Pages

Saturday 30 June 2012

फेसबुकवर वावरतांना ‘ज्ञान’ व ‘भान’ ठेवण्याची गरज


कोणत्याही गोष्टीचे पुर्ण ज्ञान असल्याशिवाय तिचा वापर करतांना झालेली चुक कशी घोडचुक ठरू शकते याचा प्रत्यय दारव्ह्यातील घटनेतून दिसुन येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे नक्कीच श्रेयस्कर आहे. मात्र ते करतांना त्यातील प्रत्येक बाबीचे किमान प्राथमिक ज्ञान व विवेक असणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजीक संपर्काचे एक प्रभावी माध्यम ठरलेले ‘फेसबुक’ आता मोठ्या शहरापासुन थेट ग्रामिण भागापर्यंतही पोहचले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व आपले आचार विचार इतरांशी ‘शेअर’ करण्यासाठी फेसबुक व तत्सम सामाजीक संकेतस्थळांची उपयुक्तता निश्चितच जास्त आहे. त्यामुळेच प्रस्थापीत माध्यमांनाही त्याची गरज भासत आहे. मात्र ज्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टीने चांगला वापर होऊ शकतो तितकाच त्याचा वाईट गोष्टींसाठीही वापर होतो असा अनुभव आहे. सामाजीक संकेतस्थळांवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे तणाव निर्माण होण्याची दारव्ह्याची घटना पहिलीच नव्हे. किंबहुना अशा वादग्रस्ततेमुळेच ही सामाजीक संकेतस्थळे सर्वांच्या परिचयाची झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरूवातीला ऑर्कुट व आता फेसबुक अशा वादाचे कारण ठरत आहे. विकृत मानसिकता व माहितीचा अभाव हेच अशा तणावाचे कारण आहे. 
कुठल्यातरी एका विकृत डोक्यातून नको ती गोष्ट बाहेर येते. त्याचे प्रदर्शन तो चक्क सामाजीक संकेतस्थळावरच करतो. अन त्या गोष्टीला एखादी समविचारी प्रवृत्ती अनावधानाने अथवा खोडसाळपणाने ‘लाईक’ करते. त्यामुळे भडकलेल्या व प्रसंगी भडकविण्यात आलेल्या भावनांमुळे तणाव निर्माण होतो. खरं तर फेसबुकवरील फोटो, पोस्ट, लिंक हे लाईक करणे किंवा त्यावर प्रतिक्रीया देणे ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे. सेकंदाला कोट्यवधी वेळा होणा-या या क्रियेपैकी एका क्रियेसाठी संपुर्ण शहरात तणाव निर्माण व्हावा हे कितपत योग्य आहे याचा विचारही व्हायला हवा. याचा अर्थ असा मुळीच नाही की दारव्ह्यातील त्या दोन विक्षिप्तांनी केलेली कृती समर्थनिय आहे. कोणाच्याही भावनांना तडा जाईल अशी कृती कधीच योग्य ठरू शकत नाही. मात्र सद्यस्थितीत फेसबुक सारख्या माध्यमांचा होत असलेला चुकीचा वापर लक्षात घेता त्याबाबत समाजाने संयमाने वागण्याची गरज आहे. फेसबुकवर आपण स्वत: जरी आक्षेपार्ह मजकुर टाकला नाही तरी इतर कोणी टाकलेल्या मजकुराला लाईक, टॅग, शेअर करणे म्हणजे एकप्रकारे आपण सुद्धा त्याच विचाराचे आहोत हे आपसुकच दर्शविते. त्यामुळेच संकेतस्थळांवर वावरतांना आपण काय करतोय याचे भान असणे गरजेचे आहे. अशा मजकुराला ‘लाईक’ अथवा तत्सम कृती करणारा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या दोषी ठरेलच असे नाही. परंतू भडकलेल्या भावना कोणाचीच गय करीत नाहीत हे आपल्या समाजाचे वास्तव आहे.
त्याचप्रमाणे सगळेजण वापरतात म्हणुन आपणही वापरायचे अशा मानसिकतेतून सामाजीक संकेतस्थळांचा वापर करणा-या तरूणाईला सुद्धा आता जागरूक राहण्याची गरज आहे. अनेक तरूणी या संकेतस्थळांवर आपली छायाचित्रे टाकतात. त्यापैकी बहुतांश तरूणी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्विकारतांना समोरचा व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे अथवा नाही याचाही विचार करीत नाही. याचा परिणाम अनेकदा विचित्रच होतो. काही विक्षिप्तांकडून त्याचा गैरवापर होतो अन त्याचा शेवट मनस्तापात. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा वापर करतांना त्याचे पुरेपूर ज्ञान व संयमी मानसिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा क्षुल्लक गोष्टीतून मोठा भडका होणे अटळ आहे. 
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 


Thursday 28 June 2012

ग्रा.पं.पोटनिवडणुकीत सुरेश लोणकरांना धक्का


नुकत्याच झालेल्या शिरोली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर समर्थीत उमेदवाराचा पराभव झाला. तर आमदार निलेश पारवेकर यांचे समर्थक असलेले शिरोलीचे सरपंच अरविंद महल्ले यांच्या गटाचे उमेदवार अमोल मोतीराम पेंदोर हे १८ मतांनी निवडून आले. त्यांनी सुरेश लोणकर यांच्या गटाच्या संतोष वसंत सोयाम यांचा पराभव केला. पेंदोर यांना १५३ तर सोयाम यांना १३५ मते मिळाली. शिरोलीचे उपसरपंच रमेश धुर्वे हे पंचायत समिती सदस्यपदी निवडून आल्याने त्यांनी ग्रा.पं.सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणुक झाली. नुकतीच सुरेश लोणकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र त्यांच्या स्वत:च्या गावातच ग्रा.पं.पोटनिवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
साभार :- देशोन्नती 

महिला शेतक-याच्या नावाने परस्पर उचलले विहीरीचे अनुदान


रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर न खोदताच विहीरीचे अनुदान लाटल्याचा प्रकार तालुक्यातील टिटवी येथे उघडकीस आला. मौजा टिटवी येथिल गट क्र.१०७/५ या शेतात महिला शेतकरी पंचफुला किसन आत्राम यांच्या नावाने परस्पर अनुदान उचल करण्यात आल्याबाबत काही ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुषंगाने नायब तहसिलदार एस.ए.जयस्वाल यांचेसह मंडळ अधिकारी, तलाठी यांनी सदर शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे विहिरीचे खोदकाम झाल्याचे आढळले नाही. उल्लेखनिय म्हणजे हे शेत ज्या आदिवासी महिलेच्या नावाने आहे तिला विहीर अथवा त्यासाठी मिळालेल्या अनुदानाबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. पंचायत समितीच्या अभियंत्याच्या संगनमताने ही फसवणुक करण्यात आल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेतामध्ये पंचनामा करण्यात आला. यावेळी उपसरपंच प्रमोद गंडे, किशोर कळसकर, किसन आत्राम, वामन हजारे, प्रकाश काळे, गोपाल उमरे यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांचेशी संपर्क केला असता त्यांना सदर विहिर कोणत्या योजनेतील आहे, त्यासाठी देण्यात आलेले अनुदान किती याबाबत कोणतीही माहिती नव्हती. संबंधीतांना विचारून माहिती सांगतो असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले.
साभार :- देशोन्नती 


राज्य माहिती आयोगाची वनविभागास चपराक


वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय घाटंजी अंतर्गत वनपाल बी.आर.पवार यांच्या कार्यकाळात विदर्भ पाणलोट विकास मिशन अंतर्गत झालेल्या कामाची माहिती उशिरा दिल्याबद्दल वनपालावर कार्यवाही तर अपीलीय अधिका-याला अर्जदारास ३ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले. येथिल दिनकर मानकर यांनी सहाय्यक वनसंरक्षक पी.एस.वगारे तथा जनमाहिती अधिकारी, यवतमाळ यांचेकडे दि.१८ जानेवारी २०१० रोजी माहितीसाठी अर्ज केला होता. विहित मुदतीत माहिती देणे बंधनकारक असतांनाही संबंधीतांनी ११ महिन्यानंतर माहिती दिली. त्यामुळे अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक माहिती अधिकारी तथा वनपाल बी.झेड.पवार यांना कलम २०(२) नुसार दोषी ठरवून त्यांचे विरोधात ३ महिन्यांचे आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करणा-या प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपवनसंरक्षक यवतमाळ यानाही या प्रकरणात दोषी ठरवुन अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल ३ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहीती आयुक्त भास्कर पाटील यांनी दिले आहेत.
साभार :- देशोन्नती 

सर्वोच्च भारतीय निवडण्याची जनमत चाचणी रद्द करा

आंबेडकरी युवा मंचाची मागणी

सी.एन.एन. आय.बी.एन. व हिस्ट्री १८ या वाहिन्यांवर १९४७ नंतर महात्मा गांधी यांच्या नंतरचे सर्वोच्च भारतीय ही जनमत चाचणी घेण्यात येत आहे. एका राष्ट्रीय व्यक्तीमत्वाची आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इतर व्यक्तीमत्वांची निवड करण्याची ही दोषपुर्ण जनमत चाचणी रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन येथिल आंबेडकरी युवा मंचच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. असा प्रकार जगात प्रथमच होत आहे. यामुळे इतर महापुरूषांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकारामुळे सामाजीक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या चाचणीमुळे समाजात अनावश्यक वैचारीक संघर्षाला खतपाणी घातल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या जनमत चाचणीवर तातडीने निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Monday 25 June 2012

वनविभागाच्या इमारतीचे ना.मोघेंच्या हस्ते लोकार्पण

तालुक्यातील वाढोणा(खु) येथे 'कॅम्पा' अंतर्गत वनविभागाची इमारत आणि सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतीचे  उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते नुकतेच झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशीक) डॉ. दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडाचे उपवनसंरक्षक अ.पा. गि-हेपुंजे, जि. प. सदस्य योगेश पारवेकर, देवानंद पवार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष इकलाख खान पटेल, पं.स. सभापती शैलेश इंगोले, रफिक पटेल,  स्वामी काटपेल्लीवार,  संजय आरेवार, रूपेश कल्यमवार, किशोर दावडा, प्रजय कडू पाटील, रमेश आंबेपवार, शालिक चवरडोल आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि वनविभागाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
रामू पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, राजू निकोडे, श्रीकांत देशमुख, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, नायब तहसीलदार जयस्वाल, बाबाराव उदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन दीपक महाकुलकर, प्रास्ताविक पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मणराव गाडे तर आभार प्रदर्शन चिखलवर्धाचे वनरक्षक शांतीदूत मुळे यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराम उईके, भाऊराव कोवे, सूर्यभान मेश्राम, सज्जनराव कुडमेथे, हॉफिज पठाण, गजानन भोयर, पारवाचे क्षेत्र सहायक शकील खान, विजय कडू (पहापळ), वाढोणा बीट गार्ड वसंतराव लामतुरे, वैजनाथ बांगर, संजय जिरकर, नरेंद्र मस्के, राजू गोटे, पवन बाजपेयी, विलास पतंगे, गजानन गहुकार, श्रीकृष्ण येसनसुरे, विजय शुक्ला, पाटापांगराचे क्षेत्र सहायक जगदीश पेंदोर यांनी परिश्रम घेतले.
     

साभार :- देशोन्नती 

Tuesday 19 June 2012

प्रा.कमलेश मुणोत अपघातात गंभिर जखमी


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे जेष्ठ प्राध्यापक कमलेश मुणोत यांच्या वाहनाचा नागपुर येथून येतांना अपघात झाला. या अपघातात प्रा. कमलेश मुणोत व त्यांची पत्नी गंभिर जखमी झाले. तर त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. काल (दि.१८) ला रात्री ८ वाजेदरम्यान नागपुर पांढरकवडा मार्गावर वडकी जवळ हा अपघात झाला. ते कुटूंबासह सिंगापुरला सहलीसाठी गेले होते. तिथुन परतल्यावर नागपुरवरून ते घाटंजीकडे येत होते. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचे संतुलन गेले. रस्ता दुभाजकाला धडकल्याने गाडी पलटी झाली. त्यांना गंभिर अवस्थेत सावंगी मेघे येथिल वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून प्रा. मुणोत यांना नागपुरच्या सिम्स रूग्णालयात व त्यांच्या पत्नीला अन्य एका रूग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभिर परंतु स्थिर आहे. प्रा. मुणोत यांनी अनेक वर्ष घाटंजी येथे पत्रकारीतेच्या क्षेत्रातही कार्य केले आहे.



Monday 18 June 2012

अवैध वाहतुकीने घेतला नवयुवकाचा बळी

पारवा पोलीसांच्या नाकर्तेपणाचा परिणाम

पारवा पोलीस स्टेशन हद्दीसह संपुर्ण घाटंजी तालुक्यात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे 
१५ वर्षीय नवयुवकाचा बळी घेतला. आयता येथुन घाटंजीकडे येताना अज्ञात काळी पिवळीने दुचाकीला धडक दिल्याने अभिजीत अशोक खडसे (१५) याचा उपचाराकरीता यवतमाळला नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवक आपल्या मित्राच्या दुचाकीवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घाटंजीकडे येत होता. यादरम्यान पाटापांगरा गावाजवळ काळी पिवळीने दुचाकीला धडक दिली. या भिषण धडकेत जखमी झालेल्या दोन्ही युवकांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले. मात्र अभिजीत याचा रूग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे अपघाताला ६ तास लोटुनही पारवा पोलीसांकडे घटनेची नोंद झाली नव्हती. यावरूनच पोलीस याबाबत किती गंभिर आहेत याची प्रचिती येते. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी अवैध वाहतुकीला खुली सुट दिल्याने प्रवाशी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी नेण्यात येतात. गाडीच्या टपावर व अवतीभवती बिलगुन असलेले प्रवाशी वाहने घाटंजी तालुक्याच्या प्रत्येक रस्त्यावर आढळतात. पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक त्यांचेवर असल्याचे दिसत नाही. घाटंजी व पारव्याच्या बसस्थानकासमोर नेहमीच अवैध वाहतुकदारांचा गराडा असतो. अनेकदा वाहतुक पोलीसांच्या नजरेसमोर बसस्थानक परिसरातून प्रवाशी घेतल्या जातात. मात्र त्याकडे पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहीती आहे. ठाणेदारांकडून जसा आदेश मिळतो त्याचेच पालन करावे लागत असल्याचे एका वाहतुक पोलीसाने खासगीत सांगीतले. अवैध वाहतुकदारांकडून पोलीसांना महिन्याकाठी मिळणा-या मलिद्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला मोकळीक दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असुन यावर वेळीच नियंत्रण न आणल्या गेल्यास यापेक्षाही गंभिर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अवैध वाहतुकीला चालना देणा-या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday 14 June 2012

वन्यजीव संरक्षण कायदा धाब्यावर बसवुन होतात सापांचे खेळ

वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष





वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये साप व तत्सम जीवांना पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे, खेळ करणे हा गंभिर गुन्हा आहे. मात्र असे असले तरी घाटंजी तालुक्यातील विवीध भागांमध्ये दुर्मीळ जातीच्या सापांचे खेळ करण्याचा प्रकार हल्ली चांगलाच फोफावला आहे. वनविभाग, पोलीस यंत्रणा यासह वन्यजीवप्रेमींचेही  याकडे दुर्लक्ष होत आहे. घाटंजी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या सापांचा खेळ करण्याचा प्रकार नित्यनेमाने सुरू आहे. विशेष म्हणजे असे खेळ करतांना चिमुकल्या बालकांचाही वापर होत असुन या लहान मुलांच्या हातात साप देऊन लोकांना खेळाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.
नाग, धामण, पाणदिवड यासह विवीध जातीच्या सापांचा खेळात उपयोग केल्या जातो. हा खेळ करणा-यांना सापांविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते हाताळतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतल्या जात नाही. कापडी पिशव्यांमध्ये सापांना कोंबुन ठेवल्या जाते. त्यामुळे अनेकदा साप चार दोन दिवसातच दगावतात. सापांच्या खेळामध्ये चिमुकल्या मुलांचा वापर करण्याचा प्रकारही वाढ़ल्याने साप हाताळताना या मुलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या बालमजुरी विरोधातील अभियान सुरू आहे. मात्र भर चौकामध्ये लहान बालकांचा जीवघेण्या प्रयोगामध्ये उपयोग होत असतांना यंत्रणा मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे अभियान केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसुन येत आहे. 
वन्यजीवांचे संरक्षण व्हावे व त्यांचे कुठेही खेळ अथवा प्रदर्शन होऊ नये यासाठी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये साप व अन्य वन्यजीवांना पकडून त्यांचे प्रदर्शन करणा-यांवर गुन्हा दाखल करता येतो. या कायद्याचे पालन व्हावे याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन, वनविभाग व पोलीस यंत्रणेवर असते. मात्र याबाबत कोणीही गंभिर असल्याचे आढळत नाही. अनेकदा काही जागरूक नागरीक असे खेळ सुरू असतांना वनविभागाला कळवितात मात्र वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनाच या कायद्याबाबत पुरेशी माहीती व गांभिर्य नसल्याने या कायद्याचे खुलेआम उल्लंघन होते. गेल्या काही वर्षात या कायद्यान्वये वनविभागाने तालुक्यात अपवादात्मक स्थितीतही कुणावर गुन्हा दाखल केल्याचे ऐकीवात नाही. नागरीकांनीच याबाबतीत सतर्क राहुन वन्यजीवांचे खेळ सुरू असल्यास वनविभाग अथवा पोलीसांना कळवुन कार्यवाही करण्यास भाग पाडण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

दहावीच्या निकालात घाटंजी तालुका जिल्ह्यात अव्वल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेच्या निकालात घाटंजी तालुक्याने ७०.७४ टक्के सरासरी निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. 
यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी १ हजार ६९६ नियमित व ३३५ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६९२ नियमित व ३३५ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी परिक्षेला बसले. यामधुन १ हजार २७१ नियमित व १६३ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ७५.१२ टक्के असुन सरासरी टक्केवारी ७०.७४ टक्के आहे. 
तालुक्यातून रा.चि.उपलेंचवार विद्यालय आमडी या शाळेचा सर्वाधीक ९६.५५ टक्के निकाल लागला असुन शिवाजी माध्यमिक विद्यालय देवधरी या शाळेचा सर्वात कमी ९.९ टक्के निकाल लागला आहे.
समर्थ विद्यालयातील सुजाता वसंत शेलुकार हिला ९४.९१ टक्के गुण मिळाले आहेत. याच विद्यालयातील शिवाणी विजय पातालबंसी हिला ९०.३७ टक्के व माधुरी शंकर डंभारे हिला ९० टक्के गुण मिळाले आहेत. 
तालुक्यातील ईतर शाळांचा निकाल खालील प्रमाणे आहे. शि.प्र.मं.विद्यालय घाटंजी ७३.३३ टक्के, श्री समर्थ विद्यालय घाटंजी ६३.३७ टक्के, शि.प्र.मं.कन्या शाळा घाटंजी ५८.६५ टक्के, बा.दे.विद्यालय पारवा ७७.०२ टक्के, वसंत आदिवासी विद्यालय पार्डी नस्करी ७८.४३ टक्के, बा.दे.विद्यालय शिरोली ६३.४१ टक्के, शासकीय आश्रमशाळा झटाळा ६८.०९ टक्के, जगदंबा विद्यालय सायतखर्डा ८६.९६ टक्के, शासकीय आश्रमशाळा जांब ५५.१० टक्के, कै.मंजी नाईक विद्यालय किन्ही ९२.३१ टक्के, न.प.उर्दू विद्यालय घाटंजी ६४.७१ टक्के, बा.दे.विद्यालय कुर्ली ६८.५७ टक्के, विवेकानंद विद्यालय पांढुर्णा ९२.४२ टक्के, म.ज्यो.फुले विद्यालय एरंडगाव ६७.४४ टक्के, कै.माधवराव नाईक विद्यालय शिवणी ६९.२३ टक्के, कै.किसनसिंग सिद्धु विद्यालय राजुरवाडी ४८.०८ टक्के, मनोहर नाईक विद्यालय मोवाडा ५६.८६ टक्के, बा.दे.विद्यालय साखरा ८२.२६ टक्के, कै.किसनसिंग सिद्धु विद्यालय सावरगाव ७६ टक्के, गुरूदेव आश्रमशाळा चांदापुर ७१.८८ टक्के, श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालय घोटी ७५ टक्के, आदर्श विद्यालय ताडसावळी ९१.६७ टक्के, मजीद पटेल उर्दू विद्यालय चिखलवर्धा ८१.८२ टक्के, शासकीय आश्रमशाळा कारेगाव ८३.३३ टक्के, आबासाहेब देशमुख पारवेकर आश्रमशाळा जरूर ९१.६७ टक्के, जिजाऊ आश्रमशाळा खापरी ५० टक्के, शासकीय आश्रमशाळा मोवाडा ४४.४४ टक्के, शासकीय आश्रमशाळा रामपुर ८६.६७ टक्के, दत्त माध्यमिक विद्यालय अंजी ८१.८२ टक्के, श्री. गजानन महाराज विद्यालय कोळी ८०.४९ टक्के.
शहरी भागातील शाळांपेक्षा ग्रामिण भागातील शाळांचा निकाल चांगला लागला असुन कॉपी सेंटर म्हणुन कुप्रसिद्ध असलेल्या काही शाळांचा निकालही घसरला आहे.
साभार :- देशोन्नती 

Friday 8 June 2012

पारवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तिव्रता दडपण्याचा प्रयत्न

सव्वा लाखांची चोरी ७२ हजारात दडपली
ठाणेदार वंजारेंचा मनमानीपणा
पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात झालेल्या १ लाख ३१ हजार रूपयांच्या चोरीची तक्रार घेताना केवळ ७२ हजार रूपयांचीच चोरी झाल्याची नोंद घेणा-या ठाणेदार पंजाब वंजारेंची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची तिव्रता कमी करून  बर्किंगचे प्रकार वाढल्याचे या घटनेतून प्रकर्षाने दिसुन येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वघारा येथिल रहिवासी शेख मोईन शेख हुसेन हे एका कौटूंबीक कार्यक्रमानिमित्य ३ दिवस बाहेरगावी गेले होते. दि.२८ मे रोजी घरी परत आल्यावर घराचे कुलूप तुटून होते, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाट फोडून लॉकरमधील ३५ हजार रूपये रोख, मोबाईल तसेच आणखी दुस-या कपाटातील ९३ हजार रूपये असा एकुण १ लाख ३१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. वघारा हे गाव पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तक्रारकर्ते चोरीची फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. तोंडी तक्रारीवरून फिर्याद दाखल करतांना ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या सांगण्यानुसार संबंधीत कर्मचा-याने तक्रारीत केवळ ७२ हजार रूपयेच चोरीस गेल्याचा उल्लेख केला. तक्रारकत्र्यांनी वारंवार सांगीतले की, आमच्या घरी १ लाख ३१ हजार रूपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे तेवढीच रक्कम तक्रारीत नोंद करा. मात्र आपल्याच गुर्मीत वावरणारे ठाणेदार वंजारे यांनी तक्रारकर्त्यांना ‘तुम्हाला काही समजत नाही, आम्ही बरोबर करतो, तुम्ही चुप बसा’ असे बजावले. त्यानंतर एकदा घरी येऊन थातुरमातुर चौकशी केली. मात्र अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना यश आलेले नाही. गेल्या काही कालावधीत पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या अनेक घटना झाल्या असुन बहुतांश घटनांमधील आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाही. जवळजवळ प्रत्येक घटनेमध्ये गुन्ह्याची तिव्रता कमी करण्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये वाढला आहे.
चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी बोलाविण्यात येणा-या श्वानपथकासाठी खर्च लागतो असे कारण देऊन फिर्यादींकडून पैसे उकळल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे.
ठाणेदार पंजाब वंजारे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आश्रय देण्याच्या कार्यपद्धतीमुळे पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय बळावले आहेत. त्यामुळे ठाणेदार वंजारेंची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार :- देशोन्नती 

तालुका कृषी अधिकारी घुलेंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी. चौकशी करा

घाटंजीत शेतक-यांच्या धरणे आंदोलनातील मागणी



येथिल तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांनी केलेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी घाटंजी तहसिल कार्यालयासमोर शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भ जन आंदोलन समितीचे मोरेश्वर वातिले यांचे नेतृत्वात तहसिलदारांना विवीध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना वातिले यांनी तालुका कृषी अधिकारी पी.पी.घुले यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर सडकुन टिका केली. ज्या कार्यालयात शेतक-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकारी कर्मचा-यांनी तत्पर राहावयास हवे तिथे नेहमीच शेतक-यांना अपमानास्पद वागणुक दिल्या जाते. तसेच शासनातर्फे शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या बहुतांश योजना घाटंजी तालुक्यात कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कृषी विस्तारासाठी साहाय्य देण्यासाठी असलेल्या ‘आत्मा’ या योजनेत शेतक-यांना लाभ देतांना लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणीच झालेली नाही असे वातिले यांनी यावेळी सांगितले. घाटंजीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अधिका-यांच्या आशिर्वादाने वावरणा-या एजंटांच्या माध्यमातूनच संपर्क करावा लागतो. अन्यथा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येते. राजकीय पुढा-यांच्या चेल्याचपाट्यांना पात्र नसतांनाही योजनांचे लाभ दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पी.पी.घुले यांच्या घाटंजी तालुक्यातील कार्यकाळा दरम्यानच्या कारभाराची सि.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावुन धरली. जयवंत भोयर, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, राजु राठोड, संदिपसिंग ढालवाले, यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. कृषी विभागाने शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, योजना राबवितांना ग्रामसभेच्या ठरावामध्ये मंजुर कराव्या अशा विवीध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांच्या कार्यालयासमोर ५ जुलै पासुन आमरण उपोषण करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात  किरण जवादे, विष्णु कोरवते, अमरदिपसिंग ढालवाले, संदिप खवास, रमेश पडलवार, अमोल पडलवार, विकास धुर्वे, अरूण कुडमते, लक्ष्मण आत्राम, अमुत करमनकर, अरूण सिडाम यांचेसह अनेक शेतक-यांनी सुमारे तिन तास धरणे दिले.

साभार :- देशोन्नती