Pages

Thursday 29 November 2012

गरिबाच्या लेकराले किंमत नसते काय?

‘सपना’च्या आईचा जळजळीत सवाल

‘कोण्या मोठ्या लोकायचं लेकरू कोनी नेलं असतं... तं सारेच्या सारे कामाले लागले असते. पन आता कोनालेच कायी घेनदेन नाई... गरिबाच्या लेकराची किंमतच नसते का? त्यायचा जीव गेला तरी दुनियेले काही फरक पडत नाही...’ चिंतातूर चेह-यावर ओघळणारे अश्रू पुसत चोरांब्याची शारदाबाई बोलत होती. तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता असलेल्या सपनाची ती आई. दिवसभर मजुरी केली तरच जेवणाची सोय होईल अशी बिकट परिस्थिती. मुलीच्या शोधासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने खायचे काय? असा प्रश्न पुढे असुनही दोन मुलांना कडेवर घेऊन सपनाचे आई वडील तिचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र सुरूवातीपासुनच पोलीस प्रशासनाच्या असंवेदनशिल व्यवहारामुळे ते हतबल झालेत. गोपाल व सौ.शारदा पळसकर हे दाम्पत्य घाटंजीलगत असलेल्या चोरांबा येथे कोलामपोडावर राहतात. त्यांना तिन अपत्य. सात वर्षांची सपना सर्वात मोठी त्यापाठोपाठ अपर्णा (३ वर्ष) व मंगल केवळ एक वर्षाचा. विजयादशमीचा तो सोन्यासारखा दिवस. या दिवशीच ‘सोन्यासारखी’ लेक बेपत्ता झाली ते पळसकर दाम्पत्याला कळलं सुद्धा नाही. कारण गावातच शारदाबाईचे माहेर. सपना कधी कधी आजीकडेच राहायची. त्यामुळे दस-याच्या दिवशी ती बेपत्ता झाल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही. सकाळी ती आजीकडेही नसल्याने तिची गावभर शोधाशोध सुरू झाली. आजुबाजूच्या जंगलातही सर्वांनी मिळून शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारणा झाली. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर २५ ऑक्टोबरला पळसकर दाम्पत्याने पोलीस स्टेशन गाठले. पण सुरूवातीला तक्रार घेण्यासच टाळाटाळ करण्यात आली. आधी तुम्ही शोध घ्या... आम्ही देखिल प्रयत्न करतो... तक्रार करू नका. असे गोड बोलुन त्यांची बोळवण करण्यात येत होती.
जेव्हा तिच्या पालकांनी तक्रारीचा आग्रह धरला तेव्हा त्यांना धाकदपट करण्यात आली. तेव्हाही ते न जुमानल्याने अखेर बेपत्ता असल्याची नोंद घेऊन पोलीसांनी कागदी सोपस्कार केले. पण तक्रारीची पोच देण्यास चक्क नकार देण्यात आला. महिनाभर जिकडेतिकडे भटकत असलेल्या पळसकर दाम्पत्याच्या कानावर जेव्हा मुरली येथिल घटना पडली तेव्हा त्वरीत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. आपली सपना तिच तर नसेल ना या भितीने त्या मायमाऊलीच्या काळजाची काय अवस्था झाली असेल ते अकल्पनीयच. 
पोलीस मात्र ती सपना असेल असा संशय व्यक्त करून तपास करण्याच्या मानसिकतेत नसल्याने मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने पळसकर दाम्पत्याने थेट ‘एस.पी.’ साहेबांना गाठले. पण ते तर गुप्तधनासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा नव्हे, घटनास्थळी मुलगी असणे शक्यच नाही, ती तुमचीच मुलगी असेल हे कसे म्हणायचे? असे प्रतिप्रश्न करायला लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. साहेबांनाही आमच्यावर विश्वास बसला नाही असे निराश चेह-याने शारदाबाईने सांगितले. 
घाटंजी पोलीसांविषयी कोलामपोडावर प्रचंड संताप असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ‘ठाणेदारानं डब्बे भरून घेतले म्हनुनच त्यायचे हात बांधुन असंन’ अशा शब्दात ग्रा.पं.सदस्य यशोदा मेश्राम यांनी पोलीस तपासावर आपली नाराजी व्यक्त केली. गावात यापुर्वी अशी घटनाच घडली नसल्याचे गावकरी सांगतात. सात वर्षांची मुलगी जाणार तरी कुठे? अन ते ही या छोट्याशा गावातून? शंकेला नक्कीच वाव आहे. पण हे पोलीसांना कोण सांगणार? ते केवळ या प्रकरणात आपण सुरक्षीत राहावे यासाठी कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त आहेत तर निवडणुकीच्या वेळी मिरवणारे राजकारणी आपल्या ‘सग्या सोय-यांना’ वाचविण्याच्या प्रयत्नात हे प्रकरणच दडपण्यासाठी निघालेत. मन सुन्न करणा-या या बिकट परिस्थितीत एक चिमुकला निष्पाप जीव मात्र कुठे असेल याच प्रश्नाने संवेदनशिल माणसाच्या मनाचा ठाव घेतलाय.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

Wednesday 28 November 2012

आबा तुमच्या पोलीसांचा हा असा कसा तपास ?



गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाला आठवडा लोटलाय. तर चोरांब्याची ‘सपना’ तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता आहे. गुप्तधन प्रकरणातील फिर्यादी पोटतिडकीने सांगतोय की, मी एका बालकाची किंकाळी ऐकली. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे देखिल हा गुप्तधनासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट करीत आहेत. बेपत्ता मुलीच्या पालकांची जिकडे तिकडे उपाशीपोटी भटकंती सुरू आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांनी तपास गांभिर्याने घ्या असे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमे घटनेच्या  वास्तविकतेवर प्राधान्याने लक्ष वेधत आहेत. या सर्व खटाटोपात पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या नावाखाली केवळ  ‘तपासनाट्य’ करीत असल्याचे दिसत आहे. ही घटना गावातील दोन गटातील राजकारणाचा भाग आहे. तर कधी मारहाण केल्याने आपल्यावर अ‍ॅट्रोसिटी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र बेपत्ता मुलगी व गुप्तधनासाठी नरबळीच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलीस तपास ‘शुन्य’ आहे. कोणत्याही स्पष्ट निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. गेल्या आठ दिवसात केवळ फिर्यादी व ग्रामस्थांचे बयाण घेण्यापलिकडे पोलीस तपास गेला नाही. या दरम्यान फिर्यादी विजय चव्हाण याची किमान दहा वेळा चौकशी झाली आहे. त्याला चार ते पाच वेळा घटनास्थळी नेण्यात आले. तर घटनेतील आरोपी व संशयीतांपैकी कुणालाही घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले नाही हे विषेश. अपहरण व हत्येचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी पोलीसांना केवळ एकाच दिवसाचा ‘पीसीआर’ मिळाला तेव्हाच पोलीसांना या प्रकरणात नेमके काय करायचे आहे हे लक्षात आले. चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांना पाचवा आरोपी शोधण्या ऐवजी पोलीस वारंवार फिर्यादीलाच पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लावत आहेत. एवढेच काय तर पत्रकारांनाही ही बातमी तुम्हाला कोणी दिली ते आम्हाला सांगा असे म्हणण्यापर्यंत पोलीसांची मजल गेली आहे. मात्र या घटनेतील संशयीत कोण कोण आहेत याची संपुर्ण माहिती तालुक्यातील ‘शेंबड्या’ पोरांनाही आहे. मग पोलीस या प्रकरणात त्यांना का दुर्लक्षीत आहेत?  या प्रकरणाच्या सुरूवाती पासुनच तपास अधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे. प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले, पोलीस उपनिरिक्षक राऊत यांनी या आठवडाभरात आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचेच प्रयत्न केलेत. माध्यमांनी त्यावर वेळोवेळी प्रकाशही टाकला आहे. त्यानंतर तपास हाती घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन हे सुद्धा तशाच कार्यपद्धतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांची सुद्धा या प्रकरणात ‘नकारात्मक’ भुमिकाच दिसत आहे. असे असतांना नि:पक्ष तपास होईल तरी कसा? त्यामुळेच राज्याचे गृहमंत्री ना.आर.आर.पाटील तरी या गंभिर प्रकरणात जातीने लक्ष घालुन पोलीस दलाबद्दल जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप दुर करण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. एका गंभिर प्रकरणात पोलीसांच्या या ‘उरफाट्या’ तपासाबद्दल तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


टिपेश्वर अभयारण्यात शिजले ‘गुप्तधन’ प्रकरण ?

त्या कथित पुजेने वाढले गुढ

नवरात्राच्या काळात घाटंजी तालुक्यालगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात काही लोक विशिष्ट प्रकारची पुजा करण्यासाठी गेले होते. सलग आठ ते दहा दिवस ही पुजा चालली अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत असुन त्यामुळे गुप्तधन प्रकरणाचा ‘कट’ टिपेश्वर अभयारण्यात तर शिजला नाही ना ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. या कथित पुजेमध्ये घाटंजी तालुक्यातील सुमारे दहा ते बारा लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये काही व्यावसायीक व शासकीय कर्मचारी सुद्धा होते अशी माहिती आहे. वन्यप्राण्यांनी व्यापलेल्या अभयारण्यामध्ये नेमकी कोणती ‘पुजा’ झाली याबाबत सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे. या पुजेत सहभागी झालेल्यांना एक ‘गुरूजी’ मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण देत होता. या कालावधीत पुजेमध्ये सहभागी झालेले लोक केवळ फलाहार घ्यायचे. हे सर्व साहित्य त्यांना घाटंजी येथुन पाठविण्यात येत होते. त्यांनी राहण्यासाठी राहुट्या उभारल्या होत्या. अष्टमीच्या दिवशी ही कथित पुजा संपली अशी माहिती आहे. योगायोगाने दस-याच्या दिवशी म्हणजेच ‘दशमी’ला चोरांबा येथिल सपना पळसकर ही मुलगी बेपत्ता झाली. तर ‘पंचमी’च्या पुर्वरात्रीला गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेली हो टोळी ग्रामस्थांच्या हाती लागली. हा केवळ योगायोग आहे की एका गंभिर कटाचा भाग याचा पोलीसांनी शोध घेण्याची गरज आहे. ग्रामस्थ व फिर्यादी विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सदर घटनेत दहा पेक्षा जास्त लोक सहभागी होते. पोलीसांनी अद्याप केवळ चार आरोपींना अटक केली आहे. टिपेश्वर अभयारण्यामध्ये झालेल्या त्या कथित पुजेबाबत पोलीसांनी योग्य चौकशी केली तर या प्रकरणात एक मोठा सुगावा हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी नवरात्राच्या काळात कुठे होते याचे मोबाईल च्या माध्यमातून ‘लोकेशन’ घेतल्यास या चर्चेमध्ये काही सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल. या दरम्यान त्यांना कोण कोण भेटण्यास येत होते? ते कुठे कुठे गेले? याबाबतही पोलीसांनी तपास करण्याची गरज आहे. तसेच आरोपी व संबंधीतांच्या मोबाईल ‘कॉल डिटेल्स’ वरून या प्रकरणी पोलीसांना तपासाची दिशा मिळु शकते. मात्र पोलीस त्या मानसिकतेत असल्याचे दिसत नाहीत. गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा झालेला प्रयत्न, सुमारे विस दिवसांपासुन बेपत्ता असलेली चिमुकली व टिपेश्वरच्या अभयारण्यात झालेली कथित पुजा या तिन्ही घटनांचे एकमेकांशी साधम्र्य असल्याचे दिसत आहे. पोलीसांनी या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविल्यास यातील नेमके तथ्य बाहेर येऊ शकते असा कयास वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

अमोल राऊत

Wednesday 21 November 2012

अखेर गुप्तधन प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल

श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच  





गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली. 
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ  राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे.  या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.  या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 


Tuesday 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

ग्रामस्थांच्या सतर्कतेने गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न फसला

घाटंजी तालुक्यातील मुर्ली तांड्यावरील घटना
गावक-यांकडून टोळीतील सदस्यांना चोप
‘त्या’ अज्ञात चिमुकलीचा जीव धोक्यातच
राजकीय दबावातून पोलीसांचे आरोपींना ‘अभय’





पैशाच्या लालसेने निष्ठुर झालेल्यांनी गुप्तधन मिळविण्यासाठी एका चिमुकल्या मुलीचा बळी देण्याचा केलेला प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पडला. दि.१७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही मन विषन्न करणारी घटना घडली. मात्र  टोळीतील सदस्य त्या अज्ञात मुलीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी लगत असलेल्या मुर्ली तांड्याजवळील एकहात्या मारोती मंदिरापुढे सुमारे ६ ते ८ लोक संशयास्पद स्थितीत वावरत असल्याचे त्या भागात शौचास गेलेल्या विजय चव्हाण नामक युवकास दिसले. त्यातच लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने त्याचा संशय बळावला. त्याने लगेच तांड्यावरील नातेवाईकांना भ्रमणध्वनी करून बोलावुन घेतले. अवघ्या काही वेळातच २० ते २५ लोक तेथे आले. लोकांचा जमाव येत असल्याचे दिसताच त्या टोळीतील सदस्यांची पळापळ सुरू झाली. 
त्यातील एकाने त्या लहान मुलीला घेऊन पळ काढला. त्या भागात अंधार असल्यामुळे तो पळुन जाण्यात यशस्वी झाला. या दरम्यान टोळीतील तिन सदस्य ग्रामस्थांच्या हाती लागले. घटनास्थळावरील प्रकार पाहुन संतापलेल्या नागरिकांनी त्यांना येथेच्च झोडपून काढले. त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. पोलीस येईपर्यंत तिन आरोपींपैकी एकजण निसटण्यात यशस्वी झाला. दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले.
अशोक दर्शनवार (३६) रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार (५२) रा.बेलोरा ता.घाटंजी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ताकसांडे नामक दोन ईसम व ईतर अज्ञात आरोपी फरार आहेत. मात्र अटक केलेल्या आरोपींवर केवळ गावातील शांतता भंग केल्या बद्दल प्रतिबंधात्मक कार्यवाही करून रात्रीच जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावरून एम.एच. २९ क्यु.१९७७ व ए.पी.१० ए.टी.५१६४ क्रमांकाच्या दोन दुचाकी, कुदळ, फावडे, हळदीने माखलेला दगड, लिंबु, दोरी जप्त केले. मात्र ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात आढळले नाहीत हे विषेश. 
या घटनेत ताब्यात घेतलेले आरोपी मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते असे आता पोलीस सांगत आहेत. मात्र नजरेसमोर अघोरी पुजा सुरू असताना हे दोन आरोपी खरंच हनुमान चालीसा वाचत होते काय? त्यांना त्या चिमुकल्या जीवाची किंकाळी ऐकु आली नाही का? घटनास्थळावरील परिस्थिती व आरोपींचे बयाण यामध्ये पोलीसाना संशय का आला नाही? जर आरोपी फक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते तर त्यांनी ग्रामस्थांना पोलीस तक्रार न करण्यासाठी १ लाख रूपये का देऊ केले? एरवी क्षुल्लक माहितीवरून घटनेचा तपास लावणा-या पोलीसांना एवढी गंभिर परिस्थिती डोळ्यापुढे दिसतांना गुन्हा दाखल करून गांभिर्याने तपास करण्याचीही गरज वाटू नये ही बाब संशयास्पद आहे. घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी, आरोपी, फिर्यादी व संबंधीतांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यास या प्रकरणात नेमके कोण कोण गुंतले आहेत ? पोलीस कोणाच्या दबावात काम करीत आहेत ? याचा सहज उलगडा होऊ शकतो. घाटंजी पोलीस सदर घटनेत आरोपींना थेट पाठीशी घालत असल्याने वरिष्ठानीच या प्रकरणी तपास करावा अशी मागणी होत आहे. या घटनेतील ती अज्ञात मुलगी अद्यापही या टोळीतील सदस्यांच्याच ताब्यात असल्याची भिती आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील चोरांबा येथिल सपना गोपाल पळसकर ही सात वर्षाची मुलगी दस-याच्या दिवसांपासुन बेपत्ता आहे. त्यामुळे या घटनेतील मुलगी तिच तर नाही ना अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा अद्याप योग्य तपास केलेला नाही. तालुक्यातील काही राजकीय धेंड या प्रकरणी आपल्या हस्तकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने घाटंजी पोलीसांकडून नि:पक्ष तपास होईल याबाबत साशंकता आहे.

साभार :- देशोन्नती 


Saturday 17 November 2012

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी घाटंजी तालुक्यातून प्रातिनिधीक प्रतिक्रीया !



आम्ही ‘पोरके’ झालोय !

बाळासाहेब समस्त शिवसैनिकांसाठी वडीलांसमान होते. त्यांच्या जाण्याने प्रत्येक शिवसैनिक पोरका झालाय. मात्र त्यांचे ज्वलंत विचार आम्हाला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत राहिल. त्यांच्या विचारांशी ईमान राखत आम्ही अशीच वाटचाल करीत राहु. बाळासाहेबांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची व वैचारीकतेची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.
भरत दलाल
शिवसेना तालुका प्रमुख, घाटंजी


बाळासाहेबांच्या विचारांनीच खुप काही शिकविले

बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तीमत्व नव्हे तर एक झंजावात होते. त्यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत होऊन माझ्यासारख्या अनेक तरूणांनी त्या काळी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. केवळ बाळासाहेबांच्या तेजस्वी विचारांच्या बळावरच शिवसेनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्या विचारांमुळेच आज कोणापुढेही न झुकता भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देता येतोय.
मधुकर निस्ताने
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी



एका युगप्रवर्तकाचा अंत

कोणतेही सत्ताकेंद्र नसतांना स्वत:भोवती राजकीय, सामाजीक व वैचारीक वलय निर्माण करणारे बाळासाहेब म्हणजे एक युग होते. त्यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांचे विचार प्रखर होते. परिणामांची चिंता न करता ते आपले विचार प्रकट करायचे. बोललेल्या गोष्टीवर ठाम राहण्याचे सामथ्र्य खुप कमी राजकारण्यांमध्ये असते.
मोरेश्वर वातिले
सामाजीक कार्यकर्ता, घाटंजी

