Pages

Showing posts with label भिषण आग. Show all posts
Showing posts with label भिषण आग. Show all posts

Saturday, 15 September 2012

ईलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या संशयास्पद आगीत २१ लाखांचे नुकसान











येथिल महाराणा प्रताप चौकात असलेल्या पुजा ईलेक्ट्रॉनिक्स हे दुकान व जेसिस कॉलनीत असलेल्या गोदामाला दि.१३ ला रात्री १ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे २१ लाख ५० हजार रूपयांचे साहित्य जळुन खाक झाले. जलाराम मंदिराच्या बाजुला पालतेवार कॉम्पलेक्स मध्ये तळमजल्यावर हे दुकान आहे. रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांना दुकानातून धुराचे लोट येत असल्याचे दिसले. लोकांनी धावाधाव करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नगर परिषदेचा टँकर तसेच यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र तोवर दुकान व गोदामातील टि.व्ही.,फ्रीज, कुलर यासह विवीध ईलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य भस्मसात झाले. या आगीत सुमारे २१ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. ही आग अपघाताने लागली नसुन लावण्यात आली असल्याचा दाट संशय आहे. दुकान व गोदाम या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी आग कशी लागली ?  दुकान बंद असताना आग एवढी कशी पसरली? याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी इश्वर शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली आहे.
साभार :- देशोन्नती   

Thursday, 10 May 2012

घाटंजीत गॅस सिलेंडर लिकेजमुळे घराला भिषण आग

घरातील साहित्य भस्मसात
३ लाख ५० हजारांचे नुकसान








स्थानिक आनंदनगर भागात वसंत वडतकर यांचे घरी गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील संपुर्ण साहित्य जळाले. आज सकाळी ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. यामध्ये सुमारे ३ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 
श्री गजानन महाराज मंदिराच्या मागे असलेल्या आनंदनगरात वसंत नारायण वडतकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राम बापुराव करपते हे भाड्याने राहतात. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते देवघरात दिवा लावण्यास गेले. सिलेंडर लिक असल्यामुळे गॅस घरात पसरलेला होता. ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. माचीस पेटवताच अचानक मोठा भडका झाला. राम करपते यांनी आग लागलेला सिलींडर घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यादरम्यान घरातील साहित्याने पेट घेतला. टि.व्ही, सोफा, फ्रीज, कुलर, पलंग यासह दरवाजे, खिडक्या जळुन खाक झाले. आजुबाजूच्या नागरीकांनी धावपळ करून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तोवर घरातील बहुतेक सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घटनेच्या वेळी घरात राम करपते यांची पत्नी प्रतिभा, २ वर्षांचा चिमुकला दिपेश हे होते. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आगीच्या तिव्रतेने खिडक्यांची तावदाने फुटली. नागरीकांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. सिलींडरचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती. महसुल विभागाचे एस.वाय गुघाणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. करपते दाम्पत्याचे तिन वर्षांपुर्वीच लग्न झाले असुन दोन वर्षांपासुन ते वडतकर यांचे घरी भाड्याने राहात आहेत. गॅस कंपन्यांकडून देण्यात येत असलेले अनेक रेग्युलेटर तकलादु असल्याने काही दिवसांनी त्यातून कमी अधिक प्रमाणात गॅस लिक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 5 May 2012

बैलबाजार मैदानातील कच-यांच्या ढिगा-यांना आग

गुरूदेव वार्ड थोडक्यात बचावला 
बाजार समितीचा दुर्लक्षीतपणा


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ज्या मैदानात बैलबाजार भरविण्यात येतो तिथे असलेल्या कचरा व खताच्या ढिगा-यांना आज दुपारी आग लागली. दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा असल्याने मैदानात ठिकठिकाणी साठवुन असलेल्या ढिगांनी पेट घेतला. झपाट्याने पसरत चाललेली आग बाजुलाच असलेल्या गुरूदेव वार्डातही पसरण्याची भिती निर्माण झाल्याने येथिल नागरीकांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नगर परिषदेचा टँकर बोलविण्यात आला. वार्डातील नागरीकांनी वेळीच धावपळ केल्याने आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा दुपारी असलेल्या सुसाट वा-यामुळे लोकवस्तीपासुन अवघ्या २० ते २५ फुट अंतरावर असलेल्या या कच-याच्या जळत्या ढिगा-यांनी संपुर्ण गुरूदेव वार्डालाच आगीच्या भक्ष्यस्थानी घेतले असते. कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने हे कच-याचे ढिगारे न उचलल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा येथिल संतप्त नागरीकांनी दिला आहे. घाटी (घाटंजी) भागातील गुरूदेव वार्डाच्या बाजुला बाजार समितीच्यावतीने बैलबाजार भरविण्यात येतो. यादरम्यान येथे जमा होणा-या शेण, कचरा व वैरणीच्या खताचा लिलाव केल्या जातो. हे जमा झालेले खत व कचरा संबंधीत कंत्राटदाराने मैदानातून न्यावयास पाहिजे होता. मात्र त्याच्या अक्षम्य दुर्लक्षीतपणामुळे आजुबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. बैलबाजारानंतर बाजार समितीने साफसफाई न केल्याने सर्वत्र वैरणाचा कचरा पसरला आहे. एका ठिणगीनेही या भागात भिषण आग पसरण्याची भिती आहे. दोन दिवसांपुर्वी येथिल दोन कच-याच्या ढिगा-यांनी पेट घेतला होता. त्यावेळी एक मुलगा जळता जळता सुदैवाने वाचला.
आज दुपारीही दोन ढिगा-यांना आग लागली. वारा सुसाट असल्याने विस्तव सर्वत्र उडाला. त्यामुळे सुमारे आठ ते दहा ठिकाणी आग लागली. या मैदानात असलेल्या बाजार समितीच्या शेड मध्ये गवताच्या पेंढ्या ठेवुन आहेत. वारा विरूद्ध बाजुने असता तर प्रचंड नुकसान झाले असते. या आगीबाबत माहिती देण्यासाठी काही नागरीकांनी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही असे नागरिकांनी सांगीतले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले होते. आग विझविण्यासाठी विनोद मोहिजे, मंगल मोहिजे, अभय मोहिजे, विठ्ठल ससाणे, अंकुश ठाकरे यांचेसह अनेकांनी प्रयत्न केले. येथे भरविण्यात येत असलेल्या बैलबाजाराचा परिसरातील नागरीकांना नेहमीच त्रास होतो. त्यामुळे बैलबाजाराचे ठिकाण बदलावे किंवा संरक्षक भिंत बांधावी अशी येथिल नागरिकांची मागणी आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday, 19 March 2012

डी.पी.पेटल्याने फोटो स्टुडीओ भस्मसात




स्थानिक अग्रसेन चौकातील डीपी पेटल्याने संजय ढवळे यांच्या फोटो स्टुडिओला लागलेल्या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत फोटो स्टुडिओतील झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, प्रिंटर आदी साहित्य जळून खाक झाले.
आजुबाजूच्या नागरीकानी धावपळ करून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विज वितरण  कंपनीची यंत्रणा वेळेवर न पोहचल्याने आग विझवायला विलंब झाला. या आगीमुळे शहरातील विद्युत पुरवठा सुमारे तिन तास खंडीत झाला होता.
  

Friday, 23 December 2011

घाटंजीतील राणा जिनींगला भिषण आग





येथिल अकोलाबाजार मार्गावर असलेल्या राणा जिनींगला आज दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सात लाखांचा कापुस जळुन भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास कापुस तोलाई करतांना वाहनाच्या सायलेंसर मधुन निघालेल्या ठिणगीमुळे बाजुलाच असलेल्या कापसाच्या गंजीला आग लागली. त्यात सुमारे दोनशे क्विंटल कापुस जळाला. जिनिंगच्या परिसरात अनेक कापसाच्या गाड्या असल्याने आग लागताच वाहनधारकांची धावपळ उडाली. यावेळी येथे उपस्थित शेतकरी, जिनिंग मधील कामगार व काही व्यापा-यांनी वेळेवर धावपळ करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये कैलास कोरवते, निलेश जुनगरे, शेरू देवतळे, विठ्ठल कडु, सलीम शेख, होनबा डंभारे, अविनाश भुरे, संजय वातीले, गोविंद परचाके, अभय कटकमवार यांचेसह जिनिंगच्या कामगारांचा समावेश आहे. नगर परिषदेचा पाण्याचा टँकर व एका खासगी टँकरने आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. यवतमाळ व वणी येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेचे वाहन येण्यास सुमारे दोन तास तर वणी येथिल वाहनाला तिन तासांचा अवधी लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विझविण्यासाठी पावले उचलल्याने पेटलेल्या कापसाच्या गंजीलाच लागुन असलेल्या मोठ्या गंजी पर्यंत आग पसरली नाही. घटनेची माहिती मिळताच नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे, सुरेश जयस्वाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, सहसचिव डी.डी.हिवरकर हे घटनास्थळी दाखल झाले. जिनिंग लगतच पेट्रोलपंप असल्याने तातडीने ते बंद करण्यात आले. विशेष उल्लेखनिय म्हणजे सदर जिनिंग मध्ये आग विझविण्यासाठी अथवा आगीपासुन बचाव व्हावा यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने यंत्रणेला धावपळ करावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी घटनास्थळी भेट दिली.


न.प. अध्यक्षपदासाठी ३ नामांकने

नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज ३ नामांकने दाखल करण्यात आले. कॉंग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी व किशोर दावडा तर शिवसेनेकडून शर्मिला उदार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असल्याने संख्याबळानुसार कॉंग्रेसकडे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे.
साभार:- देशोन्नती

Wednesday, 23 November 2011

मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

शहरातील मुख्य बाजारपेठेत नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या अजमेर मार्केटिंग या दुकानाला काल मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत संपुर्ण दुकान व साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास येथिल व्यापारपेठ बंद असल्यामुळे सगळीकडे सामसुम होती. काही नागरीक या भागातील चौकात बसुन होते. त्यांना दुकानातुन धुर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधीतांना कळविले तसेच या भागातील नागरीकांना गोळा केले. पोलीस विभागाला सुचना देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक कोंडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. यवतमाळ येथिल अग्निशमन यंत्रणेला बोलविण्यात आले. मात्र तोवर आग विझविण्यासाठी घाटंजी नगर परिषदेकडे असलेला पाण्याचा टँकर आणण्यासाठी सुचना देण्यात आली. मात्र सदर टँकर रिकामा असल्याने तो भरण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. विषेश म्हणजे यावेळी कर्तव्यावर असलेल्या टॅ्रक्टर चालकाकडे चावीच नव्हती. शिवाय या टँकरचा पाईप सुद्धा फुटलेला होता. योग्य वेळी हा टँकर न पोहचल्याने सदर दुकान भस्मसात झाले. नागरीकांनी परिसरातुन पाण्याची व्यवस्था करून आग पसरू दिली नाही. यवतमाळ येथुन अग्निशमनाची गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र सिराज अजानी यांच्या मालकीचे अजमेर मार्केटिंग हे दुकान संपुर्णपणे आगीच्या तडाख्यात खाक झाले. आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
न.प.चे ‘अग्निशमन’ थंडबस्त्यात
काही महिन्यांपुर्वी राज्य शासनाकडून नगर परिषदेला अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. न.प.ला आपला सहभाग नोंदवायचा होता. मात्र नगर परिषदेकडे पैसाच नसल्याचे कारण पुढे करून विद्यमान पदाधिका-यांनी अग्निशमन यंत्रणा उभारण्यास नकार दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे सोंग उभे करणा-या न.प.पदाधिका-यांना नागरिकांच्या जिवीताशी संबंधीत सुविधेबद्दल किती आस्था आहे हेच यावरून स्पष्ट होते. नागरिकांनीही न.प.निवडणुकीच्या निमित्ताने यावर वर्तमान
पदाधिका-यांना जाब विचारण्याची गरज आहे.