Pages

Showing posts with label मुख्यमंत्री. Show all posts
Showing posts with label मुख्यमंत्री. Show all posts

Monday, 10 September 2012

सा.बां.विभागाच्या सदोष सर्वेक्षणामुळे पुरग्रस्त मदतीपासुन वंचीत



जुलै महिन्यात आलेल्या पुरानंतर पडझड झालेल्या घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदोष सर्वेक्षण केल्याने सुमारे ४१ कुटूंबे मदतीपासुन वंचीत राहणार असल्याची तक्रार कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी केली आहे. महापुरामुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी अंगावरच्या कपड्यावरच बाहेर पडून जीव वाचवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्ह्यातील आमदार मंत्री, खासदार,  आमदार तात्काळ येऊन पाहणी करून गेले. शासनाची मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तलाठी चंदु भोयर यांनी पंचनामे केले. घरांच्या पडझडीचे मुल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र सदोष पद्धतीने मुल्यांकन करण्यात आल्याने सुमारे ४१ कुटूंब पडझड नुकसानापासुन वंचीत राहिले. ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापुर्वी तहसिलदारांना देण्यात आली होती. नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळेल असे महसुल विभागामार्पâत सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत मदत मिळालेली नाही. कोळी (बु.) या गावात आपत्तीमुळे झालेली हानी मोठ्या प्रमाणात आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर कुणीही अधिकारी भेट देण्यास आला नाही. एकंदरीतच शासन प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे पुरग्रस्त वा-यावर आहेत. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन कोळी (बु.) येथिल ग्रामस्थांनी उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना दिले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पुरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडणार असल्याचे खरतडे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती  

Sunday, 12 August 2012

पुरग्रस्तांचे जीवन उभारणारा कार्यक्रम राबवणार

मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक शब्द



















 




अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये ज्यांचे सर्वस्व वाहुन गेले त्यांचे जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम राबविणार या आश्वासक शब्दांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांनी घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सांत्वन केले. पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौ-यामध्ये कोळी (बु.) येथे पुरग्रस्तांना संबोधीत करतांना ते बोलत होते. पुररेषेखाली येणा-या धोकादायक गावांचे सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, पुनर्वसनाबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगीतले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री ना.नितिन राऊत, सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके,  आमदार निलेश पारवेकर, विजय खडसे, वामनराव कासावार, संजय राठोड, संजय देशमुख यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरग्रस्तांशी हितगूज करतांना ते पुढे म्हणाले की, कधी नव्हे एवढा महापुर या भागात आला. ढगफुटीमुळे एकाच दिवशी तब्बल २९० मि.ली.पावसाची विक्रमी नोंद झाली. प्रशासकीय यंत्रणा झालेल्या नुकसानाचे पंचनामे करीत आहे. मात्र कुटूंबांचे झालेले नुकसान केवळ पंचनाम्याने कधीच भरून निघणार नाही. पुरात जीवन किती उध्वस्त होते याची जाणीव असल्याचे ते यावेळी म्हणाले. अतिवृष्टीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या गावांचे गावापासुन जवळ असलेल्या सुरक्षीतस्थळी पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिथे जमिन मिळणार नाही तिथे अधिग्रहण करून पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातील. घाटंजी तालुक्याचा परिसर रम्य आहे. येथिल शेतकरी कष्टाळू आहे. योग्य सोयीसुविधा मिळाल्या तर आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी सुखी होऊ शकतील. या भागातील शेतक=यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी शासन अनुदान सुद्धा देईल असे त्यांनी सांगीतले. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पुरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असुन त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दुपारी १२ वाजुन ५० मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोळी (बु) येथे पोहचला. आमदार निलेश पारवेकर हे स्वत: मुख्यमंत्री बसुन असलेली पजेरो गाडी चालवित होते. याच गाडीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, पालकमंत्री ना.नितीन राऊत हे देखिल होते.  कोळी (बु) चे उपसरपंच चंद्रप्रकाश खरतडे यांनी मुख्यमंत्र्यांना गावात झालेल्या भिषण नुकसानाची माहीती दिली. रामपुर प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम व त्यांच्या चमुकडून मुख्यमंत्र्यांनी या भागातील आरोग्य विषयक बाबींबद्दल विचारणा केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विवीध संघटना व नागरिकांची निवेदने स्विकारून त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.  कवठा (खु.), चांदापुर (आश्रम), किन्ही, विरूळ, कोळी (खु.), कापसी (कोपरी) या पुराने सर्वाधीक बाधीत झालेल्या गावातील अनेक ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांपुढे आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी कोळी (बु) येथे जमले होते.


पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा - ना.मोघे

घाटंजी तालुक्यात प्रथमच पुरामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी भरीव मदत करून पुरग्रस्तांना मायेचा आधार द्यावा अशी मागणी सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केली. पुरग्रस्तांसाठी सध्या घराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा न पाहता सर्व पुरग्रस्तांना सरसकट घरे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

हारतुरे स्वागत स्विकारले नाही

आपल्या गावात राज्याचे मुख्यमंत्री येणार या आशेने सुखावलेल्या पुरग्रस्त कोळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना विसरून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी केली होती. ग्रामिण भागातील परंपरेनुसार कार्यक्रमस्थळी पाय धुवायला पाणी ठेवले होते. तसेच स्वागतासाठी पुष्पहार आणण्यात आले होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या स्वागतास मुख्यमंत्र्यांनी नम्र नकार दिला. केवळ कपाळी अक्षत लावुन घेतल्यावर त्यांनी लगेच गावाची पाहणी करण्यासाठी प्रस्थान केले.

फलकातूनही दिसली पुराची भिषणता

पावसाच्या पाण्याने सर्वस्व वाहुन गेलेल्या ग्रामस्थांनी आपल्या गावाची ओळख दाखविण्यासाठी आणेलेले फलक सुद्धा पावसाची भिषणता दाखवित होते. कुणी वापरण्यासाठी असलेल्या एकमेव उपरण्यावर गावाचे नाव लिहीले होते तर कुणी फाटक्या धोतराच्या कापडावर. गावाचे नाव लिहीलेले कापड सुद्धा पावसात भिजल्याने नावे धुसर झाली होती. या भिजलेल्या कापडांमधुन गावात पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र स्पष्ट दिसत होते.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती  

छायाचित्र सौजन्य :-
संदिप डिजीटल फोटो स्टुडीओ, शिरोली 
(प्रो.प्रा.संदिप वानखडे), Mob.No.9421770650
निलेश जुनगरे, शिरोली