साभार :- देशोन्नती 


Friday 16 November 2012

घाटंजीच्या तिरूपती जिनींग मध्ये वजनकाट्यात तफावत

मनसेच्या हस्तक्षेपानंतर वजनकाटा बंद
कापसाच्या सौदा पट्टीतही खोडतोड

कापसाच्या खरेदीचा हंगाम जेमतेम सुरू झाला असतांना घाटंजीच्या तिरूपती कॉटन मॉडर्न जिनिंगमध्ये शेतक-यांची लुट करण्याचा सुरू असलेला कार्यक्रम मनसेच्या हस्तक्षेपामुळे उधळल्या गेला. 
शेतक-यांनी घरून मोजुन आणलेल्या वजनात व जिनिंगमध्ये केलेल्या मोजणीत वजनामध्ये सुमारे ४५ किलोची तफावत असल्याचे काही शेतक-यांच्या निदर्शनास आले. संबंधीतांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांना याबाबत कळविल्यावर त्यांनी जिनिंगमध्ये येऊन सर्वांसमक्ष वजनकाट्याची तपासणी करण्याची मागणी केली. मापारी व बाजार समितीच्या उपस्थितीत प्राथमिक तपासणी केली असता ४६ किलोची तफावत दिसुन आली. तसा पंचनामाही यावेळी करण्यात आला. मात्र काही कालावधी नंतर पुन्हा काट्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला त्यावेळी ही तफावत केवळ १ ते २ किलोंची होती. त्यामुळे बाजार समितीचा कोणता पंचनामा योग्य होता याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याचा आरोप धांदे यानी केला. 
जिनिंगच्या कर्मचा-याने वजनकाट्याला विशिष्ट ठिकाणी छेडछाड करताच वजनात असलेली तफावत अत्यंत कमी झाल्याचा आरोप शेतकरी व मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यावर संतापलेल्या जिनिंग मालकाने मी आता एकाही गाडीचा कापुस घेणार नाही. सगळ्या परत घेऊन जा अशी दर्पोक्ती केली. यावेळी मनसे कार्यकर्ते व जिनिंग मालक यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुद्धा झाली. बाजार समितीच्या मार्वेâट यार्डावर लिलाव झाल्यानंतर कापसासाठी ठरविण्यात आलेला भाव कापुस सौदा पट्टीवर लिहिण्यात येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोडतोड नियमानुसार करता येत नाही. मात्र व्यापारी व जिनिंग मालक बहुतांश शेतक-यांच्या सौदा पट्टीवरील ठरविलेला कापसाचा दर खोडून त्यामागे त्यापेक्षा कमी दर लिहितात. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप धांदे यांनीr केला. पुराव्यादाखल त्यांनी काही शेतक-यांच्या खोडतोड केलेल्या कापुस सौदा पट्या सुद्धा दाखविल्या.
केवळ तिरूपती कॉटन जिनिंगमध्येच नव्हे तर तिरूपती अ‍ॅग्रोसह ईतरही जिनिंगच्या वजनकाट्यांमध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी ही बाब गंभिरतेने घ्यावी अशी शेतक-यांची मागणी आहे. तांत्रिक बिघाडाच्या गोंडस नावाखाली होत असलेल्या शेतक-यांच्या फसवणुकीची तज्ञांमार्पâत चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांची प्रतिक्रीया घेतली असता सदोष वजनकाट्याची दुरूस्ती होई पर्यंत या जिनिंगमधील वजनकाटा बंद करण्यात आला असुन शेतक-यांची फसवणुक होणार नाही यासाठी दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

साभार :- देशोन्नती 

घाटंजी बाजार समितीच्या कापुस खरेदीचा शुभारंभ






येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापुस यार्डावर आज कापुस खरेदी तसेच शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचे हस्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला. 
या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, शंकर ठाकरे, संजय इंगळे, शाम बेलोरकर, नामदेव आडे, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, किशोर चवरडोल, विवेक भोयर, चंपत आत्राम, संजय निकडे, रफिक बाबु, वंदना जिभकाटे, लक्ष्मण पोतराजे, श्री.गवळी, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. मार्केट यार्डावर ईलेक्ट्रॉनिक काट्यांद्वारे मोजमाप पद्धतीचा अवलंब करून शेतक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धान्यासाठी नाफेडची खरेदी सुरू करण्यात बाजार समितीने पुढाकार घेतला असुन सि.सि.आय.च्या खरेदीसाठीही बाजार समिती प्रयत्नरत आहे. उल्लेखनिय म्हणजे कापुस व्यापा-यांना ५ लाख रूपये तर अडत्यांसाठी २ लाख रूपये बँक गरंटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतक-यांच्या सुरक्षिततेकरीता मापा-यांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. सेसबद्दल सुद्धा व्यापा-यांकडून आलेल्या अर्जावर धोरणात्मक निर्णय घेऊन शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळवुन देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांनी केले. यावेळी व्यापारी, अडते व शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

साभार :- देशोन्नती 


लखमाई ईण्डेन कडून गॅस ग्राहकांची पिळवणूक

संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा ईशारा

येथिल लखमाई ईण्डेन गॅस एजन्सी कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पिळवणुक होत असुन गॅस वितरणात गैरप्रकार होत आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
लखमाई ईण्डेनच्या वितरण प्रणालीमध्ये प्रचंड गलथानपणा होत असुन नोंदणी केल्यावरही गॅस सिलेंडर मिळत नाही. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये एजन्सी मार्पâत घरपोच गॅस पुरविण्याची सेवा बंद करण्यात आली आहे. या एजन्सीच्या अंजी मार्गावर असलेल्या गोदामावर पहाटे पाच वाजता पासुनच सुमारे एक किलोमिटर लांबपर्यंत सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली असते. या रांगेमुळे बहुतांश वेळा राज्य महामार्गावरील वाहतुकही विस्कळीत होत असुन ग्राहकांना जीव मुठीत घेऊनच येथे उभे राहावे लागते. मागणी व पुरवठ्याच्या बाबतीत एजन्सी मार्पâत योग्य सुसूत्रता पाळली जात नसल्यामुळे ग्राहकांना योग्य वेळी गॅस उपलब्ध होत नाही. ऐन सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याने वरिष्ठांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन लखमाई ईण्डेनच्या कारभाराची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. असे न झाल्यास संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा मार्ग स्विकारेल असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजेश उदार, राहुल खर्चे, प्रपुâल्ल अक्कलवार, नाना राठोड, दिपक महाकुलकर, प्रमोद टापरे, शितल कोवे उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती 



जिल्हास्तरीय मैदानी खेळात विकासगंगा संस्थेच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगीरी


नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धांमध्ये विकासगंगा सामाजीक संस्था, पांढुर्णा खुर्द ता.घाटंजी या संस्थेच्या चार खेळाडूनी उत्कृष्ट कामगीरी केली असुन त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. धावण्याच्या स्पर्धेत महिलांच्या खुल्या गटामध्ये माया भुरे हिने ४०० मिटर हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तर अश्विनी देठे ही १०० मिटर हर्डल्स मध्ये अव्वल आली. सपना वाढई, लक्ष्मी लेनगुरे यानी सुद्धा याच क्रिडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व खेळाडूंना तालुक्यातील राष्ट्रीय धावपटू राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले. विकासगंगा संस्थेने ग्रामिण भागातील विद्यार्थी व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी केलेला हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असुन क्रिडा क्षेत्राच्या वाढीला पोषक ठरणारा आहे असे मत धावपटू राजन भुरे यांनी व्यक्त केले. तसेच खेळाडूंना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी विकासगंगा संस्थेचे अध्यक्ष रणजीत बोबडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

साभार :- देशोन्नती 


रा.कॉ.च्या घाटंजी महिला तालुकाध्यक्षपदी चंद्ररेखा रामटेके


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घाटंजी महिला तालुकाध्यक्षपदी नगरसेविका चंद्ररेखा सुखदेव रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.मनोहर नाईक, आमदार संदिप बाजोरीया, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे (राऊत) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक तथा देशाचे कृषीमंत्री ना.शरद पवार यांचे विचार तळागाळातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी रामटेके यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारीणीत नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, शिक्षण सभापती राम खांडरे, आरोग्य सभापती संगिता भुरे, नगरसेविका इंदू परतेकी, नगरसेवक संजय राऊत यांनी केले आहे.

साभार :- देशोन्नती 


Sunday 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती