Pages

Showing posts with label स्मशानभुमी. Show all posts
Showing posts with label स्मशानभुमी. Show all posts

Thursday, 7 February 2013

घाटंजीतील पाच युवकांचा अपघातात करूण अंत

अंत्यसंस्काराला अवघी घाटंजी लोटली
पंधरवाड्यातील दुस-या दुर्दैवी घटनेने तालुका शोकमग्न





आमदार निलेश पारवेकर यांच्या अकाली निधनाच्या दु:खातून घाटंजी तालुका सावरलाही नसताना पाच जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूची बातमी पहाटेच धडकली अन संपुर्ण शहरात स्मशान शांतता पसरली. सारेच काही सुन्न झाले. राहुल अशोक फ़ुसे (२२), अमोल प्रल्हाद गोडे (२३), सुमित सुरेश कांबळे (२४), अजय गणपत कुमरे (२७), आकाश उर्फ़ गोल्डी विजय गिरी (२२) या पाच मित्रांचा देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील शिरपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात करूण अंत झाला. सुमारे १५ दिवसांपुर्वी राहुल फ़ुसे याने घेतलेल्या इंडीगो कार क्रं.एम.एच.२९-२१७३ या गाडीने हे सर्व मित्र काल सायंकाळी नागपुर येथे गेले होते. त्यानंतर परत येतांना रात्री २.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.एम.एच.२६ एच.६१७२ या सोयाबिन नेणा-या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव शहरात आणण्यात आले. वसंत नगर, राममंदीर वार्ड, मानोली रोड या परिसरात राहणा-या या पाचही युवकांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील अमोल प्रल्हाद गोडे हा वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. तो येथिल पेट्रोलपंपावर काम करतो. सुमित सुरेश कांबळे हा देखिल वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व बहिण आहे. अजय कुमरे हा मानोली रोड भागात राहतो. हा सुद्धा पेट्रोल पंपावर काम करतो. राहुल फ़ुसे हा राममंदिर वार्डात राहत होता. तो हि कार भाड्याने देत होता. 
आकाश गिरी हा राम मंदिर वार्डातील रहिवासी आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. हे पाचही अत्यंत जिवलग मित्र होते. मोक्षधामात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भयाण शांततेत मृतकांच्या नातलगांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता. घाटंजी तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच स्मशानभुमीने एवढी गर्दी अनुभवली. संपुर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली होती. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचेसह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरीक यावेळी उपस्थित होते. अनेकांनी घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या कडेवरून हा दु:खद प्रसंग अनुभवला. 
साभार :- देशोन्नती 

Thursday, 17 May 2012

कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमी देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

तालुक्यातील कुर्ली येथे ब-याच कालावधीपासुन हिंदु स्मशानभुमीची गरज असताना प्रशासनाकडून त्यासाठी टाळाटाळ होत आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावासह या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावातून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना.नितीन राऊत, सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचेसह संबंधीतांकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र एक वर्षाचा कालावधी होऊनही स्मशानभुमीबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा सोलंकी यांचा आरोप आहे. मौजा कुर्ली येथे हिंदु समाजाकरीता अनेक वर्षांपासुन स्मशानभुमी नसल्याने ग्रामपंचायतीने रितसर ठराव घेतला. मात्र, कुर्ली येथे पुर्वीपासुनच हिंदु स्मशानभुमी असल्याचे महसुल विभागाच्या फेरफार, हक्क नोंदणीनुसार निष्पन्न झाले आहे. कुर्ली येथे गट क्र. ४/१ मध्ये माजी जि.प.सदस्य जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या शेतजमीनीमध्ये ०.४० आर जागेवर हिंदुंची स्मशानभुमी असतांना तसेच तत्कालीन नायब तहसिलदार पंधरे यांना हिंदु स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश देण्याचा अधिकार नसतांना त्यांनी ७/१२ उता-यावरील इतर अधिकारात नमुद असलेल्या ०.४० आर हिंदु स्मशानभुमीची जागा प्रकरणात प्रस्तुत ३/कली/क्रमांक/कावि/९५१/२००४, दि.१९/०६/२००४ रोजी आदेश काढुन गट क्र.४/१ जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांच्या ७/१२ उता-यातील इतर अधिकार मधील नोंदी काढुन आदेश पारित केला आहे. जो नियमबाह्य आहे. स्मशानभुमीच्या प्रकरणात कोणताही आदेश रद्द अथवा पारित करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिका-यांनाच आहे. त्यामुळे या प्रकरणात नायब तहसिलदार पंधरे यांच्यासह संबधीत तलाठीही दोषी असल्याने त्यांच्याविरूद्धही कार्यवाही करावी अशी सोलंकी यांची मागणी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंधरे यांनी काढलेला तो बेकायदेशीर आदेश तहसिल कार्यालयात उपलब्ध नसल्याचे जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार पारवा यांनी माहितीच्या अधिकारान्वये मागीतलेल्या माहितीमध्ये कळविले आहे. एकंदरीतच स्मशानभुमीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट असुन प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. कुर्ली येथे हिंदु स्मशानभुमीची अत्यंत आवश्यकता असतांना शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोलंकी यांनी सांगीतले.
साभार :- देशोन्नती