Saturday, 11 August 2012

पुरग्रस्तांच्या जखमांवर केवळ ’ फुंकर’ पुरेशी नाही

१ हजार कुटूंबे बेवारस
६ हजार हेक्टर शेती उध्वस्त















जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला ते सर्वस्व घेऊन जाण्यासाठीच. घरदार, शेती सगळं काही पावसात वाहुन गेलं. जिथे हक्काचं डौलदार घर होतं तिथे पावसानंतर उरला केवळ मलबा. अंकुरायला आलेली शेतपिके पुराच्या पाण्याने पार खरडून नेली. पावसाच्या तडाख्याने शारिरीक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या घायाळ झालेल्या पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालायला अनेकजण आले. सामाजीक संस्था, दानशुर लोक, राजकीय नेते, कार्यकर्ते या सर्वांनी येऊन आपापल्या परिस्थितीनुसार मदत केली, जखमांवर फुंकर घातली. मात्र निसर्गाच्या फटक्याने भळभळणा-या या जखमा केवळ पुंâकर घातल्याने ब-या होणार नाहीत. त्यासाठी भरीव मदतीचे ’बँडेज’च गरजेचे आहे. हा उपाय केवळ मुख्यमंत्रीच करू शकतात. २८ जुलैला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नियोजीत दौरा खराब हवामानामुळे रद्द झाल्याने पुरग्रस्तांचे तर अवसानच गळाले होते. आता उद्या मुख्यमंत्री येणार या आशेने त्यांना एक आधार मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जखमांवर फुंकर घालावी ही अपेक्षा अगदीच तोकडी आहे. पुराच्या पाण्याने तालुक्यातील सुमारे १ हजार कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. स्वत:चे असे काहीच त्यांच्या जवळ उरले नाही. नदीकाठची शेती तर पुर्णपणे खरडून गेली आहे. आज हाती आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ९६४ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या आत व ४८१७ हेक्टर शेतीचे ५० टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर सुमारे ८४७ हेक्टर शेती पुर्णपणे खरडून गेली आहे. हे नुकसान कोटवधींच्या घरात आहे. शासकीय आकड्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान तालुक्यात झाले आहे. प्रशासनाच्या वतीने ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले आहे. ठराविक गावांमध्ये आरोग्य कॅम्प व्यतिरिक्त कोणतीही ठोस मदत प्रशासनाकडून झालेली नाही. हजारो पुरग्रस्त कुटूंबांनी आपापल्या परिने विवीध ठिकाणी आश्रय घेतला आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवा-याची व्यवस्था सुद्धा अद्याप झालेली नाही.
काही गावांमध्ये नागरीक स्वत: खर्च करून पुरग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी टँकरने पुरवित आहेत. मात्र तिथे भारनियमन आडवे येत आहे. पुरग्रस्त गावांनाही भारनियमनातून तात्पुरते वगळण्यात आलेले नाही. गावात साचलेल्या चिखलावर केवळ मुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. ते पसरविण्यात आले नाही. ज्या काही थोड्या थोडक्या उपाययोजना झाल्यात त्या केवळ मुख्यमंत्री येण्याच्या वार्तेमुळेच झाल्या आहेत.
मंत्री, आमदार असलेल्या तालुक्यातील नेत्यांनी पुरग्रस्तांच्या जखमेवर केवळ सहानुभूतीची फुंकर घालण्यापलीकडे काही केल्याचे दिसत नाही. अशा अवस्थेत आता सर्व पुरग्रस्तांच्या आशाळभूत नजरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच लागलेल्या आहेत.

सर्वस्व गमावलेल्या सरपंचाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अतिवुष्टीमुळे पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेल्या कवठा (खुर्द) येथिल सरपंच उदेभान रायबाजी घरडे (५५) यांचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामध्ये घरडे यांचे घर पुर्णपणे वाहुन गेले आहे. तसेच शेतपिकांचेही नुकसान झाले आहे. आता आयुष्य कसे जगावे याच विवंचनेत असलेल्या घरडे यांना हा ताण सहन झाला नाही व हदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिक्षकांचा मदतनिधी गेला कुठे?
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी आपल्या नक्षलग्रस्त भत्त्याची एका महिन्याची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविकत: एका जि.प.सदस्याच्या तोंडी आदेशावरून शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम बंधनकारक केले होते. गटशिक्षणाधिका-यांनी तसा आदेशही  केंद्र प्रमुख व मुख्याधापकांना लेखी स्वरूपात कळविला होता. त्यानुसार सुमारे ५ लाखांच्या वर निधी गोळा होणार होता. मानवतेच्या दृष्टीने कोणीही यासाठी विरोध केला नाही. मात्र त्यानंतर या निधीचे काय झाले? त्याचा विनियोग कुठे करण्यात आला याबाबत माहिती द्यायला कुणीच तयार नाही. उल्लेखनिय म्हणजे नक्षलग्रस्त भत्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या वेतनातून कपात करण्यात येणार होती. मात्र अद्याप जुलै महिन्याचे वेतनच निघाले नाही. तर मग ही लाखो रूपयांची रक्कम कुठून अ‍ॅडजस्ट करण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे. ही रक्कम पुरग्रस्तांसाठीच वापरण्यात आली असेल तर मग त्याचा कुठे वापर झाला हे सांगायला कुणीच का तयार नाही असा प्रश्न आता शिक्षकांमध्येच चर्चील्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


Sunday, 29 July 2012

अन ते मुख्यमंत्र्यांची वाट बघतच राहीले.......!





गेल्या दोन तिन दिवसात ज्यांच्या येण्याच्या अपेक्षेने पुरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या ते मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सारेच येऊन गेले, सांत्वना केली, पोटाची आग तात्पुरती शमविली पण भविष्याचे काय? असा प्रश्न पडलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्री घाटंजी तालुक्यात येतिल अन मोडून पडलेल्या संसाराला मदतीचा हात देतील अशी वेडी अपेक्षा पुरात सर्वस्व गमावलेले ग्रामस्थ बाळगून होते. लोकांनी दिलेल्या मदतीवर कुठवर जगायचे? दानशुर लोक काही दिवस पोटाची सोय करतील. 
मात्र जगण्याच्या आधाराचे काय? डोक्यावर हक्काचे छप्पर कधी येणार? अशा एक ना अनेक समस्यांनी वेढलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या दौ-याकडून खुप आशा होती. आज सकाळी १० वाजेदरम्यान मुख्यमंत्री अकोलाबाजार व त्यानंतर मांजर्डा, बोरगाव (पुंजी), कोळी, पारवा या गावांना भेटी देऊन पुरग्रस्तांशी संवाद करणार होते. या दौ-यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. ज्या गावापर्यंत अद्याप पाणीही पोहचले नव्हते तेथे सकाळपासुनच पाण्याचे टँकर पोहचले. जेवण्याचीही सोय झाली. मुख्यमंत्री ज्या रस्त्यांनी जाणार ते रस्तेही निट करण्यात आले होते. मुख्यमंत्री येण्याची वार्ता येताच एवढा बदल होऊ शकतो तर ते आल्यावर आपल्या सर्व समस्याच निकाली निघतील अशी आशा अनेकांना होती. मात्र सारेच काही फसवे निघाले. कारण कोणतेही असो पण त्यांनी काही मिनिटांसाठी तरी यायला पाहीजे होते असे सर्वांनाच वाटले. त्यांच्या ऐवजी ना.राजेंद्र मुळक, प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, ना.शिवाजीराव मोघे, अ निलेश पारवेकर यांनी काही भागाचा आज दौरा केला मात्र मदत घेतांना फोटो काढुन काढुन थकलेल्या पुरग्रस्तांसाठी ते पुरेसे नव्हते. 
गाडी आली की नागरीक त्यातून कोण येतंय हे मोठ्या उत्सुकतेने पाहात होते. एवढा ऊहापोह झाल्यावर मुख्यमंत्री येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या गावाला मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजीत नव्हता तेथिल नागरिकही आपल्या खचलेल्या घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. 
आपले पांढरेशुभ्र कपडे वाचवित गावातील चिखल तुडवित आलेले ईतर काही नेते आपल्याला सल्ले देण्यापलीकडे काही करणार नाहीत याची तालुक्यातील पुरग्रस्तांना  खात्री होती. 
एवढ्या बिकट परिस्थितीत ते भेट देऊन गेले हीच एक समाधानाची बाब. मात्र त्यांच्या भेटीने साध्य काय केले हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. केवळ शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करू असे नेहमीचे आश्वासन पुरग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकणार नाही. यामध्ये ना.मनोहर नाईकांनी तालुक्यातील सर्व पुरग्रस्तांच्या विस दिवसांच्या जेवणाची घेतलेली ‘व्यक्तीगत’ जबाबदारी नक्कीच कौतुकास पात्र आहे. गृह तालुक्यातील नेत्यांना मात्र हे सुचले नाही. पुरग्रस्तांसाठी होणारी प्रत्येक मदत स्वागतार्ह आहे. मात्र ती देतांना होणा-या फोटोसेशनला थोडा आवर घातला तर मदत घेणा-यांचा स्वाभिमान दुखावणार नाही. आज मदत घेण्यासाठी पुढे येणा-या याच आपत्तीग्रस्तांकडे आपल्याला भविष्यात मतांची भिक मागायला जावे लागेल व तेव्हा ते फोटो काढण्याचा आग्रह करणार नाहीत. मग आता त्यांना मदतीचा हात देतांना प्रसिद्धीचा अट्टाहास का ? यावर सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.
साभार :- देशोन्नती