देशोन्नती