Pages

Showing posts with label टॉवर उभारणी. Show all posts
Showing posts with label टॉवर उभारणी. Show all posts

Tuesday, 17 January 2012

विद्युत पारेषण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे सहाय्यक अभियंता अनिल बागडे यांच्यावर घरात घुसून शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घाटंजी पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादी राजेश जाधव यांनी येथिल प्रथम श्रेणी न्यायालयात दाद मागीतली होती.
याबाबत विस्तृत वृत्त असे की, विद्युत पारेषण कंपनी कडून घाटंजी तालुक्यात टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. फिर्यादी जाधव यांच्या शेतातुनही टॉवर उभारणी करण्यात येणार होती. मात्र त्यांनी याप्रकरणी कायदेशीर मार्गाने विरोध केला. उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याप्रकरणी याचीका दाखल आहे. यामुळे चिडलेल्या सहाय्यक अभियंता बागडे यांनी १० मे २०११ रोजी जाधव यांच्या घरात घुसून शिवीगाळ तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जाधव यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती.
मात्र घाटंजी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे राजेश जाधव यांनी न्यायालयात दाद मागीतली होती. अखेर सहाय्यक अभियंता अनिल बागडे यांचेवर कलम ४४८, २९४, ५०६ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शेतात उभ्या असलेल्या पिकांची पर्वा न करता विज पारेषण कंपनीचे अधिकारी पोलीस बंदोबस्ताचा दबाव शेतक-यांवर टाकुन टॉवर उभारणीचे काम करीत आहेत. यामध्ये शेतक-यांना नुकसान झालेल्या पिकाची भरपाई सुद्धा योग्य वेळेत देण्यात येत नाही. विज पारेषण कंपनीच्या दंडूकेशाहीच्या विरोधात तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.
साभार :- देशोन्नती

Monday, 28 November 2011

शेतक-यांचे उभे पिक विज कंपनीच्या टाचेखाली

पोलीस दहशतीत टॉवरचे काम
शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष
 कापुस व सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी सर्वत्र  संघर्ष सुरू असतांना घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या पिकांवर विज पारेषण कंपनीची करडी नजर पडली आहे. शेतात पिके उभी आहेत. मात्र अशा अवस्थेतही विज पारेषण कंपनीने मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा बोलावुन दहशतीच्या वातावरणात शेतामध्ये टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
चोरांबा भागात मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या टॉवर उभारणीला शेतक-यांचा विरोध आहे. पारेषण कंपनीचे कर्मचारी शेतामध्ये घुसून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी देतात अशा आशयाची तक्रारही सुनिल पांढरमिसे, लियाकत तंव्वर, राजेश जाधव, पवन गोडे या शेतक-यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर या शेतक-यांनी शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार या टॉवर उभारणी विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दि. ५ मे २०११ रोजी रिट पीटीशन याचीका (क्र.२१०७) दाखल केली आहे. सदर खटला अद्याप सुरू आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत टॉवर उभारणी करू नये अशी या भागातील शेतक-यांची मागणी आहे. मात्र विज पारेषण कंपनी व कंत्राटदाराने पोलीसांशी हातमिळवणी करून मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज शेतपिके पायदळी तुडवित टॉवर उभारणीच्या कामाला सुरूवात केली. या प्रकाराला विरोध केल्यास गंभिर गुन्हे दाखल करण्यात येतिल अशी धमकी पोलीसांकडुन देण्यात येत असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. शेतक-यांवर दडपण आणण्यासाठी राखीव पोलीस दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.
विज पारेषणचे अधिकारी व पोलीसांच्या या दडपशाही विरोधात सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचेसह स्थानिक नेते व कार्यकर्ते सुद्धा हस्तक्षेप करीत नसल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. हे काम त्वरीत न थांबविल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा शेतक-यांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती