Pages

Friday, 13 July 2012

आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीला पारवा पोलीसांचे संरक्षण

तक्रार होऊनही गुन्हा दाखल नाही

कौटुंबिक वादातून सोळा वर्षीय युवतीस शिविगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीविरूद्ध पारवा पोलीसांनी अद्याप कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
पारवा पोलीसांच्या या मनमानी कारभाराबाबत फिर्यादींनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. गुन्ह्याची तिव्रता दडपण्यात हातखंडा असलेल्या ठाणेदार पंजाब वंजारे यांनी या प्रकरणात आरोपीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता ‘मर्ग’ नोंद करण्याची किमया केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छाया संजय राठोड (१६) रा.भंडारी ता.घाटंजी ही युवती दि.८ जुलै रोजी विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी विनोद मोहन जाधव याने कौटुंबिक वादातून सदर युवतीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तिने विष प्राशन केले. प्रकृती गंभिर झाल्याने तिला आर्णी ग्रामिण रूग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभिर असुन तिचेवर उपचार केल्या जात आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पारवा पोलीसांनी घटनेची चौकशी न करता मर्ग दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या युवतीचे अद्याप बयाण देखिल नोंदविण्यात आले नाही असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 
घटनेतील आरोपीची पत्नी मिरा विनोद जाधव ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या युवतीची आत्या आहे. विनोद जाधव हा त्याच्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याने ती माहेरी राहात आहे. पतीकडून होत असलेल्या छळाबाबत तिने याआधी पारवा पोलीस स्टेशनमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०१० व १७ नोव्हेंबर २०१० रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पारवा पोलीसांनी सदर आरोपीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही हे विशेष. 
सावळी येथे कार्यरत ‘गणेश’ नामक पोलीस शिपाई या आरोपीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप होत आहे. पारवा ठाणेदाराचा ‘वसुली अधिकारी’ म्हणुन परिचीत असलेल्या या गणेशने आजवर या आरोपीवर गुन्हा दाखल होऊ दिल्या नसल्याचेही बोलल्या जात आहे. 
महिन्याभरापुर्वीच सव्वा लाखांची चोरी ७० हजारात दडपण्याचा प्रकार ठाणेदार पंजाब वंजारेनी केला होता. तर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल न करता चक्क ‘मर्ग’ नोंद करण्याचे ‘धाडस’ त्यांनी दाखविले आहे. आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती 




घाटंजी पं.स.चे संजय पवार यांना उत्कृष्ट कृषी अधिकारी सन्मान



येथिल पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कृषी अधिकारी संजय पवार यांना कृषीदिनी उत्कृष्ट कृषी अधिकारी म्हणुन सन्मानीत करण्यात आले. 
यवतमाळ येथिल वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतुगृहात कृषीदिनानिमित्य आयोजीत एका भव्य समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख होते. तर उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा कृषी अधिक्षक काशिनाथ तरकसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमोद यादगिरवार, कृषी विकास अधिकारी अनिल इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संजय पवार यांनी घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने सजग राहुन कार्य केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम, शाखा अभियंता आर.एच.लभाने, कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे, कार्यालय अधिक्षक  श्री. लतिफ, विस्तार अधिकारी योगेश उडाखे, डॉ.विलास देशमुख, ए.के.राजुरकर यांचेसह पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी वर्गाने कौतुक केले आहे.
साभार :- देशोन्नती 




Tuesday, 3 July 2012

संगिता भुरे यांचे विशारद पुर्ण परिक्षेत सुयश


अखिल भारतील संगित गांधर्व मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायन वादन परिक्षेत नगरसेविका संगिता अरविंद भुरे यांनी उल्लेखनिय  यश संपादन केले. येथिल कलाश्री संगित वर्गाच्या विद्यार्थीनी असलेल्या सौ.भुरे यांनी संगित क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या ‘संगित विशारद’ या गायन परिक्षेत ७० टक्के गुण मिळवुन विशारद पुर्ण ही परिक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली. 
शिवाय कलाश्री संगित क्लासेसचे सुमारे ४२ विद्यार्थी सुद्धा या परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन त्यापैकी ३० विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या सर्वांना कलाश्रीचे संगित शिक्षक दिलीप हेमके यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती 

