Pages

Sunday 29 July 2012

अन ते मुख्यमंत्र्यांची वाट बघतच राहीले.......!





गेल्या दोन तिन दिवसात ज्यांच्या येण्याच्या अपेक्षेने पुरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या ते मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सारेच येऊन गेले, सांत्वना केली, पोटाची आग तात्पुरती शमविली पण भविष्याचे काय? असा प्रश्न पडलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्री घाटंजी तालुक्यात येतिल अन मोडून पडलेल्या संसाराला मदतीचा हात देतील अशी वेडी अपेक्षा पुरात सर्वस्व गमावलेले ग्रामस्थ बाळगून होते. लोकांनी दिलेल्या मदतीवर कुठवर जगायचे? दानशुर लोक काही दिवस पोटाची सोय करतील. 
मात्र जगण्याच्या आधाराचे काय? डोक्यावर हक्काचे छप्पर कधी येणार? अशा एक ना अनेक समस्यांनी वेढलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या दौ-याकडून खुप आशा होती. आज सकाळी १० वाजेदरम्यान मुख्यमंत्री अकोलाबाजार व त्यानंतर मांजर्डा, बोरगाव (पुंजी), कोळी, पारवा या गावांना भेटी देऊन पुरग्रस्तांशी संवाद करणार होते. या दौ-यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. ज्या गावापर्यंत अद्याप पाणीही पोहचले नव्हते तेथे सकाळपासुनच पाण्याचे टँकर पोहचले. जेवण्याचीही सोय झाली. मुख्यमंत्री ज्या रस्त्यांनी जाणार ते रस्तेही निट करण्यात आले होते. मुख्यमंत्री येण्याची वार्ता येताच एवढा बदल होऊ शकतो तर ते आल्यावर आपल्या सर्व समस्याच निकाली निघतील अशी आशा अनेकांना होती. मात्र सारेच काही फसवे निघाले. कारण कोणतेही असो पण त्यांनी काही मिनिटांसाठी तरी यायला पाहीजे होते असे सर्वांनाच वाटले. त्यांच्या ऐवजी ना.राजेंद्र मुळक, प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, ना.शिवाजीराव मोघे, अ निलेश पारवेकर यांनी काही भागाचा आज दौरा केला मात्र मदत घेतांना फोटो काढुन काढुन थकलेल्या पुरग्रस्तांसाठी ते पुरेसे नव्हते. 
गाडी आली की नागरीक त्यातून कोण येतंय हे मोठ्या उत्सुकतेने पाहात होते. एवढा ऊहापोह झाल्यावर मुख्यमंत्री येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या गावाला मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजीत नव्हता तेथिल नागरिकही आपल्या खचलेल्या घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. 
आपले पांढरेशुभ्र कपडे वाचवित गावातील चिखल तुडवित आलेले ईतर काही नेते आपल्याला सल्ले देण्यापलीकडे काही करणार नाहीत याची तालुक्यातील पुरग्रस्तांना  खात्री होती. 
एवढ्या बिकट परिस्थितीत ते भेट देऊन गेले हीच एक समाधानाची बाब. मात्र त्यांच्या भेटीने साध्य काय केले हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. केवळ शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करू असे नेहमीचे आश्वासन पुरग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकणार नाही. यामध्ये ना.मनोहर नाईकांनी तालुक्यातील सर्व पुरग्रस्तांच्या विस दिवसांच्या जेवणाची घेतलेली ‘व्यक्तीगत’ जबाबदारी नक्कीच कौतुकास पात्र आहे. गृह तालुक्यातील नेत्यांना मात्र हे सुचले नाही. पुरग्रस्तांसाठी होणारी प्रत्येक मदत स्वागतार्ह आहे. मात्र ती देतांना होणा-या फोटोसेशनला थोडा आवर घातला तर मदत घेणा-यांचा स्वाभिमान दुखावणार नाही. आज मदत घेण्यासाठी पुढे येणा-या याच आपत्तीग्रस्तांकडे आपल्याला भविष्यात मतांची भिक मागायला जावे लागेल व तेव्हा ते फोटो काढण्याचा आग्रह करणार नाहीत. मग आता त्यांना मदतीचा हात देतांना प्रसिद्धीचा अट्टाहास का ? यावर सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.
साभार :- देशोन्नती 

Saturday 28 July 2012

पाणी ओसरले ; अन आता वेदनांची भरती

राजकारण्यांच्या भेटी फोटोसेशनसाठी
दानशुरांच्या मदतीवरच पुरग्रस्त अवलंबुन

जिंदगी बित जाती है ईक आशिया बनानेमे !!
पर हाय ए कुदरत; तरस नही खाती, बस्तीया उजाडनेमे !!
सिमेंट मातीच्या खोल्याना घर बनविण्यासाठी माणसाला आयुष्य वेचावे लागते, मात्र माणसावर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती क्षणात असे अनेक घरे जमीनदोस्त करते. अशावेळी काळाच्या पडद्याआड आपत्ती दडून जाते मात्र ती निघुन गेल्यावरही वेदना कायम राहतात. याची प्रचिती जिल्हावासियांना आज होत आहे.
अनेक दिवस चातकासारखी ज्या पावसाची सर्वजण वाट पाहात होते तो अचानक २२ जुलै रोजी अवतरला. मात्र सुजनाचे प्रतिक असलेल्या या पावसाने आपले विध्वंसक रूप घेतल्याने सारेच काही गंगेला मिळाले अशी परिस्थिती घाटंजी तालुक्यातील हजारो पुरग्रस्तांवर ओढवली आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडाले, कवडी कवडी जमवुन बांधलेले घर क्षणार्धात कोसळले.  खाण्याची सोय नाही, पाण्याने सर्वस्व नेले मात्र आता प्यायलाही पाणी नाही, अंगावरचे कपडेच तेवढे शिल्लक राहिलेत. त्यामुळे आता घालायचे काय हा मोठा प्रश्न. अख्खे गावच पाण्याखाली गेल्याने आता झोपायचे कोठे ही समस्याही आ वासुन उभी. अशी भिषण परिस्थिती गेल्या अनेक वर्षात प्रथमच घाटंजी तालुक्यावर ओढवली आहे. शासकीय यंत्रणेची ईतर मदत तर सोडाच पण बहुतांश गावांमध्ये शासनाचे पाणीही पोहचले नाही. सारेच राजकीय नेते, मंत्री, आमदार येऊन सांत्वना करून गेले. मात्र त्यांची सांत्वना व तोकडी मदत ही केवळ फोटोसेशन करण्यापुरतीच असल्याचे आता निदर्शनास येत आहे. सर्व आपदग्रस्त केवळ दानशुरांनी पुरविलेल्या अन्न पाण्यावरच जगत आहेत. नैसर्गीक आपत्तीग्रस्तांना देण्यात येणारी सानुग्रह राशी सुद्धा अजुन पर्यंत एकाही कुटूंबापर्यंत पोहचली नाही. 
सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली.
कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज चुकीचा असुन प्रत्यक्षात झालेली हानी प्रचंड आहे. या सर्वेक्षणातही राजकारण शिरण्याची भीती असुन आपल्या राजकीय फायद्यासाठी स्थानिक नेते आपापल्या जवळच्या लोकांची नावे यामध्ये घुसविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण राजकारण विरहीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
अनेक गावांना जोडणारे नदी नाल्यांवरील पुल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने त्या गावांचा संपर्वâच तुटला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप या दुष्टीने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
पावसात उध्वस्त झालेल्या सर्व गावांमध्ये इतर गावांमधुन तसेच घाटंजी शहरातुन शिजवलेले अन्न, कपडे व ईतर साहित्य पुरविण्यात येत आहे.
अमोल राऊत


साभार :- देशोन्नती 

Friday 27 July 2012

शिवणी प्रा.आ.केंद्रात गावगुंडाचा धुमाकूळ

महिला कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला
कार्यालयातील सामानाची प्रचंड तोडफोड

तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातीलच एका गुंड प्रवुत्तीच्या युवकाने प्रचंड धुमाकुळ घातल्याने आरोग्य कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वुत्त असे की, काल ( दि.२४) ला रात्री ९ च्या सुमारास संदिप श्रावण जाधव हा युवक जखमेवर पट्टी बांधण्याचे कारण सांगून आरोग्य केंद्रात आला. संबंधीत विभागाचे कर्मचारी वाघाडे त्याला पट्टी करण्यासाठी गेले असता त्याने अश्लिल शिवीगाळ केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने कार्यालयात तोडफोड करण्यास सुरूवात केली. 
टेबल, खुर्च्या, खिडक्यांची तावदाने फोडली. औषधांची फेकाफेक करण्यास सुरूवात केली. ही आरडाओरड ऐकुन परिचारीका कुसूम मानकर व कुसूम वेट्टी बाहेर आल्या. सदर युवकाने त्यांनाही अश्लिल शिवीगाळ करण्यास केली. कुसूम मानकर या अपंग परिचारीकेला मारहाण केली. वायरच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना थापडा मारून ढकलुन दिले. वेट्टी यांनाही त्याने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा कर्मचा-यांच्या निवासस्थानाकडे वळविला. निवासस्थानाच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्या मारून आतील सामानाची  फेकाफेक  केली. वैद्यकीय अधिका-याच्या निवासस्थानाबाहेरही त्याने असाच धुमाकूळ घातला. या संपुर्ण प्रकाराने धास्तावलेल्या कर्मचा-यांनी घाटंजी पोलीस स्टेशन व वरिष्ठांना याबबत कळविले. शिवणी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन गेडाम हे त्यावेळी बाजुच्या गावात साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. 
त्यांनी लगेच आरोग्य केंद्र गाठले. तसेच घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. मात्र तोवर सदर आरोपी तेथुन पसार झाला होता. घाटंजी पोलीसांनी त्याचेविरूद्ध अप.क्र.५५/०१२ कलम ३३२, ३५३, २९४, ५०६, ४२७ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र लगेच त्याची जामिनावर मुक्तताही करण्यात आल्याची माहिती आहे. या गावगुंडाविरोधात पंधरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकामाची तोडफोड करून सरपंच व ग्रामसेवकाला धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याचेविरूद्ध पोलीसांनी मवाळ भुमिका घेतली होती. हा युवक गावात नेहमीच अशा प्रकारचा धिंगाणा घालीत असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस विभाग त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपुर्ण प्रकारामुळे कर्मचारी भयभीत झाले असुन अशा हिंसक प्रवुत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Thursday 26 July 2012

घाटंजी तालुक्यात पावसाचे भिषण तांडव

२ हजार कुटूंबांना पुराचा फटका
अडीच हजार हेक्टरवरील पिक वाहुन गेले
कोट्यवधींचे नुकसान









गेल्या दोन दिवसांपासुन घाटंजी तालुक्यात कोसळत असलेल्या संततधार पावसाने तब्बल अडीच हजार हेक्टर शेतातील पिके खरडून नेली. तर सुमारे २ हजार कुटूंबे पावसाच्या तडाख्याने बेघर झाली आहेत.या पावसामुळे तालुक्यात कोट्यवधी रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या पाण्यात ९ जनावरे वाहुन गेली तर १ हजार १०३ घरे अंशत: व ९०५ घरे पुर्णपणे उध्वस्त झाले. दि.२२ जुलैच्या रात्री पासुन सुरू झालेल्या संततधार पावसाने संपुर्ण घाटंजी तालुक्यात धिंगाणा घातला. अनेक गावांना पुराचा फटका बसला. काही गावे तर पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथिल नागरिकांना जंगलात रात्र काढावी लागली. घरातील साहित्य, कपडे, धान्य व पावसाची वाट पाहात राखुन ठेवलेले बि.बियाणे, रासायनिक खतेही पावसाने वाहुन नेली. सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली. कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घाटंजी शहरातील काही नेहरू नगर, घाटी, पांढुर्णा रोड, आनंद नगर मधील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथिल  राहिवाशाना न.प.शाळा, गजानन महाराज मंगल कार्यालय, सोनु मंगलम, पंजाबी लॉन, न.प.सांस्कृतिक भवन या ठिकाणी हलविण्यात आले. येथे या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व  नगरसेवक, व्यापारी व सामाजीक कार्यकर्त्यांनी केली. कोळी बु. हे गाव अडाण नदीच्या काठी असल्याने या गावाला पुराचा सर्वाधीक फटका बसला. संततधार पावसामुळे अडाण नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले व पाहता पाहता संपुर्ण गाव पाण्याखाली गेले. त्यामुळे येथिल नागरीकांना गावालगत असलेल्या आश्रमशाळेत आश्रय घ्यावा लागला. शिरोली येथिल नागरीकानी पुरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पुरविले. तर विलास निलावार यांनी या नागरीकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या वेळकाढु धोरणामुळे शासकीय मदत मात्र वेळेवर पोहचली नसल्याची माहिती आहे.. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितीन राऊत, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी या भागांचा दौरा केला. उपविभागीय अधिकारी एस.ए.खांदे, तहसिलदार प्रकाश राऊत हे देखिल गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करीत आहेत. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानाचा शासकीय अंदाज व प्रत्यक्षात झालेले नुकसान यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप न होऊ देता वास्तविक नुकसानाचे सर्वेक्षण केल्या जावे अशी मागणी होत आहे.

Saturday 21 July 2012

उपविभागीय कार्यालय घाटंजीतच करण्याची सर्वस्तरातून मागणी


नव्याने होऊ घातलेले उपविभागीय कार्यालय घाटंजीमध्येच व्हावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे. राजकीय पक्ष, सामाजीक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार, कर्मचारी अशा सर्वच स्तरातून या मागणीला मोठा पाठींबा मिळत असुन अनेकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयामार्फत संबंधीतांना पाठविले आहे. तसेच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ग्राहक पंचायत, विदर्भ जन आंदोलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, प्राऊटीस्ट ब्लॉक इंडीया, विद्यार्थी संघटना तसेच अनेक कार्यकत्र्यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
सध्या घाटंजी तालुका पांढरकवडा उपविभागीय कार्यालयाशी संलग्न आहे. तर नव्याने होणा-या उपविभागात घाटंजीला आर्णीशी जोडून आर्णीमध्येच महसुल उपविभागीय कार्यालय स्थापन होण्याची शक्यता आहे. घाटंजी तालुक्यातील नागरिकांसाठी आर्णी अत्यंत गैरसोयीचे ठरणार असुन प्रशासकीय दृष्टीने सक्षम असतांना घाटंजीला डावलल्या जात असल्याबद्दल तालुक्यात प्रचंड संताप आहे. यापुर्वीही नव्यानेच स्थापन झालेल्या विधानसभा मतदार संघाला आर्णी विधानसभा मतदार संघ असे नामकरण करून घाटंजी तालुक्यावर अन्याय करण्यात आला. घाटंजी तालुका १९८१ मध्ये स्थापन झालेला आहे. तर घाटंजीत १९४८ पासुन नगर परिषद अस्तित्वात आहे. घाटंजी तालुक्यात जवळपास सर्वच शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये, जिल्ह्यात एकाच ठिकाणी असलेले केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, विवीध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले अग्रगण्य औद्योगीक केंद्र तसेच सामाजीक क्षेत्रात नावाजलेल्या स्वयंसेवी संस्था आहेत. घाटंजी शहर हे पांढरकवडा व आर्णी शहराच्या मध्यभागी असल्याने ईतर दोन्ही तालुक्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. 
त्यामुळे उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी तालुक्यातून होत असुन अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा अनेक संघटनांनी दिला आहे.


उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी घाटंजी बंद

प्रस्तावीत उपविभागीय कार्यालय घाटंजी शहरातच व्हावे या मागणीसाठी घाटंजीतील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील व्यापा-यांची मोर्चा काढुन बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आर्णी पेक्षा जास्त सोयीस्कर असुन देखिल घाटंजीला डावलुन नव्याने होत असलेल्या महसुल उपविभागाचे कार्यालय आर्णी मध्ये स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे कार्यालय आर्णीला झाल्यास घाटंजी तालुक्यातील ग्रामिण जनतेला प्रचंड आर्थिक व मानसिक ताण सोसावा लागणार आहे. त्यामुळे घाटंजी तालुक्यातील काही पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, सामाजीक कार्यकर्ते तसेच विवीध संघटनांनी यापुर्वीच याबाबत निवेदने दिली आहेत.
आज घाटंजीतील व्यापारी व अनेक नागरीकानी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुक, शैक्षणीक प्रतिष्ठाने व जिवनावश्यक वस्तुंच्या व्यवसायांना या बंद मधुन वगळण्यात आले होते.
साभार :- देशोन्नती 


घाटंजी बाजार समितीच्या गोदामावर व्यापा-यांचा कब्जा

मनसेच्या धडकेत पितळ उघडे



शेतक-यांचे धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फक्त व्यापा-यांचीच धान्य पोती ठेवून असल्याचे सत्य मनसेने धान्य यार्डावर दिलेल्या धडकेत समोर आले.
काही शेतक-यांच्या तक्रारीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी कार्यकत्र्यांसह धान्य यार्डावर जाऊन पाहणी केली असता शेतमाल तारण योजनेचे धान्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामात नामदेव आडे व अविनाश भुरे या व्यापा-यांच्या मालकीचे सुमारे ७५० धान्याची पोती या गोदामात असल्याचे आढळले. तसेच इतरही गोदामात फक्त व्यापा-यांचाच माल ठेवून असल्याचे निदर्शनास आले. उल्लेखनिय म्हणजे नामदेव आडे हे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. ते स्वत:च बाजार समितीच्या गोदामावर कब्जा करीत असतील तर शेतक-यांनी आपले धान्य कुठे ठेवायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 
जे गोदाम शेतक-यांनी आणलेले धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणे अभिप्रेत आहे तिथे व्यापारीवर्ग जागा काबिज करून ठेवत असल्याने शेतक-यांची प्रचंड हेळसांड होते. बाजार समिती प्रशासनही व्यापारी व त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते यांच्या दबावाखाली राहुन व्यापा-यांना खुली सुट देत असल्याचे दिसुन येत आहे.
शेतक-यांच्या गोदामावर मालकी हक्क समजणारे बाजार समितीचे संचालक नामदेव आडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोणतेही भाडे न देता गोदाम वापरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रशांत धांदे यांनी यावेळी केली.
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांना विचारणा केली असता शेतक-यांचा माल सध्या उपलब्ध नसल्याने काही व्यापा-यांना दोन महिन्यांसाठी या गोदामात धान्य ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची बाब त्यांनी कबुल केली.
मात्र शेतक-यांची तक्रार असेल तर तिन चार दिवसात गोदाम रिकामे करून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगितले. घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले की, व्यापा-यांमध्ये स्पर्धा टिकवून ठेवण्याकरीता समितीला अनेकदा परिस्थितीनुरूप लवचिक धोरण अवलंबावे लागते. मात्र हे करतांना शेतकरी डावलल्या जातात हा आरोप साफ चुकीचा आहे. व्यापारी असतील तरच शेतक-यांचा माल योग्य दरात विकल्या जाईल. व्यापा-यांना झिडकारून चालणार नाही असे ते म्हणाले. शेतक-यांच्या मालाची आवक नसल्याने व व्यापा-यांनी विनंती केल्याने काही कालावधीसाठी गोदाम देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती 

Friday 13 July 2012

घाटंजी न.प.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा ‘तो’ ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविला अवैध

सार्वजनिक उपक्रमाची जागा प्रार्थनास्थळाला दिल्याचे प्रकरण
मुख्याधिका-यांच्या भुमिकेवरही ताशेरे

नगर परिषद निवडणुक डोळ्यापुढे ठेवुन ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाची जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला देण्याबाबतचा घाटंजी न.प.चा वादग्रस्त ठराव जिल्हाधिका-यांनी अवैध ठरवुन तहकुब केला.
येथिल दत्ता बापुराव दातारकर व ईतर तिघांनी नगर परिषदेच्या या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी जलाराम प्रभाग क्रं.१ मधील बापुराव खांडरे यांच्या ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाकरीता असलेली खुली जागा प्रार्थनास्थळाकरीता दिली होती. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अंतर्गत ८ डिसेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पटलावर नसतांना अध्यक्षांच्या परवानगीने हा ठराव मांडून पारित करण्यात आला. यानुसार वात्सल्य बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रार्थनास्थळासाठी ही जागा मंजुर करण्यात आली होती. मात्र परिसरातील मुलांना खेळण्यासाठी अथवा ईतर सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला दिल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या.
तसेच जिल्हाधिका-यांकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड कोडापे यांनी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रं.२ व न.प.मुख्याधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी व कार्यवाही स्थगीत ठेवण्याबाबत युक्तीवाद केला. न.प.ने ही जागा देतांना त्या परिसरातील भुखंडधारकांची संमती घेतली नव्हती. तसेच खुली जागा ज्या कारणासाठी दिली जावी त्यासाठी न देता विशिष्ट समाजाच्या धार्मिक कारणास्तव देण्यात आल्याने बांधकाम उपविधी व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिका-यांनी या आदेशास स्थगिती दिली. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदेने जिल्हाधिका-यांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात ले आऊटमधील जागेच्या १० टक्के जागा सार्वजनिक उपक्रमासाठी अनुज्ञेय असुन प्रार्थना स्थळाला देणे अपेक्षीत नाही असे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच हा ठराव पारित करतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे कबुल केले आहे.
मुख्याधिका-यांनी सदर आदेश पारित करतांना ठरावातील सर्व बाजु नियमातील तरतुदीस धरून पडताळून पाहिल्या नसल्याने हा आदेश अवैध ठरत असल्याचे जिल्हाधिका-यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे. शिवाय विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाकरीता सार्वजनिक उपक्रमाची जागा दिल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. 
घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी केवळ न.प.निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा ठराव घेतला होता. त्यावेळी देशोन्नतीने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर ठराव त्या काळात नगर परिषदेने घेतले असुन त्याची सविस्तर चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीला पारवा पोलीसांचे संरक्षण

तक्रार होऊनही गुन्हा दाखल नाही

कौटुंबिक वादातून सोळा वर्षीय युवतीस शिविगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीविरूद्ध पारवा पोलीसांनी अद्याप कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
पारवा पोलीसांच्या या मनमानी कारभाराबाबत फिर्यादींनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. गुन्ह्याची तिव्रता दडपण्यात हातखंडा असलेल्या ठाणेदार पंजाब वंजारे यांनी या प्रकरणात आरोपीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता ‘मर्ग’ नोंद करण्याची किमया केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छाया संजय राठोड (१६) रा.भंडारी ता.घाटंजी ही युवती दि.८ जुलै रोजी विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी विनोद मोहन जाधव याने कौटुंबिक वादातून सदर युवतीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तिने विष प्राशन केले. प्रकृती गंभिर झाल्याने तिला आर्णी ग्रामिण रूग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभिर असुन तिचेवर उपचार केल्या जात आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पारवा पोलीसांनी घटनेची चौकशी न करता मर्ग दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या युवतीचे अद्याप बयाण देखिल नोंदविण्यात आले नाही असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 
घटनेतील आरोपीची पत्नी मिरा विनोद जाधव ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या युवतीची आत्या आहे. विनोद जाधव हा त्याच्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याने ती माहेरी राहात आहे. पतीकडून होत असलेल्या छळाबाबत तिने याआधी पारवा पोलीस स्टेशनमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०१० व १७ नोव्हेंबर २०१० रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पारवा पोलीसांनी सदर आरोपीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही हे विशेष. 
सावळी येथे कार्यरत ‘गणेश’ नामक पोलीस शिपाई या आरोपीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप होत आहे. पारवा ठाणेदाराचा ‘वसुली अधिकारी’ म्हणुन परिचीत असलेल्या या गणेशने आजवर या आरोपीवर गुन्हा दाखल होऊ दिल्या नसल्याचेही बोलल्या जात आहे. 
महिन्याभरापुर्वीच सव्वा लाखांची चोरी ७० हजारात दडपण्याचा प्रकार ठाणेदार पंजाब वंजारेनी केला होता. तर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल न करता चक्क ‘मर्ग’ नोंद करण्याचे ‘धाडस’ त्यांनी दाखविले आहे. आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती 




घाटंजी पं.स.चे संजय पवार यांना उत्कृष्ट कृषी अधिकारी सन्मान



येथिल पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कृषी अधिकारी संजय पवार यांना कृषीदिनी उत्कृष्ट कृषी अधिकारी म्हणुन सन्मानीत करण्यात आले. 
यवतमाळ येथिल वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रोतुगृहात कृषीदिनानिमित्य आयोजीत एका भव्य समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख होते. तर उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा कृषी अधिक्षक काशिनाथ तरकसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमोद यादगिरवार, कृषी विकास अधिकारी अनिल इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संजय पवार यांनी घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने सजग राहुन कार्य केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम, शाखा अभियंता आर.एच.लभाने, कृषी विस्तार अधिकारी राहुल डाखोरे, कार्यालय अधिक्षक  श्री. लतिफ, विस्तार अधिकारी योगेश उडाखे, डॉ.विलास देशमुख, ए.के.राजुरकर यांचेसह पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी वर्गाने कौतुक केले आहे.
साभार :- देशोन्नती 




Tuesday 3 July 2012

संगिता भुरे यांचे विशारद पुर्ण परिक्षेत सुयश


अखिल भारतील संगित गांधर्व मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायन वादन परिक्षेत नगरसेविका संगिता अरविंद भुरे यांनी उल्लेखनिय  यश संपादन केले. येथिल कलाश्री संगित वर्गाच्या विद्यार्थीनी असलेल्या सौ.भुरे यांनी संगित क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या ‘संगित विशारद’ या गायन परिक्षेत ७० टक्के गुण मिळवुन विशारद पुर्ण ही परिक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली. 
शिवाय कलाश्री संगित क्लासेसचे सुमारे ४२ विद्यार्थी सुद्धा या परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन त्यापैकी ३० विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या सर्वांना कलाश्रीचे संगित शिक्षक दिलीप हेमके यांचे मार्गदर्शन मिळाले.
साभार :- देशोन्नती 

नाणेटंचाईमुळे व्यावसायीक व ग्राहकांना मनस्ताप

स्टेट बँकेने नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

दैनंदिन व्यवहारात महत्वपूर्ण असलेल्या नाण्यांची टंचाई घाटंजी तालुक्यात सर्वच ठिकाणी निर्माण झाली आहे. परिणामी टंचाईचे कारण पुढे करून ग्राहकांची लूट होत आहे. व्यापारी वर्गाकडून सक्तीने सुट्या पैशांसाठी अनावश्यक वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत.गेल्या चार ते पाच वर्षांपुर्वी बाजारपेठ व बँक व्यवहारात नाण्यांचा सुकाळ पहावयास मिळत होता. यानंतर देशभरात एक रुपयांत बोला अशी सुविधा क्वॉईन बॉक्सवर आल्याने या व्यवहारात वेगाने वाढ झाली. परिणामी नाण्यांची टंचाई भासू लागली. पण आता मोबाईलच्या एक पैसा एक सेकंद अशा विविध सवलती योजनांमुळे क्वॉईन बॉक्स व्यवसाय अडचणीत येऊन बंद झाल्याने बॉक्समध्ये पडणारी नाणी व्यवहारातून हद्दपार झाली आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेकदा नाण्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी, हॉटेल चालकांची पंचाईत झाली आहे. सध्या बाजारपेठेत १,२,५ रुपयांच्या नाण्यांची टंचाई असून अनेक ठिकाणी सक्तीने अनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच ते अडचणीचे ठरत आहे. प्रवास करतांना तिकिट काढल्यानंतर सुटे पैसे उतरतांना मागून घ्या, असे वाहकाकडून सांगण्यात येते. अनेकदा प्रवासी कामाच्या गडबडीत तसेच उतरुन जातात, तर काहीजण एक-दोन रुपये मागण्यात कुठे वेळ घालवायचा म्हणून पैसे न घेताच जातात. याचा फायदा वाहकांना होतो. एकेकाळी सक्तीने नाणी दिली जायची. असे असतांना आता असणारी भरमसाठ नाणी गेली कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
स्टेट बँकेकडून नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासुन स्टेट बँकेतही नाणे उपलब्ध होत नसल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. नाणे टंचाईमुळे सुट्या पैशासाठी व्यावसायीकांचे ग्राहकांशी होणारे वाद आता नेहमीचे झाले आहेत. मात्र यामुळे व्यवसायावर तसेच ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. स्टेट बँकेने व्यापा-यांना नाणे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करावी अशी आग्रही मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
साभार :- देशोन्नती 

पारवा पोलीसांना अवैध दारू विक्रेत्यांचा पुळका

दारू विक्रीची तक्रार करणा-यांना ठाण्यात दमदाटी

तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला अवैध दारू विक्रेत्यांशी एवढी सहानुभूती निर्माण झाली आहे की, गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार करणा-यांना चक्क पोलीस ठाण्यात बोलावुन दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या प्रकाराने चिडलेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह सावळी सदोबा पोलीस चौकीवर धडक दिली. याबाबत विस्तृत वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी कापेश्वर येथिल ग्रामस्थांनी गावातील दोन अवैध दारू विक्रेत्यांविषयी ग्रामसभेत तक्रार केली. पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले. मात्र अवैध व्यावसायीकांना पाठिशी घालणा-या पारवा पोलीसांनी तक्रारकर्त्यांनाच गोत्यात आणण्याची खेळी केली. ज्या अवैध दारू विक्रेत्यांची ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्यांच्याकडून पोलीसांनी त्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार घेतली. तसेच चार ते पाच ग्रामस्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन, ‘तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही दारू विक्रेत्यांना विरोध केल्यास ते सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे तक्रार करू नका’ असा धमकीवजा सल्ला पारवा पोलीसांनी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. योग्य बाबीची तक्रार केल्यावर पोलीस दारू विक्रेत्यांची बाजु घेऊन ग्रामस्थांना धमकावत असल्याचे लक्षात येताच उमरी कापेश्वर येथिल शेकडो गावक-यांनी थेट सावळी सदोबा पोलीस चौकी गाठुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिल्याने अवैध व्यावसायीकांचे धारिष्ट्य वाढले आहे. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपुर्वीच विशेष शाखेने पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. परंतु ग्रामिण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाहतुक व  तत्सम व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत बिनदिक्कतपणे सुरू आहे. वरिष्ठांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती