Pages

Showing posts with label Murder. Show all posts
Showing posts with label Murder. Show all posts

Friday, 6 December 2013

घाटंजी तालुक्यात ‘ऑनर किलिंग’

वडील, भाऊ व मामाने केला १६ वर्षीय मुलीचा खुन
तब्बल २२ दिवसांनी लागला तपास
नेर तालुक्यात पुरला होता मृतदेह
अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण व लग्नाचा हट्ट सहन न झाल्याने मुलीचे वडील, भाऊ, मामा यांचेसह पाच जणांनी कट रचुन तिचा निर्घुण खुन केला. घाटंजी तालुक्यातील किन्ही गावातील या घटनेने तालुका हादरला आहे. घटनेच्या तब्बल २१ दिवसांनी हा गंभिर प्रकार उघडकीस आला. 
रेखा प्रेमदास जाधव (वय१६) असे त्या दुर्दैवी मृतक मुलीचे नाव आहे. ता.१३ नोव्हेंबर रोजी नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारातील शेतात तिचा खुन करून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला होता. या प्रकरणी घाटंजी पोलीसांनी मुलीचे वडील प्रेमदास केशव जाधव (४५) नातलग देविदास राठोड यांना अटक केली असुन खुनाच्या कटात सहभागी मुलीचा भाऊ रूपेश प्रेमदास राठोड, मामा अशोक धनु राठोड, राजु मोतीराम राठोड हे आरोपी फरार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृतक मुलगी हि ता.१७ नोव्हेंबर रोजी घाटंजी येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील प्रेमदास केशव जाधव यांनी नोंदविली होती. गावातीलच अर्जुन उर्फ  बबलु वासुदेव राठोड (२०) याचेशी मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यानेच तिला फूस लावुन पळविल्याचा आरोप वडीलांनी केला होता. त्यानुसार घाटंजी पोलीसांनी त्या युवकावर भा.दं.वि.कलम ३६३, ३६६ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट ३७० (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. अद्यापही तो युवक न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारात ता.२२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पुरलेल्या अवस्थेतील युवतीचे प्रेत आढळुन आले होते. चेहरा दगडाने ठेचुन विद्रुप करण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नेर तालुक्यात या अनोळखी युवतीच्या खुनामुळे खळबळ उडाली होती. उल्लेखनिय म्हणजे मृतक रेखाच्या वडीलांनाही नेर येथे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र कपडे व अन्य साहित्य माझ्या मुलीचे नाही असे त्यांनी सांगितले होते. तपासादरम्यान मुलीच्या वडीलांची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पोलीसांचा संशय बळावला.
त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाच जणांनी कट रचुन रेखाला अशोक राठोड व राजु राठोड यांचे सोबत दुचाकीवर नेर तालुक्यात पाठविले. तिथे शेतशिवारात या दोघांनी तिचा खुन केल्याचे त्याने कबुल केले. मुलीचे गावातीलच अर्जुन राठोड याचेशी प्रेमसंबंध होते. तिने त्याच्या सोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. याबाबत समाजाची बैठकही किन्ही येथे झाली होती. मुलाकडचे लग्नासाठी तयार होते. मात्र मुलीच्या वडीलाचा लग्नाला तिव्र विरोध होता. त्यातुनच हे कृत्य त्याने सांगितले. घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या नेतृत्वात घाटंजी पोलीस आरोपींचा कसोशीने शोध घेत आहेत.  
साभार : सकाळ