नाणेटंचाईमुळे व्यावसायीक व ग्राहकांना मनस्ताप

स्टेट बँकेने नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

दैनंदिन व्यवहारात महत्वपूर्ण असलेल्या नाण्यांची टंचाई घाटंजी तालुक्यात सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे. परिणामी टंचाईचे कारण पुढे करून ग्राहकांची लूट होत आहे. व्यापारी वर्गाकडून सक्तीने सुट्या पैशांसाठी अनावश्यक वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपुर्वी बाजारपेठ व बँक व्यवहारात नाण्यांचा सुकाळ पहावयास मिळत होता. यानंतर देशभरात एक रुपयांत बोला अशी सुविधा क्वॉईन बॉक्सवर आल्याने या व्यवहारात वेगाने वाढ झाली. परिणामी नाण्यांची टंचाई भासू लागली. पण आता मोबाईलच्या एक पैसा एक सेकंद अशा विविध सवलती योजनांमुळे क्वॉईन बॉक्स व्यवसाय अडचणीत येऊन बंद झाल्याने बॉक्समध्ये पडणारी नाणी व्यवहारातून हद्दपार झाली आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेकदा नाण्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी, हॉटेल चालकांची पंचाईत झाली आहे. सध्या बाजारपेठेत १,२,५ रुपयांच्या नाण्यांची टंचाई असून अनेक ठिकाणी सक्तीने अनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच ते अडचणीचे ठरत आहे. प्रवास करतांना तिकिट काढल्यानंतर सुटे पैसे उतरतांना मागून घ्या, असे वाहकाकडून सांगण्यात येते. अनेकदा प्रवासी कामाच्या गडबडीत तसेच उतरुन जातात, तर काहीजण एक-दोन रुपये मागण्यात कुठे वेळ घालवायचा म्हणून पैसे न घेताच जातात. याचा फायदा वाहकांना होतो. एकेकाळी सक्तीने नाणी दिली जायची. असे असतांना आता असणारी भरमसाठ नाणी गेली कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
स्टेट बँकेकडून नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासुन स्टेट बँकेतही नाणे उपलब्ध होत नसल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. नाणे टंचाईमुळे सुट्या पैशासाठी व्यावसायीकांचे ग्राहकांशी होणारे वाद आता नेहमीचे झाले आहेत. मात्र यामुळे व्यवसायावर तसेच ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. स्टेट बँकेने व्यापा-यांना नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करावी अशी आग्रही मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
साभार :- देशोन्नती 

पारवा पोलीसांना अवैध दारू विक्रेत्यांचा पुळका

दारू विक्रीची तक्रार करणा-यांना ठाण्यात दमदाटी

तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला अवैध दारू विक्रेत्यांशी एवढी सहानुभूती निर्माण झाली आहे की, गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार करणा-यांना चक्क पोलीस ठाण्यात बोलावुन दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या प्रकाराने चिडलेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह सावळी सदोबा पोलीस चौकीवर धडक दिली. याबाबत विस्तृत वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी कापेश्वर येथिल ग्रामस्थांनी गावातील दोन अवैध दारू विक्रेत्यांविषयी ग्रामसभेत तक्रार केली. पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले. मात्र अवैध व्यावसायीकांना पाठिशी घालणा-या पारवा पोलीसांनी तक्रारकर्त्यांनाच गोत्यात आणण्याची खेळी केली. ज्या अवैध दारू विक्रेत्यांची ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्यांच्याकडून पोलीसांनी त्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार घेतली. तसेच चार ते पाच ग्रामस्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन, ‘तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही दारू विक्रेत्यांना विरोध केल्यास ते सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे तक्रार करू नका’ असा धमकीवजा सल्ला पारवा पोलीसांनी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. योग्य बाबीची तक्रार केल्यावर पोलीस दारू विक्रेत्यांची बाजु घेऊन ग्रामस्थांना धमकावत असल्याचे लक्षात येताच उमरी कापेश्वर येथिल शेकडो गावक-यांनी थेट सावळी सदोबा पोलीस चौकी गाठुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिल्याने अवैध व्यावसायीकांचे धारिष्ट्य वाढले आहे. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपुर्वीच विशेष शाखेने पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. परंतु ग्रामिण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाहतुक व  तत्सम व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत बिनदिक्कतपणे सुरू आहे. वरिष्ठांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती